Wednesday, August 1, 2018


सोशल मिडियातील फेक न्यूज
ओळखण्याची जबाबदारी प्रत्येकाची
- अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे
नांदेड, दि. 1 :- विविध सोशल मिडियाचा वापर करीत असतांना त्याच्या फायद्याबरोबरच त्याचे तोटे लक्षात घेऊन खरी व खोटी माहिती ओळखण्याची जबाबदारी आता प्रत्येक जागरुक नागरिकांची बनली आहे, असे प्रतिपादन भारतीय पोलीस सेवेतील अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी केले आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "फेक न्यूज परिणाम आणि दक्षता" या विषयावर पोलीस अधीक्षक कार्यालयातील चिंतन हॉल येथे आयोजित कार्यशाळेत अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शिंदे बोलत होते. यावेळी गृह पोलीस उपअधीक्षक ए. जी. खान, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, जनसंपर्क अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अशोक लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शिंदे पुढे म्हणाले, प्रिंट मिडियाबरोबर सोशल माध्यमांद्वारे माहितीची देवाण-घेवाण वाढली आहे. यातून आपले जीवन सोईस्कर झाले असले, तरी खोट्या माहितीतून कुठलीही दुर्देवी घटना होणार नाही याची जबाबदारी ओळखून प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. फेसबुक व व्हॉटस्अपवरील माहितीची सत्यता पडताळणी करणे महत्वाचे आहे. मिडिया प्रत्येक घरात पोहचत आहे. समाज माध्यम प्रबोधनात मिडियाचा महत्वाचा सहभाग आहे. समाज माध्यमावरील कोणत्याही माहितीची खात्री केल्याशिवाय ती पुढे फारवर्ड करु नये, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.    
गृह पोलीस उपअधीक्षक श्री. खान म्हणाले की, खोट्या बातमीतून समाजात दरी निर्माण होते. समाजात वाईट घटना घडणार नाहीत यासाठी समाज प्रबोधन आवश्यक आहे. मात्र समाज माध्यमाद्वारे चांगला संदेश नागरिकांपर्यंत पोहचला पाहिजे. नागरिकांनी कायद्याचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.  
सायबर कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. सहाणे यांनी फेक न्यूजबाबत सविस्तर विवेचन करतांना सांगितले की, समाज माध्यमाद्वारे फेक न्यूज प्रसारीत केल्या जात असून त्यामुळे समाजात अफवा पसरविल्या जात आहेत. समाज माध्यमाचा गैरवापर थांबविण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत. खोटे संदेश, फोटो, व्हिडीओ तयार करुन अंधश्रद्धेला व समाज विघातक घटनांना पाठबळ दिले जात आहे. यासाठी सामाजिक हित लक्षात घेऊन संदेशाची सत्यता पडताळूनच तो पुढे पाठवावा. समाज माध्यम वापराबाबत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तरी यातून वाईट गोष्टी समाजात पसरले जाणार नाहीत याची खात्री करावी. प्रसार माध्यमांनी सामाजिक दृष्टीकोनातून याविषयी जनजागरण करावे. सध्या लहान मुले पळविणारी कुठलेही टोळी कार्यरत नसून अशा खोट्या बातमीवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी माध्यम प्रतिनिधींनी फेक न्यूज कशा तयार केल्या जातात त्याचा वापर कशा केला जातो, त्या कशा ओळखल्या पाहिजेत याबाबत संवाद साधला. त्याविषयी शंका समाधान  करण्यात आले. या कार्यशाळेस प्रसार माध्यमातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    
00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...