Thursday, September 22, 2022

कृपया सुधारित वृत्त

नांदेड जिल्ह्यात 19 गावातील

71 गाय वर्ग लम्पीने बाधित

 

· जिल्हा प्रशासनातर्फे ग्राम पातळीपर्यंत लसीकरणाचे नियोजन

· 44 हजार 963 जनावरांचे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावपातळीपर्यंत ग्रामपंचायतींना दक्षतेचे निर्देश दिले आहेत. आजच्या स्थितीत नांदेड जिल्ह्यात एकुण 19 बाधीत गावे झाली आहेत. या बाधीत गावातील पशुधन संख्या (गाय वर्ग) 10 हजार 138 एवढी आहे. यातील लम्पी बाधीत पशुधन संख्या (गाय वर्ग) 71 एवढी आहे. बाधीत गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 138 एवढी झाली आहे. एकुण गावे (बाधित अधिक 5 किमी परीघ) 157 गावातील पशुधनाची संख्या ही 48 हजार 249 एवढी आहे. यात बाधित व परिघाच्या गावातील पशुधनाची संख्या 58 हजार 387 एवढी गणण्यात आली आहे.

 

लसीकरणाच्या दृष्टिकोनातून सद्यस्थितीत उपलब्ध लस मात्रा 2 लाख 10 हजार एवढी आहे. आज रोजी 26 हजार 402 जनावरांचे लसीकरण झाले आहे. तर एकुण प्रागतिक लसीकरण हे 44 हजार 963 एवढे आहे. मृत पशुधनाची संख्या 2 एवढी आहे.

00000

श्री रेणुकादेवी व माहूरगडाच्या स्वच्छतेसाठी भाविक व नागरिकांचेही योगदान लाखमोलाचे
- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर

▪️श्री शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्णत्वास
▪️संस्थानच्या बैठकीत विविध सेवा-सुविधा व्यवस्थेचा आढावा

नांदेड (जिमाका) दि. 22 :- देवसस्थान परिसरातील स्वच्छता ही कोणत्याही भाविकाला अगोदर भावते. स्वच्छतेतून पावित्र्यता अधिक वृद्धींगत होते हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. स्वच्छता ही कोण्या एका घटकाची, यंत्रणेची जबाबदारी नसून ती प्रत्येकाच्या कर्तव्याचा भाग झाली पाहिजे. भक्त म्हणून, भाविक म्हणून सर्वांचीच ती जबाबदारी असते. ज्या ठिकाणी ही जबाबदारी चोख पार पाडल्या जाते ते मंदिर व परिसर अधिक भावतो, असे प्रतिपादन श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष तथा नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी केले.

श्री रेणुका संस्थान श्रीक्षेत्र माहूरगड येथील श्री शारदीय नवरात्र महोत्सवाची आढावा बैठक आज माहूरगड येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, सहायक जिल्हाधिकारी तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे सचिव किर्तीकिरण एच. पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी तथा संस्थानचे उपाध्यक्ष विजय डोंगरे, तहसिलदार तथा संस्थानचे कोषाध्यक्ष किशोर यादव, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, बालाजी जगत, दुर्गादास भोपी, अरविंद देव आदी मान्यवर उपस्थित होते.
शेगाव येथील गजानन महाराज संस्थान, आपल्या नांदेडचा श्री सचखंड गुरुद्वारा व इतर निवडक मंदिर परिसरात असलेली स्वच्छता ही भाविकांनी संस्थानासमवेत मिळून दिलेल्या योगदानाचे द्योतक आहे. श्री रेणुकादेवी संस्थान याचदृष्टिने विचार करत असून हा नवरात्र महोत्सव हरित नवरात्र उत्सव म्हणून आपण अधिक जबाबदारीने साजरा करू यात. अध्यक्ष म्हणून मला संस्थानची सेवा करण्याची संधी मिळाली आहे या दृष्टिकोणातून मी तत्पर आहे. इश्वराच्या परिसरात सेवेला अधिक महत्व असते. याचबरोबर एक नागरिक म्हणूनही आपले कर्तव्य प्रत्येकाने जर चोख बजावले तर हा परिसरही अधिक आपण सुंदर बनू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथील विकासाच्या प्रक्रियेत काही ठिकाणी भौगोलिक दृष्टिकोणातून येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येतील यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

एक शक्ती पीठ म्हणून अवघा महाराष्ट्र माहूरकडे पाहतो. संस्थानकडून माहूरकरांच्या काही अपेक्षा आहेत हेही मी समजू शकतो. संस्थानच्या व श्री शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने याच परिसरातील नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी व कर्तव्य अधिक चोखपणे पार पाडावीत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले. पोलिसांच्या मदतीसाठी माहूर येथून काही स्वयंसेवक पुढे येत असतील तर दहा स्वयंसेवकांमागे एक पोलीस कर्मचारी आम्ही उपलब्ध करू असे त्यांनी सांगितले. वाहतूक व इतर नियमांचे काटेकोर पालन झाले नाही तर संबंधिताविरुद्ध कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टिने कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थानतर्फे हा श्री शारदीय नवरात्र महोत्सव अधिक मंगलमय वातावरणात पार पडला जावा यादृष्टिने आम्ही नियोजन केले आहे. सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, अन्नदान, प्रसाद व्यवस्था, आरोग्य विभागाच्या टिम, अन्न व औषधी विभागाकडून दक्षता, पिण्याचे स्वच्छ पाणी आदी जबाबदारी संबंधीत विभाग प्रमुखांवर दिल्याची माहिती संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच पुजार यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांनी बैठकीचे संयोजन करून स्थानिक नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्यास संधी देऊ त्यांचे योग्य ते निरसन केले.
000000










 दिवाळी फटाका दुकान

परवानासाठी 4 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करावेत


नांदेड (जिमाका) दि. 21 :- दिपावली उत्सव 21 ते 26 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत साजरा होणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीतील फटाका दुकानांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत परवाने 22 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत विक्री व स्विकारले जातील. तात्पुरता फटाका दुकानाच्या परवानासाठी 4 ऑक्टोंबर 2022 पर्यत अर्ज करावेत, असे जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी कळविले आहे.


जिल्ह्यातील सर्व  उपविभागीय दंडाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरता फटाका परवाना निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  तात्पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या मार्फत जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रातील फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनियमय 2008 नुसार फटाके विक्री परवानासाठी विहित नमून्यात अर्ज करायचा आहे. परवाना घेताना दुकानाचा नकाशा व ज्यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण, साठवणूक क्षमता, त्याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्यादी तपशील दाखवण्यात यावा. The Explosive Rule 2008 मधील नियम 84 अन्वये सदर दुकानातील किमान अंतर 03 मीटर असावे तसेच संरक्षीत  क्षेत्रापासून अंतर 50 मीटर असणे आवश्यक आहे. सदर नकाशात दुकान क्रमांक नमूद असावा. नकाशा स्थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो. लायसन्स फी रुपये 600 चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामूहिक रित्या दुकाने टाकण्यात येत असल्यास संबंधित अर्जदारास देण्यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणत्र असणे आवश्यक आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड/मुख्याधिकारी नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालय यांचे नाहरकत प्रमाणपत्र. संबंधित पोलिस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र, विक्री-कर विभाग नांदेड या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्रमहाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळ नांदेड या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र, विद्युत विभाग मनपा नांदेड यांचे नाहरकत प्रमाणपत्र (नांदेड मनपा हद्दीमध्ये), विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांचे नाहरकत प्रमाणपत्र, जागेच्या मालकी हक्काचा पुरावा, नोंदणीकृत/ मान्यताप्राप्त असोसिएशन मार्फत तात्पुरता फटाका परवानासाठी अर्ज केल्यास या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या परवान्यातील नमूद ज्या अटी व शर्तीनुसार संबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहिल तसेच  कोणत्याही विस्फोटक नियमांचे व परवान्यातील अटी व शेर्तीचे होवून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित असोसिएशनची असेल याबाबत संबंधित असोसिएशन कडील शपथपत्र. दुकानाच्या ठिकाणी करण्यात आलेली व्यवस्था तपशील अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार राहील. 


शासन स्तरावरुन तसेच विस्फोटक नियंत्रक व इतर संबंधित विभागाकडून वेळोवळी फटाका परवाना निर्गमनाबाबत प्राप्त होणाऱ्या अटी व शर्तीचे अधीन राहून देण्यात येते. अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनद्वारे फिस शासन जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने दिनांक 10 ऑक्टोबर, 2022    11 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍या मार्फत तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने सबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या मार्फत निर्गमित केले जातील.

दिपावली सण-उत्‍सवाच्या कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञाप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिणामापर्यतचाच व्‍यवहार करता येईल याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

00000

 नुकसान भरपाईसाठी पीक नुकसानीची माहिती

विमा कंपनीस 72 तासाच्या आत कळवावी

जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसानहोण्याची शक्यता आहे.नुकसान झालेल्या पिक विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानीच्या 72 तासांच्या आत विविध माध्यमांद्वारे नुकसानीची पूर्वसुचना पिक विमा कंपनीस कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.

 

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गीक आग या नैसर्गीक आपत्तीमुळे तसेच पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरुन दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे तसेच शेतात पिक कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या पिकांमध्ये कापणी पासून 14 दिवसांपर्यंत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस ई. कारणामुळे नुकसान झाल्यास होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते.

 

सदस्थितीमध्ये Mid-Season Adversity साठी अधिसुचना काढलेली असताना देखील स्थानिक नैसर्गीक आपत्ती अंतर्गत  काढणी पश्चात नुकसान झाल्यास पूर्वसुचना विमा कंपनीस देणे अनिवार्य आहे. त्याशिवाय सदरील घटकाअंतर्गत नुकसान भरपाई मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

 

विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती/पूर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पिक विमाधारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop-Insurance (क्रॉप इन्शुरन्स) ॲप डाउनलोड करुन त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा टोल फ्री क्रमांक 18002337414 /180042533333 किंवा ई-मेल (pmfbypune@uiic.co.in / 230600@uiic.co.in ) द्वारे नुकसानीची पूर्वसुचना द्यावी.

 

काही तांत्रीक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पूर्वसुचना देऊ  शकल्यास तालुका प्रतिनिधी, युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी किंवा संबधीत तालुका कृषि अधिकारी, कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषि सहाय्यकाकडे ऑफलाईन अर्ज सादर करावेत असेही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

0000

                

 ग्रामीण गुंठेवारी प्रस्ताव स्विकारण्यास 31 ऑक्टोंबर पर्यत मुदतवाढ


नांदेड (जिमाका) दि. 22 :- गुंठेवारीचे बरेच प्रस्ता‍व दाखल करावयाचे शिल्लक असल्याने ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यास 31 ऑक्टोंबर पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.


महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यास मान्यता दिली. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिकानगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्रवगळून उर्वरित ग्रामीण भागातील 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यासाठी नगर रचना विभाग (शाखा कार्यालय नांदेड) यांच्याकडील नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट / इंजिनियर यांच्या मार्फत छाननी शुल्कासह प्रस्ताव दाखल करण्यास 30 जून 2022 पर्यत मुदत देण्यात आली होती. त्यास आता सोमवार 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहेअसे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालयनांदेड यांनी कळविले आहे.

0000

 नांदेड तालुक्यातील वाघी व देगलूर तालुक्यातील तमलूर गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित

·   लम्पी आजाराबाबत जिल्हा प्रशासन दक्ष

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. नांदेड तालुक्यातील मौजे वाघी व देगलूर तालुक्यातील तमलूर या गावात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने ही गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

 

प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील मौजे वाघी तसेच देगलूर तालुक्यातील मौजे तमलूर येथील पशुधनामध्ये लम्पी स्किन डिसीजची लागण झाल्याचा रोग निदान अहवाल सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे यांच्याकडून प्राप्त झाला आहे.

 

भारत सरकारचा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग तसेच पशुसंवर्धन आयुक्त पुणे यांनी रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.  याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष खुशालसिंह परदेशी यांनी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. लम्पी स्किन रोग प्रादुर्भावग्रस्त व बाधीत झालेली नांदेड तालुक्यातील मौजे वाघी व देगलूर तालुक्यातील मौजे तमलूर ही गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून 5 कि.मी. त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या परिसरातील गावांमध्ये बाधीत जनावरे वगळता इतर जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. साथीच्या काळात बाधीत भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे. बाधीत गावामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चराई करिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये गाई व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधीत व अबाधीत जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त पशुधनाचा मृत्यु झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावीअसे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

बाधीत परिसरामध्ये स्वच्छता व निर्जंतूक द्रावणाची फवारणीरोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या, गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणीलम्पी स्किन रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांचेमार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. तसेच बाधीत पशुधनाची काळजी घ्यावी असे सांगितले आहे.  कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांचेविरुध्द नियमानुसार गुन्हा दाखल करणे. तसेच कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्व खाजगी पदविकाधारकांनी / पशुपालकांनी लम्पी स्किन रोगांची माहिती शासकीय पशुवैद्यकीय संस्थेस देणे बंधनकारक आहे. लम्पी स्किन रोगांचा उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात यावा. खाजगी पदविकाधारकांनी लम्पी स्किन रोगांचा परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नांदेड जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांनी लम्पी स्किन रोगांच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधी वरिष्ठांशी चर्चा करुन उपलब्ध करुन घ्याव्यात, असेही आदेशात जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी यांनी स्पष्ट केले आहे.

0000

 सेवा पंधरवड्यात विद्यार्थ्यांना शाळेत

मिळणार विविध प्रमाणपत्रे


नांदेड (जिमाका) दि. 22 :- सर्वसामान्यांची कामे विहित वेळेत होण्याच्या दृष्टीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. या पंधरवड्यात नागरिकांचे अर्ज/तक्रारी यांचा विहित कालमर्यादेत निपटारा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने देगलूर व मुखेड तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना महसुल विभागामार्फत देण्यात येणारे उत्पन्न, जात, नॉन क्रिमीलेअर, रहिवासी, ईडल्ब्लुएस अशी विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत, असे देगलूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी सांगितले आहे.

या काळात मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शाळांमध्येच जात प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त यांनी दिली आहे. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे प्रमाणपत्रात उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, ईडल्ब्लुएस प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापक व प्राचार्यांनी संकलित करावीत. यात विद्यार्थ्यांचे मतदान कार्ड, राशन कार्ड, आधार कार्ड, शेती असल्यास सातबारा व होल्डीग, टि.सी किंवा प्रवेश निर्गम, 10 वीची सनद, लाभार्थी 18 वर्षाखालील असल्यास वडीलांचे आधार कार्ड, मतदान कार्ड, तहसिलदार यांनी दिलेले रहीवासी प्रमाणपत्र, नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र किंवा मानीव दिनांक पुरावा. वडीलांचे कागदपत्रात –आधारकार्ड, मतदान कार्ड, तीन वर्षाचे उत्त्पन्न प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. सर्व शाळांमधील संबंधित मुख्याध्यापक व प्राचार्यांनी 23 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सर्व कागदपत्रे संकलित करुन शाळेजवळ असलेल्या सेतू सुविधा केंद्राकडे सादर करावीत. अधिक माहितीसाठी  माधव कांबळे यांचा मो. क्र. 8482878288 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले  आहे.

00000

 लम्पी आजारावरील लसीकरण 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करा

 -जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी  

 लसीकरणात दुर्लक्ष केल्यास होणार कारवाई  

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने ती गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. लम्पी आजारावर नियत्रंण व प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पशुधनास लम्पी आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी 100 टक्के लसीकरण 30 सप्टेंबर पर्यत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले. 

परदेशी यांनी आज लिंबगाव येथे रोगप्रतिबंधक लसीकरण कॅम्पला भेट देवून पशुपालकांची विचारपूस केली. तसेच गोचीड, गोमाशापासून गोठे फवारणी करुन घेण्याचेही त्यांनी आवाहन केले. 

पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणूजन्य लम्पी रोगाच्या संदर्भात पशुपालकांमध्ये भिती निर्माण होऊ नये म्हणून लसीकरणासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लसीकरण प्रक्रीयेत कोणीही दुर्लक्ष करता कामा नये अन्यथा त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी आढावा वैठकीत दिला.

 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी लसीकरण एका आठवड्यात पूर्ण करावेत, असे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात लस व औषधीसाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. लसीकरणासाठी पशुधनाच्या निकषानुसार लस व औषधी पुरवठा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या नियोजनातून करण्यात येत आहे.

00000

 संस्कृतीचे जतन होणे आवश्यक

- ॲड गंगाधर पटने   

·         राजा राममोहन रॉय यांच्या जयंती निमित्त रॅलीचे आयोजन

·         विविध शाळेतील 250 विद्यार्थ्यांचा उर्त्स्फूत सहभाग 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- आधुनिक तंत्रज्ञानामुळे नवीन पीढी वाचनापासून दूर जात आहे.वाचनाची सवय जोपासल्यास मनुष्यामध्ये  प्रगल्भता निर्माण होते. नव्या पिढीची मानसिकता ओळखून त्यांच्या सोईने ग्रंथालयातील ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचवा यामुळे वाचनसंस्कृती वाढण्यास मदत होईल असे मत जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अँड.गंगाधर पटने यांनी व्यक्त केले. 

उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने राजा राममोहन रॉय यांच्या 250 व्या जयंती निमित्त महिला सक्षमीकरण शालेय मुलांची जनजागृती रॅली या कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. 

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विकास माने, शारदा एज्युकेशन सोसासटीचे अध्यक्ष रावसाहेब शेंदारकर,  पोलिस निरीक्षक भगवान कापकर, मुख्याध्यापक प्रमोद शिरपूरकर,  जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

पुढे बोलताना पटने म्हणाले की, वाचनाने माणूस मोठा होतो जेवढे वाचन कराल तेवढे ज्ञान वाढत जाईल.स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी वाचणाची सवय अंगी असणे गरजे आहे असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला उपस्थित रावसाहेब शेंदारकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

या रॅलीमध्ये या रॅलीमध्ये नांदेड शहरातील महात्मा फुले हायस्कुल, सावित्रीबाई फुले हायस्कुल, प्रतिभा निकेतन हायस्कुल, शिवाजी विद्यालय, केब्रिज विद्यालय, दत्तप्रभू प्राथमिक शाळा, या शाळेतील विद्यार्थी रॅलरीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महिला सबलीकरण : योगदान, सतीप्रथेस प्रतिबंध, मालमत्तेबाबत महिलांना समान अधिकार असणे, विधवांना पुनर्विवाहाचा हक्क मिळणे, महिलांसाठी शिक्षण, बहुपत्नी व बाल विवाहास प्रतिबंध मनाई करणे या विषयावर रॅली काढण्यात आली होती.रॅलीचा समारोप जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथे करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी केले.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...