Wednesday, January 26, 2022

 नांदेड जिल्ह्यात 611 व्यक्ती कोरोना बाधित

तर 602 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 684 अहवालापैकी 611 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 517 तर अँटिजेन तपासणीद्वारे 94 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 44 एवढी झाली असून यातील 93 हजार 174 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 206 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे धनेगाव नांदेड येथील 70 वर्षाचा एक पुरुष, हडको येथील 77 वर्षाचा पुरुष, हदगाव तालुक्यातील नेवरी 63 वर्षाची महिला, हदगाव येथील 62 वर्षाच्या पुरुषाचा मंगळवार 25 जानेवारी 2022 रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 664 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 327, नांदेड ग्रामीण 57, भोकर 10, देगलूर 2, धर्माबाद 2, कंधार 6, हदगाव 1, किनवट 46, लोहा 15, मुदखेड 2, मुखेड 15, हिमायतनगर 2, औरंगाबाद 2, अर्धापूर 3, बिलोली 3, नायगाव 2, माहूर 6, परभणी 4, हिंगोली 5, यवतमाळ 2, अकोला 1, आदिलाबाद 2, पंजाब 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 17, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 3, बिलोली 15, देगलूर 2, धर्माबाद 10, हदगाव 2, किनवट 17, मुखेड 14, नायगाव 12, उमरी 1 असे एकुण 611 कोरोना बाधित आढळले आहे.  

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 470, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 110, खाजगी रुग्णालय 12, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, हदगाव कोविड रुग्णालय 4 असे एकुण 602 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.  

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 36, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 159,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 968, किनवट कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 38 असे एकुण 4 हजार 206  व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 37 हजार 35

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 21 हजार 890

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 44

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 93 हजार 174

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 664

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.13 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-30

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-49

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 206

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3. 

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

 उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी

सूक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2021 या वर्षासाठी सोमवार 28 फेब्रुवारी 2022 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे.  

उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योगांना पुरस्कार दिले जातात. सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे 15 हजार व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.  

जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या वेळी, उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी पासून उद्योग आधार व एमएसएमई डेटा बँक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कमीतकमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकांना यापूर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे.  

नांदेड जिल्ह्यातील लघु उद्योजकांनी सोमवार 28 फेब्रुवारी 2022 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित

रोजगार मेळाव्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन 

नांदेड (जिमाका), दि. 26 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेडच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. जयश्री पावडे, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, कौशल्य विकासचे सहायक संचालक रेणुका तम्मलवार आदी उपस्थित होते. 

या रोजगार मेळाव्यात एकुण 32 नामांकित कंपन्यांमध्ये एकुण 3 हजार 550 रिक्त पदांची ऑनलाईन भरती होणार असल्याची माहिती रेणुका तम्मलवार यांनी दिली. दिनांक 26 ते 29 जानेवारी असे तीन दिवस ऑनलाईन रोजगार मेळावा सुरू राहणार आहे.

0000



 मानवतेच्या मूल्याशी अधिक कटिबद्ध होऊ यात

- पालकमंत्री अशोक चव्हाण 


·         भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

·         आरोग्याच्या सेवेसाठी नाविन्यपूर्ण योजनांचा जिल्ह्यात प्रभावी वापर

·         कृषी पंप विज जोडणी धोरणाचा शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ

नांदेड (जिमाका), दि. 26 :- स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व घटना समितीतील सदस्यांनी आपल्या भारतीय राज्यघटनेचा पाया मजबूत केला आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात हजारो जाती, जमाती, अनेक धर्म, पंथ गुण्यागोविंदाने अनादी काळापासून एकत्र राहत आले आहेत. आपल्या संस्कृतीतील मानवतेचे जे मूल्य आहे तेच भारतीय राज्यघटनेने व्यापक प्रमाणात अधोरेखीत केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.  

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. जयश्री पावडे, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, स्वातंत्र्य सैनिक व निमंत्रीत नागरिक उपस्थित होते. यावेळी  पालकमंत्रयांच्या हस्ते उल्लेखनिय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाल्या बद्दल पोलिस उपनिरिक्षक मिर्झा अनवर बेग यांचा सत्कार करण्यात आला. 

भारतीय स्वातंत्र्यातील मानवतेचे मूल्य इथल्या जनमाणसात रुजल्याने विकासाच्या प्रक्रियेला लोकसहभागाचे अधिष्ठान आपण देऊन शकलो हे आपल्या प्रजासत्ताकाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ज्या ठिकाणी लोकसहभाग अधिक भक्कम असल्याचे आपण पाहतो, त्याठिकाणी विकासाची व्याप्ती ही मोठी असते. विकासाची ही संकल्पना अधिक भक्कम करण्याचे कार्य महाविकास आघाडी शासन करीत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जय जवान जय किसान हा नारा दिवंगत पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी दिला. यातून  शेतकऱ्यांच्या मनात मोठा विश्वास निर्माण झाला. कै. वसंतराव नाईक यांनी कृषिक्रांती तर स्व. शंकरराव चव्हाण यांनी जलक्रांतीसाठी दिलेल्या योगदानाने कोरडवाहू क्षेत्रालाही हक्काचे पाणी मिळू शकले. असंख्य योजना ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनातर्फे राबविल्या जात आहेत. काळानुरूप या योजनांमध्ये बदल करून त्याला नवतंत्रज्ञानाची जोडही दिली आहे. शेतीसमवेत ग्रामीण भागात शिक्षणाच्या सेवा-सुविधाही अधिक भक्कम कशा होतील याचे नियोजन आपण करीत असल्याचे ते म्हणाले. 

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा अधिक विचार करून कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 ही योजना जाहीर केली आहे. या योजनेत कृषी पंप वीज ग्राहकांना तात्काळ वीज कनेक्शन देणे आणि दिवसा वीज पुरवठा करणे नियोजित आहे. या योजनेत संपूर्ण विलंब आकार माफ करून वीज बिलात 66 टक्के पर्यंत वीजबिल माफीची सवलत देण्यात आलेली आहे. या योजनेमधून  शेतकऱ्यांचे वीज बिल कोरे करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. या योजनेत नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

आरोग्याच्या या संकटाशी सामना करतांना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत व सेवा-सुविधेत कोणतीही कमतरता पडणार नाही याची खबरदारी आपण घेतली. श्री गुरू गोबिंद सिंघजी शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये अद्ययावत सिटी स्कॅन मशीन, अद्ययावत कोविड-19 वार्ड, नांदेड जिल्ह्यात 14 मॉड्युलर ऑपरेशन थेअटर, जिल्ह्यातील सर्व भागांना आरोग्य सुविधेशी जुळता यावे या उद्देशाने 62 नवीन रुग्णवाहिकांची खरेदी, प्रत्येक तालुक्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता एक्सरे मशीन्स, महिला रुग्णालय येथे अद्ययावत सोनोग्राफी कक्ष, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे अद्ययावत कोविड अतिदक्षता बालरोग कक्ष, मिशन स्वास्थ अंतर्गत क्रीडा सुविधांवर भर, नाविन्यपूर्ण योजना व लोकसहभागातून महसूल कॉलनी येथे 3 सिंथेटिक टेनिस कोर्ट, जिल्हा क्रीडा संकुल येथे अत्याधुनिक 3 बॅडमिंटन कोर्ट, जिल्ह्यात शासकीय कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या खुल्या जागेत ओपन जीम, नांदेड क्लब येथे हेरीटेज रोड, पाच नगरपरिषदांकरीता अत्याधुनिक अग्निशमन वाहन, जिल्ह्यातील रुग्णालय, मनपा व नगरपरिषदांमध्ये विकेंद्रीत मलनिस्सारण केंद्राची उभारणी, नियोजन भवन येथे विविध बैठका, परिषदा यादृष्टिने व्हिडिओ कॉन्फरन्सकरीता डिजिटल एलईडी डिस्पले, सहस्त्रकुंड येथे मेगा ॲडव्हेन्चर स्पोर्ट यावर आपण भर दिला असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या विकासाला आवश्यक असणाऱ्या समृद्धी महामार्गापासून नांदेड व शेजारी जिल्ह्यातील काही भाग वंचित राहत असल्याची बाब मी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. या महामार्गाला जोडण्यासाठी नांदेड ते जालना पर्यंतच्या नव्या महामार्गाच्या कामाला त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत मंजूरी दिली. या महामार्गाचे काम येत्या दोन वर्षात युद्ध पातळीवर पुर्ण करता यावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  यांच्या भूसंपादनासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यावरील होणाऱ्या पुलांची कामे अत्याधुनिक पद्धतीने व्हावेत, सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर कसा करता येईल यावर आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. 

नांदेडच्या प्रशासकीय कामासाठी जे एकत्रित संकुल अत्यावश्यक आहे, त्याचेही नियोजन आम्ही केले आहे. कौठा येथील सुमारे 100 एकर जागेवर हे संपूर्ण प्रशासकीय संकुल एकाच भागात आकारास येणार  असल्याने नागरिकांनाही आता ते अधिक सोयीचे होईल.  नांदेड शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी सुमारे 700 कोटी निधीची तरतूद केली असून या कामाचा शुभारंभही केल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

यावेळी परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली. 

00000





  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...