Saturday, March 24, 2018


समाज विघातक कृत्याविरोधातमहामित्रने ढाल बनून काम करावे
राज्यस्तरीय सोशल मिडिया महामित्र सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे आवाहन

           
मुंबई, दि. 24 : माहितीच्या स्फोटाच्या युगात सकारात्मक ज्ञानाचा अभाव राहू नये यासाठी सोशल मिडिया महामित्र यांनी समाज विघातक कृत्याविरोधात ढाल बनवून काम करावे. त्या माध्यमातून सकारात्मक, सक्षम महाराष्ट्र घडवू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्यस्तरीय सोशल मिडिया महामित्र सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवासन, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह,  लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर, लोकमत न्यूज 18 चे संपादक डॉ. उदय निरगुडकर, उद्योगपती दिपक घैसास, मिलिंद कांबळे, हिवरे बाजारचे सरपंच  पोपटराव पवार, अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, स्पृहा जोशी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप लोखंडे, अनुलोमचे अतुल वझे यावेळी उपस्थित होते.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र शासन (Govt of Maharashtra)या जिओ चॅट चॅनलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी लोकार्पण करण्यात आले.
             हल्ली सोशल मिडियाच्या माध्यमातून माहितीचा स्फोट होतो. मात्र त्यात ज्ञानाचा अभाव असल्याने त्यातून वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. सोशल मिडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेता या माहितीच्या स्फोटातून निर्माण होणारी नकारात्मकता मिटविण्यासाठी सोशल मिडियाच्याच माध्यमातून सकारात्मक संदेश पसरविण्याचे काम महामित्रच्या माध्यमातून झाले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
           
सोशल मिडियावर प्रत्येकाला अभिव्यक्ती व्यक्त करण्याचे अमर्यादा स्वातंत्र्य आहे. मात्र त्याचा अतिरेक देखिल होता कामा नये. माझे स्वातंत्र्य अमर्याद आहे, पण कुठपर्यंत हवी ती शेजाराच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येऊ देणार नाही इथपर्यंत, अशी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची संकल्पना स्पष्ट करुन मुख्यमंत्री म्हणाले की, 21 व्या शतकामध्ये डेटाहे सर्वात मोठं भांडवल असणारा आहे. भविष्यात एखाद्याची श्रीमंती मोजण्यासाठी या डेटाच्याच माध्यमातून ती मोजली जाईल, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, सोशल मिडियाचा सकारात्मक वापर करुन समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. आज या ठिकाणी उपस्थित असलेले 300 महामित्र हे सोशल मिडियावरील समाजसेवक आहे, असा सार्थगौरव मुख्यमंत्र्यांनी  यावेळी केला.
            महामित्र समाजात परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सकारात्मकतेतून नवीन समाजाची निर्मिती करण्याचे काम करीत असताना समाज विघातक कृत्याविरोधात महामित्र ढाल म्हणून काम करतील. सकारात्मक काम करणारी ही सेना असल्याचा गौरव मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
            हल्ली खोट्या प्रचाराच्या माध्यमातून सामाजिक स्वाय्थ्य बिघडविण्याचे काम केले जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन  यूवक समाज विरोधी भूमिका काही वेळेला घेतात. हे यूवक अचानक असे का वागतात याचा विचार झाला पाहीजे. ज्या सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हाईट कॉलर गुन्हेगारी वाढत आहे. त्या विषयी समाज जागृती करण्यासाठी त्याच सोशल मिडियाच्या माध्यमातून काम झाले पाहीजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
          राज्य शासन अनेक लोकोपयोगी योजना तयार करते. मात्र लोक सहभागाशिवाय त्याची यशस्वी अंमलबजावणी शक्य नाही. त्यामुळे महामित्र ने अशा लोकोपयोगी योजनांचा प्रसार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील 100 टक्के ग्रामपंचायतींपर्यंत फायबर ऑप्टीकल पोहोचून कनेक्टीविटी देण्याचे काम मार्च पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचे सांगत रिअल टाईम कम्युनिकेशनच्या माध्यमातून ग्रामीण विकास साध्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

            यावेळी माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह यावेळी म्हणाले की, सोशल मिडियावरील नकारात्मकता घालविण्यासाठी महामित्र हे महाराष्ट्राची सकारात्मक ऊर्जा म्हणून काम पाहते. गेल्या महिन्याभरात महामित्र ॲपच्या माध्यमातून 85 हजार महामित्र यांनी नोंदणी केली असून यासाठी जिल्ह्या-जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. देशातील क्रमांक एकचे ॲप म्हणून महामित्रचा गौरव झाला असून महाराष्ट्राच्या सकारात्मक उभारणीसाठी महामित्र उपयुक्त ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
            जिल्ह्यांमध्ये महामित्र संवादसत्र घेण्यात आले. आज राज्यस्तरीय सोहळ्यानिमित्त 9 गटांमध्ये चर्चा करण्यात आली. त्यातील महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करताना शिक्षण तज्ज्ञ दिलीप टिकले यांनी सांगितले की, सकारात्मक ऊर्जा महामित्र यांच्यामध्ये दिसून आली असून चर्चेच्या केंद्रस्थानी विश्वासार्हता या शब्दाभोवती चर्चा होती. त्यासोबतच डिजिटल इंडिया योजना सोप्याभाषेत सांगितल्या पाहिजे. नकारात्मक संदेशाला तातडीने संकारात्मक उत्तराने प्रतिसाद दिला गेला पाहिजे. नागरिकांशी संवाद हा दुहेरी असायला हवा. करिअर मार्गदर्शन सारखेच योजनांचे मार्गदर्शन झाले पाहिजे. रिल हीरोपेक्षा रिअल हीरो होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे अनेकांनी आपली मते या चर्चे दरम्यान व्यक्त केली. डिजिटल माध्यमाची ओळख नसलेल्या गावांमध्ये डिजिटल इंडियाचा प्रसार स्वत:हून करण्याचा संकल्प महामित्रांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी महामित्र अजहर पठाण याने मनोगत व्यक्त करताना सोशल मिडिया हे दुधारी शस्त्र असल्याचे सांगत या माध्यमाचा वापर नकारात्मक गोष्टी पसरविण्यासाठी जसा केला जातो तसाच सकारात्मक बाबींसाठीही त्याचा वापर योग्य प्रकारे होवू शकतो याचे सोदाहरण दिले. सोशल मिडियाचा दुरुपयोग होवू नये हे महामित्रची नैतिक जबाबदारी असल्याचे त्याने सांगितले. ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांच्या काव्य पंक्तींच्या वापर करीत त्याने आपल्या भाषणाचा समारोप केला.
            माहिती व जनसंपर्क निर्मित जिओ चॅट चॅनलचा शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या मोबाईल ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाविषयी सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध असून त्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिसांचे संपर्क क्रमांक, मंत्रिमंडळ व शासन निर्णय यांची माहिती तसेच लोकराज्याचे अंक, प्रश्न मंजुशा, अहवामान अंदाज, सेवा हक्क कायदा, तक्रार निवारण, महायोजना, महालाभार्थी, मी मुख्यमंत्री बोलतोय याबाबत माहिती उपलब्ध आहे. अँड्रॉड आणि आयओएस मोबाईलवर हे ॲप डाउनलोड करण्याची सुविधा असून जिओ चॅटवर महाराष्ट्र शासन नावाने चॅनल उपलब्ध आहे.

            यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव श्री. सिंह, संचालक, देवेंद्र भुजबळ, शिवाजी मानकर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संचालक अजय अंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.
           
00000
अजय जाधव/




नांदेड जिल्ह्यासाठी
तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
नांदेड, दि. 24 :-  शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सन 2018 या वर्षासाठी नांदेड जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. 
मंगळवार 3 एप्रिल 2018 रोजी हाजी सय्याह सरवरे मगदुम (रहे) ऊर्स कंधार निमित्त, सोमवार 23 जुलै 2018 रोजी आषाढी एकादशी ( पंढरपूर यात्रा ) आणि मंगळवार 6 नोव्हेंबर 2018 रोजी नरक चतुर्दशी या तीन स्थानिक सुट्ट्या नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू राहणार नाही, असेही या अधिसुचनेत म्हटले आहे.
000000


जिल्हा कृषि महोत्सवाचे  
26 ते 30 मार्चपर्यंत नवा मोंढा येथे आयोजन
नांदेड, दि. 24 :-  कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) संस्थेमार्फत "नांदेड जिल्हा कृषि महोत्सव" सोमवार 26 मार्च ते शुक्रवार 30 मार्च 2018 या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्पादीत शेतमाल तसेच शेतकरी गट आणि महिला बचतगटांची उत्पादने थेट ग्राहकांना विक्री केली जाणार आहेत. शेतकरी व नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) नांदेड यांनी केले आहे.
उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारीत धान्य, खाद्य, फळे, फुले, भाजीपाला तसेच सेंद्रीय शेतीमाल विक्री आदीचे आयोजन या कृषि महोत्सवात केले आहे. कृषि विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे. शेतकरी शास्त्रज्ञ आणि संशोधन-विस्तार-शेतकरी-विपणन साखळी सक्षम करणे. समुह / गट संघटित करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे. शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा यासाठी शेतकरी ते ग्राहक विक्री श्रृंखला विकसित करणे. कृषि विषयक परिसंवाद, व्याख्यानांद्वारे विचारांच्या देवाण-घेवाणीतून शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करणे. विक्रेता व खरेदीदार संमेलनाचे माध्यमातून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपनणास चालना देणे हा कृषि महोत्सवाचा उद्देश आहे.
 कृषि प्रदर्शन हा महत्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालने, विविध कंपन्यांचे स्टॉल, खाद्य पदार्थांचे स्टॉल, प्रात्यक्षिके यांचा समावेश करण्यात येणार आहे. कृषि आणि पुरक व्यवसायाशी निगडीत एकात्मिक शेती पद्धती संकल्पनेवर आधारीत प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येणार आहे. यामध्ये कृषि व कृषि संलग्न विभाग, कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, संबंधीत विविध कृषि महामंडळे तसेच शासकीय यंत्रणेबरोबर खाजगी कंपन्या, उद्योजक, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग राहणार आहे.
कृषि शास्त्रज्ञ, तज्ज्ञ अधिकारी, विविध पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी, प्रक्रिया उद्योजक, यशस्वी महिला शेतकरी, उद्योजिका, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यांची व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शनाबरोबर शेतकऱ्यांशी सुसंवाद गट चर्चा होणार आहे.
जिल्ह्यातील शासन पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांबरोबर कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले प्रयोगशील शेतकरी तसेच जिल्हा, तालुकास्तरीय पीक स्पर्धा विजेते शेतकरी, गट, संस्था यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


 क्षयरोग निमुर्लनासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मेकाने
नांदेड, दि. 24 :- क्षयरोग निमुर्लनासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. क्षयरोग व अतिगंभीर स्वरुपाचा मल्टी ड्रग रेजीस्टंट टि.बी. (एमडीआर) यावर वेळीच आवर घालण्यासाठी व निर्मुलनासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे, प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने यांनी केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्राच्या प्रांगणात आज संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मेकाने बोलत होते.  
यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शाम नागापूरकर, डॉ. कापसे , डॉ. प्रदीप जाधव, डॉ. दिपकसिंह हजारी , डॉ. साखरे, डॉ. श्रीरामे, उज्वला काळंबे आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त भव्य रॅली मोंढा परिसराच्या टॉवरपासून गुरुद्वारा चौक-महाविर चौक-गांधी चौक-गांधी पुतळा मार्गक्रमण करीत जिल्हा क्षयरोग केंद्र सामान्य रुग्णालय परिसर नांदेड येथे विसर्जीत करण्यात आली. या रॅलीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.  
प्रास्ताविकात डॉ. नागापूरकर यांनी क्षयरुग्णांसाठी योजनांची माहिती देवून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्णांच्या नोंदी करण्याविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी क्षयरोग जनजागृतीपर मार्गदर्शन केले. आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे क्षयरोगाविषयी जनजागृती केली.
याप्रसंगी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात ग्रामीण भागातील उत्कृष्ट सेवेबद्दल वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सुत्रसंचालन डॉ. संदीप रायसोनी यांनी तर आभार वरिष्ठ पर्यवेक्षक अनिरुध्द भावसार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. सौ. अनुपमा शिंदे, डॉ. शिवशक्ती पवार, जितेंद्र दवणे, ज्योती डोईबळे, पी.व्ही. कांबळे , संतोष दरगु, महेंद्र ऐगडे, श्री. कनकदंडे, श्री. चमकुरे, अजय सोळंके, संदीप मामीडवाड , गणेश इंगळे , राजू गायकवाड , योगेश धोंगडे आदिंनी संयोजन केले.    
 
00000     

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...