Saturday, July 31, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 873 अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 179 एवढी झाली असून यातील 87 हजार 477 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 47 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे मुखेड तालुक्यात 1, मुदखेड 1, माहूर 1 असे एकूण 5 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 4 व्यक्तीला सुट्टी देण्यात आली. 

आज 47 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, किनवट कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरण 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 40 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 59 हजार 651

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 57 हजार 510

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 179

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 477

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.00 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-36

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-47

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 

जिल्ह्यातील 80 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 80 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. रविवार 1 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या एकुण 15 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर स्त्री रुग्णालयात कोविशील्ड लसीचे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 16 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय बिलोली, हिमायतनगर, कंधार, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव या 10 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस दिले आहेत. तर उपजिल्हा रुग्णालय मुखेड, ग्रामीण रुग्णालय मांडवी या 2 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस दिले आहेत. 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस, ग्रामीण भागातील 45 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 5 प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी 50 डोस कोविशील्डचे देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 30 जुलैपर्यंत एकुण 8 लाख 19 हजार 568 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 54 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 95 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 49 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान प्रथम वर्षाच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ  

नांदेड, दि. 31 (जिमाका) :- शैक्षणिक वर्ष 2021- 22 साठी अभियांत्रिकी व तंत्रज्ञानच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश नोंदणीस शुक्रवार 6 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावीनंतर 3 वर्ष कालावधीची पूर्णवेळ पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञानच्या प्रथम प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या छायांकित प्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज निश्चित करण्यास ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 

ऑनलाईन अर्ज भरणे व निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ई-स्क्रुटीनी, प्रत्यक्ष स्क्रुटीनी, छाननी पद्धतीची माहिती, प्रवेश पात्रतेचे निकष, अर्ज भरण्यासाठी लागणारे शुल्क, उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना आदी बाबी संचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दहावीचा निकाल लागण्यापूर्वी पदविका प्रवेश प्रक्रिया नोंदणीस सुरुवात झाली होती. दहावीचा निकाल लागल्यानंतर तंत्रनिकेतन प्रवेशासाठी विद्यार्थी येत आहेत. सीबीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होणे आहे. नुकतीच झालेली राज्यातील पूर परिस्थिती, विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रास लागणारा विलंब या बाबी लक्षात घेऊन विद्यार्थी प्रवेश अर्ज 6 ऑगस्ट पर्यंत भरु शकतील. त्रुटीच्या पुर्तता ही  10 ते 12  ऑगस्ट 2021 दरम्यान करता येईल. शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे प्रवेश मदत केंद्र शनिवारी व रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी चालू असल्याने जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले.

000000

पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

- सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे 

नांदेड, दि. 31 (जिमाका) :- शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतातील उत्पन्न बाजारात पोहचविणे व शेतीसाठी लागणारे दैनंदिन साहित्य शेतीपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील पाणंद रस्त्याचे माती काम व त्याचे मजबुतीकरण होणे गरजेचे आहे. पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पूनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. कंधार तालुक्यातील कारतळा या गावातील पाणंद रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन दळवे पाटील, जिल्हाध्यक्ष भोसीकर, मुक्तेश्वर धोंडगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, तहसिलदार व्यंकटेश मुंडे, कारतळाचे सरपंच संभाजी कदम पाटील, गटविकास अधिकारी श्री. बळवंत, ग्रामसेवक सुरवसे, कारतळा येथील शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. 

ग्रामीण भागाच्या विकासासाठी गावात पायाभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. गावातील पाणंद रस्ते पक्के झाल्यास दळण-वळणाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होण्यास मदत होईल. याच धर्तीवर कारतळा येथील मारोती मंदिरापासून ते पुढे एक कि.मी अंतराच्या पाणंद रस्त्याचे माती कामाची सुरुवात करण्यात येत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विकास कामात कोणतीही अडचण येणार नाही, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी स्पष्ट केले.  

जिल्ह्यातील रस्ते विकासासोबतच पाणी पुरवठ्याच्या योजनेतही गाव स्वावलंबी झाले पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन या योजनेची अंमलबजावणी पहिल्या फेजमध्ये घेऊन ती पूर्ण करावी. योग्य नियोजन व आराखडा तयार करुन शासनाच्या योजना गावा-गावात राबविण्यात याव्यात. त्यासाठी शासन सर्वोतोपरीने प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीने गावात वृक्षारोपण करुन मोठ्या प्रमाणात गावे हरित करण्याचा संकल्प करावा. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा आर्दश येणाऱ्या पिढीसमोर ठेवावा. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर करावा, असे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

0000







  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...