Thursday, January 23, 2020



अल्पसंख्यांक विकास व औकाफ,
मंत्री नवाब मलिक यांचा दौरा
नांदेड, दि. 23 :- राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शुक्रवार 24 जानेवारी 2020 सांताक्रुझ अंतरदेशीय विमानतळ येथून विमानाने दुपारी 2.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत ॲड मोहम्मद खान पठाण प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड यांच्या निवासस्थानी राखीव. सायंकाळी 4 वा. नांदेड गुरुद्वारास भेट. दुपारी 4.30 वा. नांदेड येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील. रविवार 26 जानेवारी 2020 रोजी परभणी येथून मोटारीने दुपारी 12.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 1 वा. चार्टर विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000


शालेय शिक्षण मंत्री
प्रा. वर्षा गायकवाड यांचा दौरा 
नांदेड, दि. 23 :- राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शनिवार 25 जानेवारी 2020 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.45 वा. नांदेड येथे आगमन. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. सकाळी 10 वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. रविवार 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9.15 वा. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रमानंतर संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथून मोटारीने धर्माबाद मार्गे बासरकडे प्रयाण करतील.
00000


प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी ध्वजवंदनाचा
मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानावर
नांदेड, दि. 23 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार 26 जानेवारी 2020 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.
000000


राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 23 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  
00000


केळी पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 23 :- उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड अंतर्गत मुदखेड, अर्धापुर या तालुक्यात केळी पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे संदेश देण्यात येत आहे.
केळीच्या प्लॉट  स्वच्छ तणविरहीत ठेवावा. तसेच पाण्याचा निचरा व्यवस्थीत करावा, पाणी साचणार नाही यांची काळजी घ्यावी. केळीच्या पानावरील ठिपके आढळल्यास तो भाग काढुन टाकावा. बागेच्या बाहेर  नेऊन नष्ट  करावा, असे आवाहन आर. टी. सुखदेव उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या
महिलांसाठी विनामुल्य अभ्यासिका
नांदेड, दि. 23 :- जिल्ह्यातील बेरोजगार, स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरु महिला उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास नगर वर्कशॉप रोड नांदेड यांच्या मार्फत  विनामुल्य अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे.
या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या मुलींसाठी ग्रंथालय विभागामध्ये वाचनासाठी विविध स्पर्धा परिक्षेची पुस्तके दिली जातात. विविध वर्तमानपत्रे वाचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. अभ्यासिकेत मोफत प्रवेश देणे चालु असून स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरु महिला उमेदवारांनी शासनाच्या या मोफत अभ्यासिकेचा लाभ घेऊन स्वबळावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रा. सो. खंदारे सहायक यांनी केले आहे.
0000


वसतिगृह योजनेपास वंचित असलेल्या
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना  
नांदेड, दि. 23 :-  वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत गुरुवार 6 फेब्रुवारी 2020 आहे. विहि मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
महानगरपालिका विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासुन इयत्ता 12 वीनंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत भोजन, निवास इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
ही योजना महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयांमध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेऊन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना लागु राहील.
सदर योजनेची अटी निकष पुढील प्रमाणे आहेत. विद्यार्थी धनगर समाजातील असावा, विद्यार्थ्यांना अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी इयत्ता 12 नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी 02 वर्षापेक्षा कमी नसावा. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधीत विद्यार्थ्यांने इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 60 टक्के असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा. धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने देय राहील. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. संबंधीत विद्यार्थ्यांने शैक्षणिक संस्थेने महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने संबंधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहील. त्याच प्रमाणे महाडिबीटी पोर्टलवर मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्तीचा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थीच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील.
नांदेड महानगरपालिका क्षेत्रामधील मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयांमध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेवुन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सन 2019-20 करीता अर्ज करण्याचे आवाहन अध्यक्ष निवड समिती तथा जिल्हाधिकारी नांदेड तसेच सदस्य सचिव निवड समिती तथा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.
            या योजनेचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, अर्धापुर रोड, नांदेड येथे शुक्रवार 24 जानेवारी 2020 ते बुधवार 5 फेब्रुवारी 2020 या कालावधीत (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळुन) संबंधीत विद्यार्थ्यांना वाटप केले जातील.
स्वयंम योजनेच्या अर्जासोबत जोडाव्याची प्रमाणपत्र / कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. जातीचे प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, रहिवाशी पुरावा (वय/अधिवास राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र), वयाचा पुरावा (टि.सी / शाळा सोडल्याचा दाखला),विद्यार्थ्यांचे आधार कार्ड,बँक पासबुक झेरॉक्स,चालु वर्षाचे पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र,विद्यार्थी दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, बारावी, पदवीका / पदवी परिक्षेचे प्रमाणपत्र, महाविद्यालयाचे मुळ बोनाफाईड प्रमाणपत्र, विद्यार्थीनी विवाहीत असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा, खाते क्रमाकांशी आधार संलग्न असल्याचा पुरावा, सन 2019-20 मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतलाबाबत प्रवेश पावती, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याचे शपथपत्र, स्थानिक रहिवाशी नसल्याचे शपथपत्र, विद्यार्थी सध्या जिथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वस्तीगृह भाडेकरारनामा इत्यादी), महाविद्यलयाचे उपस्थिती प्रमाणपत्र, सत्र परिक्षेच्या निकालाची प्रत, अलोंटमेंट लेंटर आवश्यक राहील.
00000

वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...