Saturday, June 30, 2018


एकच लक्ष्‍य 13 कोटी वृक्ष
तालुका स्तरीय 3 लाख 42 हजार वृक्ष
लागवडीचा अंबाळा येथे आज शुभारंभ
नागरिकांना सहभागाचे आवाहन  
नांदेड, दि. 30 :- राज्यात 1 जुलै ते 31 जुलै 2018 या कालावधीत होणाऱ्या 13 कोटी वृक्ष कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय 3 लाख 42 हजार वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ हदगाव तालुक्यातील अंबाळा येथील राखीव वन कक्ष क्र. 493 येथे रविवार 1 जुलै रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार उपस्थित राहणार आहेत. तर उद्घाटक म्हणून आ. नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, सहायक वनसंरक्षक डी. एस. पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. तर पंचायत समिती सभापती सुनिताताई दवणे, तहसिलदार संदीप कुलकर्णी, पोलीस निरीक्षक डी. के. चौरे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव सावतकर, पंचायत समिती सदस्य लताताई निळे, आंबाळाचे सरपंच सौ. जयश्री पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नागरिकांनी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन हदगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) शरयु रुद्रावार, सौ. सुषमा मोतेवार, अंबाळा ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांच्यावतीने करण्‍यात आले आहे.
000000


आरटीओ कार्यालयाचे तालुका शिबीर  
नांदेड, दि. 30 :- प्रादेशीक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील 9 तालुक्यात मोटार वाहन निरीक्षकाचे तालुका शिबीर जुलै ते डिसेंबर 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.  या शिबीर कार्यालयाचा दौरा पुढीलप्रमाणे राहील. 
शिबिराचे ठिकाण
जुलै 2018
ऑगस्ट 2018
सप्टेंबर 2018
ऑक्टोंबर 2018
नोव्हेंबर
2018
डिसेंबर
2018
मुखेड
5,24
6, 23
5, 24
5, 22
5, 22
5,21
कंधार
7,18
7,21
7, 19
8, 19
3, 19
7, 18
किनवट
10
10
10
10
12
10
मुदखेड
13
14
14
12
14
14
हदगाव
16, 31
16, 31
15, 28
15, 29
15, 29
15, 29
हिमायतनगर
17
18
18
17
17
17
देगलूर
6,20
8, 20
6, 21
6, 20
13,21
6,20
धर्माबाद
12,25
13, 27
12, 25
16, 25
16,26
13, 26
माहूर
30
30
29
30
30
31
वरील कालावधीत स्थानिक सुट्टी जाहीर झाल्यास शिबिराच्या तारखेत बदल होऊ शकतो, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 2.85 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 30 :- जिल्ह्यात शनिवार 30 जून 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 2.85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 45.61 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 254.42 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 27.19 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 30 जून 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 3.13 (315.27), मुदखेड- 4.00 (434.68), अर्धापूर- 6.00 (265.67), भोकर- 1.25 (359.25), उमरी- निरंक (262.31), कंधार- निरंक (280.83), लोहा- 5.33 (282.98), किनवट- 1.29 (169.85), माहूर- 0.50 (240.75), हदगाव- 2.14 (321.86), हिमायतनगर- निरंक (298.35), देगलूर- 3.17 (102.50), बिलोली- 3.00 (177.60), धर्माबाद- 1.00 (206.65), नायगाव- 7.00 (209.20), मुखेड- 1.57 (111.41). आज अखेर पावसाची सरासरी 245.56 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3928.89) मिलीमीटर आहे.
00000


हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मदिनानिमित्‍त
आमदार चिखलीकर यांचे हस्‍ते आज
लोहा तहसिल परिसरात वृक्षारोपन
नांदेड, दि. 30 :-  महाराष्‍ट्र राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मदिनानिमित्‍त आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या हस्‍ते 1 जुलै रोजी दुपारी 1 वा. लोहा तहसिल कार्यालयाच्‍या प्रांगणात वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
महाराष्‍ट्र शासनाचे सन 2018 या वर्षात 13 कोटी वृक्ष लागवड करण्‍याचे उद्दिष्‍ट आहे. याचाच एक भाग म्‍हणून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या हस्‍ते तहसिल कार्यालयाच्‍या प्रांगणात 1 जुलै रोजी दुपारी 1 वा. वृक्षारोपन करण्‍यात येणार आहे. यावेळी कंधारचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांची उपस्थिती राहणार आहे.
सदर वृक्षारोपन कार्यक्रमास लोहा तालुक्‍यातील सर्व कार्यालयाचे विभाग प्रमुख, अधिकारी / कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नागरिक आदिंनी मोठया प्रमाणावर उपस्थित राहून वृक्षारोपन कार्यक्रम यशस्‍वी करावा, असे आवाहन तहसिलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी नायब तहसिलदार एस.पी. जायभाये, एस.एम. देवराये व ईतर अधिकारी / कर्मचारी प्रयत्‍नशील आहेत.
00000


सुधारीत बीज भांडवल योजना ,
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी
अर्ज वितरण 9 जुलै पासून सुरु होणार
नांदेड, दि. 30 :- जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सन 2018-19 मध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुधारीत बीज भांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेंतर्गत व्यवसायासाठी कर्ज वितरणाचे अर्ज 9 जुलै ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत वितरीत करण्यात येणार आहे. इच्छूक पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड येथील जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
सुधारीत बीज भांडवल योजनेंतर्गत व्यवसाय, उत्पादक उद्योगासाठी 25 लाख व सेवा व्यवसायाकरीता 10 लाख रुपयापर्यंत कर्ज दिल्या जाते. अर्जदाराचे वय 18 ते 50 च्या दरम्यान असावे. अर्जदाराने सेवायोजन कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. अर्जदाराचे शिक्षण इयत्ता सातवीच्या पुढे असावे. अर्जदारास कर्ज मंजूर झाल्यास बँकेमार्फत 75 टक्के कर्ज व उद्योग केंद्रामार्फत सर्वसाधारण 15 टक्के व मागासवर्गीयांसाठी 20 टक्के सुधारीत बीज भांडवल 6 टक्के व्याज दराने मिळेल.
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना उत्पादक उद्योगासाठी लागू असून कर्ज मर्यादा 20 लाख रुपये आहे. अर्जदाराचे वय 18 ते 50 च्या दरम्यान असावे. अर्जदार ग्रामीण भागातील कारागीर असावा. अर्जदार शिक्षीत / निरक्षर असावा. अर्जदारास कर्ज मंजूर झाल्यास बँकेमार्फत 75 टक्के ते 65 टक्के कर्ज व जिल्हा उद्योग केंद्र नांदेड मार्फत सर्वसाधारण करीता 20 टक्के व अनु. जाती / जमातीकरीता 30 टक्के मार्जीन मनी बीज भांडवल 4 टक्के व्याज दराने मिळेल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000   


नांदेड शासकीय वसतिगृहात (नवीन)
मुलींची प्रवेश प्रक्रिया सुरु   
नांदेड, दि. 30 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (नवीन), गांधीनगर नांदेड येथे सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात 29 रिक्त जागांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच पदवी, पदव्युत्तर प्रथम वर्ष व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम वर्षातील शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. वसतिगृहातील प्रवर्गनिहाय माहिती संबंधीत वसतिगृहातील गृहपाल यांचेकडे उपलब्ध आहे.
शालेय विद्यार्थींनी 4 जुलै 2018 पर्यंत. इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 20 ऑगस्ट पर्यंत. बारावी नंतरचा अभ्यासक्रम बीए, बीकॉम, बीएससी या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदविका, पदवी आणि एमए, एमकॉम, एमएससी या पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थींनी 24 ऑगस्ट पर्यंत व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थींनी 28 ऑगस्ट 2018 पर्यंत शासकीय वसतिगृहातील गृहपाल यांचेकडे अर्ज सादर करावीत.  
प्रवेश हे गुणवत्ता व आरक्षणावर आधारीत असून प्रवेशित विद्यार्थींनीना निवास व भोजन तसेच शैक्षणिक साहित्य, बेडींग साहित्य, निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. विद्यार्थींनी मुदतीत अर्ज शासकीय वसतिगृह गांधीनगर नांदेड येथे सादर करावीत. अधिक माहितीसाठी वसतिगृहातील गृहपाल यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (नवीन) गांधीनगर, नांदेड यांनी केले आहे.
00000


नायगाव शासकीय वसतिगृहात
मुलांची प्रवेश प्रक्रिया सुरु   
नांदेड, दि. 30 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नायगाव येथे सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात 37 रिक्त जागांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच पदवी, पदव्युत्तर प्रथम वर्ष व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम वर्षातील शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. वसतिगृहातील प्रवर्गनिहाय माहिती संबंधीत वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे उपलब्ध आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी 4 जुलै पर्यंत. इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून )प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 20 ऑगस्ट पर्यंत. बारावी नंतरचा अभ्यासक्रम बीए, बीकॉम, बीएससी या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदविका, पदवी आणि एमए, एमकॉम, एमएससी या पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी 24 ऑगस्ट पर्यंत व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी 28 ऑगस्ट 2018 पर्यंत शासकीय वसतिगृहातील गृहपाल यांचेकडे अर्ज सादर करावीत.
प्रवेश हे गुणवत्ता व आरक्षणावर आधारीत असून प्रवेशित विद्यार्थ्यांनी निवास व भोजन तसेच शैक्षणिक साहित्य, बेडींग साहित्य, निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज शासकीय वसतिगृह नायगाव येथे सादर करावीत. अधिक माहितीसाठी वसतिगृहातील गृहपाल यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नायगाव यांनी केले आहे.
00000


दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक इमारतींना मिळाला
युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा
सर्वाधिक वारसा स्थळांचा समावेश असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य
मुंबई, दि. 30 : दक्षिण मुंबईतील परिसरातील व्हिक्टोरियन गाॅथिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा येथे आज, दि. 30 जून रोजी झालेल्या 42 व्या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे राज्यात पाचव्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश होणार असून देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे. यापूर्वी अजंठा, एलिफंटा, वेरुळ व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत आदींचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दर्जा मिळण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि दक्षिण मुंबई भागातील जतन कार्य करणाऱ्या सामाजिक संघटना यांना प्रोत्साहन दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या पथकाने युनेस्को परिषदेत आपली भूमिका मांडली. केवळ मुंबई नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असा निर्णय युनेस्कोने घेतला. मुख्यमंत्र्यांनी यासाठी इतिहासकालीन वास्तूच्या जतनासाठी अग्रेसर असणाऱ्या नागरिकांच्या संघटनांनी केलेल्या जतन कार्याबद्दल आभार मानले. 
दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्ह व फोर्ट परिसरात असलेल्या 19 व्या शतकातील व्हिक्टोरियन वास्तू शैलींच्या इमारती व 20 व्या शतकातील आर्ट डेको शैलीच्या इमारतींचा आहेत. यामध्ये उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिस्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्टोरियन वास्तुशैलीच्या इमारती तसेच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेन्सनची पहिली रांग, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल तसेच मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती आदी वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होण्यासाठी नामांकन झाले आहे. युनेस्कोची तांत्रिक सल्लागार समिती असलेल्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर  मोमेंटस अँड साईटस् या समितीने नामांकनाचे पत्र राज्य शासनाला पाठविले  होते. त्यामध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी मुंबईतील परिसराच्या समावेशास हिरवा कंदल दाखविला होता.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या परिसराचा समावेश व्हावा, यासाठी राज्य शासनाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला होता. भारतातर्फे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीकडे मुंबईतील व्हिक्टोरियन व आर्ट डेको वास्तुशैलीच्या इमारतींचा प्रस्ताव अधिकृतपणे जावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे विशेष प्रयत्न केले होते. यासंबंधी श्री. फडणवीस यांनी केंद्र शासनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, या मानांकनामुळे मुंबईतील पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्राला मोठा फायदा होणार असून यामुळे जागतिक पर्यटनाच्या नकाशात मुंबईचे स्थान अग्रेसर होण्यास मदत होईल. लंडन व युरोपियन शहरांतील अनेक उद्योगपती यामुळे मुंबईकडे आकर्षित होतील.
राज्यातील या परिसराचा जागतिक वारसा यादीत समावेशामुळे देशातील वारसा स्थळांच्या यादीत 37 व्या स्थळाचा समावेश होणार असून सर्वात जास्त वारसा स्थळे असलेल्या देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत 7 व्या क्रमांकावर येणार आहे.
वारसा स्थळांच्या यादीत समावेशसाठी युनेस्कोकडून सल्लागार समितीने सप्टेंबर 2017 मध्ये मुंबईमध्ये येऊन या परिसराची पाहणी केली होती.  या समितीने मुख्यमंत्री, नगर विकास विभाग व बृहन्मुंबई महानगरपालिकेची हेरिटेज समितीचे अधिकारी आणि नागरिकांशी चर्चा केली होती. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर व वास्तुरचनाकार आभा नरिन लांबा यांनी मुंबईतील वरील परिसराचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये व्हावा, यासाठी खंबीरपणे बाजू मांडली.
            यासंबंधी युनेस्कोचे संचालक व भारतातील प्रतिनिधी इरिक फेट यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन करून म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने अतिशय उत्तमरित्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी प्रस्ताव सादर करून नामांकन मिळविले आहे. या इमारतींच्या समुहांमुळे वैश्विक मुल्यांची जपवणूक केली आहे. अशा या वास्तुंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होणार आहे.
नगर विकास सचिव नितीन करीर म्हणाले, व्हिक्टोरियन व आर्ट डेको पद्धतीच्या इमारती या जगभरात दिसून येतात. मात्र एकाच परिसरात एवढ्‌या मोठ्या प्रमाणात दोन्ही शैलीच्या इमारती या फक्त मुंबईतच आढळतात. 19 व्या व 20 व्या शतकातील दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या अद्वितीय वास्तुरचना मुंबई वगळता इतर कुठल्याही शहरात आढळून येत नाहीत. या परिसराचा समावेश जागतिक यादीत झाल्यामुळे महाराष्ट्र हे प्रमुख जागतिक वारसा स्थळे असलेल्या राज्यांमध्ये अग्रेसर राज्य ठरणार असून एकट्या मुंबईतील तीन स्थळांचा समावेश जागतिक यादीत असणार आहेत. मुंबईने 1995 वारसा नियमावली तयार केल्या असून नागरी संवर्धनामध्ये देशात अग्रगणी ठरला आहे. संवर्धन व विकास यांचा समतोल साधून अनोखी वारसा व्यवस्थापन यंत्रणा तयार केली आहे.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/29.6.2018

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...