Saturday, February 23, 2019


कृषी सेवक मेगा भरतीची
ऑनलाईन परीक्षेबाबत आवाहन
लातूर,दि.21(विमाक):-महाराष्ट्र शासन कृषी सेवक मेगा भरती 2018-19 ची संगणक आधारित (Computer Based Online Examination) परीक्षा 22 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत  आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी  www.mahapariksha.gov.in या संकेत स्थळावरुन आपले हॉल तिकीट उपलब्ध करुन घ्यावे व त्यात दिलेल्या सुचनेनुसार आपणास देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक टी.एन.जगताप यांनी केले आहे.
****


रा. प. महामंडळात
चालक तथा वाहक पदाची रविवारी परीक्षा
अफवांवर विश्वासू ठेवू नका
           नांदेड, दि. 23 :- रा. . महामंडळाचालक तथा वाहक पदाची ऑफलाईन परिक्षा रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात येणार आहे. या भरतीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर  विश्वास ठेवू नका अशा प्रवृत्तीच्या लोकांकडुन उमेदवारांशी संपर्क आल्यास त्याबाबत त्वरीत रा. . महामंडळाच्या संबंधीत विभाग नियंत्रक यांचेशी संपर्क साधावा.
        उमेदवारांना या भरती प्रक्रियेबद्दल ऑफलाईन परीक्षेसंदर्भात अफवा पसरवून निवड करुन देण्याचे प्रलोभन दाखवून संभ्रम निर्माण करुन देण्याचा प्रयत्न होत असल्यास अशा अफवा   प्रलोभनास उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी बळी पडु नये. तसेच स्थानिक पोलीस स्टेशन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यास राप महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन रा.. महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
------


शिल्पनिदेशकांच्या नेमणुकीसाठी मंगळवारी मुलाखती
नांदेड, दि. 23 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे शिल्प कारागीर योजनेंतर्गत शिल्पनिदेशकांची पदे तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती मंगळवार 26 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 11.30 वा. घेण्यात येणार आहेत.
तासिका तत्वावर तत्वाभ्यास व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी ही नेमणूक असून उमेदवारांनी मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्राच्या प्रतीसह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे उपस्थित रहावे. तारतंत्री, जोडारी, कातारी या व्यवसायासाठी ही पदे भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता संबंधीत व्यवसायात यंत्र / विद्युत अभियांत्रिकी किमान द्वितीय श्रेणीतील पदवी / पदविका व एक / दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी / एटीएस परीक्षा उत्तीर्ण, तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेश / गटनिदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णयानुसार अटी मान्य असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतर तासिका तत्वावरील नियुक्ती मिळेल. या संस्थेस यापुर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी सुद्धा 26 फेब्रुवारी रोजी संस्थेत उपस्थित रहावे. मुदतीनंतर आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन धर्माबाद औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे. 
00000


"हत्तीरोग" उच्चाटनासाठी
सामुदायिक औषधोपचार मोहिम 
नांदेड, दि. 23 :- "हत्तीरोग" एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम नांदेड जिल्ह्यात 25, 26 व 27 फेब्रुवारी 2019 या कालावधीत ग्रामीण भागात तर शहरी, मनपा निवडक भागात 25 फेब्रुवारी ते 1 मार्च 2019 दरम्यान राबविली जाणार आहे. या मोहिमेत डीईसी अधिक अॅलबेनडॉझॉल गोळया खाऊ घालण्यासाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, स्वंयसेवक येतील तेंव्हा या गोळया जेवन करुन (उपासी पोटी न घेता)  घेऊन शासनाच्या या मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी सर्वानी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी केले आहे.
जिल्ह्यात ही मोहिम राबविण्यासाठी 1 हजार 884 टिम ( 2 कर्मचाऱ्यांची एक टिम)  तयार करण्यात आली आहे. त्यावर 379 पर्यवेक्षक, 17 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व 20 जिल्हास्तरीय अधिकारी पाहणी करणार आहेत. ही मोहिम राबविण्यासाठी 77 लाख डि.ई.सी. गोळया व 31 लाख अलबेंडॉझॉल गोळया प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत पोहच करण्यात आल्या आहेत. जिल्हयात 35 लाख 61 हजार 364 लोकसंख्या पैकी 30 लाख 82 हजार 712 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकुण अपेक्षित लाभार्थी 28,42,97 आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. लोकसंख्येत नांदेड जिल्हयातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड मधील हडको, सिडको  वाघाळा व तरोडा खु व तरोडा बु परिसराचा समावेश आहे.
एक दिवसीय उपचार मोहिमेच्या गोळयाचा डोस
वयोगट
डी.ई.सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा
ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ
2 वर्षापेक्षा कमी 
निरंक   
निरंक   
2 ते 5 वर्षे
1 गोळी
1 गोळी
6 ते 14  वर्षे
2 गोळ्या
1 गोळी
15 वर्षावरील
3 गोळ्या
1 गोळी
भारतात "हिवताप" खालोखाल हत्तीरोग ही महत्वाची सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. जगातील 110 कोटी लोकसंख्येचा भाग हत्तीरोगग्रस्त आहे. 80 देशातील 12 कोटी लोंकाना याची लागण झाली आहे. त्यापैकी 1 / 3 रुग्ण भारतात आढळतात. भारतात हा रोग देशभर पसरलेला असून त्यातल्या त्यात केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा, पं. बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व बिहार राज्यातील काही भागात हत्तीरोग रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. तर राज्यात नागपूर, नांदेड, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आदी जिल्हयात जास्त प्रमाणात आढळते.
            बुचेरिया बॅक्रोपटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. जेंव्हा डासाची क्युलेक्स मादी हत्तीरोग झालेल्या (आजारी) व्यक्तीस चावते तेंव्हा ती मानवाच्या शरीरातील जंतू रक्तासोबत शोषून घेते. डासाच्या शरीरात या जंतूची 12 ते 14 दिवसात वाढ होऊन पुनः दुसऱ्या निरोगी व्यक्तीस जेंव्हा हा डास चावतो तेंव्हा, हे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात सोडतो. मानवाच्या शरीरात हे जंतू लसीका संस्थेत जातात तेथे त्यांची वाढ होते. नर व मादी वेगळे होतात नंतर नर व मादी जंतूचे मिलन होऊन असंख्य पिल्ले जन्म घेतात त्यांना आपण मायक्रोपफायलेरिया म्हणतो. नर व मादी मानवी शरीरात 5 ते 8 वर्षे राहतात. लसीकावाहिनीत हे जंतू अडकून बसल्याने तेथील भाग फुगीर बनतो व तेथेच संबंधीत व्यक्तीस विकृती येते त्यासच आपण लसीकाचा हत्तीरोग झाला असे म्हणतो. डास चावण्यापासून ते हत्तीरोगाचे लक्षणे दिसण्याचा कालावधी (अधिशयन काळ) 12 ते 18 महिने आहे.
            हत्तीरोगग्रस्त रुग्णाच्या लसीकाग्रृंथी सुजतात. जांघेत गाठ येते, वेदना होतात, रुग्णास ताप येतो, थंडी सुध्दा वाजते. काही पुरुषामध्ये वृषणदाह होतो. हातपाय व बाहय जननेंद्रिय सुजतात. रुग्णास अंडवृध्दी होते. या लक्षणामुळे रुग्ण सामाजिक उपेक्षेस पात्र ठरतो. रुग्णाचे लग्न होत नाही. अशा या हत्तीरोगाचे केंद्र शासनाने सन 2020 पर्यन्त उच्चाटण करण्याचे ठरविले आहे. सद्यस्थितीत हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी रुग्णांना औषधोपचार व डास नियंत्रण या कार्यप्रणालीनुसार हत्तीरोगाचे नियंत्रण करण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी "एकदिवसीय सामुहिक औषधोपचारएम.डी.ए. (मास ड्रग अॅडमिनिट्रेशन) सर्वाना (ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरिया असोत किंवा नसोत, लक्षणे असोत किंवा नसोत) रोगाचा कायम प्रादुर्भाव असणाऱ्या भागात दिला जातो. फक्त 2 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रीयांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधोपचार देवू नये.
            या एम.डी.ए. एकदिवसीय सामुहिक औषधोपचार मोहिम ही जवळ-जवळ 12 दिवसाच्या हत्तीरोगाच्या समुळ उपचारा इतकीच प्रभावी आहे. हत्तीरोग रुग्ण शोधणे फार कठीण काम आहे. हत्तीरोगाचे संपुर्ण सर्वेक्षण होत नाही. रोगीचे रक्त नमुने घेणे, तपासणे व रुग्णास 12 दिवस औषधोपचार करणे. शिवाय रुग्णांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. एकदम 10 ते 15 वर्षाला विकृती दिसून येते. म्हणून एम.डी.ए या एकदिवसीय डी.ई.सी अधिक अॅलबेनडॉझॉल गोळयाचा उपचार एक दिवसीय सतत पाच वर्षे केल्यास एकाच मात्रा (डोस) मुळे रुग्णाच्या शरीरात जर हत्तीरोगाचे जंतू असतील तर ते जंतू जवळ जवळ 95 टक्के मरतात. यामुळे रोग फैलावत नाही. पर्यायाने हत्तीरोगाच्या प्रसारास आळा बसतो, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  
00000


जिल्हा परिषदेची मंगळवारी सर्वसाधारण सभा
नांदेड, दि. 23 :-  नांदेड जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा बुधवार 27 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 12.30 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.
00000




अनुकंपा तत्वारील नियुक्तीसाठी
387 धारकांची यादी प्रसिद्ध
नांदेड, दि. 23 :-  अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच 387 अनुकंपा धारकांची प्रतिक्षा यादी जिल्हा परिषदेच्या www.zpnanded.org या वेबसाईटवर व जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
31 डिसेंबर 2018 अखेर पर्यतची प्रतिक्षा यादी प्राप्त प्रस्तावाप्रमाणे घोषित करण्यात येत आहे. घोषित केलेल्या यादीत ज्या उमेदवाराचे प्रस्ताव अपूर्ण आहेत अशा अनुकंपा धारकांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही अथवा ज्येष्ठतेबाबत आक्षेप असल्यास मंगळवार 26 फेब्रुवारी 2019 पर्यंत लेखी म्हणणे पुराव्यासह जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागास सादर करावे. त्यानंतर आलेल्या अक्षेपाचा विचार होणार नाही, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
00000


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा रविवारी शुभारंभ
नांदेड, दि. 23 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय उद्घाटन शुभारंभ रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री किसान सन्मान (PM-KISAN) योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा औपचारीक शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी गोरखपुर उत्तरप्रदेश येथे होणार आहे.   
            या समारंभात सकाळी 10.30 ते 11 वाजेपर्यंत पीएम किसान योजनेची माहिती व उपस्थित मान्यवरांचे भाषणे. सकाळी 11 ते 11.30 वाजेपर्यंत मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण. सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे नांदेड यांनी केले आहे.
            अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेत प्रती शेतकरी कुटूंबाला प्रती वर्ष 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, तालुका, ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
00000

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...