Monday, November 8, 2021

 जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत  

नांदेड (जिमाका) दि. 8  :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 9 नोव्हेंबर 2021 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.  

जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वाहन अपघातात जखमी व्यक्तींचे

प्राण वाचविणाऱ्या जीवनदुतांसाठी पुरस्कार 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  रस्ते अपघातात लोक गंभीररित्या जखमी होतात, तर काहींना आपला जीव गमवावा लागतो. रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींला तात्काळ मदत मिळावी यासाठी काही व्यक्ती जीवनदूत म्हणून नेहमी कार्यरत असतात. या व्यक्तींना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने पुरस्कार घोषित केला आहे. याबाबत अधिक माहिती https://morth.nic.in/ या संकेतस्थळावर दिली आहे. 

ही योजना 15 ऑक्टोंबर पासून सुरु झाली असून या पुरस्काराची रक्कम 5 हजार रुपये आहे. जिल्ह्यात अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ मदत केली असल्यास अशा व्यक्तींनी Good Samaritans च्या नियम अटीची पूर्तता करुन अपघात स्थळाच्या नजीकचे पोलीस स्टेशनचा, रुग्णालयाचा अहवालासह आपला अर्ज नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व दिवाळीच्या औचित्याने "दिवाळी पहाट" उपक्रमाने नांदेडच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवे बळ

नांदेड (जिमाका) दि. 8 :- अवघ्या जगाला अस्वस्थ करणाऱ्या कोविड-19 च्या लाटेनंतर सावरू पाहत असलेल्या जनजीवनाला व शहराला अतिवृष्टीमुळे ज्या गोदावरीच्या काठाला मनसोक्त न्हाऊन काढले, तो काठही दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे दिवाळीसाठी सज्ज झालेला. गेली 17 वर्षे या काठाने दिवाळी पहाटच्या निमित्ताने वाहत्या पाण्यात समवेत सुरांचाही अभिषेक करुन घेतलेला. यात आणखी भर म्हणून नांदेड मधील सर्व रसिकांनी अंतरमनातून दाद देत सूरांनाही अधिक प्रवाहित केले. दोन वर्षाच्या कालखंडा नंतर ही दिवाळी पहाट आणि गोदावरीच्या काठेवरचा दिनांक 4 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर पर्यंतचा हा उत्सव अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसेचा पाया भक्कम करणारे नांदेड नगरीतील डॉ. नंदकुमार मुलमुले यांच्या सारख्या सिद्ध हस्त चोखंदळ लेखक, कवी पासून ते निर्मळ रसिकत्व जपणाऱ्या दुसऱ्या पिढीतील शंतनू डोईफोडे, प्रा. सुनील नेरलकर, लक्ष्मण संगेवार, चारुदत्त चौधरी, विजय जोशी व इतर रंगकर्मी रसिकांनी यावर्षी दिवाळी पहाट सांस्कृतिक उत्सव घ्यायचाच ही खुणगाठ बांधली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सुवर्णमध्य साधत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या महोत्सवाला भक्कम साथ दिली. 

डिजिटल माध्यमांमुळे मानसे कितीही जुळल्या गेली तरी त्या भेटीत नेमका सुर गवसेलच असे नाही. मैफिलित सूर प्रत्यक्ष भेटीला येतात. सोळावं वर्षे धोक्याचं याची प्रचिती या महोत्सवालाही आल्याचे आपण अनुभवले, अशी मिश्कील टिप्पणी कार्यक्रमाचे संचलन करणारे डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी करुन दोन वर्षाच्या पडलेल्या खंडाला सांधत कोरोनामुळे सर्वांच्या सहनशक्तीला हळुवार फुंकर घातली. "प्रेमातील ऊर भेटीपेक्षा सूर भेटी या अधिक उभारी देणाऱ्या असतात. कोरोनातून सावरताना विश्वासार्हतेबरोबर जी स्वसुरक्षिततेची, स्वजबाबदारीची भावना आवश्यक आहे" या भावनेला गुंफत डॉ. मुलमुले यांनी दिवाळी पहाटच्या पहिल्याच कार्यक्रमापासून जबाबदारीचे भान दिले.   

राग भूप मधील पूर्वेच्या देवा तुला सूर्य देव हे नाव या गितापासून माझे जीवनगाने, धुंदी कळ्यांनो, ऋणानुबंधाच्या... ते निघालो घेऊन दत्ताची पालखी पर्यंत एकावर एक अशी सरस गानी प्रख्यात गायक संजय जोशी यांनी  सादर केली. त्यांना औरंगाबादच्या वर्षा जोशी यांनी साथ दिली. संगित साथ  जगदीश देशमुख, भार्गव देशमुख, स्वरुप देशपांडे, स्वरेश देशपांडे, शेख नईम यांनी दिली. 5 नोव्हेंबर रोजी नांदेडचे दुसरे स्थानिक कलावंत अभिजित रत्नाकर अपस्तंभ यांनी राग अहिर भैरवने सकाळच्या वातावरणाला अधिक अल्हादायक करीत अलबेला सजनचे सूर दिले. प्रा. सुनिल नेरलकर यांनी अहिर भैरवच्या वैशिष्ट्यांपासून थेट कट्यार काळजात घुसली पर्यंतच्या संगित नाटकातील नाट्य गितांचा आढावा घेत त्यातील भाव वैशिष्ट्ये उलगडून दाखविली.


त्याच दिवशी सायंकाळी "जाऊ कवितेच्या गावा" या कविसंध्येच्या माध्यमातून कव‍ि बापू दासरी यांनी ज्येष्ठ साहित्यीक देविदास फुलारी व सुप्रसिद्धी कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी गोदावरीच्या काठाला अधिक भावनिक संदर्भ दिले. यानंतर डॉ. भरत जेठवाणी यांच्या दिग्दर्शना खाली नांदेडच्या प्रथितयश कलावंतांनी उत्सव आझादी का चा जोश आपल्या विविध नृत्य अदाकारीतून दिला.
 

दिनांक 6 नोव्हेंबर रोजी पहाटे गीतकार जगदिशी खेबुडकर यांच्या रचनांवर आधारित धुंदी कळ्यांना हा बहारदार गीतांचा अनोखा नजरांना नांदेडकरांच्या भेटीला दिला. ॲड गजानन पिंपरखेडे यांची संकल्पना व निवेदन असलेल्या या बहारदार कार्यक्रमाची निर्मिती व दिग्दर्शन ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांनी केले. डॉ. प्रमोद देशपांडे यांनी संगीत संयोजन केलेल्या या कार्यक्रमात निनाद आजगावकर, श्रीरंग चिंतेवार, शिल्पा मालंडकर, रागिनी जोशी, प्रियंका मनाठकर, रागेश्री जोशी यांनी खेबुडकरांच्या सरस रचना सादर करुन रसिकांची मने जिंकली. 

जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व रसिक नागरी सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या या महोत्सवाने नांदेडच्या सांस्कृतिक विश्वात एक नवी पहाट सुरू झाली. ही दिवाळी पहाट रसिक नागरी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष शंतनू डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मण संगेवार, सुरेश जोंधळे, ॲड गजानन पिंपरखेडे, विजय बंडेवार, बापू दासरी, उमाकांत जोशी, विजय जोशी, सुनील नेरलकर, वसंत मैय्या, हर्षद शहा, चारुदत्त चौधरी, रत्नाकर अपस्तंभ, प्रमोद देशपांडे, डॉ. भरत जेठवाणी, दिपक मुळे, राघवेंद्र कट्टी, विजय होकर्णे, कविता जोशी-शिरपूरकर यांच्या प्रयत्नातून साकारली.
00000




  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...