Thursday, May 2, 2024

 वृत्त क्र. 401

लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान

 

10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार

 

नांदेड दि. 2 मे : 26 एप्रिल रोजी 16- नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये यशस्वीपणे निवडणुकीचा डोलारा सांभाळणाऱ्या दहा हजारावर कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यस्ततेतही मताधिकार सुलभतेने बजावल्याचे पुढे आले आहे. कक्षाच्या नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी ही माहिती दिली आहे.

 

ज्या कर्मचाऱ्यांची निवडणूक कार्यासाठी नियुक्ती 16 नांदेड लोकसभा क्षेत्रात आहे. परंतु त्यांचे नाव 16 नांदेड लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ जसे की भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर,मुखेड या सहा मतदारसंघात येत होते. अशा निवडणूक कामात असलेल्या नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना नमुना 12 -अ भरल्यानंतर संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी इडीसी (इलेक्शन ड्युटी सर्टीफिकेट ) प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले.

 

इडीसी प्रमाणपत्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएमद्वारे प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावता येतो. या निवडणूक आयोगाच्या प्रयोजनाचा फायदा या वर्षी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे.

 

त्यामुळे जिल्ह्यात ठीकठिकाणी नियुक्त झालेल्या आणि ज्यांना इडीसी अर्ज मंजूर करण्यात आले, अशा 5762 कर्मचाऱ्यांपैकी 5537 कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे आजपर्यंतच्या पार पडलेल्या निवडणुकीतील ही संख्या सर्वाधिक आहे.

 

तसेच जे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती 16-नांदेड लोकसभा (सहा विधानसभा क्षेत्रा बाहेर) मतदार संघाच्या बाहेर होती. मात्र त्यांचे नाव या सहापैकी एका विधानसभा क्षेत्रात होते. त्यांनाही फॉर्म 12-ड द्वारे टपाली मतपत्रिकाची मागणी करता येत होती. तसेच फॉर्म 12 ड द्वारे जेष्ठ नागरिक, दिव्यांग व अत्यावश्यक सेवातील कर्मचारी यांना देखील टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. या संधीचा फायदा देखील 5376 टपाली मतपत्रिका मंजूर झाल्या पैकी 4264 कर्मचारी मतदार यांनी घेतला आहे. त्यांना आपल्या व्यस्ततेतही मतदान करता आले आहे.

 

निवडणूक आयोगाच्या या वेळेच्या बदलानुसार टपाली मतपत्रिका पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या नाहीत. तशी स्वीकृत करण्याची सुविधा नसल्याने प्रत्यक्ष टपाली मतपत्रिका ताब्यात घेऊनच त्याच ठिकाणी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

याशिवाय पारंपारिक पद्धतीने सैनिकांसाठी सर्विस वोटर सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्याद्वारे 1689 सैनिकांना टपाली मतपत्रिका ऑनलाईन निर्गमित करण्यात आल्या आहे. त्यापैकी 480 मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.

 

एकूणच 16 नांदेड लोकसभा मतदारसंघातील जवळपास दहा हजारापेक्षा जास्त निवडणूक कर्मचारी अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. टपाली मतपत्रिका कक्षाच्या नोडल अधिकारी श्रीमती संगीता राठोड यांनी ही माहिती दिली आहे.

00000

 





जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भावनांमध्ये आज खरीप हंगाम 2024 पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीषक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विकास अधिकारी विजय बेतिवार, यांच्यासह कृषी, जलसंधारण,पणन, खते, बियाणे, कृषी आधारित व पूरक उद्योग, पशुसंवर्धन, मत्स, दुग्ध व्यवसाय, रेशीम व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.





 वृत्त क्र. 400

मुदखेड येथील मासिक शिबिराच्या तारखेत बदल

नांदेड दि. 2 - प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मुदखेड तालुक्याच्या ठिकाणी 15 मे 2024 रोजी मासिक शिबिर घेण्याचे नियोजन होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे शिबिर 14 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे. तरी सर्वांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 399

"नीट" परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड दि. 2 :- "नीट परीक्षा 2024" ही रविवार 5 मे 2024 रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 5.20 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण 56 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्रावर 22 हजार 279 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.  या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. 


परीक्षा केंद्राच्या परिसरात रविवार 5 मे 2024  रोजी  12  वाजेपासून ते सांयकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतच्या सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी,  भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

00000

वृत्त क्र. 398

 

पुढचा दीड महिना जलसंधारणाच्या कामांची मोहीम राबवा : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


·         खरीप पूर्व हंगामासाठी प्रशासन सज्ज ; आवश्यक प्रमाणात बियाणे,खते उपलब्ध

·         यावर्षीही भरारी पथक बोगस बियाण्यांवर ठेवणार निगराणी

·         बियाण्यांची सर्व माहिती देणारे पत्रक दर्शनी लावण्याचे निर्देश

 

नांदेड दि. 2 मे :- नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी मान्सूनची सुरुवात दहा दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे.खरीप पूर्व हंगामासाठी प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक प्रमाणात खते बियाण्यांची उपलब्धता करण्यात येत आहे. तथापि, पुढील दीड महिना जलसंधारणाची कामे राबविण्यात यावी. यावर्षी मोठ्या प्रमाणात जलसाठे निर्माण होतील,यासाठी नियोजन करण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भावनांमध्ये आज खरीप हंगाम 2024 पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीषक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विकास अधिकारी विजय बेतिवार, यांच्यासह कृषी, जलसंधारण,पणन, खते, बियाणे, कृषी आधारित व पूरक उद्योग, पशुसंवर्धन, मत्स, दुग्ध व्यवसाय, रेशीम व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

 

आजच्या बैठकीमध्ये खरीप हंगामा संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा सादर करण्यात आला.आचारसंहितेमुळे या बैठकीला लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. तथापि, गेल्यावेळी लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाल्याचे सभेमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी स्पष्ट केले.

 

जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा राहणार आहे. जवळपास 7 लक्ष 74 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड होणार असून ऊस, हळद,केळी व इतर भाजीपाला फळपीके लक्षात घेता 8 लक्ष 38 हजार 5OO क्षेत्र लागवडीखाली येणार आहे. सोयाबीन पाठोपाठ कापूस,तूर,ज्वारी पिकाची लागवड केली जाणार आहे.हवामान खात्याने यावर्षी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.जून महिन्यात मध्यापर्यंत पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृगाच्या सुरुवातीला 7 जून पासून पेरणी न करता पंधरा दिवस उशिरा पेरणी करावी अशी सूचना कृषी विभागाने केली आहे.

 

या बैठकीला कृषी केंद्राच्या प्रतिनिधींनाही बोलवण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीत बोगस बियाणे शेतकऱ्यांपर्यंत जाणार नाही, याची काळजी घेण्याची ताकीद आज या बैठकीत देण्यात आली.जे बियाणे विकण्यात येणार आहेत, त्याबाबतची संपूर्ण माहिती दर्शनी भागात लावण्यात यावी. नफेखोरीसाठी कोणत्याही अनोळखी बियाण्याची विक्री जिल्ह्यात होणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच भरारी पथकांनी आकस्मिक तपासणी करावी, असे निर्देशही आजच्या बैठकीत देण्यात आले.

 

शेतकऱ्यांनी कोणत्याही कृषी केंद्राच्या अनोळखी वाणाच्या संदर्भात कृषी विभागाकडून खातरजमा केल्याशिवाय नवीन वाणाचे बियाणे घेऊ नये, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती ही आजच्या बैठकीत देण्यात आली.

जिल्ह्यात बियाण्यांसोबतच खतांची, कीटकनाशकांची उपलब्धता आवश्यक प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी खूप साठा करण्याची गरज नाही. यासंदर्भात ऐन वेळेवर अधिक खत पुरवठा लागल्यास रेल्वेच्या दळणवळणाच्या सर्व सुविधा उपलब्ध राहतील, याबाबतची तपासणी आजच्या बैठकीत करण्यात आली.

 

जिल्ह्यामध्ये गुण नियंत्रक निरीक्षकांची एकूण संख्या 44 आहे. जिल्हास्तरावर एक भरारी पथक, तर तालुकास्तरावर 16 भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यावर १६ तालुका कृषी अधिकारी, तसेच १६ पंचायत समिती कार्यालयातून निगराणी असणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये धडक कारवाई करण्यात आली होती 12 बियाणे विक्रेते, 16 रासायनिक खते विक्रेते, पाच कीटकनाशक विक्रेते अशा एकूण 33 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले होते. दहा जणांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. 51 लोकांवर विक्री बंद आदेश बजावण्यात आला, तर दोन लोकांवर पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी विभागामार्फत येणाऱ्या वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा सादर केला.

 

जलसंधारणाची कामे राबवा...

मराठवाड्याच्या अन्य जिल्ह्याप्रमाणे यावर्षी देखील नांदेडमध्ये काही गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पावसाचे पाणी न अडविणे यामुळे आपले जलस्त्रोत उन्हाळ्यात कोरडे होतात. त्यामुळे पुढील दीड महिन्यात लोकसहभागातून गावतलाव खोलीकरण करण्यावर भर द्यावा.  तसेच आचारसंहितेपूर्वी सुरू झालेली नाला रुंदीकरण, खोलीकरण ही सर्व कामे पूर्ण करावी. लोकसहभागाच्या कामाला आचारसंहितेची अडचण नाही. लोकसहभागातून जास्तीत जास्त कामे 15 जून पूर्वी पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

00000





सारथी प्रणाली 18 मेपर्यंत बंद

  सारथी प्रणाली 18 मेपर्यंत बंद नांदेड दि.   17   :-   अनुज्ञप्ती  ( लायसन्स )  व अनुज्ञप्ती विषयक सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाच्या सारथी ...