Thursday, January 10, 2019


शेतकऱ्यांसाठी आवाहन

नांदेड, दि.10:-  उप विभागीय कृषि अधिकारी , नांदेड अंतर्गत मुदखेड/ अर्धापुर या तालुक्यात केळी पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिक  संरक्षणासाठी खालीलप्रमाणे संदेश देण्यात येत आहे.

केळी :- केळीच्या  झाडांचे जास्तीत जास्त पाने ठेवावीत. पानाचा प्रादुर्भावग्रस्त्‍ा भाग काढुन  टाकावा. प्रोपीकोनेझॉल 0.05 टक्के (0.5Ml/1) + मिनरल ऑईल 1 टक्के (10 Ml/1) मिली प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. असे आवाहन  आर. टी. सुखदेव उप विभागीय कृषि अधिकारी , नांदेड यांनी केले आहे.

0000

 

शेतकऱ्यांसाठी आवाहन
नांदेड, दि.10:- उप विभागीय कृषि अधिकारी , नांदेड अंतर्गत मुदखेड/ अर्धापुर या तालुक्यात केळी पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिक  संरक्षणासाठी खालीलप्रमाणे संदेश देण्यात येत आहे.
केळी :- जर केळीच्या पिकाच्या पानावर  छोटे , छोटे  पिवळे डाग बुडाकडील पानावर आढळुन येत असतील तर कार्बेन्डॅझिम 50 डब्लु पी 0.1 टक्के द्रावण म्हणेच 1 ग्रॅम + 1 मिली स्टीकर प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारावे जर पानावरील ठिपके यांचा आकार वाढुन एकमेकात मिसळुन मोठे करडे आकाराचे ठिपके आढळुन येत असतील तर कार्बेन्डॅझिम 0.5 टक्के  0.5 ग्रॅम+  मिनरल ऑईल 1 टक्के 10 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारावे, असे आवाहन  आर. टी. सुखदेव उप विभागीय कृषि अधिकारी , नांदेड यांनी केले आहे.
 0000

16 जानेवारीपासून मोटार सायकलकरिता

पसंती क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु

 नांदेड, दि. 10 :-  नांदेड जिल्हयातील सर्व जनतेस कळविण्यात येते की, मोटार सायकलकरिता MH 26-BN ही नविन मालिका दि.16 जानेवारी, 2019 पासून सुरु होत असून, ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे अर्ज दि.14 जानेवारी, 2019 रोजी  दुपारी 2.30 वा. पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. तरी सर्वानी या बाबतची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी कळविले आहे.   

0000   

दिव्यांगाच्या विशेष शाळा / कर्मशाळेतील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसास

अनुकंपा तत्वा धरतीवर नियुक्तीबाबत यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

            नांदेड, दि. 10 :-  नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळा / कर्मशाळेतील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वा धरतीवर नियुक्ती देण्यासंदर्भात अनुकंपाधारकांची प्रसिध्दी यादी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग (दिव्यांग ) येथे नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा परिषद , नांदेड यांच्या  zpnanded.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादी संदर्भात काही आक्षेप असल्यास आठ दिवसाच्या आत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्याकडे आक्षेप नोंदवावेत, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

0000

पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व प्रेरणादायी

--- विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे   

 

            नांदेड, दि. 10 :- भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे सच्चे देशभक्त होते. त्यांच्यासारखे चतुरस्त्र व्यक्तिमत्व देशाला नेहमी प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी अटलजींच्या कर्तत्वाचा गौरव केला.

भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी या चरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, संतूक हंबर्डे, लेखक डॉ. सुरेश सावंत, प्रकाशक संजीव कुळकर्णी आणि प्रा. डॉ. पी. विठ्ठल व्यासपीठावर उपस्थित होते.

अटलजींच्या विविध आठवणी सांगतांना विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले की, अटलजी त्याकाळी जयपूरच्या एका सभेला जातांना सायकलवरुन प्रवास केला होता. त्या सभेत त्यांनी मै हार लेने नही, मैं जीत लेने आया हुँ हे सुचक वक्तव्य केले . जेंव्हा तेथील आयोजक पुष्पहाराने स्वागत करीत होते. त्यांच्या त्या सुचक वक्तव्याने अनेकांना अवाक केले होते. सिलींगच्या कायद्यासाठी केलेला आग्रह आणि पंडित नेहरुंच्या निधनानंतर त्यांनी व्यक्त केलेला शोक अत्यंत ह्दयस्पर्शी होता. देशाच्या अर्थकारण, सामाजिक परिस्थिती आणि एकात्मतेविषयी अटलजींचा चोख अभ्यास होता. त्यांच्या चौफेर व्यक्तिमत्वामुळे ते पुढील काळात देशाचे प्रधानमंत्री होतील असा विश्वास जनतेमध्ये दिसत होता. त्यांचे देशावरील अपार प्रेम अनेकांना स्फुर्ती देत होते.

अटलजींना 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन 23 दिवसांचा कारावासही भोगावा लागला होता असे सांगून बागडे म्हणाले की, आणीबाणीच्या कठीण काळात अटलजींनी स्विकारलेली भूमिका साऱ्या देशाला माहित होती. त्यासाठी तुरुंगातही जावे लागले. लोकशाही सजविण्यासाठी देशानेही पुढाकार घेण्याची गरज अटलजींनी पुढे आणली होती. राष्ट्रहितासाठी घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने अटलजी ठामपणे उभे रहायचे अटलजी प्रधानमंत्री म्हणून घेतलेल्या विविध निर्णयांचीही माहिती बागडे यांनी यावेळी दिली.

            अटलजींच्या विविध पैलूंचा आपल्या भाषणात उल्लेख करीत अध्यक्ष बागडे यांनी यावेळी अनेक घटना आणि अटलजींच्या आठवणी सांगितल्या. 

            भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंचा उल्लेख करीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आपल्या भाषणात वाजपेयींच्या कणखर निर्णयामुळे भारत देश बलशाली झाला. अणू चाचणीमुळे आपल्या देशाची शक्ती साऱ्या जगाला कळली. अशा व्यक्तीमत्वाला शतकानुशतके देशवासी विसरणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.

            आमदार रातोळीकर यांनी आपल्या भाषणात अटलजींच्या चरित्रात्मक ग्रंथ निर्मितीबद्दल विशेष कौतुक केले. निष्कलंक व्यक्तीमत्वाच्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या चरित्र लेखनाबद्दल आणि प्रकाशनाबद्दल कौतुक करुन संतुक हंबर्डे यांनी यावेळी वाजपेयी यांच्या स्मृति जाग्या केल्या.

            प्रास्ताविकात अभंग प्रकाशनचे संजीव कुळकर्णी यांनी भारतरत्न अटल बिहारी बाजपेयी यांच्या समग्र चरित्राविषयी व पुस्तकाच्या अभ्यासपूर्ण लेखनाविषयी सविस्तर विवेचन केले.

            प्रारंभी अंभग प्रकाशनच्यावतीने विधानसभा अध्यक्ष बागडे आणि मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. पुस्तकाविषयी डॉ. पी. विठ्ठल यांनी भाष्य केले. तर पुस्तकाचे लेखक डॉ. सुरेश सावंत यांनी ग्रंथलेखनामागील भूमिका स्पष्ट केली. पुस्तकाची पहिली प्रत सौ. विठाबाई व जगदेव सोळंके यांना सुपूर्द करण्यात आली.

            अभंग प्रकाशनच्यावतीने बागडे यांच्या हस्ते लेखक डॉ. सावंत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. दर्पण पुरस्काराबद्दल देगलूरचे पत्रकार विवेक केरुरकर यांचाही सत्कार करण्यात आला. महानरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या श्रीमती सोढी व वैजनाथ जाधव यांचाही पुस्तकाची प्रत देवून सत्कार करण्यात आला. प्रवीण साले यांनी वाचक म्हणून सविस्तर मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यास अभंग प्रकाशनचे सौ. नीमा कुलकर्णी , गणेश कस्तुरे, उमेश कस्तुरे यांच्यासह साहित्यिक, कवि, वाचक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे सुत्रसंचालन निळकंठ पाचंगे यांनी केले.

0000

 

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...