Monday, May 2, 2022

अक्षय्य तृतीया मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

 

अक्षय्य तृतीया  मुहूर्तावर होणारे

बालविवाह थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- अक्षय तृतीयेच्या  मुहूर्तावर शहरासह ग्रामीण भागात बालविवाह लावण्याची काही ठिकाणी पद्धत असते. याला आळा घालण्यासाठी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. बालविवाह हा अजामीन पात्र गुन्हा आहे. अशा विवाहांना आळा घालण्यासाठी व कायदेशिर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता व योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती जिल्हाधिकरी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली.

 

बालविवाह जिल्ह्यात होऊ नये यासाठी महिला व बालविकास संरक्षण  अधिकारी, संबंधित विभाग यांना याबाबत त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बालविवाह जर कुठे आढळून आल्यास नागरिकांनीही पुढे येऊन याबाबत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले.

बालविवाह होऊ नयेत यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम, प्रशिक्षण  इत्यादी  प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात , अशा सूचनाही त्यांनी दिल्या.  

०००००

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- नांदेड जिल्ह्यात बुधवार 4 मे रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 18 मे 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात बुधवार 4 मे रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 18 मे 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 

एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात

आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 2:- जिल्हा रुग्णालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आज एस.जी.जी.एस.अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था विष्णुपुरी नांदेड येथे आरोग्य तपासणी लसीकरण शिबीर घेण्यात आले. या शिबिरात विद्यार्थी कर्मचारी मिळून 65 जणांची आरोग्य तपासणी 40 जणांचे कोविड लसीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमास राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना तिवारी, डॉ. राजाराम कोळेकर व राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. उमेश मुंडे, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थी कर्मचारी यांचे बीपी, शुगर, मौखिक आरोग्य तपासणी केली. तर अधिपरिचारिका जयश्री वाघ, प्रियंका झगडे, कल्पना बटेटेवाड, धनंजय देशमुख  यांनी 40 विद्यार्थी कर्मचारी यांचे कोविड लसीकरण केले.

हे शिबीर संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या शिबिरास एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ. माधव वैद्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे सचिव राहुल गुंडूले रा. से. यो. चे विध्यार्थी प्रशांत दुधमल, ओंकार डोहरे, जुई कदम, हेमंत खांडगावकर यांचे सहकार्य लाभले.

0000

सोयाबीन बियाण्यातील स्वयंपूर्णतेबाबत नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अग्रभागी - जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर

 

         सोयाबीन बियाण्यातील स्वयंपूर्णतेबाबत

           नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अग्रभागी 

                 - जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. २ मे :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बियाणे बाबत केलेल्या नियोजनामुळे आज शेतकऱ्यांनी स्वयंपूर्णता मिळवून इतिहास रचला आहे. कृषी विभागामार्फत यासाठी गावपातळीवर भर दिला जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

कासारखेडा येथे  प्रगतिशील शेतकरी बाबाराव गोविंदराव आढाव यांच्या शेतात आज कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पूर्व तयारी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, कासारखेडा गावच्या सरपंच सुरेखा शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी डॉ.तानाजी चिमनशेटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले , जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख , प्रा. माणिक कल्याणकर, तालुका कृषि अधिकारी नांदेड प्रकाश पाटील आदींची उपस्थिती होती. 

चांगले बी बियाणे शेतकऱ्यांनी तयार करून त्याची उगवण क्षमता तपासून घेतली पाहिजे. घरच्या घरी या गोष्टी करता येणाऱ्या आहेत. मदतीला गावपातळीवर कृषी सेवक, अधिकारी आपल्यासाठी उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गावातील उन्हाळी सोयाबीन लागवड व खरीप हंगामासाठी उपलब्ध सोयाबीन बियाणे बाबत आढावा घेतला. 


शेतीसाठी येणाऱ्या खर्चात बी- बियाणे यासाठी येणारा खर्च वरचेवर वाढत आहे. जे बी -बियाणे आपल्याला पूर्वापार ज्ञानाच्या आधारे जपता येण्यासारखे आहे त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यातूनच शेतकरी आपले बीज स्वातंत्र्य व बियानातील स्वयंपूर्तता प्राप्त करू शकतील असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी व्यक्त केला. "कृषी विभागाचा एकच नारा, बियाण्यामध्ये गाव स्वयंपूर्ण हमारा." असे प्रतिपादन करून त्यांनी  गावातील बियाण्याची गरज गावातच पूर्ण झाली पाहिजे असे सांगितले. 

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी बियाणे बाबतीत केलेल्या नियोजनाबाबत त्यांनी प्रशंसा  करून शेतकऱ्यांना येणाऱ्या  खरीप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड रविशंकर चलवदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून जिल्ह्यामध्ये 7 हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन लागवड झाल्याचे सांगून केलेल्या सोयाबीन बियाणे साठवणूक बाबत माहिती दिली. जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. चिमनशेट्टे यांनी जिल्ह्यामध्ये रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा करणार असल्याचे सांगून, भेसळ बियाणे व खते विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे सूचित केले.


कासारखेडा गावचे कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोगा विषयी प्रात्यक्षिक करीत माहिती दिली. कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी रासायनिक सरळ खतांमधून मिश्र खते तयार करण्या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. माणिक कल्याणकर यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवून बीज प्रक्रियेचे अनन्यसाधारण महत्व विशद केले. डॉ. देविकांत देशमुख यांनी रासायनिक कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी विषयी माहिती देऊन रासायनिक कीटक नाशकांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगितले. 

प्रशिक्षणाचे यशस्वीतेसाठी उमेश आढाव, ज्ञानेश्वर आढाव, तानाजी शिंदे, चंद्रशेखर शिंदे, सोनाजी आढाव, राजाराम शिंदे, दशरथ आढाव, सतिश आढाव, अश्विन कुमार शिंदे, गोपाळ आढाव, पूरभाजी आढाव,राजू हिंगोले, योगाजी देशमुख,आदींनी परिश्रम केले. या कार्यक्रमास कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे सह नांदूसा गावचे उपसरपंच राजू धाडवे, विनायक धडावे, चिखली बू . गावचे  भगवान शेजूळे, प्रकाश जोगदंड, कासारखेडा गावातील ओंकार राहते, किशोर शिंदे, राष्ट्रपाल झिंजाडे, रितेश आढाव, अमन आढाव, मुंजाजी आढाव, शिवम आढाव, बालाजी आढाव, दत्ता आढाव आदींसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. उपस्थित मान्यवर यांनी शेतकरी यांच्या सोयाबीन प्लॉटची पाहणी केली. तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील आभार मानले. हा कार्यक्रम फेसबुकवर लाइव्ह दाखविण्यात आला.


0000

 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...