Thursday, January 10, 2019


पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व प्रेरणादायी

--- विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे   

 

            नांदेड, दि. 10 :- भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे सच्चे देशभक्त होते. त्यांच्यासारखे चतुरस्त्र व्यक्तिमत्व देशाला नेहमी प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी अटलजींच्या कर्तत्वाचा गौरव केला.

भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी या चरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, संतूक हंबर्डे, लेखक डॉ. सुरेश सावंत, प्रकाशक संजीव कुळकर्णी आणि प्रा. डॉ. पी. विठ्ठल व्यासपीठावर उपस्थित होते.

अटलजींच्या विविध आठवणी सांगतांना विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले की, अटलजी त्याकाळी जयपूरच्या एका सभेला जातांना सायकलवरुन प्रवास केला होता. त्या सभेत त्यांनी मै हार लेने नही, मैं जीत लेने आया हुँ हे सुचक वक्तव्य केले . जेंव्हा तेथील आयोजक पुष्पहाराने स्वागत करीत होते. त्यांच्या त्या सुचक वक्तव्याने अनेकांना अवाक केले होते. सिलींगच्या कायद्यासाठी केलेला आग्रह आणि पंडित नेहरुंच्या निधनानंतर त्यांनी व्यक्त केलेला शोक अत्यंत ह्दयस्पर्शी होता. देशाच्या अर्थकारण, सामाजिक परिस्थिती आणि एकात्मतेविषयी अटलजींचा चोख अभ्यास होता. त्यांच्या चौफेर व्यक्तिमत्वामुळे ते पुढील काळात देशाचे प्रधानमंत्री होतील असा विश्वास जनतेमध्ये दिसत होता. त्यांचे देशावरील अपार प्रेम अनेकांना स्फुर्ती देत होते.

अटलजींना 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन 23 दिवसांचा कारावासही भोगावा लागला होता असे सांगून बागडे म्हणाले की, आणीबाणीच्या कठीण काळात अटलजींनी स्विकारलेली भूमिका साऱ्या देशाला माहित होती. त्यासाठी तुरुंगातही जावे लागले. लोकशाही सजविण्यासाठी देशानेही पुढाकार घेण्याची गरज अटलजींनी पुढे आणली होती. राष्ट्रहितासाठी घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने अटलजी ठामपणे उभे रहायचे अटलजी प्रधानमंत्री म्हणून घेतलेल्या विविध निर्णयांचीही माहिती बागडे यांनी यावेळी दिली.

            अटलजींच्या विविध पैलूंचा आपल्या भाषणात उल्लेख करीत अध्यक्ष बागडे यांनी यावेळी अनेक घटना आणि अटलजींच्या आठवणी सांगितल्या. 

            भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंचा उल्लेख करीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आपल्या भाषणात वाजपेयींच्या कणखर निर्णयामुळे भारत देश बलशाली झाला. अणू चाचणीमुळे आपल्या देशाची शक्ती साऱ्या जगाला कळली. अशा व्यक्तीमत्वाला शतकानुशतके देशवासी विसरणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.

            आमदार रातोळीकर यांनी आपल्या भाषणात अटलजींच्या चरित्रात्मक ग्रंथ निर्मितीबद्दल विशेष कौतुक केले. निष्कलंक व्यक्तीमत्वाच्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या चरित्र लेखनाबद्दल आणि प्रकाशनाबद्दल कौतुक करुन संतुक हंबर्डे यांनी यावेळी वाजपेयी यांच्या स्मृति जाग्या केल्या.

            प्रास्ताविकात अभंग प्रकाशनचे संजीव कुळकर्णी यांनी भारतरत्न अटल बिहारी बाजपेयी यांच्या समग्र चरित्राविषयी व पुस्तकाच्या अभ्यासपूर्ण लेखनाविषयी सविस्तर विवेचन केले.

            प्रारंभी अंभग प्रकाशनच्यावतीने विधानसभा अध्यक्ष बागडे आणि मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. पुस्तकाविषयी डॉ. पी. विठ्ठल यांनी भाष्य केले. तर पुस्तकाचे लेखक डॉ. सुरेश सावंत यांनी ग्रंथलेखनामागील भूमिका स्पष्ट केली. पुस्तकाची पहिली प्रत सौ. विठाबाई व जगदेव सोळंके यांना सुपूर्द करण्यात आली.

            अभंग प्रकाशनच्यावतीने बागडे यांच्या हस्ते लेखक डॉ. सावंत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. दर्पण पुरस्काराबद्दल देगलूरचे पत्रकार विवेक केरुरकर यांचाही सत्कार करण्यात आला. महानरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या श्रीमती सोढी व वैजनाथ जाधव यांचाही पुस्तकाची प्रत देवून सत्कार करण्यात आला. प्रवीण साले यांनी वाचक म्हणून सविस्तर मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यास अभंग प्रकाशनचे सौ. नीमा कुलकर्णी , गणेश कस्तुरे, उमेश कस्तुरे यांच्यासह साहित्यिक, कवि, वाचक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे सुत्रसंचालन निळकंठ पाचंगे यांनी केले.

0000

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...