Tuesday, January 26, 2021

 

राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार- 2021

कामेश्वर वाघमारे याचे 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून कौतूक 

नांदेड (जिमाका) दि. 26 :-  जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील घोडज येथील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या शालेय विद्यार्थ्याला महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांचेकडून राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार 2021 घोषित झाला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याचे कौतूक करुन प्रशस्तीपत्र देऊन त्याचा गौरव केला. 

वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षेपर्यतच्या वयोगटासाठी  शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य या क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी बजावणाऱ्या बालकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कामेश्वर जगन्नाथ वाघमारे यांने कंधार तालुक्यातील घोडज येथे 22 फेब्रुवारी 2020 रोजी ऋषी महाराज मंदिरात आदित्य दुंडे व गजानन श्रीमंगले व ओम मठपती हे तीघे दर्शनासाठी आले होते. तत्पुर्वी हे तिघेही आंघोळीसाठी मानार नदीच्या धोबीघाटावर गेले होते.  परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडत होते. यावेळी कामेश्वरने आदित्य दुंडे व गजानन श्रीमंगले या दहावीच्या विद्यार्थ्यांना प्राणाची पर्वा न करता पाण्याच्या बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. या शौर्याची दखल घेवून महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून त्यास प्रधानमंत्री बाल शक्ती पुरस्कार 2021 घोषीत झालेला आहे. मात्र यापैकी ओम मठपती या विद्यार्थ्यांचे प्राण वाचविता आले नसल्याचे शल्यही कामेश्वरला बोचत आहे असे कामेश्वर यांनी सांगितले.

00000




 

 

समाजमनाला योग्य मार्गाने प्रवाहित करण्यात

साहित्यिक, विचारवंत, कलावंतांचे योगदान मोलाचे

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड, (जिमाका)दि. 26 :- विचारवंतांची उपलब्धता ही राज्याची वैचारिक पातळी दर्शवित असते म्हणून लेखक, कवी, निर्मिती क्षेत्रातील कलावंत आणि दिग्दर्शकांनी देशात काय चालले आहे, याकडे गांभीर्याने लक्ष ठेऊन समाजमन योग्य दिशेने प्रवाहित करण्याचे काम करावे, असे आवाहन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज केले.  

नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने मंगळवार 26 जानेवारी रोजी येथील कुसुम सभागृहात सावित्रीबाई फुले व नरहर कुरुंदकर पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मंगराणी अंबुलगेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यक्रमात आ. अमरनाथ राजूरकर, आ. बालाजी कल्‍याणकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. श्‍यामसुंदर शिंदे, महापौर मोहिनी येवनकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आमदार वसंत चव्‍हाण, हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा तथा आरोग्‍य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्‍याण सभापती रामराव नाईक, महिला व बाल विकास सभापती सुशीलाताई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माध्‍यमिक शिक्षणाधिकारी बालासाहेब कुंडगीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश भोसीकर, साहेबराव धनगे, लक्ष्‍मण ठक्‍करवाड, गोविंदराव नागेलीकर आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना अशोक चव्हाण पुढे म्हणाले, या देशात सामाजिक परिपक्व नेतृत्व नसेल तर तो देश नेतृत्वहीन होतो आणि वैचारिक गोंधळ निर्माण होतो. यातून अनपेक्षित गोष्टी घडत जातात. चुकीच्या विचारांच्या हातात सत्‍ता गेली की, असे घडत असते, जसे की, बलाढय आशा अमेरिकेत घडले आहे. म्हणून देशात अराजकता दिसत आहे. हे चित्र चांगले नाही. सुदृढ लोकशाहीस याबाबी मारक आहेत. त्यामुळे विचारवंत, लेखक व कवींनी अधिक जागरूक राहून लेखन करणे व समाजाला दिशा देणे गरजेचे आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात मोलाचे काम केले असून यापुढेही त्यांनी अविरतपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सावित्रीबाई फुले पुरस्काराने  संध्याताई दत्तात्रेय बारगजे व बेबीसुरेखा मनोहर शिंदे यांना तर नरहर कुरुंदकर पुरस्काराने डॉ. सुरेश सावंत व आशा पैठणे यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, ग्रंथ, शॉल, पुष्‍पहार व दीड लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

प्रारंभी क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले व कै. नरहर कुरुंदकर यांच्‍या प्रतिमेचे पुजन करुन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दीप प्रज्‍वलन करण्‍यात आले. त्‍यानंतर आनंदी विकास व संच यांनी स्‍वागत गीत सादर केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी पुरस्‍कार प्राप्‍त मान्‍यवरांचे अभिनंदन करुन त्‍यांच्‍या भावी कार्यास शुभेच्‍छा दिल्‍या. 

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले. यावेळी पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमस्थळी शैक्षणिक स्टॉल उभारण्यात आले होते. बालासाहेब कच्‍छवे यांची मेंदूची व्यायाम शाळा हा एक नावीन्यपूर्ण प्रयोग याठिकाणी मांडण्यात आला होता. या स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्‍यंकटेश चौधरी तर उपस्थितांचे आभार शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्‍हयातील साहित्‍यप्रेमी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, दत्तात्रेय मठपती, माधव सलगर, रुस्तुम आडे, दीपक महालिंगे, पद्माकर कुलकर्णी, अधीक्षक बळीराम येरपूलवार, लेखाधिकारी अमोल आगळे, डॉ. विलास ढवळे, दादाराव शिरसाट, शिवाजी नाईकवाडे, विलास कोळनूरकर, प्रवीणा मांदळे, राजेश कुलकर्णी आदींने परिश्रम घेतले.

000000






सुधारित वृत्त

कोरोना काळात जनतेने बाळगलेला संहिष्णूता व एकात्मता हा खऱ्या अर्थाने लोकशाही मुल्यांचा गौरव -         पालकमंत्री अशोक चव्हाण  

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

नांदेड, (जिमाका)दि. 26 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन आपण साजरा करीत असतांना मागील 71 वर्षांच्या संचितापेक्षा गत एक वर्षात जे काही अनुभवले, जे काही पाहिले, जे काही सोसले ते मागे वळून पाहिले तर प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही. मात्र या कठीण कालावधीत संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतीयांनी नागरिक म्हणून जो संयम, धैर्य, संहिष्णूता आणि एकात्मता दाखविली ती खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही मुल्यांचा गौरव करणारी आहे, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नागरिकांचा गौरव केला. 

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. याप्रसंगी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते.  यावेळी महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, स्वातंत्र्य सैनिक, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी व वरिष्ठ अधिकारी, नागरिक उपस्थित होते.   

राज्यघटनेच्या या मूलतत्वावर लोककल्याणकारी राज्याची भूमिका आपण स्विकारुन राज्याच्या प्रत्येक भागातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकिय योजनांना आकार दिला आहे. शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून विकासासाठी प्रतिक्षेत असलेल्या जनतेला न्याय देण्यासाठी आपण प्रशासनाची, विविध विभागांची निर्मिती केली आहे. या सर्व यंत्रणेमार्फत आपण नांदेड जिल्ह्यात विविध विकास कामांना चालना दिल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

राज्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी नांदेडला जोडता यावे यादृष्टीने आम्ही निर्णय घेतला असून आता  नांदेड ते जालना पर्यंतचा साधारणत: 194 किमीचा स्वतंत्र समृद्धी मार्ग केला जाणार आहे. हा संपूर्ण मार्ग सिमेंट काँक्रिटचा सहा पदरी असून यास अंदाजे 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येईल. मार्गामुळे धर्माबाद येथून नांदेडपर्यंत अवघ्या 1 तासात येण शक्य होणार आहे. नांदेड येथून जोडल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत अडीच तासात नांदेड येथून औरंगाबादला पोहचता येईल. मुंबईला जाण्याचा प्रवासही यामुळे अवघ्या सात तासात जलद आणि सुरक्षितरितीने नांदेडवासियांना करता येईल, असे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.    

 

धर्माबाद येथे रेल्वे उड्डाणपूल, भुयारी रेल्वेपूल अशा 170 कोटी रुपयांच्या कामांसह एशिएन डेव्हलमेंट बँकेअंतर्गत नांदेड ते निळा-आसनापूल-मुगट-कारेगावफाटा ते बासर येथील ट्रीपल आयटीपर्यंत जवळपास 1 हजार 325 कोटीचा रस्ता लवकरच हाती घेऊन याचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.  

 

कोरोनातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणखी काही काळ आपल्याला द्यावा लागणार आहे. कोरोनाचे प्रमाण कमी जरी झाले असले तरी त्याचा धोका अजून टळलेला नाही हे नागरिकांनी निट लक्षात घेऊन काळजी घेतली पाहिजे. कोरोनाची लस जिल्ह्यातील गरजूवंतापर्यंत पोहोचावी यादृष्टिने आरोग्य विभागातर्फे आपण नियोजन केले आहे. पहिल्या फेरीत आरोग्य विभागात व कोरोना व्यवस्थापन आणि नियंत्रण संदर्भात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देत आहोत. कोरोनावरची लस ही सक्षम असल्याने आपण सर्वांनी मोठ्या विश्वासाने लसीकरणासाठी तयार रहावे, असेही आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

गाव तेथे स्मशानभूमी अभियानांतर्गत

पालकमंत्र्यांच्या हस्ते जमीन प्रदान आदेशाचे वाटप

नांदेड जिल्ह्यातील असंख्य गावात आजही अंत्यविधीसाठी स्वतंत्र अशा जागा नसल्यामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकवेळा वंशपरंपरागत पद्धतीने ज्या जागेवर दहन किंवा दफन विधी केला जातो. स्मशानभूमीची जागा बऱ्याच गावांमध्ये खाजगी मालकीची असल्याने वादविवाद होतात. यात तक्रारी होत असल्याने बऱ्याचवेळा हा प्रश्न जटिल होतो. नांदेड जिल्ह्यातील या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन गाव तेथे स्मशानभूमी, दफनभूमी योजना हाती घेतली असून आज नांदेड तालुक्यातील चिखली, निळा, भोकर तालुक्यातील जांबदरी, धारजनी, मौ. चिचाळा या गावांना जमीन प्रदान आदेशाचे प्रातिनिधीक वाटपही केले.

याचबरोबर जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनासंदर्भात जर काही अडचणी असतील तर त्या शासनस्तरावर तात्काळ पोहचाव्यात व त्यावर प्रशासनाला काम करणे सोईचे व्हावे या उद्देशाने प्रशासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ त्यांनी केला.  

ग्रामीण भागासह शहरातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी बचतगटांची भूमिका ही खूप मोलाची आहे. यादृष्टिने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नांदेड यांच्यामार्फत वेळोवेळी नाविन्यपूर्ण योजनांसाठी बचतगटांना प्रोत्साहित केले जाते. जिल्ह्यातील बचतगटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत उद्योग करणाऱ्या नांदेड येथील रमाई महिला बचतगट, करंजी ता. हिमायतनगर येथील जिजाऊ महिला बचतगट, तेजस्वीनी मसाला युनिट नांदेड, नाळेश्वर ता. नांदेड येथील अष्टविनायक महिला बचतगट यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्याचबरोबर नेहरु युवा केंद्रामार्फत स्वच्छ भारत समर इंटरशीप अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या युवकांचे त्यांनी अभिनंदन केले. याचबरोबर जिल्ह्यात  बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत जी साक्षरता मोहिम घेतली आहे त्या मोहिमेचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कौतूक करुन पुस्तिकेचे प्रकाशन केले.   

किनवट येथील आदिवासी मुला-मुलींच्या

नीट-2021 प्रशिक्षणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नांदेड जिल्ह्यात आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या किनवट या तालुक्यातील आदिवासी वाड्या-पाड्यात राहणाऱ्या अभ्यासू मुलांना वैद्यकीय क्षेत्रात येता यावे व त्यांना चांगल्या शिक्षणाची विशेषत: नीट परीक्षेबाबत चांगली तयारी करता यावी यादृष्टिने पूर्व तयारी करता मिशन नीट-2021 हा उपक्रम शासकीय आश्रमशाळा किनवट-बोधडी येथे आजपासून सुरु करण्यात आला. याचा शुभारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 चा

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (pmkvy 3.0) या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एम्पावर प्रगतीचे प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, यश राजु बल्लेवार, आसिफखान हिदातखान खान या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाचे साहित्य वितरित करण्यात आले. याप्रसंगी कौशल्य विकासचे सहायक आयुक्त्त रेणुका तम्मलवार, प्रशिक्षणार्थी सहाय्यक आयुक्त गौरव इंगोले, प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे प्रमुख विजय पुरोहित उपस्थित होते.

सैनिक गोरठकर यांच्यासह पोलीसदलातील

उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदक

सीमा सुरक्षाबलाचे सेवारत सैनिक कॉ. भास्कर गंगाधर गोरठकर यांचे ऑपरेशन रक्षक जम्मु काश्मिरमध्ये अंतकवाद्याशी झालेल्या चकमकीत 50 टक्के दिव्यांगत्व प्राप्त झाले. त्यांचा आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तांब्रपट देवून गौरव करण्यात आला. पोलीस सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल मा. राष्ट्रपती यांचे पोलीस पदक पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांना देण्यात आले. याचबरोबर पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, यांना गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावल्याबद्दल विशेष सेवापदक देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक योगेश बोधगिरे, व्यंकट गंगलवाड, शिवकुमार बाचावाड, गोपाळ इंद्राळे, दिगांबर पाटील, आनंद बिच्चेवार, पो. कॉ. अमोल जाधव यांना विशेष सेवापदक देण्यात आले. तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खामराव वानखेडे पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह, पो. कॉ. संतोष सोनसळे, साईनाथ सोनसळे यांना सायकलिंग व कोरोना योद्धा प्रशिस्तीपत्र प्रदान करण्यात आले.    

याचबरोबर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकिय आणि खाजगी रुग्णालय यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुरस्कार देऊन गौरव केला. यात कु. उषा सुर्यवंशी, प्राची गजभारे, मुक्ता नारायण पवार या विद्यार्थींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असे पुरस्कार मिळविले. याचबरोबर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीतील राज्यगुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

समाजात कोरोनाबाबत जनजागृती, आरोग्यविषयक साक्षरता प्रसार व्हावा यादृष्टिने दक्ष असलेल्या माध्यमातील कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या माध्यम प्रतिनिधी, संपादक, छायाचित्रकार यांचा गौरव करण्यात आला. 

यावेळी परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्यासमवेत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी  परेडचे निरीक्षण केले व त्यानंतर परेड संचलन झाले. त्यांच्या सोबतीला राखीव पोलीस निरीक्षक शहादेव पोकळे होते. संचलनात सहभागी प्लाटूनचे पथक पुढीप्रमाणे होते. केंद्रीय राखीव पोलीस बल मुदखेड, जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी) नांदेड, दंगानियंत्रण पथक पोलीस मुख्यालय नांदेड, पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड, महिला पोलीस कर्मचारी पथक, नांदेड शहर विभाग, इतवार उपविभाग पथक, शहर वाहतूक शाखा पथक नांदेड, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक  (एमएसएफ), पोलीस बँड पथक पो. मु. नांदेड, डॉग स्कॉड युनिट डॉगचे नाव सुलतान, बॉम्ब शोधक व नाशक पथक बीडीडीएस, मार्क्स मॅन क्यूआरटी, वज्र वाहन (दंगा नियंत्रण), बुलेट रायडर अग्निशमक दल, देवदूत वाहन (मिनी रेस्क्यु फायर टेंडर), अग्निशमन दलाचे रेस्क्यु वाहन, वनविभागचा चित्ररथ, 108 रुग्णवाहिका, पिकेल ते विकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान रेशीम लागवड मिशन 2000 व शेततळ्याली मत्स्यपालन अभियान चित्ररथ, बेटीबचाओ बेटी पढाओ चित्ररथाचा या संचलनात सहभाग होता.

00000












  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...