Thursday, December 7, 2017

माहिती कार्यालयांतील वर्ग -
संवर्गातील पदांसाठी मुलाखती
            नांदेड, दि. 7 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागातील वर्ग-ची रिक्त पदे भरण्याबाबत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणानुसार गुणवत्ता यादी शासन नियमानुसार तयार करण्यात आली आहे. ही गुणवत्ता यादी माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयाच्या www.mahanews.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे तसेच मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा माहिती कार्यालयात सूचना फलकावर लटकवण्यात आल्या आहेत.
पात्र उमेदवारांना मुलाखतीला उपस्थित राहण्याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहेत. संबंधित उमेदवारांनी तोंडी मुलाखतीसाठी बुधवार 20 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता संचालक (माहिती) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठवाडा विभाग, अरिहंत बिल्डींग, सिटी सर्व्हे क्र. 2714, हॉटेल सिटीजन्स समोरील गल्ली, खडकेश्वर, औरंगाबाद- 431001 या पत्त्यावर उपस्थित रहावे, असे आवाहन, औरंगाबाद विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले आहे.

00000
बालक, गरोदरमातांसाठी
लसीकरणाची विशेष मोहिम
नांदेड , दि. 7 :- इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्यचा तिसरा टप्पा 7 ते 14 डिसेंबर 2017 या कालावधीमध्ये जिल्हयात राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांचे पालक, स्थानिक कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, सामाजिक संस्था यांचा सहभाग घेऊन लसीकरणाची मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले आहे. या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यबल गटाची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. 
  उर्वरीत असंरक्षित लाभार्थ्यांना शंभर टक्के लसीकरणाद्वारे संरक्षित करुन जिल्हयातील इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य अभियान यशस्वी करण्याबाबत आरोग्य विभागातील सर्व यंत्रणांना सुचना देण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरुन जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षकीय अधिकारी कार्यक्षेत्रात देणार असून राज्य स्तरावरुन मोहिमेचे संनियंत्रण करण्यात येत आहे.            
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्हि.आर.मेकाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण श्री. शिंगाडे, शिक्षणाधिकारी                श्री. खुडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, युनिसेफच्या कल्सटंट डॉ. ज्योती पोतरे, म.न.पा.वैद्यकिय अधिकारी डॉ. बदरोद / दीन, जिल्हा निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. इंगळे आदी समिती सदस्य बैठकीस उपस्थित होते.
ग्रामीण , शहरी व मनपा क्षेत्रात निवडलेल्या कार्यक्षेत्रातील शुन्य ते दोन वर्ष वयोगटातील बालके व गरोदर माता यांचे सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले आहे. असंरक्षित असलेल्या लाभार्थ्यांची संख्या कार्यक्षेत्रनिहाय जिल्हा स्तरावर प्राप्त झाली त्यानुसार सर्व संस्थांना लसीचा साठा पुरविण्यात आला आहे. लसीकरणाची माहिती व महत्व सांगण्यात येत असून वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना याबाबत सुचना देण्यात आली आहे. शुन्य ते 2 वर्ष वयोगटातील बालके व गरोदर माता यांना आजारापासुन संरक्षित करण्यासाठी विविध रोग प्रतिबंधात्मक लसी आरोग्य विभागातर्फे दिल्या जातात. शुन्य ते 2 वर्ष वयोगटातील बालके व गरोदर माता या लसीकरणापासुन वंचित राहु नये यासाठी , केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सन 2014 पासुन मिशन इंद्रधनुष्य मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम देशातील काही कमी काम असलेल्या जिल्ह्यात प्रभावीपणे राबवुन डिसेंबर 2018 अखेर 90 टक्क्यापेक्षा जास्त बालके व गरोदर मातांना लसीकरणाद्वारे संरक्षीत करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
नांदेड जिल्हयातील निवडक शहरी व ग्रामीण भागात तसेच महानगरपालिका क्षेत्रातील काही भाग यामध्ये समाविष्ट असून, लसीकरणापासुन वंचित बालकांना व मातांना संरक्षित करण्यासाठी ही मोहिम ऑक्टोबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 मध्ये दि. 7 ते 14 व जानेवारी 2018 मध्ये दि. 8 ते 15 रोजी या मोहिमेसाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पुढील निकषानुसार कार्यक्षेत्राची निवड करण्यात आली आहे.
लसीकरणाचे काम कमी असणारे कार्यक्षेत्र, जोखीमग्रस्त भाग ( घटसर्प,गोवर,धनुर्वात इ.रोगांचा उद्रेक     झालेला भाग ,अतिदुर्गम /डोंगराळ भाग,सलग तीन लसीकरण सत्रे रद्द झालेली गावे  / विभाग, एएनएमची पदे रिक्त असलेल्या उपकेंद्रांची गावे, शहरी भागातील झोपडपट्टी (स्लम एरिया), पल्स पोलिओ कार्यक्रमात  आढळलेले जोखीमग्रस्त भाग/कार्यक्षेत्र, विट्टभट्या/बांधकामे,स्थलांतरित/भटके रहिवासी यांच्या वस्त्या, उसतोड कामगार वस्त्या, ईतर (पेरि अर्बन एरिया) मोहिमेअंतर्गत 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालकांना इंजेक्शन बिसीजी, आयपीव्ही, पेंटाव्हॅलेंट ,डिपीटी, ओरल पोलिओ व्हॅक्सिन, जिवनसत्वाची मात्रा तसेच गरोदर मातांना धनुर्वात प्रतिबंधक लस व लोहयुक्त गोळ्या द्यावयाच्या आहेत. या मोहिमेत 0 ते 2 वर्ष या वयोगटातील बालकांना क्षयरोग, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, मेंदुज्वर, काविळ, गोवर या आजारासाठी रोगप्रतिबंधात्मक लसी या मोहिमेंतर्गत द्यावयाच्या आहेत. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणी व पर्यवेक्षणासाठी राज्य स्तरावरुन पर्यवेक्षकीय व मुल्यमापन अधिकारी भेट देवुन पाहणी करणार आहेत.
ही मेाहिम यशस्वी करण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यात गावपातळी ते महानगरपालिका कार्यक्षेत्रापर्यंत आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी (स्त्री / पुरुष)  लिंक वर्कर यांच्यामार्फत घरोघरी जावून लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन असंरक्षित गरोदर माता व बालके यांच्या याद्या प्रत्येक महिन्यात तयार करण्यात येत आहेत. 7 ते 14 आक्टोबर या कालावधीत ग्रामीण शहरी व मनपा क्षेत्रात एकुण 206 लसीकरण सत्रामध्ये कार्य झाले आहे.  मागील आयोजित दोन फेऱ्यामधील कार्याची तुलना करता जिल्हयामध्ये इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत वंचित लाभार्थ्यांना करण्यात आलेल्या लसीकरणात सातत्याने सुधारणा होत असुन, ग्रामीण व शहरी  भागामध्ये 90 टक्के  कार्य झाले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

00000
अतिविलंब शुल्काने 12 वी परीक्षेचे
अर्ज स्विकारण्याच्या तारखा जाहीर
नांदेड, दि. 7 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी फेब्रुवारी, मार्च 2018 मध्ये होणाऱ्या परीक्षेस नियमीत, पुर्नपरिक्षार्थी, तुरळक विषय श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे  अतिविलंब, विशेष अतिविलंब, अतिविशेष अतिविलंब शुल्काने परीक्षेचे अर्ज स्विकारण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
इयत्ता 12 वी परीक्षेसाठी अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 50 रुपये प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे शनिवार 2 डिसेंबर ते सोमवार 1 जानेवारी 2018 पर्यंत. विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 100 रुपये प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे मंगळवार 2 जानेवारी ते 16 जानेवारी 2018 पर्यंत. तर अति विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 200 रुपये प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे बुधवार 17 जानेवारी ते 31 जानेवारी 2018 पर्यंत राहील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000
खाजगीरित्या प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे
 नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध   
नांदेड, दि. 7 :- फेब्रुवारी-मार्च 2018 मधील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी प्रमाणपत्र दहावीसाठी http://from17.mh-ssc.ac.in व बारावीसाठी http://from17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावीत, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
दहावी, बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज विभागीय मंडळाकडे सादर करण्याबाबत विद्यार्थ्यांना कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने फॉर्म नं. 17 प्राप्त अर्जाची छाननी करुन जे उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांच्या भ्रमणध्वनीवर व ईमेलवर संदेश प्राप्त होतील अशा विद्यार्थ्यानी आपले स्वत:ची नाव नोंदणी प्रमाणपत्र संकेतस्थळावरुन ऑनलाईन उपलब्ध करुन घ्यावीत.
इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन व येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी विभागीय मंडळामार्फत संपर्क केंद्रे निश्चित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना संपर्क केंद्रामार्फत स्वाध्याय पुस्तिका देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी या स्वाध्याय पुस्तिका विशिष्ट कालावधीत वेळापत्रकाप्रमाणे सोडवून संपर्क केंद्राकडे जमा करावयाच्या आहेत. इयत्ता दहावीच्या संबंधीत विद्यार्थ्यांनी संपर्क केंद्र प्रमुखांशी संपर्क साधावा व तसेच इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधीत कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000
बीटी कापसाचे तंत्रज्ञान वापरुन
बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करावा
- कृषि संचालक डॉ. जाधव
नांदेड, दि. 7 :- शेतकऱ्याने बी. टी. कापसाच्या कडेला बिगर बी. टी. कापसाची लागवड केल्याने शेंदरी बोंड अळीचा कमी प्रादुर्भाव दिसून आला आहे. बी. टी. कापसाचे तंत्रज्ञान योग्य राबविल्याने कृषि आयुक्तालयाचे संचालक (विस्तार) डॉ. सु. ल. जाधव यांनी श्री. कदम या शेतकऱ्याचे कौतुक केले असून इतर शेतकऱ्यांनी याप्रमाणे तंत्रज्ञान वापरण्याचे आवाहन केले. 
कृषि आयुक्तालयाचे संचालक (विस्तार) डॉ. जाधव यांनी वारंगाफाटा येथील बालाजी भिमराव कदम यांच्या बी.टी. कापसाची पाहणी नुकतीच केली आहे. भारतात सन 2002 मध्ये बी. टी. कापसाचे तंत्रज्ञान आले. बि.टी. कापूस खरेदी करताना बी. टी. कापसाबरोबर नॉन बी. टी. कापसाचे बियाणे मिळत असते. बी.टी. कापसाच्या चारही बाजूने नॉन बीटीचे बियाणे लावायचे असते. कापसावरील बोंड अळ्या बी. टी. कापसाला प्रतिकारक्षम बनू नये म्हणून ही लागवड करायची असते. शेतकऱ्यांनी नॉन बी. टी. चे बियाणे फेकुण देऊ नाही. कापसाचा हंगाम संपल्यानंतर फरदड कापूस घेतल्यामुळे शेंदरी बोंड अळी आता बी. टी. कापसावर हल्ला करु लागल्याने शेतकऱ्याने बी. टी. कापसाच्या चारही बाजूने बी. टी. कापूस लावण्याचे व फरदड कापूस न घेण्याचा सल्ला डॉ. जाधव यांनी दिला. ज्या ठिकाणी शेंदरी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे असा कापूस उपटून नष्ट करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
000000


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...