Monday, April 4, 2022

प्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत  

महसूल वसुलीचे 106 टक्के उद्दीष्ट पूर्ण 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाने सन 2021-22 मध्ये महसूल वसुली व अंमलबजावणी कामकाजात महसूल वसुलीच्या 106 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या विभागात नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. महसूल वसुली कामात उद्दिष्ट 177 कोटी रुपये एवढे होते यात 188 कोटी रुपयाची पूर्तता करून 106 टक्के कामाचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. तर अंमलबजावणी कामकाजात 738 लाख रुपयाचे उद्दीष्ट देण्यात आले होते यात 696 लाख रुपयाची उद्दीष्ट पूर्तता करून 94 टक्के हे काम पूर्ण केले आहे. 

नांदेड विभागाने एकुण 188 कोटी रुपयाची महसूल वसुली केली आहे. वाहन अंमलबजावणी (वाहन तपासणी) कामात 13 हजार 420 दोषी वाहनधारकांकडून 696 लाख रुपये इतका दंड वसूल केला आहे. आकर्षक नोंदणी क्रमांकाद्वारे नांदेड कार्यालयाने 2 हजार 184 वाहनांकडून 168 लाख रुपये इतका महसूल प्राप्त केला आहे. 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रादेशिक विभागाने मागील तीनही आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली असून शासनाने दिलेल्या महसूल वसुलीचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी, हिंगोली कार्यालानेही त्यांचे काम चांगले पार पाडले आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात सुद्धा या विभागाकडून महसूल वसुलीसाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000



जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड जिल्ह्यात सोमवार 4 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 18 एप्रिल 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात सोमवार 4 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 18 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000


 प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने

शिकाऊ, पक्के अनुज्ञप्तीसाठी मासिक शिबिराचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी एप्रिल 2022 महिन्यात तालुक्याच्या ठिकाणी शिबिर कार्यालय आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या अधिन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट 5 एप्रिल 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येणार आहे. अपॉइटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी याबाबची नोंद घेऊन शिबिर कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

 

तालुक्याच्या ठिकाणी पुढीलप्रमाणे शिबिराचे आयोजन केले आहे. नांदेड तालुक्यासाठी 9 ते 23 एप्रिल 2022, मुखेड तालुक्यासाठी 7 एप्रिल, किनवट तालुक्यासाठी 13 एप्रिल, हदगाव तालुक्यासाठी 20 एप्रिल, धर्माबाद तालुक्यासाठी 22 एप्रिल, हिमायतनगर तालुक्यासाठी 26 एप्रिल तर माहूर तालुक्यासाठी 29 एप्रिल 2022 रोजी कॅम्पचे आयोजन केले आहे, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000  

 परराज्यातील वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र

नूतनीकरण, पूर्ननोंदणीच्या शुल्कात वाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- केंद्र शासनाने 4 ऑक्टोंबर 2021 च्या अधिसूचनेद्वारे केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 47 व नियम 81 मध्ये सुधारणा करुन विविध शुल्कात वाढ केली आहे. या सुधारणेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून सुरु करण्यात आली आहे. ही अधिसूचना केंद्र सरकारच्या morth.gov.in  या संकेतस्थळावर व तसेच कार्यालयीन सुचना फलकावर उपलब्ध आहे. या अधिसूचनेप्रमाणे वाहन 4.0 प्रणालीमध्ये परराज्यातील वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व पूर्ननोंदणीच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 कोविड-19 च्या अनुषंगाने लागू केलेले निर्बंध मागे

 ·  नव्या मार्गदर्शक सूचना निर्गमीत 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- कोविड-19 रुग्णांची कमी झालेली संख्या व आरोग्य सुविधेवरील कमी झालेला ताण तसेच कोविड-19 च्या प्रतिबंधाच्या अनुषंगाने सध्याची स्थिती नियंत्रणात आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात करावयाच्या कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमीत केले आहेत.    

·नांदेड जिल्ह्यात कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये निर्गमीत केलेल्या आदेशान्वये लागू केलेले सर्व निर्बंध याद्वारे 1 एप्रिल 2022 रोजीच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आले असून ते पुढे अंमलात राहणार नाहीत.

·कोविड-19 चे व्यवस्थापन व प्रतिबंधाचे अनुषंगाने भारत सरकार कडील 22 मार्च आणि 23 मार्च 2022 रोजीच्या पत्रान्वये देण्यात आलेले मार्गदर्शक सूचना सर्व संबंधित अधिकारी, स्थानिक प्रशासनाने तंतोतंतपणे पालन करावे.

· जिल्ह्यातील सर्व नागरिक, आस्थापना व संस्थांनी कोविड अनुरुप वर्तनाचे (ज्यामध्ये मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन आदीचा समावेश आहे) पालन करावे, कारण ते व्यक्ती आणि समाजाचे आरोग्य व सुरक्षेसाठी सर्वात मोठी ढाल म्हणून कार्य करते.

· जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने साथरोगाच्या उद्रेक याबाबत विविध परिमाणे जसे प्रतिदिवशी आढळून येणाऱ्या नविन रुग्णांची संख्या, उपचाराधिन रुग्णांची संख्या (ॲक्टीव्ह केसेस), बाधित रुग्णसंख्येचा दर (पॉझिटीव्हीटी रेट) तसेच दवाखान्यात उपराधिन रुग्णांसाठी वापरात असलेल्या विविध प्रकारच्या खाटांची संख्या याबाबत दक्ष रहावे.

· कोणत्याही परिस्थितीत रुग्णसंख्येचा कल यावरुन साथरोगाचा पुनश्च प्रादुर्भाव होण्याची स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आल्यास त्याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात तात्काळ कळविण्यात यावे. जेणेकरुन साथरोगाचा पुन:श्च प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरु करण्यात येतील.

· जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य शासनाचे सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना व जनजागृतीचे कार्यक्रम चालू ठेवावेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 31 मार्च 2022 रोजी निर्गमीत केले आहेत.

000000

 जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे होणार जल पूर्नभरण

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

· जल शक्ती अभियान कॅच द रेन 2022 मोहिमेसाठी व्यापक बैठक

·  बांबू लागवडी संदर्भात विशेष कार्यशाळा

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- भविष्यातील पाण्याचे संकट ओळखून महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी व्यापक प्रमाणात जल संधारणाची चळवळ रुजलेली आहे. नांदेड जिल्ह्यातही लोकसहभागातून अनेक संस्थांनी पाणी प्रश्नांवर चांगले काम केले आहे. चांगल्या कामांपासून प्रेरणा घेत ही चळवळ जिल्ह्यातील गावोगावी रुजली पाहिजे, पोहचली पाहिजे. या दृष्टिकोणातून जिल्ह्यात जल शक्ती अभियान कॅच द रेन 2022 ही मोहिम व्यापक प्रमाणात वृद्धींगत करू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. याचा प्राथमिक टप्पा म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे जल पूर्नभरण, जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक जलसाठे व वैयक्तिक जलसाठ्याचे जीओ टॅगींग, गावपातळीवरील जलसंधारण आराखडा व वार्षीक कृति योजना करून त्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे या मोहिमेसंदर्भात जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी, जलसंधारण, कृषि व सर्व संबंधित विभाग प्रमुखांची व्यापक बैठक संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनुराधा ढालकरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, आदींची उपस्थिती होती.

 

या योजनेसमवेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. मिशन आपुलकी, प्रशासन आपल्या दारी या योजनांसह कॅच द रेन ही योजनाही राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 7 लाख 50 हजार घरांना नळाने पाणी पुरविण्याच्या उद्देश ठेवला पाहिजे. जिल्हा प्रशासनातर्फे या सर्व योजनेअंतर्गत जो कृति आराखडा तयार केला आहे त्यानुसार सिंचन, महसूल, शालेय शिक्षण, कृषि, जिल्हा परिषद, भूजल सर्वेक्षण, सामाजिक वनीकरण, वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कृती आराखडा प्रत्यक्षात साकारण्यासाठी सर्वांनी एक कटिबद्धता स्विकारून पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

 

पाण्याची क्षमता वाढवायची असेल तर जे मध्यम तलाव व इतर स्त्रोत आहेत त्याला भक्कम केले पाहिजे. लोकचळवळीतून, लोकसहभागातून यातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. गाळाने भरलेले तलाव मोकळे करणे हे केवळ त्या तलावाची पाणी क्षमता वाढविणे एवढ्यापुरताच उद्देश नाही तर या छोट्या कामातून प्रकल्पाला पूर्नजन्म दिल्याचाच भाग असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात 75 किमी नाला सरळीकरण, 75 गॅबीएन स्ट्रक्चर / वनराई बंधारे, ग्रामीण भागातील शाळांमध्ये लहान रोपवाटिका, 750 एकर बांबू लागवड, पोकरा अंतर्गत 750 जलसंधारणाची विविध कामे, 75 अवजारांची बैंक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण आदी कामे लोकसहभागातून अधिक भक्कम करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीनंतर बांबू लागवडी संदर्भातही विशेष कार्यशाळा घेण्यात आली. यात बांबुचे विविध प्रकार, जमिनीच्या प्रकारानुसार त्याची लागवड, मृदसंधारण यावर मार्गदर्शन करण्यात आले.

0000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...