Thursday, August 22, 2019


वनमंत्र्यांचा आज ग्रामपंचायतींशी "महा ई संवाद"
हरित महाराष्ट्रासाठी योगदान देण्याचे आवाहन
मुंबई, दि. 22 : हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी ३ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह "महा ई संवाद" साधणार आहेत.  राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी श्री. मुनगंटीवार थेट चर्चा करतील. या सर्वांना मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा टॅबद्वारे  www.parthlive.com  या लिंकवर क्लिक करून कार्यक्रमात सहभागी होता येईल.
हरित महाराष्ट्राच्या निर्धाराने वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी लोकसहभागातून तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला. या वृक्षलागवडीच्या पहिल्या टप्प्यात २०१७ साली  ४ कोटी वृक्षलागवडीच्या बदल्यात ५ कोटी ४३ लाख वृक्ष राज्यात लागले. यात १६ लाख लोकांनी सहभाग नोंदवला. या वृक्षलागवडीची लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.  २०१८ साली १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प १५ कोटी ८८ लाख वृक्ष लागून पूर्णत्वाला गेला. या वृक्षलागवडीत राज्यातील ३६ लाख लोक सहभागी झाले आणि वृक्षलागवड हा केवळ शासनाचा उपक्रम न राहाता ती खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाल्याचे दृष्टिपथात आले.
००००
दुष्काळ निवारणासाठीमराठवाडा वॉटरग्रीड : बबनराव लोणीकर
            मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची दुष्काळ निवारणासाठीमराठवाडा वॉटरग्रीडया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता प्रक्षेपित होणार आहे.
            मराठवाड्यातील पाणीपुरवठ्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना,शासनाचा मराठवाडा वॉटर ग्रीड हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये अंतर्भूत बाबी, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाची वॉटर ग्रीडसाठी मदत,वॉटरग्रीडसाठी जलशुध्दीकरण केंद्र, जलसंपत्तीनियम प्राधिकरणाची वॉटर ग्रीड उभारणी व नियमावलीमध्ये असलेली भूमिका, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची राज्यातील अंमलबजावणी आदी विषयांची माहिती श्री. लोणीकर  यांनी जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.
००००


राष्ट्रीय प्रज्ञाशोध राज्यस्तरीय परीक्षा 17 नोव्हेंबरला

नांदेड, दि.22 : - राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 17 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज 11 सप्टेंबर 2019 पर्यंत भरता येणार आहे. तर ऑनलाईन विलंब शुल्कासह अर्ज 12 सप्टेंबर 2019 ते 18 सप्टेंबर 2019 पर्यंत भरता येणार आहे.
महाराष्ट्रातील प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेच महत्व अनन्यसाधारण आहे. सन 1963 पासून राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा योजना राबविली जाते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे हा या योजनेचा गाभा आहे. मुलभूत विज्ञान, सामाजि‍क शास्त्र आणि वाणिज्य यामधील पीएचडी (विद्यापती) पदवी प्राप्त करेपर्यंत सदर शिष्यवृत्ती मिळते. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन आणि विधी यामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदर शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर पदवीपर्यंत देण्यात येते.
या परीक्षेसाठी बसणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in  आणि http://nts.mscescholarshipexam.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहेत. सर्व शाळांनी ऑनलाईन आवेदनपत्रे सर्व माहिती व चलनासह 31 डिसेंबर 2019 पूर्वी पूर्ण करुन एनसीईआरटीकडे सादर करावयाची आहेत असे पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000



मरावे परी नेत्ररुपी उरावे....
आपल्या भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व श्री राजीव गांधी यांनी २५ ऑगस्ट १९८३ रोजी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. या कृतीची आठवण म्हणून केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे दरवर्षी भारतभर २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो.
            जगामध्ये साधारण ४ कोटी अंध व्यक्ती आहेत. त्यापैकी सुमारे १.२ कोटी अंध व्यक्ती आपल्या देशात आहेत. त्यापैकी सुमारे २० लाख अंध व्यक्तींचे बुबुळ प्रत्यारोपण शस्रक्रियेने नजर परत येऊ शकते. आपल्या संस्कृतीत विविध दान महत्वपूर्ण मानले जातात. तसेच मरणोत्तरही आपण कुणाच्या तरी कोणत्या मार्गाने का होईना उपयोगाला आले पाहिजे, असे मानले जाते.या परंपरेचे पाईक होण्याचा प्रत्येकाने काही अंशी तरी प्रयत्न केल्यास समाजातील गरजू व्यक्तींच्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत होईल.
अनंताच्या पलीकडे जाऊन
अस्तित्व उराव!
तुमच्या डोळ्यातून
तुम्ही जग बघाव!
डोळस व्यक्तींना, अंध व्यक्तींच्या जीवनातील अडी-अडचणी सोडवायचे असतील तर मरणोपरांत नेत्रदान हे अपरिहार्य ठरते. हेच खऱ्या अर्थाने अंध व्यक्तींचे पुनर्वसन होईल. आणि जन्मतः अंध असणार्या व्यक्तीना जगाचे सोंदर्य दाखवता येईल. त्यांचे जीवन सर्वार्थाने फुलवता यईल. नेत्रदानाविषयी समाजामध्ये कांही अंधश्रद्धा, गैरसमज पसरल्यामुळे आपल्या देशात नेत्रदानाचे प्रमाण हे अत्यल्प आहे. समाजातील सेवाभावी व्यक्तींनी पुढे येऊन हे गैरसमज दूर केले पाहिजे. नेत्रदान केल्याने मृत व्यक्तींचा चेहरा विद्रूप होतो. अशी जनसामान्यात धारणा आहे. पण अशाप्रकारे चेहरा विद्रूप होत नाही. नेत्रशल्यचीकीत्सक हे काळजीपूर्वक २० मिनिटाच्या शस्त्रक्रीयनंतर प्लास्टिक सर्जरी द्वारे डोळ्याच्या आतील भाग व्यवस्थित शिवून बंद  करतात. त्यामुळे पापणी पूर्ववत बंद करून ठेवता येते.
नेत्रदान कोण करू शकतो??
स्त्री असो वा पुरुष हे नेत्रदान करू शकतो. ज्या व्यक्तींचा मृत्यू विषानुंच्या आजारामुळे (उदा-एड्स,हिपाटायटीस बी, रेबीज) झाला असेल तसेच कॅन्सर सेप्टीसेनिया क्षयरोग अशा व्यक्तींचे नेत्रदान होऊ शकत नाही. नेत्रदानासाठी मृत्युपूर्वी इच्छापत्र भरले असले तर उत्तमच नसल्यास मृत व्यक्तींच्या जवळचे नातेवाईक किंवा वारस नेत्रादानास परवानगी देऊ शकतात. मृत्युनंतर दोन ते सहा तासाच्या आत नेत्रापेडीस संपर्क साधने  आवश्यक आहे. तत्पूर्वी नातेवाईकानी मयताच्या डोळ्यात अँटीबायोटीक ड्रप टाकून डोळे बंद करून ठेवावे. मृत देह स्वच खोलीत ठेवावे डोळ्यावर थंड पान्याच्या किंवा बर्फाच्या पट्ट्या ठेवाव्या. व खोलीतील पंख बंद करावा. फमिली डॉक्टर कडून मृत्यू प्रमाणपत्र घेऊन ठेवावे. अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार मृत देहातून थोडेसे रक्त एड्स च्या चाचणीसाठी ठेवतात. यानंतर बुबुळावर पंढरी टीक असणारया व्यक्तींच्या प्रतीक्षा यादीनुसार रुग्णांना बोलावून २४ ते ४८ तासाच्या आत नेत्ररोपण शस्त्रक्रिया मोफत केली जाते. तसेच नेत्रादानास मिळालेले नेत्र विकले जात नाहीत. नेत्ररोपण केलेल्या रुग्णांचे नाव नेत्रदात्यांच्या नातेवाईक यांना सांगितले जात नाही. महाराष्ट्र मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य रुग्णालय,काही खाजगी नेत्र रुग्णालय व सामाजिक संस्थांच्या नेत्रारुग्नालयात आणि अनेक नेत्र पेढ्यामध्ये नेत्ररोपण श्स्त्राक्रीयाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच नेत्रदान  इच्छापत्रे नजीकच्या नेत्रपेढीमध्ये उपलब्ध होतात. यावर्षी पासून इच्छापत्र ग्रामीण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय स्तरावर देखील नेत्रचिकित्सा अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नेत्रदाना विषयी गैरसमज दूर करून समाजमनामध्ये जाग्रुती निर्माण करण्यासाठी समाजातील शिक्षित व बुद्धिवंत आणि समाजाविषयी कणव असलेल्यांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन नांदेड जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती मार्फत करण्यात येत आहे.समिती ही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा नेत्र शाल्याचीकीत्साकाद्वारे नियंत्रित केली जाते.
आधी नेत्रदान मगच अंत्यसंस्कार! !
-           लेखक-  डॉ.संतोष बी सिरसीकर (नेत्र शल्यचिकित्सक वर्ग-१  रा.अ.नि.का.सा.रु.नांदेड)
                                                                                                   जिल्हा शल्यचिकीत्सक
                                                                                                       जि.सा.रु.नांदेड
00000


शेतकऱ्यांनी किसान मानधन योजनेचा लाभ घ्यावा
                                - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
    आजपासून नांदेड जिल्ह्यात नोंदणीसाठी विशेष मोहिम ;
गावोगावी घेण्यात येणार नोंदणी शिबिर
            नांदेड दि. 22 :- आयुष्यभर कष्ट करणाऱ्या अल्प व अत्यल्प भू धारक शेतकरी कुटूंबास उतारवयात आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना उपयुक्त आहे. जिल्हातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे.
            केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असल्याने अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे. दि. 23, 24 व 25 ऑगस्ट या तीन दिवसात या योजनेच्या नोंदणी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहाय्यक या ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांच्या सहभागातून जास्तीतजास्त लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.
लाभार्थी होण्यासाठी सोपी पद्धत
            तर योजनेच्या तुलनेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिशय सुलभता आहे. वय वर्ष १८ ते ४० वर्ष असलेले व दोन हेक्टर पेक्षा कमी शेती धारण करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. नोंदणीसाठी गावातील आपले सरकार सेवा केंद्रावर एक साधा अर्ज व सोबत बँक पासबुक,आधार ओळखपत्र व नमुना ८-चा उतारा सादर केला की नोंदणी पुर्ण होणार आहे. यावेळी कोणतीही रोख रक्कम लगेच भरण्याची आवश्यकता नाही. योजनेसाठी लाभार्थ्याचे अंशदान त्याच्या खात्यातून आपोआप जमा करण्यात येईल. तेवढे अंशदान केंद्र सरकारच्या कडून विमा महामंडळाकडे जमा करण्यात येईल.
वयाची साठ वर्ष पुर्ण होताच लाभार्थ्यास ३ हजार रूपये प्रतिमाह मानधन मिळतील. एकाच कुटूंबातील अनेकजण या योजनेत सहभागी होवू शकतात. तथापी त्यासाठी प्रत्येकाने स्वतंत्रपणे अंशदान भरावे लागेल. काही अडचणीमुळे अंशदान भरता आले नाही तरी जमा रक्कम व्याजासह मिळण्याची सोय या योजनेत आहे.
यांना घेता येणार नाही लाभ
             ही योजना प्राधान्याने अल्प व अत्यल्प भू धारकांसाठी असल्याने त्यांचे व्यतिरिक्त उच्च आर्थिक उत्पन्न असलेले शेतकरी, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, कर्मचारी राज्य विमा योजना, कर्मचारी निधी संघटन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री लघू व्यापारी मानधन योजना यासारख्या योजनांच्या लाभार्थींना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचबरोबर जमीन धारण करणारी संस्था, संवैधानिक पदधारण करणारी अथवा केलेली व्यक्ती, आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत तसेच निवृत अधिकारी-कर्मचारी, आयकर भरणाऱ्या व्यक्ती, नोंदणीकृत व्यावसायिक जसे डाँक्टर,वकील,अभियंता,सनदी लेखापाल,वास्तुविशारद ईत्यादींना या योजनेसाठी अपात्र ठरवले आहे. असे असले तरी शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशीही माहिती दिली आहे.
00000


मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 8 ऑगस्ट पासून लागू
बेरोजगारांना मिळणार आता उद्योगासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज
नांदेड दि. 22 :-  वाढणारी बेरोजगारी लक्षात घेवून राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना लागू केली असून राज्यात 8 ऑगस्ट पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. उत्पादन आणि सेवा याअंतर्गत येणाऱ्या उद्योगासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात दहा हजार बेरोजगारांना उद्योजक बनवण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार असून यापुर्वी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना देशभर सुरु आहे. या धरतीवर राज्य सरकारने दुप्पट कर्ज देणारी ही नवी योजना मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या नावावर सुरु केली आहे. केंद्र सरकारची योजना जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांची नव्याने सुरु झालेली ही योजना 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देणारी असून यामध्ये खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 25 टक्के अनुदान देण्याची तरतूद आहे. अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 33 टक्के अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यासाठी तीनशे कोटींची तरतूद करण्यात आली असल्याने प्रत्येक जिल्ह्याच्या वाट्याला नऊ ते दहा कोटी रुपये चालू आर्थिक वर्षात उपलब्ध होणार आहेत. राज्यात रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारने ही योजना लागू केली आहे.
या योजनेसाठी अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार हा 18 ते 45 वयोगटातील असावा. विशेष प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथील आहे. 50 लाखापर्यंत प्रकल्प येाजनेत कर्ज उपलब्ध होईल. राज्य शासनाचे मार्जीन मनी अनुदान 15 ते 35 टक्के राहणार आहे. दहा लाखापर्यंत प्रकल्पासाठी किमान दहावी वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शहरी भागात जिल्हा उद्योग केंद्र तर ग्रामीण भागात जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यामार्फत ही योजना राबविली जाणार आहे. येत्या पाच वर्षात एक लाख उद्योजक तयार होतील असे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत कर्जासाठी ऑनलाईन प्रस्ताव कागदपत्रासह भरावा लागणार आहे. त्यानंतरच बॅक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्याकडून तपासणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कर्ज मंजूर करेल व उद्योग सुरु केल्यानंतर अनुदानासाठी मागणी करायची आहे. ती अनुदान रक्कम बँकेत फिक्स डिपॉझीट राहील. तीन वर्षे उद्योग सातत्याने चालल्यानंतर लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार अनुदान मिळेल. अर्जदाराने http://cmegp.org.in/onlineapplication या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावेत, अशी माहिती नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी दिली आहे.
000000


वीज अंगावर पडू नये
यासाठी बचावाच्या उपाययोजना
नांदेड दि. 22 :- दरवर्षी जगात विजा पडून होणाऱ्या मृत्‍युंचे प्रमाण खपूच जास्‍त आहे. नांदेड जिल्‍हयात वारंवार विजा पडून मोठया प्रमाणावर वित्‍त आणि जीवीतहानी झालेली आहे. याबाबत सखोल संशोधन करण्‍यासाठी भारतीय उष्‍णदेशीय मौसम विज्ञान संस्‍थान, पृथ्‍वी विज्ञान विभाग भारत सरकार, पुणे येथील दोन वरीष्‍ठ शास्‍त्रज्ञांनी नांदेड जिल्हयातील वीज प्रवण गावांना भेटी दिल्‍या होत्‍या. त्‍यांचा संशोधनाचा अहवाल जिल्‍हा प्रशासनास पाठविलेला होता.
 त्‍यांच्‍याद्वारे स्‍थापित करण्‍यात आलेल्‍या विजपात पूर्वसूचना  Lightning Information & Predicition System (LIPS) देणारी यंत्रणा व त्‍याचे सेंसर स्‍थापित करण्‍यात आले आहेत. एखादया ठिकाणी विजांचा कडकडाट होत असेल तर ही प्रक्रिया आजुबाजुला पसरते आणि ही यंत्रणा 200 कि.मी. परिक्षेत्रात याची पूर्व सूचना देते. त्‍यामुळे खबरदारी म्‍हणून तेथील यंत्रणेला दूरध्‍वनी, मोबाईल आणि व्‍हॉटस्अप प्रणालीवर संदेश प्रसारीत करुन जास्‍तीत जास्‍त एक ते दीड तास आधी याची पूर्वसूचना देवून संभावीत धोका आणि होणारी वित्‍त व जीवीतहानी टाळता येणे शक्‍य होते. हे संदेश आपल्‍याव्‍दारे सुद्धा पुढे प्रसारीत होणे आवश्‍यक आहे.  
मान्‍सून सक्रिय होण्‍याच्‍या एक महिना अगोदर अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाच्‍या काळात विजा कोसळण्‍याचे प्रकार सर्वाधिक घडतात. पाऊस पडण्‍याच्‍या आधी साधारणत: दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेच्‍या सुमारास आकाशात अचानक ढग जमतात आणि काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात व मोठया आवाजासह कुठेतरी पडतात. याच कालावधीत शिवारात खरिपाची तयारी सुरु असते. त्‍यामुळे शेतात काम करीत असलेल्‍या शेतक-यांचा, मजुरांचा आणि जनावरांच्या अंगावर विजा पडून मृत्‍यू झाल्‍याच्‍या घटना नियमितपणे घडतात. उंच झाड हे कोसळणाऱ्या विजेला आकर्षित करतात त्‍यामुळे झाडाखाली आश्रय कोणत्‍याही परिस्थितीत घेवू नये.  याबाबत तहसीलस्‍तरावर वेळोवेळी घेण्‍यात येणा-या तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, सरपंच, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षण, वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आदींना विजेबाबत माहिती दिल्यास व सूचना फलकावरही माहिती डकविल्‍यास मोठया प्रमाणावर जनजागृती होते.
विजापासून सुरक्षित राहण्‍यासाठी सूचविण्‍यात येत असलेल्‍या उपाययोजना पुढील प्रमाणे आहेत.      कोसळणारी वीज ही उंच वस्‍तूवर, ठिकाणावर कोसळते आणि धातूच्‍या वस्‍तूवर जास्‍त आकर्षित होते.
 हे टाळा :- एकटे उभे असलेले मोठे झाड आणि टेकडी किंवा डोंगराचा माथा येथे विजा चमकत असताना आश्रय घेणे टाळावे. सगळयात जास्‍त धोका झाडाखाली थांबल्‍यामुळे उद्भवतो ज्‍यांच्‍या फांदया छोटया व दूरपर्यंत पसरलेल्‍या असतात.  निर्जन ठिकाणी विखुरलेले झाडांचे समुह विजेला आकर्षित करतात.  झाडाच्‍या जवळ किंवा खाली उभे राहिल्‍यामुळे मनुष्‍याला अशा प्रकारे ईजा होण्‍याची, दगावण्‍याची शक्‍यता असते. धातुंच्‍या वस्‍तू जसे छत्री, चाकु, गोल्‍फ खेळावयाची छडी, भांडे विशेषत: हे जर का शरीराच्‍या वरच्‍या बाजुला  असल्‍यास विजा चमकत असताना दूर ठेवाव्‍यात.  
अचानक होणा-या वीज वादळापासून स्‍वत:चा बचाव करण्‍यासाठी पुढील सूचना पाळाव्‍यात. तात्‍काळ मोकळया जागेवर यावे आणि दोन्‍ही पाय गुडघ्‍याजवळ घेउन त्‍यांना दोन्‍ही हातानी आवळुण ठेवावे तथा हनवटी जवळ घेतलेल्या गुडघ्‍यांवर टेकवावी.
विजा चमकत असताना किंवा वादळी परिस्थिती निर्माण झाल्‍यास काय करावे व                                            काय करु नये - विद्युत सुवाहक असणा-या वस्तुंपासुन दूर राहावे. यात आगीचे स्थान, वाहनाचे रेडीएटर्स, स्‍टोव्‍ह, धातुचे पाइप, धातुचे वाँश बेसीन, मोबाइल फोन इत्‍यादी. विजा चमकत असताना विद्युत प्‍लगमध्‍ये कोणत्‍याही ईलेक्ट्रॉनिक वस्‍तूची जोडणी देण्‍यात येवू नये. जसे हेयरडायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझर. जर वीज आपल्‍या घरावर कोसळली तर त्‍यातील प्रभार प्‍लगच्‍या माध्‍यमातून विद्युत प्‍लगमध्‍ये येवू शकते. विजा चमकत असताना मोबाईल, इंटरनेट जोडणी असलेले संगणक, टिव्‍ही, दुरध्‍वनी यांचा वापर करु नये, वीज यामुळे आकर्षित होवू शकते. चारचाकी वाहन हे विजेपासून सुरक्षित ठेवणारे साधन आहे. विजा कडाडत असताना त्‍यातुन बाहेर येवू नये.
धातुंच्‍या वस्‍तू विजा चमकत असताना त्‍या घेवून बाहेर जावू नये. जसे छत्री, धातुंची भांडी इत्‍यादी. पाण्‍यात असल्‍यास त्‍वरीत बाहेर यावे. यात जर का होडी किंवा नाव असल्‍यास त्‍यातून लवकर बाहेर पडावे. विजा चमकत असताना जर आपण बाहेर आहात तर त्‍वरीत सुरक्षित आसरा घ्‍यावा. इमारत सुरक्षित आसरा ठरते. जर इमारत उपलब्‍ध नसल्‍यास गुफा, कपार हे सुरक्षित ठिकाण ठरतात. सुरक्षीत आश्रय उपलब्‍ध झालेच नाही तर उंचीच्‍या वस्‍तुंखाली आश्रय घेवू नका. जर ओसाड ठिकाणी झाड आहे तर त्‍यापासून सुरक्षित अंतर ठेवून जमिनिला टेकून बसा. उंचझाड वीजपाताला आकर्षित करतात. विजा चमकत असतांना विद्युत प्रभार जाणविल्‍यास अंगावरील केस उभे राहतात किंवा त्‍वचेला मुंग्‍या, झिणझिण्‍या आल्‍यासारखे वाटते. तेंव्‍हा समजून घ्‍यावे की, वीज आपल्‍यावर पडणार आहे यावेळी त्‍वरीत आपल्‍याला जमिनीवर बसलेल्‍या मुद्रेत जावे. या विविध उपाययोजनांमुळे वादळी वीज पडून होणाऱ्या मृत्‍युंचे प्रमाण कमी करण्‍यासाठी मदत होईल व वादळी विजांपासून आपला जीव वाचू शकेल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  
00000


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
यांच्या जीवन चरित्रावर सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन 
नांदेड, दि. 22 :-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरिञावर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवाजी कांबळे यांचे व्याख्यान विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम सोमवारी 26 ऑगस्ट 2019 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह नांदेड येथे दुपारी 4 वा. आयोजित करण्यात आला आहे.
सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दि. 31 जुलै 2019 अन्वये राज्य शासनाने विख्यात साहित्यीक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष दि. 1 ऑगस्ट 2019 ते दि. 1 ऑगस्ट 2020 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. याअनुषंगाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेडच्या वतीने सोमवार 26 ऑगस्ट 2019 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनचरिञावर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवाजी कांबळे हे व्याख्यान विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप होणार आहे हा कार्यक्रम 26 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 4 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, ज्ञानमाता शाळेसमोर हिंगोली रोड नांदेड येथे आरोग्य सेवा (कृष्ठरोग)चे सहायक संचालक डॉ. विठ्ठ मेकाणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहूणे म्हणुन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांच्यउपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हयातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त व्यक्ती संस्था, सर्व सामाजिक, राजकीय प्रतिनिधी, समाजबांधवानी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन महामंडाचे जिल्हा व्यवस्थापक जी. जी. येरपवार यांनी केले आहे.
000000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 5.55 मि.मी. पाऊस
नांदेड, दि. 22 :- जिल्ह्यात गुरुवार 22 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 5.55 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 88.82 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 480.44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 50.23 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 22 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 23.38 (482.25), मुदखेड- 7.67 (529.02), अर्धापूर- 6.00 (411.30), भोकर- 13.50 (501.95), उमरी- 8.00 (478.44), कंधार- निरंक (434.49), लोहा- 2.67 (389.86), किनवट-4.86 (654.96), माहूर- निरंक (634.34), हदगाव- 0.43 (452.71), हिमायतनगर- 1.67 (523.69), देगलूर- 0.17 (331.33), बिलोली- 5.20 (519.80), धर्माबाद- 11.67 (474.65), नायगाव- 3.60 (458.20), मुखेड- निरंक (409.99). आज अखेर पावसाची सरासरी 480.44 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 7686.98) मिलीमीटर आहे.  
00000


रेशीम कृषि प्रदर्शनाचे जालना येथे आयोजन  
        नांदेड, दि. 22 :- रेशीम संचालनालय सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालयाच्यावतीने रेशीम दिन साजरा करण्यात येत असून हा कार्यक्रम जालना येथे रविवार 1 सप्टेंबर 2019 रोजी आयोजित करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी रेशीम संचालनालयाच्यावतीने 30 ऑगस्‍ट ते 1 सप्‍टेंबर 2019 रोजी रेशीम कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
            रेशीम साहित्‍य निर्मिती करणारे, कृषि कंपन्‍या, विमा कंपन्‍या, खादय पदार्थ विक्री करणारे, रेशीम व कृषिसाठी उपयुक्‍त साहित्‍य निर्मिती करणारे उत्‍पादक व विविध बचतगट आदींनी उत्‍पादनाची मोठया  प्रमाणात प्रसिद्धी व विक्री करण्यासाठी प्रदर्शनी स्‍थळी स्‍टॉल लावता येणार आहे. स्‍टॉल नोंदणी तसेच अधिक माहिती व संपर्कासाठी पत्‍ता पुढील प्रमाणे - रेशीम संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य, 6 वा माळा, नवीन प्रशासकीय इमारत क्र. 2 विभागीय आयुक्‍त कार्यालय, परिसर, सिव्‍हील लाईन्‍स, नागपुर- 440001 फोन क्र. ०७१२-२५६९९२४/ २५६९९२६. ई-मेल dos.maha@gmail.com. सहायक संचालक, प्रादेशिक रेशीम कार्यालय, प्‍लॉट क्र.५४, सदाशिव नगर, धूत हॉस्पिटल समोर, सिडको एन-२, औरंगाबाद. १०३१००३. फोन क्र. ०२४०- २४७५७४७ मो.क्र. ९४२०१९१०६७  ई-मेल adsilkaurangabad@gmail.com. तर रेशीम विकास अधिकारी श्रेणी-२, जिल्‍हा रेशीम कार्यालय,कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती परिसर, कापुस प्रयोगशाळा इमारत, जालना. ४३१२०३ फोन क्र. ०२४८२- २२९०४७ मो.क्र. ९८५०४४७०९६ ई-मेल reshimjalna@gmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000



संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्राचे कामकाज
हाताळण्यासाठी पात्र संस्थांना प्रस्ताव करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 22 :- स्वयंसेवी संस्थांकडुन संकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्रचे (One Stop Crises Centre) दैनंदिन कामकाज हाताळण्यासाठी नेमावयाच्या पात्रताधारक संस्थेकडून प्रस्ताव 10 सप्टेंबर 2019 अखेर पर्यंत मागविण्यात येत आहेत.
केंद्र शासनाच्या महिला बाल विकास विभागाकड नांदेड जिल्ह्यासंकटग्रस्त महिलांसाठी निवारा केंद्र मंजुर करण्यात आले आहे. हे केंद्र तात्पुरत्या स्वरुपात, लाल बहादुर शास्त्रीनगर नांदेड येथे श्री नारायण कामाजी गोरे यांची इमारत रविदानिवास घर क्र. 1/12/849 दि. 13 जून 2017 पासुन जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन कायदेश मदत आदी तातडीने उपलब्ध होईल यासाठी कार्यान्वीत करण्यात आले आहे.
            या केंद्राचे दैनंदिन कामकाज प्रभावीपणे चालवण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या One Stop Crises Center च्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे, पात्रताधारक एजन्सीची निवड करावयाची आहे. योजनेच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये नमुद केल्यानुसार नांदेड जिल्ह्यातील महिलांविषयक कायदे योजनांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था, अशा स्वयंसेवी संस्थामधुन पात्रताधारक संस्थेची (एजन्सीची) निवड करावयाची आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील उपरोक्त नमुद मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थाकडुन (एजन्सीकडुन) 10 सप्टेंबर 2019 अखेर अर्ज मागविण्यात येत आहे.
           इच्छुक नमुद मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थानी (एजन्सींनी) विहीत नमुन्यातील अर्जाचा नमुना 31 ऑगस्ट 2019 पर्यंत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, 24 गणेश कृपा शास्त्री नगर (भाग्य नगर) नांदेड 431605 येथे शासकीय सुट्टया वगळता उपलब्ध राहतील. तसेच या कार्यालयाने प्रमाणित केलेल्याचा अर्जाचा नमुना निवड प्रक्रियेदरम्यान विचारात घेतला जाईल, असे आवाहन अध्यक्ष जिल्हा व्यवस्थापन समिती तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...