Wednesday, February 17, 2021

 

महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थ्यांच्या

 शिष्यवृत्तीबाबत आवाहन

औरंगाबाद, दि.17, (विमाका) :- ज्या विद्यार्थ्यांची महाडीबीटी प्रणालीवरील शिष्यवृत्ती जमा झालेली नाही, त्यांनी प्राचार्य किंवा लिपिक लॉगीन मधुन संबंधित विद्यार्थ्यांचा त्या शैक्षणिक अर्ज क्रमांक नमुद करुन खालील आवश्यक बाबी तपासुन घ्याव्यात असे आवाहन जलील शेख, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, औरंगाबाद यांनी जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांना केले आहे.

 

सन 2018-19 पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल दिनांक 01.10.2018 पासून नव्याने सुरू करण्यात आले असुन त्यांचे हे संकेतस्थळ आहे. सदरील पोर्टल हे संचालक, माहिती व तंत्रज्ञान यांच्यातर्फे कार्यरत करण्यात आले आहे. सदर संकेतस्थळावरुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्रच्या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांचे शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील अर्ज स्वीकारण्यासाठी दिनांक 03.08.2019 पासून कार्यन्वित करण्यात आले होते. सन 2019-20 मधील विद्यार्थ्यांना भरलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्यासाठी दिनांक 17 जुलै 2020 पर्यंत मुदत वाढविण्यात आली होती.

 

अर्जांवर सहायक आयुक्त, समाज कल्याण औरंगाबाद यांनी प्रणालीद्वारे ऑनलाईन मान्यता प्रदान केल्यावर आयुक्तालयस्तरावरुन त्यांचे देयके तयार करुन कोषागारातुन देय असलेली रक्कम पारीत करुन महाडीबीटी पोर्टच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. सदर देय असलेली रक्कम ही पीएफएमएस या केंद्रभुत वितरण प्रणालीमधुन विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बँक खात्यामध्ये थेट महाडिबीटी प्रणालीद्वारे जमा होणे अपेक्षित आहे. तद्पुर्वी पीएफएमएस प्रणालीमधून वितरण करण्यापूर्वी लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक बँक खात्यास संलग्न असल्याचे या केंद्रभूत पडताळणी प्रणालीमधून मान्य झालेल्या पात्र लाभार्थ्यांचे आधार व बँक खात्याची पडताळणी करण्यात येते.

 

या पडताळणी प्रक्रियेस पीएफएमएस व एनपीसीएस यांच्याच स्तरावर विलंब होत असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत आयुक्तालयास्तरावरुन व शासनस्तरावरुन माहिती व तंत्रज्ञान संचालनालयास तसेच राज्यस्तरावरील पीएफएमएस व एनपीसीएस कार्यालयांना वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.

 

या शिवाय देयक जनरेट झालेल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती वितरण सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टल प्रणालीवरील व या प्रणलीद्वारे चालु असून सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम आधारसंलग्न बँक खात्यात अद्याप जमा व्हावयाची आहे. सदरील रक्कम पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरीत होण्यास खालील कारणांमुळे विलंब होत आहे, असे संबंधित विभागाकडून कळविण्यात आले आहे.

 

1) नॉन आधार अर्ज नोंदणी केलेल्या अर्जांमध्ये आधार क्रमांक अद्यावत नसणे.2) विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नसणे. 3) विद्यार्थ्याचे आधार क्रमांक इनक्टीव असणे. 4) विद्यार्थ्यांना व्हाऊचर रिडीमन करणे. 5) विद्यार्थ्यांच आधार संलग्न असलेले बँकेतील खाते बंद असणे. 6) विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक बंद असणे. 7) दुसऱ्या हफ्त्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्यावत करण्याकरिता अर्ज प्रलंबित असणे.

 

तरी ज्या विद्यार्थ्यांची महाडीबीटी प्रणालीवरील शिष्यवृत्ती जमा झालेली नाही, त्यांनी प्राचार्य किंवा लिपिक लॉगीन मधुन संबंधित विद्यार्थ्यांचा त्या शैक्षणिक अर्ज क्रमांक नमुद करुन खालील आवश्यक बाबी तपासुन घ्याव्यात असे आवाहन जलील शेख, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, औरंगाबाद यांनी जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांना केले आहे.

*****

 

जिल्ह्यात शुक्रवारी दारु विक्री बंद

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साजरा होणार आहे. या दरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी शुक्रवार 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील दारु विक्रीचे व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. 

मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-3, एफएल-2, एफएल/बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

*****

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड (जिमाका) दि. 17 :- नांदेड जिल्ह्यात 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 4 मार्च, 2021 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 18 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 4 मार्च 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

000000

 

24 कोरोना बाधितांची भर तर

21 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- बुधवार 17 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 24 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 11 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  21  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 706 अहवालापैकी 679 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 930 एवढी झाली असून यातील 21 हजार 870 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 259 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 8 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 590 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये हदगाव कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 16, खाजगी रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, किनवट कोविड रुग्णालय 1 असे एकूण 21 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.37 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, किनवट तालुक्यात 4, उमरखेड 1, नांदेड ग्रामीण 1, लोहा 1 असे एकुण 11 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 9, किनवट तालुक्यात 4 असे एकूण 13 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 259 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 22, किनवट कोविड रुग्णालयात 16, हदगाव कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 132, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 30, हैदराबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 33 आहेत.   

बुधवार 17 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 162, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 88 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 19 हजार 674

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 92 हजार 332

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 930

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 870

एकुण मृत्यू संख्या-590

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-259

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-8.          

0000

 

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु

विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि.17, (जिमाका) :- भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क तसेच व्यावयासिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु झाले आहे. जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील ज्या महाविद्यालयातील प्रवेशीत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अद्यापपर्यंत www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज भरावेत. आवश्यक त्या कागदपत्रासह हे अर्ज आपल्या महाविद्यालयात सादर करावे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात ज्या महाविद्यालयातील प्रवेशीत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले आहे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सदर विद्यार्थी पात्र असल्याची खात्री करुन सर्व आवश्यक कागदपत्राची पडताळणी करुन पुढील कार्यवाही तात्काळ करावी. हे पात्र अर्ज कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयाच्या लॉगीनवर प्रलंति ठेवू नयेत, असे झाल्यास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहिल. 

सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील ज्या महाविद्यालयाच्या लॉगीनवर शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत त्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सदर विद्यार्थी पात्र असल्याची खात्री करुन सर्व आवश्यक कागदपत्राची पडताळणी करुन पुढील कार्यवाही तात्काळ करावी. हे पात्र अर्ज कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयाच्या लॉगीनवर प्रलंबित ठेवू नयेत. असे झाल्यास सदर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहिल, असेही आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजश माळवदकर यांनी केले आहे.

00000

 

राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबादकडून

द्वितीय अपिलांवर नांदेडला सुनावणी कार्यक्रम

संकेतस्थळावर सुनावणी बोर्डाची माहिती प्रसिद्ध

नांदेड, दि.17, (जिमाका) :-राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्यावतीने येत्या 23, 24 व 15 फेब्रुवारी 2021 रोजी द्वितीय अपिलांची 350 विशेष सुनावणीचा कार्यक्रम नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. 

राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांना प्राप्त होणाऱ्या द्वितीय अपिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेता राज्य माहिती आयुक्तांनी नांदेड जिल्हयातील अपिलार्थीकडून प्राप्त होणाऱ्या द्वितीय अपिलांची सुनावणी नांदेड येथे घेण्यासाठी विशेष मोहिम प्रस्तावित केली आहे. 

हा सुनावणी कार्यक्रम नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिनांक 23, 24 व 25 फेब्रुवारी 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. द्वितीय अपिलांची संख्या सुमारे 350 सुनावण्या घेण्याबाबत सुचित केले आहे. राज्य माहिती आयुक्त खंडपीठ औरंगाबाद यांनी द्वितीय अपिल प्रकरणाची माहिती https://sic.maharashtra.gov.in या संकेतस्थाळावर सुनावणी बोर्ड तारखेनिहाय प्रसिद्ध केली आहे. अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हा nanded.gov.in या संकेतस्थळावर द्वितीय अपिल सुनावणी बोर्ड तारखेनिहाय प्रसिद्ध करण्यात आला आहे.  त्‍यानुसार संबंधित कार्यालय अधिनस्‍त सर्व कार्यासन प्रमुख तथा प्रथम अपिलीय अधिकारी तसेच जनमाहिती अधिकारी यांनी सुनावणी स्‍थळी अद्यावत माहितीसह व रोजनामा विहीत नमुन्‍यातील  माहितीसह सुनावणीस्‍थळी उपस्थित राहण्याबाबत आयोगाच्‍या कार्यालयामार्फत निर्देश देण्‍यात आले आहेत. त्‍यानुसार व्दितीय अपिल सुनावणीस्‍थळी कार्यालयाच्‍या संबंधीत अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुनावणी प्रकरणात निश्‍चीत केलेल्‍या दिवशी व वेळी उपस्थित राहण्याचे कळवून व जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल अवगत करण्‍यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.

0000

 

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2020

प्रवेशिका पाठविण्याकरिता 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

नांदेड, दि.17, (जिमाका) :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि.15 फेब्रुवारी 2021 होती. तथापि या प्रवेशिका सादर करण्याकरिता दि. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...