Monday, March 26, 2018

युवा प्रशिक्षणासाठी सहभागी होण्याचे

जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आवाहन

नांदेड दि. 26 :- युवाच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी 28 मार्च ते 4 एप्रिल 2018 या कालावधील जिल्हा क्रीडा संकुल, श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम परीसर, नविन इनडोअर हॉल नांदेड येथे जिल्हास्तर युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. नांदेड जिल्हयातील पात्र युवक-युवतीनी आपली नावे विहित नमुन्यात क्रीडा कार्यालयास बुधवार 28 मार्च 2018 रोजी सकाळी 11 पर्यंत नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.

भारत हा युवांचा देश म्हणून ओळखला जातो. युवा हा समाजातील अत्यंत महत्वाचा घटक असून समाजाच्या व देशाच्या विकास प्रक्रियेत युवांचा सक्रीय सहीभाग व युवांचे सक्षमीकरण होण्याची गरज आहे. युवामंध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, कौशल्यांचा विकास, स्मरणशक्तीचे नियोजन, समाजिक जाणीवेचे भान असणे आवश्यक आहे. आजच्या जागतिकीकरण व स्पर्धेच्या युगात नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी युवा सक्षमीकरणाची गरज लक्षात घेवून राज्य शासनाने राज्याचे पहिले स्वतंत्र युवा धोरण सन 2012 मध्ये जाहीर केले आहे.

सामाजीक निर्णय प्रक्रिया, संघटनात्मक नियोजन व शैक्षणिक सुधारणा हे युवा सक्षमीकरणाचे प्रमुख घटक आहेत. व्यक्तिमत्व विकास, प्रशिक्षण व कौशल्य विकास, स्वयंरोजगार, राष्ट्रीय एकात्मता पर्यावरण संरक्षण, संविधानाप्रती आदर, युवांचे हक्क आणि कर्तव्य याची जाणीव करुन आदर्श युवक व युवा नेतृत्व निर्माण करण्यासाठी तसेच युवांच्या सर्वांगीण विकास व्हावा हा मुख्य उद्देश घेऊन 28 मार्च ते 4 एप्रिल 2018 या कालावधील जिल्हा क्रीडा संकुल, श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम परीसर, नविन इनडोअर हॉल, नांदेड येथे जिल्हास्तर युवा प्रशिक्षण शिबीरचे आयोजन करण्यात आलेला आहे.

या प्रशिक्षण केंद्राच्यावतीने युवकांच्या सक्षमीकरणासाठी विविध विषयावरील दहा दिवसाच्या प्रशिक्षणात तज्ज्ञचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीरासाठी 15 ते 22 व 23 ते 29 या वयोगटातील युवकांना विविध जीवन कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी 22 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व नेहरु युवा केंद्राकडे नेहरु युवा कर्मी, राष्ट्रीय सेवा योजनेचे 2 कॅम्प पुर्ण केलेले विद्यार्थी युवक-युवती, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी युवक युवती, एम.एस.डब्ल्यू, एम.ए.सायकॉलॉजी, एम.ए.सोशियालॉजी इत्यादी शिक्षण घेत असलेले युवक युवती, स्वयंसेवी संस्था, नोंदणीकृत युवा व महिला मंडळे इत्यादीकडून सामाजिक कार्यात रस घेणारे व आवड असणारे युवक-युवती यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हयातील पात्रता धारण करणा-या युवकांना शिबिरासाठी बोलावण्यात येणार आहे.

जिल्हास्तर युवा प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभानिमित 28 मार्च ते 4 एप्रिल 2018 या कालावधील जिल्हा क्रीडा संकुल, श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम परीसर, नविन इनडोअर हॉल नांदेड येथे निश्चित केले आहे. या प्रशिक्षणात सामाजिक विकासात युवांची भुमिका, युवकांपुढील आव्हाणे, राज्याचे युवा धोरण-2012, व्यवसाय मार्गदर्शन इत्यादी विषयावर चर्चा तसेच तज्ज्ञ व्यक्तिकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी उपस्थित युवकांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

000000


नांदेड जिल्हा कृषि महोत्सवाचा शुभारंभ
शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीसह
कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 26 :- हवामानात बदल होत असून शेतकऱ्यांनी पीक परिस्थितीत बदल करुन सेंद्रीय शेती व कृषिपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
नांदेड जिल्हा कृषि महोत्सवाचे 26 ते 30 मार्च 2018 या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा नांदेड येथील मैदानावर आयोजित केला आहे. या कृषि महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री डोंगरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती बी. आर. कदम, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ भुजबळ, मनोहर शिंदे, किशोर भवरे, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, जिल्हा मार्केटींग अधिकारी रामप्रसाद दांड, नाबर्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेश धुर्वे, ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रविण घुले यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री डोंगरे पुढे म्हणाले की, जिल्हा कृषि महोत्सवात शेतकऱ्यांना शेतीपूरक विविध विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी व नागरीकांनी या कृषि महोत्सवात शासनाच्या विविध योजना व तंत्रज्ञानाची माहिती घेऊन उत्पादनात वाढ करावी. कृषिपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक व आर्थिक मदत केली जाईल. सध्या जिल्ह्यात रेशीम शेती सातशे एकरवर केली जात असून ती पाच हजार एकर पर्यंत वाढवण्याचे प्रयत्न केला जाणार आहे. रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि महोत्सवात शेतीविषयक माहिती घेऊन कृषि उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार यांनी केले. यावेळी बी. आर. कदम, किशोर भवरे यांची समयोचित भाषणे झाली.
या महोत्सवात जिल्ह्यातील कृषि, पुशसंवर्धन, कृषि विज्ञान केंद्र, कृषि पणन मंडळ, जिल्हा मार्केटींग, बियाणे महामंडळ, कृषि उद्योग विकास महामंडळ, जिल्हा रेशीम, पुरवठा, वन, कापुस संशोधन केंद्र, उद्योग, फळरोप वाटिका, जैवीक किड नियंत्रण प्रयोगशाळा, मृद सर्वेक्षण व मृद चाचणी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य, स्वच्छता, मतदान नोंदणी, आधार नोंदणी, महिला व बालविकास, कापूस संशोधन केंद्र, खादी व ग्रामोद्योग, महिला आर्थिक विकास महामंडळ आदि विभागांची दालने असून येथे माहिती दिली जात आहे. तसेच शेतकऱ्यांची कृषि उत्पादने, कृषि साहित्य, महिला उद्योग मंडळ, फुल शेती, ठिंबक आदी 120 दालनांचा यात सहभाग आहे. अनेक दालनावर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. सेंद्रीय धान्य तसेच सुक्ष्म सिंचनाच्या स्टॉलसह शेतकरी माहिती घेतांना आढळून आले.  
जिल्हा कृषि महोत्सवाची सुरुवात दिपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले. सुत्रसंचालन कृषि सहाय्यक वसंत जारीकोटे व संदिप पावडे यांनी केले तर आभार जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी मानले. या कृषि महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचतगटाचे सदस्य, नागरिक, कृषिसह विविध विभागाचे अधिकारी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...