Wednesday, May 8, 2024

 वृत्त क्र. 412

पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कुठेही पाणी टंचाई नसून  केवळ जलवाहिनीच्‍या तांत्रिक बिघाडामुळे शहरात काही दिवस पाणी पुरवठा खंडित झाला होता. येणाऱ्या काळात नांदेड शहराला पुरवठा करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी आरक्षित असून नागरिकांनी पाणी टंचाईबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

नांदेड जिल्‍हयातील पाणी टंचाई संदर्भात नांदेड शहरासाठी विष्‍णुपूरी प्रकल्‍पातून 43 दलघमी व उर्ध्‍व पैनगंगा प्रकल्‍पातून 06 दलघमी पिण्‍याचे पाणी आरक्षित करण्‍यात आले आहे. मागील आठवड्यामध्‍ये नांदेड शहरासाठी विष्‍णुपूरी प्रकल्‍पातून काबरानगर जलशुद्धीकरण केंद्राला जाणारी पाण्‍याची मुख्‍य जलवाहिनी जीर्ण होवून फुटल्‍यामुळे व विद्युत मोटारीमध्‍ये तांत्रीक बिघाड झाल्‍यामुळे शहरासाठी काही दिवस पाणी पुरवठा बंद झाला होता. जलवाहिनी दुरुस्‍तीचे काम अंतिम टप्‍प्‍यात असून साधारणपणे दोन दिवसात शहराचा पाणी पुरवठा सुरुळीत होईल, असे मनपा प्रशासनाने कळविले आहे. 

तसेच शहराच्‍या पाणी पुरवठा करण्‍याच्‍या दृष्‍टीने अतिरिक्‍त उपाययोजना म्‍हणून उर्ध्‍व पैनगंगा प्रकल्‍पातील आरक्षित पिण्‍याच्‍या पाण्‍यापैकी 02 दलघमी पाणी सांगवी बंधाऱ्यामध्ये सोडण्‍याबाबत आदेश केले होते. त्‍यानुसार आता नांदेड महापालिकांतर्गत सांगवी बंधाऱ्यातून आवश्‍यकतेनुसार पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा सुरुळीत झाला आहे. सध्‍या नांदेड शहरामध्‍ये 25 टॅंकरव्‍दारे व 250 बोअरवेल व्‍दारे पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. 

ग्रामीण भागातील 15 वाडी, गावांमध्‍ये 15 खाजगी टॅंकरव्‍दारे व 141 खाजगी विहीर अधिग्रहणपैकी साधारणपणे मुखेड तालुक्‍यात 10, कंधार 4 व माहूर तालुक्‍यात 1 टॅंकरव्‍दारे पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. तसेच भोकर-11, हिमायतनगर-16, नायगाव-43, मुखेड-29, लोहा-13 व किनवट 16 या तालुक्‍यात विहीर अधिग्रहण प्रस्‍ताव मंजूर करण्‍यात आले आहेत.  टंचाईग्रस्‍त गावातील टंचाई निवारणासाठी जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत हे तालुक्‍याच्‍या ठिकाणी आढावा बैठक घेत आहेत. तसेच तालुक्‍यातील टंचाईग्रस्‍त गावामध्‍ये टंचाई निवारण संदर्भात इतर संबंधित अधिकारी आढावा बैठका घेवून प्रत्‍येक बाबींबर लक्ष ठेवून आहेत.

0000

  वृत्त क्र. 411

अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार  

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षापर्यंत निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या निराधार, विधवा, कुमारी माता, परित्यक्ता, अत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते.  

तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी, पुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गाने न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याचा लाभ घ्यावा. प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी 1 ते 3 यावेळेत अधिक्षक माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्यगृहचे अधीक्षक वर्ग-2 एस. एम. पुजलवार यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...