Sunday, March 31, 2019


प्रचार व प्रसार माध्‍यमांचा प्रचारासाठी
गैरवापर करणाऱ्यांवर जिल्‍हा प्रशासनाची करडी नजर

नांदेड,दि. 31 :- जिल्‍हा माध्‍यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कक्षात जिल्‍हा प्रशासनाने प्रसार माध्‍यमांद्वारे प्रचारासाठी गैरवापर होवू नये. यासाठी जिल्‍हा माध्‍यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमार्फत करडी नजर ठेवण्‍यात येत आहे. आदर्श आचार सहिंतेचा भंग होवू नये यासाठी प्रचार व प्रसार माध्‍यमांचा प्रसारासाठी गैरवापर करणा-यावर तसेच विनापरवानगी प्रचार करणा-यावर कार्यवाही करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी भेटी दरम्‍यान दिले.
या दरम्‍यान जिल्‍ह्यात वर्तमानपत्रामध्‍ये येणा-या बातम्‍या, वृत्‍त, लेख तसेच समाजमाध्‍यमांतील व्‍हॉट्स अप ग्रुपवरील विनापरवानगी पोस्‍ट, मोबाईलद्वारे एसएमएस, बल्‍क एसएमएस अथवा प्रचार करणा-या तसेच सेवा पुरवविणा-या एजन्‍सीना यावेळी नोटीसा बजावल्‍या आल्‍या असून यासंदर्भात कारवाईचे निर्देशही त्‍यांनी समिती सदस्‍यांना यावेळी दिले.
तसेच विविध भाषेतील ऊर्दू, हिंदी, इंग्रजी या माध्‍यमातील दैनंदिन वृत्‍त अहवालाची तपासणी केली. मिडिया कक्ष स्थित स्‍थानिक वृत्‍त वाहिन्‍यांसह विविध वृत्‍त वाहिन्‍यांवरुन प्रसारित झालेल्‍या बातम्‍यांचाही यावेळी आढावा घेण्‍यात आला.  
उमेवारांचे फेसबुक, व्टिटर, इन्‍स्‍टाग्राम, युट्युब, व्‍हॉट्स अप या समाज माध्‍यमातून आक्षेपार्ह मजकूर अथवा ऑडिओ, व्हिडीओ क्लिप, संदेशातील मजकूर यासंदर्भात समितीने दैनंदिन अहवाल सादर करण्‍याच्‍या सुचनाही जिल्‍हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी सुचना केल्‍या.
यावेळी उपजिल्‍हाधिकारी निवडणूक प्रशांत शेळके, जिल्‍हा प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्‍हाण, माहिती अधिकारी तथा सदस्‍य सचिव श्रीमती मीरा ढास, प्रा. डॉ दीपक शिंदे समिती सदस्‍यांची उपस्थिती होती. मिलिंद व्‍यवहारे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
0000


वृत्त क्र. 253
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
18 एप्रिलला मतदानाच्या दिवशी
भरणारे आठवडी बाजार बंद राहणार
नांदेड, दि. 31 :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हदंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केले आहेत.   
जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी नांदेड, हिंगोली व लातूर या लोकसभा मतदारसंघातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघात गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मतदान दिनांकास जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यास परवानगी दिली आहे.  
गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी आठवडी बाजार भरणाऱ्या गावांची ठिकाणाची नावे पुढील प्रमाणे आहेत. अर्धापूर तालुका – मालेगाव, नायगाव खै.- नायगाव (बा.), भोकर, हदगाव- वाळकी खु, ल्याहारी (वाळकी फाटा), तळणी. किनवट- उमरी बा., बेल्लोरी (धा.). देगलूर- लोणी, बिलोली, मुखेड- बेटमोगरा, राजुरा बु, नांदेड- सिडको, कंधार- कुरुळा, मंगलसांगवी या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 19 एप्रिल 2019 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे.
0000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 31 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 मार्च 2019 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2019 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000


माजी सैनिक आणि आप्‍तस्‍वकीयांसाठी
नांदेड येथे नि:शुल्‍क डोळे तपासणी शिबीर 
नांदेड दि. 31 :-  माजी सैनिक आणि त्‍यांच्‍या आप्‍तस्‍वकीयांसाठी नि:शुल्‍क डोळे तपासणी शिबिर मंगळवार 2 एप्रिल 2019 रोजी सकाळी 9 वाजेपासुन इसीएचएस क्लिनीक नांदेड येथे आयोजित करण्‍यात आले आहे.
या शिबिरात जालना येथील प्रसिध्‍द नेत्र विशारदांच्‍या पथकाव्‍दारे आधुनिक तंत्रज्ञान पध्‍दतीने गरजुंची नेत्र तपासणी करण्‍यात येणार असुन माजी सैनिक आणि त्‍यांच्‍या आप्‍तस्‍वकीयांने मोठया संख्‍येने याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासन आणि मेजर बिक्रम थापा ( सेवानिवृत्‍त) यांनी केले आहे.
00000


उन्हाळ्यात उष्‍णलाटेची तीव्रता निर्माण होण्‍याची शक्‍यता
नागरीकांनी काळजी घ्‍यावी - जिल्‍हा प्रशासनाचे आवाहन  
नांदेड दि. 31 :-  उन्‍हाळयाची सुरुवात यावर्षी लवकरच झाली असुन मार्च ते जून या कालावधीत राज्‍यात उष्‍णतेची तिव्रता निर्माण होण्‍याची शक्‍यता भारतीय हवामान खात्यांनी व्‍यक्‍त केले आहे. या उष्‍णतेच्‍या लाटेपासुन बचाव करण्‍यासाठी नागरीकांनी व परिक्षा कालावधी असल्‍यामुळे विद्यार्थ्‍यांनी योग्‍य ती खबरदारी घ्‍यावी, असे आवाहन नांदेड जिल्‍हा प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.
या उष्‍माघातामुळे शरीराचे तापमान वाढुनन व्यक्ती बेशुद्ध झाल्यास तातडीचे वैद्यकीय उपचार करावे. उष्माघात होऊ नये यासाठी सोबत मोठा पांढरा पंचा आणि डोके झाकेल असा रुमाल, पूर्ण अंगभर शक्यतो सुती कपडे परिधान करावे,कमीत-कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचणे, जवळ पाण्याची बाटली बाळगणे, दर अर्ध्या तासाने दोन-तीन ग्लास पाणी पिणे, अधून-मधून बर्फ न टाकलेले लिंबू पाणी, फळांचे रससपिणे अशा उपायानी उष्माघात टाळता येतो. उष्माघातावरील उपचार शरीराच्या तापमान वाढीच्या कारणावर अवलंबून आहेत.
कडक उन्हामध्ये शरीराचे तापमान वाढल्याची शंका येताच स्वत:च्या रक्षणासाठी सावलीमध्ये बसणे आणि भरपुर पाणी पिणे अशा उपायांनी पुरेसा आराम मिळतो. बाहेरील तापमान चाळीसहून अधिक आणि शरीराचे तापमान चाळीस झाल्यास उष्माघात होतो. प्रखर तापमानात बाहेर उन्हात फिरल्‍याने शरीरातील पाण्याची मात्रा अचानक कमी होते व मृत्यु ओढावतो, कानास फडके न बांधल्‍याने उष्णता मेंदुपर्यंत जाते व व्‍यक्‍ती बेशुध्‍द होते, उपाशी पोटी उन्हात फिरल्‍याने शरीरास साखरेचा / ग्लुकोजचा पुरवठा कमी होतो, अति थंड पाणी पिल्‍याने शरीराच्या तापमानात अचानक बदल होतो. अश्‍यावेळी त्‍वरीत वैद्यकिय उपचार घेणे आवश्‍यक आहे.
कारण नसतांना उन्‍हात न जाणे, भरपुर पाणी प्राशन करने आणि सुती कपडे परिधान करने याद्वारे उष्‍माघात टाळता येतो. नागरीकांना उष्‍माघाताचा रुग्‍ण आढळल्‍यास तात्‍काळ त्‍यास जवळच्‍या रुग्‍णालयात प्रथमोपचारासाठी पाठवावे.
मागील वर्षापेक्षा यावर्षी उन्‍हाळयाची सुरुवात लवकर झालेली असुन उष्‍णतेच्‍या लाटेपासुन कोणत्‍याही प्रकारची जीवित हानी होऊ न देण्‍यासाठी जिल्‍हयातील महानगरपालिका, शासकीय आणि खाजगी आरोग्‍य यंत्रणेशी समन्‍वय साधुन उष्‍णतेच्‍या लाटेपासुन नागरीकांचे बचाव करावयाच्‍या तसेच यंत्रणा सज्‍ज ठेवावयाच्‍या सूचना जिल्‍हा प्रशासनाद्वारे निर्गमित करण्‍यात आल्‍या आहेत. उष्‍णतेची तिव्रता आणि तापमानात अचानक होणा-या  वाढीवर नागरीकांनी व विद्यार्थ्‍यांनी सावधगिरी बाळगावी.
00000



वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...