Wednesday, September 13, 2023

 बैल पोळा सणानिमित्त गोवर्गीय पशुधनास एकत्रित येण्यास सक्त मनाई

 

§  पशुपालक व शेतकऱ्यांनी बैल पोळा सण घरगुती स्वरूपात साजरा करावा

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार जिल्ह्यामधील सर्व तालुक्यातील गोवर्गीय पशुधनास बैल पोळा सणानिमित्त एकत्रित येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सर्व पशुपालक व शेतकऱ्यांनी 14 सप्टेंबर रोजी असलेला बैल पोळा सण घरघुती स्वरुपात साजरा करावा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.  

 

नांदेड जिल्ह्यातील एकूण 16 तालुक्यातील 197 ईपीसेंटरमध्ये गोवर्गीय पशुधन लंपी चर्मरोग या सांसर्गिक रोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. तसेच गोवर्गीय पशुधनामध्ये मर्तुकीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत आहे.  14 सप्टेंबर रोजी बैल पोळा सणानिमित्त मोठया संख्येने गोवर्गीय पशुधन एकत्रित येत असल्याने जिल्ह्यातील इतर निरोगी पशुधनास लंपी चर्मरोग या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आदेशान्वये गोवर्गीय पशुधन बैल पोळा सणानिमित्त एकत्रित येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे .

00000

 जिल्ह्यात कोणीही अनधिकृत वजन काटे वापरु नयेत

 वैधमापन शास्त्र विभागाचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- शेजारच्या राज्यातून वजन काट्याचे सुट्टे भाग व वजन काटे कमी दरात व कररहीत स्वरुपात महाराष्ट्रात विकले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे स्थानिक वजन काटे उत्पादक, दुरुस्तक व विक्रेते यांचे नुकसान होवून राज्य शासनाचा महसूल बुडत आहे. या अनुषंगाने राज्याचे वैधमापन शास्त्र नियंत्रक यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. चीनमधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्यांची सुध्दा कमी दरात खुल्या बाजारात विक्री होत आहे. या अप्रमाणित वजन काट्यांमुळे ग्राहकांच्या हिताची हानी होत आहे. यामुळे जिल्ह्यात कोणीही असे अनधिकृत वजन काटे वापरु नयेत, असे आवाहन जिल्ह्याचे वैधमापन शास्त्र विभागाचे उप नियंत्रक सं.मु.बिल्पे यांनी केले आहे.

चीनमधून येणाऱ्या अप्रमाणित वजन काट्यांना राज्य शासनाची व केंद्र शासनाची वैधानिक मान्यता नाही. अशा वजन काट्यांना अनाधिकृत व्यक्ती त्यांचे स्टिकर लावून त्याची अनाधिकृत विक्री करीत आहे. यामुळे ग्राहकांना माल योग्य वजनात मिळू शकत नाही. महाराष्ट्र शासनाचे महसुलावर परिणाम होत आहे. यामुळे अशा प्रकारच्या अनाधिकृत व्यक्तीकडून वजन काटे खरेदी करू नयेत, असेही वैधमापन शास्त्र विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 श्री गणेशोत्सव काळात पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात 19  सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत श्री गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्याकरीता या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधीकारीसर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 19 सप्टेंबर पासून ते 28 सप्टेंबर 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत वरील कलमान्वये पुढील अधिकार प्रदान केला आहे.

 

रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या विसर्जन मार्गातील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावेत्यांनी वर्तणूक किंवा वागणुक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही गणेश मंडळे या कोणत्या विसर्जन मार्गानेकोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत ? असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व विसर्जनाच्या व जमावांच्या प्रसंगीउपासनेच्यावेळीकोणत्याही रस्त्यावरसार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्येघाट किंवा घाटावरसर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्याकपडे धुण्याच्या व उतरणे च्या जागांच्या ठिकाणी व जागामध्येदेवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोलताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचेशिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणुन ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 333537 ते 4043 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.

 

कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारीसर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीखवेळजाहिर सभामोर्चेमिरवणुकनिर्दशनेपदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुकीचामोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणापुर्वपरवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधित अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावेत. सदर जाहीर सभामिरवणुकपदयात्रेतसमयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये.

 

हा आदेश लग्नाच्या ठिकाणीप्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेलअसेही आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे  यांनी जारी केले आहेत.

00000

 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील प्रलंबित लाभार्थांनी

ई केवायसी व आधार प्रमाणीकरण करून घ्यावे - जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी 

 नांदेड (जिमाका) दि. 13 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत १५ व्या हप्त्याच्या वितरणाचे नियोजन सुरु आहे. यासाठी जिल्ह्यात गाव पातळीवर विशेष मोहीम राबवून ई-केवायसी व बँक खाते आधारसंलग्न  करण्याचे काम मागील दोन महिन्यापासून कृषि विभागामार्फत सुरु आहे.   या अनुषंगाने पीएम किसान योजनेतील ई-केवायसी व आधार संलग्न प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी 22 सप्टेंबर 2023 पर्यंत ई-केवायसी व आधार संलग्न करुन घ्यावे. अन्यथा 23 सप्टेंबर 2023 पासून नावे रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.            

जिल्ह्यात अद्यापही 60 हजार 339 लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. तसेच 25 हजार 275 लाभार्थाचे आधार संलग्न करणे  प्रलंबित आहे. वारंवार संपर्क करूनही ई-केवायसी किंवा आधार संलग्न  करण्यासाठी प्रतिसाद देत नसलेल्या लाभार्थ्यांची नाव वगळण्यासाठी शासन स्तरावर सूचना प्राप्त आहेत.  सर्व लाभार्थ्यांनी कृषी सहाय्यक व सामाजिक सुविधा केंद्र यांच्या मार्फत किंवा स्वतः ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. त्याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 15 वा हप्ता मिळणार नाही. जे लाभार्थी ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत किंवा बँक खाते आधार संलग्न करणार नाही त्यांचे नाव या योजनेतून वगळण्यात येणार आहे. सर्व प्रलंबित लाभार्थी यांनी याची दक्षता घ्यावी.  गावातील  सरपंचपोलीस पाटीलप्रगतशील शेतकरी यांनी पुढाकार घेऊन कृषी सहायक यांच्या मदतीने ई-केवायसी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. प्रलंबित लाभार्थ्यांमध्ये मयत व्यक्तीस्थलांतरित लाभार्थीकर भरणा करणारेएक कुटुंबातील एका पेक्षा जास्त लाभार्थी असण्याची शक्यता असून तशी माहिती कृषी विभागामार्फत  संकलित करण्यात येत आहे, असेही कृषि विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 लोकसहभागातच शहराची सार्वजनिक स्वच्छता शक्य

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

§  17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा मोहिमेचे आयोजन

§  शाळा, महाविद्यालयाच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर  


नांदेड (जिमाका) दि. 13 :- माझे शहर सुंदर शहर या संकल्पनेला कृतीत उतरविण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा कृतीशील सहभाग आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या घर व परिसरापासून स्वच्छतेला सुरवात करणे आवश्यक आहे. ही मोहिम फक्त पंधरवाडयापुरती मर्यादित न ठेवता स्वच्छतेची कायमस्वरुपी सवय लावून स्वच्छतेची चळवळ लोकचळवळीत रुपांतरीत झाली तरच खऱ्या अर्थाने आपण कचरामुक्त शहर करण्यात यशस्वी होवू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज स्वच्छता पंधरवडा मोहिमेच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी माजी खासदार तथा नागरी कृती समितीचे सल्लागार डॉ. व्यंकटेश काब्दे, स्वारातीम विद्यापीठाचे संचालक डॉ. मल्लिकार्जून करजगी, नागरी कृती समितीचे डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ. बालाजी कोम्पलवार, डॉ. अशोक सिध्देवाड, मनपाचे उपायुक्त निलेश सुंकेवार, जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, कापड मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष, सर्व एनजीओचे अध्यक्ष, किराणा, हॉटेल, लायन्स क्लब, आडत व्यापारी, बार परमिट असोसिएशनचे अध्यक्ष यांची व इतर सदस्यांची उपस्थिती होती. 

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त शहरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्वच्छता मोहिम शहरात यशस्वीपणे राबविण्याचे नियोजन सर्वाच्या सहभागातून होण्यासाठी संबंधित यंत्रणांना सांगितले आहे. या अभियानात स्थानिक नागरिक, मनपा, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी यांच्या सहभागातून स्वच्छतेसाठी विविध प्रभागनिहाय दैनंदिन कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थीच्या माध्यमातून जागरणासह जनजागृती करण्यावर भर दिला जाईल. तसेच प्रत्येक शाळा, महाविद्यालयात प्लास्टिक संकलन टँक तयार करण्याबाबत निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे अनावश्यक प्लॉस्टिक संकलन होवून रस्त्यावरील कचरा कमी होण्यास मदत होईल. मनपाच्या कचरा संकलन करण्याच्या वेळा, मनपा कर्मचाऱ्यांचा कचरा संकलनातील सहभाग, सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता याबाबतच्या उपाययोजना करण्याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी राऊत यांनी सूचना दिल्या. 

 

जिल्हा कृती समितीचे सल्लागार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली टिम तयार करुन प्रभागनिहाय स्वच्छता मोहिम राबवावी. घंटागाडी व स्वच्छतेच्या वेळेत मनपाने बदल करुन घ्यावेत. शहरातील मुख्य रस्ता, सार्वजनिक ठिकाणे, नदीचा काठ, बाजाराची मुख्य ठिकाणे स्वच्छ होतील याबाबत उपाययोजना व नियोजन गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

व्यापारी असोसिएशनतर्फे मार्केटमधील कचरा निर्मुलनासाठी आवश्यक त्या उपाययोजना स्वत: च्या पुढाकारातून करण्याबाबत व्यापारी असोसिएशनने सकारात्मता दर्शविली. स्वच्छतेबाबत ज्या काही उपाययोजना करता येईल त्यात पुढाकार घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. 

00000

 वृत्त, दि. 13 सप्टेंबर 2023

 

श्री गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद

दोन्ही सण शांतता व एकोप्याने साजरे करावेत

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :-  श्री गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जिल्ह्यात हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी शांतता भंग न होणार नाही याची दक्षता घेन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,  अपर पोलीस अधीक्षक के. ए. धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह शांतता समितीचे सन्माननीय सदस्य व इतर सदस्यांची उपस्थिती होती.

 

जिल्ह्यात श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सोशल माध्यमावरील संदेशामुळे जिल्ह्यात शांततेचा भंग होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. याबाबत अगोदर सोशल माध्यमावरील संदेशाची सत्यता तपासून मगच प्रतिक्रिया द्यावी. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घेवून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. सणाच्या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने गणेश मंडळानी यावर्षी प्रबोधनात्मक देखावे तयार करावेत अशा सूचना त्यांनी केल्या. गोवर्गीय पशुधनाच्या सुरक्षितेसाठी व लंम्पी आजारावर प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात नागरिकांनी पोळा सण साधेपणाने घरच्या घरी साजरा करावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.  

 

यावर्षी दोन्ही धर्मीयाचे सण एकत्र आले आहेत. दोन समाजाने या कालावधीत शांतता व संयम पाळून सण साजरे करावेत. गणपती मंडळानी समाजात तेढ निर्माण होणार नाहीत याची काळजी घेवून देखावे साजरे करण्यावर भर द्यावा, असे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी सांगितले. नागरिकांनी स्वत: होवून नियम पाळले तर शांततेचा भंग होणार नाही. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून सण आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

 

समाजाची शांतता भंग करणारे सोशल माध्यमावर संदेश, अफवा अशा अशांततेच्या गोष्टीना टाळून सर्वांनी शांतता प्रस्थापित करण्याची काळजी घ्यावी. या उत्सवात सर्व विभागाचे सहकार्य असून पोलीस विभाग दक्ष असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.

 

यावेळी श्री गणेश उत्सवात विद्युत पुरवठा नेहमी सुरळीत राहील याची काळजी घेतली जाईल. दहा दिवसासाठी पुरविण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्याविषयी कार्यकारी अभियंता विद्युत विभाग यांनी माहिती दिली. प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वाहनाची तपासणी नियमानुसार करुन प्रमाणपत्र निर्गमित केले जाईल. याबाबत पुरविण्यात येणाऱ्या सेवा वेळेत देण्याबाबत माहिती दिली. शांतता समितीच्या सदस्यांनी श्री गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणामध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्या निवारण्यासाठी संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगितले. सण साजरा करण्यासाठी दाखविलेल्या सामजस्यांबाबत समितीच्या सर्व सदस्यांचे जिल्हा प्रशासनाने आभार मानले.                              

    00000







 वृत्त

 

आयुष्यमान भव: मोहिमेचा जिल्हा पातळीवर शुभारंभ

 

· अंगणवाडी ते 18 वयोवर्ष गटातील बालक व विद्यार्थ्यांची होणार मोफत तपासणी

· संदर्भीत रुग्णांवर होणार मोफत उपचार

· माता सुरक्षित घर सुरक्षित अभियांतर्गत महिलांच्या पाठोपाठ आता पुरूषांची होणार तपासणी

 

नांदेड, (जिमाका) दि. 13 :-स्वत:च्या स्वच्छतेसह परिसराच्या स्वच्छतेत निरोगी आयुष्याचा मंत्र दडलेला आहे. बरेचसे आजार हे संसर्गजन्य व अस्वच्छतेतून जन्माला येतात. याचबरोबर असंसर्गजन्य रोग हे व्यक्तीपरत्वे आढळून येतात. प्रत्येकाच्या निरोगी आयुष्यासाठी केंद्र शासनाची आयुष्यमान भव: ही मोहिम अत्यंत गरजेची असून संपूर्ण जिल्हाभर गाव पातळीपर्यंत अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणेने जबाबदारीने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.

 

संपूर्ण देशभर आयुष्यमान भव: मोहिमेचा शुभारंभ केंद्र शासनस्तरावर महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राज्यपातळीवरील या मोहिमेचे उद्घाटन ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा पातळीवरील या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते श्री गुरूगोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे करण्यात आला. जिल्हा पातळीवरील कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन आदी उपस्थित होते.

 

यावेळी टीबी कार्यक्रमात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल मुख्य कार्यकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते निक्षय मित्र विवेक माधव खरात, गिरीष रमेशराव देशपांडे, शरद संभाजीराव पवार तसेच टी. बी. चाम्पीयन, हरिदास बळीराम वाघमारे, शेख मोहम्मद गऊस शेख रहीम यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्वांनी अवयवदानाची शपथ घेतली. स्वतः मीनल करनवाल यांनी अवयवदानाचा फॉर्म भरून अवयवदान करण्याचा संकल्प केला.

 

17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत आयुष्यमान भव: मोहिम राबवली जाणार आहे. सदर मोहिमेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्डची नोंदणी व वितरण केले जाणार आहे. तसेच सर्व आरोग्य संस्थामध्ये, शाळा, महाविद्यालय येथे स्वछता मोहीम राबविली जाईल. आरोग्य वर्धिनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय स्तरावर आयुष्यमान मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवारी असंसर्गजन्य रोग आणि दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्टरोग व इतर संसर्गजन्य आजारा बाबत तपासणी, निदान व उपचार केले जाणार आहेत. तिसऱ्या आठवड्यात माता, बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत. चौथ्या आठवड्यात सिकलसेल तपासणी व नेत्ररोग चिकित्सा, कान-नाक व घसा तपासणी सुविधा दिल्या जातील. याचबरोबर सर्वांनी अवयवदान करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर आवाहन केले जाईल. रक्तदान शिबीरही प्रत्येक तालुक्यात शासकीय दवाखाण्यात घेतले जाणार आहे. शुन्य ते 18 वय वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये ४Ds’- (Defects at birth, Development Delays, Deficiencies and Diseases) करिता केली जाणार आहे. 18 वर्ष वयोगटाच्या पुढील व्यक्तींनाच्या विविध तपासण्या केल्या जाणार आहेत.

 

2 ऑक्टोबर रोजी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत गाव पातळीवर आयुष्यमान सभेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत आयुष्यमान कार्ड, आयुष्यमान गोल्ड कार्ड याचे वितरण केले जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हणमंत पाटील, डॉ. एच. के. साखरे, आर.एम.ओ. डॉ. झिने, डॉ. अर्चना तिवारी, मेट्रन सुरेखा जाधव, कार्यक्रमसमन्वयक डॉ. उमेश मुंडे, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. गुडे, डॉ. ज्ञानेश्वर पवार, अनिल कांबळे, प्रकाश आहेर, विठ्ठल तावडे, नागोराव अटकोरे, विठ्ठल कदम, अब्दुल गनी, श्री कंधारे तसेच कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000




  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...