Thursday, August 15, 2019

                             विभागीय माहिती कार्यालयात
स्वातंत्र्य दिनानिमीत्त ध्वजवंदन
            
 औरंगाबाद, दि. 15-  भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यानंतर देशाने केलेली प्रगती ही अभिमानास्पद बाब असून या प्रगतीच्या वाटेवर वंचित घटकांना सहभागी करुन घेत स्वतंत्र भारताच्या विकासाला आपण सर्व मिळून व्यापक करण्याचा संकल्प करुया असे आवाहन मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) यशवंत भंडारे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्री.भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
            भारतीय राज्य घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समानता, न्याय, बंधुता याचा समान अधिकार दिला. ज्याद्वारे विविध जातीधर्म, पंथाचे विभिन्न भागातील लोक प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहेत. याच पध्दतीने प्रत्येक घटकांच्या परस्पर सहकार्याने देशाच्या प्रगतीसाठी आपण भरीव योगदान देण्याच्या वृत्तीने कार्यरत होऊ या, असे आवाहन यावेळी श्री. भंडारे यांनी केले.
तत्पूर्वी सर्वांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत म्हटले. यावेळी अमरावती विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी, सहायक संचालक प्रमोद धोंगडे, माहिती सहाय्य्क श्याम टरके, रेखा पालवे आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्रातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्यने उपस्थिती होती.
**********
 





अल्पसंख्याक उमेदवारांसाठी
पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण
नांदेड, दि. 15 :- "पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत" राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामुल्य पोलीस शिपाई भरती पुर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांकडून प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत असून यासंदर्भात निवड चाचणीसाठी सोमवार 19 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा मुख्यालयातील पोलीस परेड ग्राऊंड नांदेड येथे अर्ज आणि सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती, दोन पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
उमेदवारांच्या निवडीसाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे राहतील. प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसल्याचा पुरावा. उमेदवार अल्पसंख्यांक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या समाजातील असावा. उमेदवार हा 18 ते 28 या वयोगटातील असावा. उमेदवारांची उंची पुरुष 165 से.मी. व महिला 155 से.मी., छाती पुरुष 79 सेमी. फुगगवून 84 से.मी. असावी. उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक राहील. उमेदवार शारीरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा.
प्रशिक्षणाचे स्वरुप : निवडलेल्या उमेदवारांना एकुण दोन महिने (50 दिवस) प्रशिक्षण दिले जाईल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणा दरम्यान 1 हजार 500 रुपये प्रतीमाह प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. मैदानी प्रशिक्षणानंतर संस्थेमार्फत चहापान व अल्पोपहार, गणवेश साहित्यासाठी गणवेश, बुट, मोजे, बनियन आदीसाठी 1 हजार रुपये एवढी एकरकमी अनुदान देण्यात येईल. निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणादरम्यान निवासाची व्यवस्था स्वत: करावी लागेल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000













स्वातंत्र्यदिन ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ उत्साहात संपन्न
दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणमधून
पाणी देण्याचा निर्णय - पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 15 :- मराठवाड्यात सातत्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असून यासाठी मराठवाड्यास कोकणमधून पाणी देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यास हा मोठा दिलासा ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेश देतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या समारंभात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती दिक्षा धबाले, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड, समाज कल्याण सभापती श्रीमती शिलाताई निखाते, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, जिल्हा परिषद, महापालिकेतील पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटूंबीय, माजी सैनिक, विविध विभागांचे अधिकारी , कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शुभेच्छा संदेशात पालकमंत्री श्री. कदम यांनी अनेकांच्या बलिदानातून भारताला स्वतंत्र्य मिळाले असून आम्ही सारे भारतीय एक आहोत असे स्पष्ट करुन स्वातंत्र्य दिनी आज पहिल्यांदा जम्मू काश्मिरमध्ये भारताचा तिरंगा फडकत आहे. याचा सर्व भारतीयांना अभिमान असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे धन्यवाद मानले.
पालकमंत्री श्री. कदम पुढे म्हणाले राज्यात सांगली, कोल्हापूर, सातारामध्ये अतिवृष्टी झाली तर आज मराठवाडा तहानलेला आहे. मराठवाड्यावर निसर्गाची अवकृपा होत असून शेतकरी आकाशाकडे डोळे भरुन पाहत आहेत. कोकणमधून मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णयाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पावसाचे पाणी जमिनीत साठवण्याचा जलपुनर्भरणाचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापुरता मर्यादेत न राहता शहरी / ग्रामीण भागात हा उपक्रम राबविला पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्यास आपण दुष्काळाशी सहज सामना करु शकतो. टंचाईसह विविध विकास कामांसाठी राज्य शासन मराठवाड्याच्या सदैव पाठीशी राहील, असे सांगून पालकमंत्री रामदास कदम यांनी सर्वांना भारतीय स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
  यावेळी पालकमंत्री श्री. कदम यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांची आस्थेवाईकपणे विचारपूसही केली.  
कार्यक्रमात पालकमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते राष्ट्रपतीपदक प्राप्त सहायक पोलीस उपनिरीक्षक खामराव वानखेडे, अविनाश सातपूते तर चीनमध्ये जागतीक पॅरा ॲथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत गोलाफेक व भालाफेकमध्ये कास्यपदक प्राप्त दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा राष्ट्रीय स्तरातून शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले 13 विद्यार्थी, सीबीएसई बोर्ड परीक्षेत गुणवंत विद्यार्थी हर्षवर्धन जाजू, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने गुणवत्तापात्र शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले 35 विद्यार्थी, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 साठी प्रथम पुरस्कार ज्ञानेश्वरी व्हिजन फाउंडेशनचे श्री पाठक व द्वितीय पुरस्कार अल-इम्रान प्रतिष्ठान बिलोलीचे अध्यक्ष मोहसीन खान, सचिव इम्रान खान पठाण यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पालकमंत्री रामदास कदम यांचे हस्ते दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना गॅस वितरण करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने बाधित नागरिकांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी येथील दत्ता देशमुख, विजय देशमुख, विक्रांत देशमुख, बालाजी नरंगले तसेच पत्रकारांकडून यावेळी धनादेश पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे सुपूर्द केला. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचालन केले.
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते
रेन वॉटर हार्वेस्टींगचे उद्घाटन
येथील जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून पावसाच्या पाण्याचे साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) उपक्रमाचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे
 

 उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
00000 


  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...