Thursday, December 15, 2016

लेख क्र. 36

लोकशाही बळकटीकरणात राज्य
निवडणूक आयोगाची महत्त्वपुर्ण भुमिका  
लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांचेही महत्त्व आणि स्थान महत्त्वपुर्ण आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणाची वाटचाल या संस्थांच्या माध्यमातूनच सुरु होते. या संस्थांच्या संवैधानिक निवडणुकांसाठी प्रत्येक राज्यात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. भारतीय संविधानाच्या 73 74 घटना दुरुस्तीनुसार राज्य निवडणूक आयोगांची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दिनांक 26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली. संविधानातील भाग -9 मधील अनुच्छेद 243 ट (243 K) अन्वये ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत व अनुच्छेद 243 यक (243 ZA) नुसार नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याबाबत संवैधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. संविधानातील सदर अनुच्छेदातील तरतुदीनुसार निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन  राज्य निवडणूक आयोग करीत आहे.  
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल, 1994 रोजी  झाली. त्यावेळी राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून डी. एन. चौधरी यांनी 26 एप्रिल 1994 ते 25 एप्रिल 1999 या कालावधीत कामकाज पाहिले. त्यानंतर वाय. एल. राजवाडे यांनी 15 जून 1999 ते 14 जून 2004 पर्यंत. तर नन्दलाल यांनी 15 जून 2004 ते 14 जून 2009 पर्यंत कार्यकाळ पूर्ण केला आहे. पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त म्हणून श्रीमती नीला सत्यनारायण यांनी 6 जुलै 2009 ते 5 जुलै 2014 या कालावधीत कामकाज पाहिले आहे. तर सध्याचे जगेश्वर एस. सहारिया हे 5 सप्टेंबर 2014 पासून ते आजपर्यंत राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. या सर्व आयुक्तांनी राज्य आयोगाच्या कामकाजाबरोबरच निवडणुका पारदर्शक , शांततेत पार पाडण्यासाठी विविध माध्यमातून मतदार जागृती अभियानाद्वारे मतदार, नागरिकांच्या मदतीने राज्य निवडणूक आयोगाची प्रतिमा उंचावण्यात मोलाचे काम केले आहे.  
माजी आयुक्त डी. एन. चौधरी यांच्या कार्यकाळात विधानसभा मतदार यादीचा वापर, विविध अधिनियम, नियम, आदेश व सूचना पारीत करण्यात आल्या आहेत. यातून निवडणुका घेण्याची पध्दती व त्यास कायदेशीर आधार प्राप्त झाला. माजी आयुक्त श्री.राजवाडे यांच्या कार्यकाळात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरण्यास सुरुवात झाली. त्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या पध्दतीत बदल घडून आणण्यात आले आहे. माजी आयुक्त श्री. नन्दलाल यांच्या कार्यकाळात राजकीय पक्षांच्या नोंदणीस सुरुवात करण्यात आली. विविध कायद्यातील तरतुदींबाबत सक्त अंमलबजावणीवर लक्ष देण्यात आले आहे. माजी आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन निवडणुकांचे व्यवस्थापन अत्यंत कार्यक्षमतेने पारदर्शकरित्या पार पाडले. त्यांच्या कार्यकाळात निवडणूक व्यवस्थापन प्रकल्प, मतदार व्हा अभियान, ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित महिला सदस्यांचे सक्षमीकरण करुन आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी क्रांती ज्योतीप्रकल्पातंर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली, मतदारांची गैरसोय टाळण्याकरिता मतदार केंद्रीत सुधारणा, बहुसदस्यीय निवडणूक पध्दतीची यशस्वीपणे अंमलबजावणी, मतदान यंत्रात सुधारणा व अद्ययावतीकरण, कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा नसेल तर मतदारांसाठी नोटाची अंमलबजावणी आणि अनर्ह करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत.
आताचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी नवीन तंत्रज्ञानाद्वारे  निवडणूक कामकाज करण्यावर भर देत आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण संख्या सुमारे 29 हजार आहे. तर या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका लढविणारे उमेदवारांची संख्या सुमारे 3 लाख आहे. हे लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे कामकाज व्यापक आहे. हे व्यापक कामकाज उत्कृष्ट पध्दतीने नियंत्रण व समन्वयाने करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अतिशय महत्वाचे आहे. यासाठी राज्य निवडणूक आयुक्त श्री. सहारिया यांच्या संकल्पनेतून नवीन सॉफ्टवेअर आणि मोबाईल अप्लिकेशनचे विकसन सुरु करण्यात आले आहे. निवडणूक विभागांची गुगलमॅप्स व प्रगणट गटाद्वारे प्रभाग रचना, मतदार यादी संगणकीकृत विभाजन, उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र ऑनलाईन भरुन घेणे, निवडणुकीतील प्रत्येक टप्प्यावरील प्रक्रिया सॉफ्टवेअरद्वारे करण्यावर मोठा भर देण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कामाचे मोठे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राज्य आयोगाच्या कामकाजात योग्यप्रकारे सनियंत्रण होऊ शकणार आहे. याद्वारे आज राज्यातील निवडणुका अधिक पारदर्शक, स्वतंत्र, मोकळ्या वातावरणात होताना दिसत आहेत.
राज्य निवडणुक आयोगाच्या मतदार जनजागृती अभियानामुळे मतदारांना त्यांच्या प्रभागातील कार्यक्षम उमेदवार निवडण्यासाठी मोठी मदत होत आहे. मतदारांनी मतदान केंद्र, मतदार यादीतील नाव, अधिक माहितीसाठी जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद, नगरपंचायत कार्यालयास संपर्क साधावा किंवा https://mahasec.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. लक्षात ठेवा आपलं मत हे आपलं भविष्य आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून टप्पा क्र. 3 मध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, उमरी, हदगाव, मुखेड, बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, देगलूर या नगरपरिषदा व अर्धापूर, माहूर येथील नगरपंचायतीसाठी रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. मतदारांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करणे आवश्यक आहे. मतदान हा लोकशाही प्रणालीला बळकट करणारा घटक आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट करणे आणि मतदान केंद्रात जावून मतदान करणे विसरु नका. मतदान हा सर्वोच्च अधिकार आहे.
              -         संकलन
काशिनाथ र. आरेवार ,
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

000000
महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी
आयुर्वेद महाविद्यालयात तीन मतदान कक्ष
 नांदेड , दि. 15 : - महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2016 साठी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे तीन मतदान कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहेत. निवडणुकीसाठी रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते सायं. 5 या कालावधीत मतदान घेण्‍यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2016 ही प्रत्‍येक जिल्‍ह्याच्‍या मुख्‍यालयी घेण्याबाबत अवर सचिव तथा नि‍वडणूक निर्णय अधिकारी महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-2016 यांनी कळविले आहे.  नऊ सदस्‍यांच्‍या या निवडणकीकरीता एकूण 49 उमेदवार आहेत. महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी झालेले नांदेड जिल्‍ह्यातील एकूण 1 हजार 883 वैद्यकीय व्‍यावसायिक ( एमबीबीएस झालेले डॉक्‍टर्स) या निवडणकीचे मतदार आहेत. ही मतदार यादी प्रबंधक महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद यांचेमार्फत प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. निवडणुकीसाठी 14 अधिकारी-कर्मचारी आणि 4 चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच प्रत्‍येक मतदान कक्षा करीता 2 पोलीस कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

00000
कर्मचाऱ्यांचा माहितीकोषाबाबत
सांख्यिकी कार्यालयाचे आवाहन
 नांदेड , दि. 15 : -  जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्यासाठी शासन निर्णयानुसार जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने कार्यवाही सुरु केली आहे. त्यासाठी नियोजन विभागाच्या 3 डिसेंबर 2016 रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी लॉगइन आयडी व पासवर्ड त्वरीत उपलब्ध करुन घ्यावीत, असे आवाहन सांख्यिकी कार्यालायाने केले आहे.
कार्यालयांनी ही सर्वकंष माहिती वेळेत सादर करणे आवश्यक आहे. संबंधित सर्व कार्यालयांनी जानेवारी ते मे 2017 या महिन्यातील वेतन देयकासोबत जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय वेतन देयके पारित होणार नाहीत याची जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी चं. प कोंडेकर यांनी केले आहे.

0000000
नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीत
दारु विक्री बंदचे आदेश
 नांदेड , दि. 15 : - जिल्ह्यातील धर्माबाद, उमरी, हदगाव, मुखेड, बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, देगलूर नगरपरिषद व अर्धापूर, माहूर येथील नगरपंचायत क्षेत्रात हद्दीतील मतदान होत असलेली गावे मतदानाच्या अगोदरचा दिवस शनिवार 17 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस व मतदानाच्या दिवशी रविवार 18 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस तसेच मतमोजणी होत असलेल्या मुख्यालय ठिकाणी सोमवार 19 डिसेंबर 2016 रोजी मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत दारु विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी काढले आहेत.
निवडणुकी संदर्भात होत असलेली मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भयपणे व शांततेत पार पडावे तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंद वह्या इत्यादी ) नियम 1969 मधील नियम 9 (अ) मधील उपनियम (2) मधील खंड (सी) उपखंड-2 अन्वये तसेच महाराष्ट्र देशी दारु नियम 1973 च्या नियम 26 मध्ये पोटनियम (1) मधील खंड सी (1) अन्वये व महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडी झाडे (छेदणे) नियम 1968 च्या नियम 5 अ च्या उपनियम (1) अन्वये मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील मतदान होत असलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

000000
मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद
नांदेड , दि. 15 : -  मार्केट ॲड फेअर ॲक्ट, 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी  धर्माबाद, मुदखेड व बिलोली या तीन नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या हद्दीत रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी ज्या गावी , ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरतात ते बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या गावचे, ठिकाणाचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार 19 डिसेंबर रोजी भरविण्यात यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.

000000
ध्वजदिन निधी संकलनातून सैन्यदलाप्रती
कृतज्ज्ञता व्यक्त करण्याची संधी – जिल्हाधिकारी काकाणी
निधी संकलनास सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 15 :- ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम म्हणजे भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. त्यामुळे या निधीस विविध घटकांनी सढळ हाताने मदत करावी , असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे केले.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2016-17 च्या संकलनाचा प्रारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. काकाणी बोलत होते. नांदेड जिल्ह्यासाठीचे गतवर्षीचे निधी संकलनाचे उद्दीष्ट 108 टक्क्यांनी पुर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी निधी संकलनात योगदान देणाऱ्या विविध कार्यालय प्रमुखांनाही यावेळी गौरवण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर व्ही. व्ही. पटवारी, मेजर बी. जे. थापा, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, प्रा. देवदत्त तुंगार यांच्यासह जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, सैनिकांचे नातेवाईक, नागरीक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी माजी सैनिकांच्या मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणजे भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनाचा आजचा हा दिवस म्हणजे सैन्यदलाबाबत समाजमनाला जागृत करण्याचा प्रयत्न आहे. नांदेड जिल्ह्यातून सैन्य भरतीत तरूणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी नुकताच मोठ्या स्वरुपात नांदेड येथे सैन्य भरती मेळावा झाला. त्यासाठी विविध घटकांनी उत्कृष्ट योगदान दिल्याचेही श्री. काकाणी यांनी नमूद केले. तसेच सैन्य दलातील भरतीसाठी प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच जिल्ह्यात विविध घटकांच्या सहभागाद्वारे विशिष्ट असा कल्याण निधी उभारण्याचाही प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे म्हणाले की, महाराष्ट्राला थोर विरांची आणि शौर्याची परंपरा आहे. सीमेवर आणि अंतर्गत सुरक्षेसाठी महाराष्ट्रातील विरांनी अलौकीक असे बलिदान केले आहे. त्यांच्याप्रती आपल्याला सदैव कृतज्ज्ञता रहावे लागेल.
सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले, तसेच अमर जवान प्रतिमेस पुष्पांजली वाहण्यात आली. त्यानंतर शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली, तसेच बिगूलच्या धुन वादनाद्वारे मानवंदनाही देण्यात आली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर पटवारी यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यातील शहीद वीर जवानांच्या वीरमाता, वीरपिता तसेच वीर पत्नींचा, कुटुंबियांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. माजी सैनिकांना तसेच त्यांच्या पाल्यांना शैक्षणीक शिष्यवृत्त्यांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांचाही यावेळी पारितोषीक, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात ध्वजदिन निधीच्या संकलनाचे उद्दीष्ठ पुर्ण करणाऱ्या कार्यालय प्रमुखांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व प्रोत्साहनपर बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी श्री. काकाणी आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजदिन निधींच्या ध्वजांचे वितरण करून, निधी संकलनासही प्रारंभ करण्यात आला. निधी संकलनाचे उद्दीष्ट पुर्ण केल्याबद्दल नांदेड जिल्ह्यासाठीचे प्रशस्तीपत्र व मानचिन्ह कॅप्टन पटवारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांना सुपूर्द करण्यात आले. नायब तहसिलदार मकरंद दिवाकर यांनी सुत्रसंचालन केले. डी. पी. झगडे यांनी आभार मानले. जिल्हा सैनिक कल्याण संघटक कमलाकर शेटे व श्री. देशपांडे आदींनी कार्यक्रमांचे संयोजन केले. याप्रसंगी विविध कार्यालयांचे प्रमुख तसेच अधिकारी-कर्मचारी आदींचीही उपस्थिती होती.

000000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...