Friday, August 3, 2018



गुलाबी बोंडअळी निर्मुलन किटकनाशके हाताळणी कार्यशाळा

            नांदेड, दि. 3:- नांदेड जिल्ह्यातील कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे त्याचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या  कै. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे कृषि विभाग जिल्हा परिषद नांदेडच्यावतीने गुलाबी बोंडअळी निर्मुलन व किटकनाशके हाताळणीबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  
            या कार्यशाळेस अध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर या होत्या. तसेच प्रमुख मार्गदर्शक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदचे कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती दत्तात्रय रेड्डी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. चलवदे, कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, परभणी कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. बेग, डॉ. पंडागळे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ देवीकांत देशमुख, कपील इंगळे, डॉ. तुरकडे, प्रकल्प संचालक श्री नईम कुरेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री कोलगणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) श्री. तुबाकले, उप मुख्य अधिकारी (पं.), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रावियो) श्रीमती क्षीरसागर तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी आणि जिल्ह्यातील कापूस उत्पादक प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
या कार्यशाळेबाबतची सविस्तर प्रस्तावना व उद्देश कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांनी विषद केला.
या कार्यशाळेमध्ये कापूस पिकावरील बोंडअळीच्या निर्मुलनाबाबत कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बेग, श्री. पंडागळे, कृषि विज्ञान केंद्राचे श्री. देशमुख यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच सिंजेन्टा कंपनीचे श्री. सरोदे यांनी फेरोमन ट्रॅप व किटकनाशक सुरक्षा किटचे प्रात्यक्षिक दाखविले.
गुलाबी बोंडअळीचे निर्मुलन करण्यासाठी प्रचार व प्रसिध्दी मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यात यावी. या मोहीमेमध्ये ग्राम स्तरावरील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांचा सहभाग घेण्यात यावा, असे आवाहन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले.
सर्व ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील यांची टिम करुन प्रत्येक गावामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे तालुका स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात यावे , असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले.
गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान होऊ नये या विषयाची सर्व माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यात यावी. प्रतिबंधात्मक औषधी कृषि विद्यापीठाने शिफारस केलेली आहे त्याचाच वापर करण्यात यावा. त्याच प्रमाणे गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनाबाबतची सविस्तर सूचना कृषि विभागाने दिलेली  आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी व तालुका स्तरावर दि.06 ऑगस्ट, 2018 रोजी तसेच ग्राम पंचायत स्तरावर दि.10 ऑगस्ट, 2018 रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरयांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषि अधिकारी विनायक सरदेशपांडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहीम अधिकारी अनिल शिरफुले, जिल्हा कृषि अधिकारी संभाजी कऱ्हाळे, कृषि अधिकारी गजानन हुंडेकर व कृषि अधिकारी विश्वास अधापूरे तसेच कृषि विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
*****




गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन
नांदेड, दि. 3:- कापूस हे राज्यातील महत्वाचे नगदी पिक आहे. मागील वर्षापासून कापूस पिकावर सर्वदूर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून दिसून आला होता तो अनुभव पाहता, कृषि विभाग, कृषि विद्यापिठे यांच्यामार्फत खरीप हंगाम 2018 सुरु होण्यापूर्वीपासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून विविध उपायोजना राबविण्यात आलेल्या आहेत. या वर्षीही गुलाबी बोंड अळीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होईल असे गृहित धरुन कृषि विभागामार्फत मोठया प्रमाणात प्रचार प्रसिध्दीचे काम करण्यात आलेले आहे.  खरीप हंगाम 2018 मध्ये असे दिसून आले की, ज्या क्षेत्रात कापूस पिक दिनांक 15 जून 2018 पूर्वी लावण्यात आलेले आहे. अशा क्षेत्रातील कापूस पिक पाते फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. अशा क्षेत्रात काही ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर दिसून येत आहे. या प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण तात्काळ करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिफारस केलेल्या रासायतील किटकनाशकाची फवारणी करावी. जेणेकरुन गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण होईल. सदर क्षेत्राच्या आजूबाजू शेतक-यांच्या शेतातील कापूस पिकावर प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी अशा क्षेत्रातील किड नियंत्रणासाठी मोहिम स्वरुपात किडनियंत्रणाचे  काम होणे आवश्यक आहे.
शासनामार्फत गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी निवडक क्षेत्रावर 50 टकके अनुदानावर किटकनाशके  उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच जे शेतकरी कृषि विभागाच्या सल्लानुसार गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी किडग्रस्त शिफारस केलेल्या शेतात किडनाशकाची फवारणी करीत आहे त्यांना पूर्वमान्यतेने डीबीटीद्वारे रुपये 750/- प्रति हेक्टर या मर्यादेत जास्तीत जास्त 2 हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल.
रासायनिक किटकनाशकांची फवारणी करताना त्याच त्याच किटकनाशकांचा पुन्हा पुन्हा वापर करु नये. त्याऐवजी शिफारस केलेली किटकनाशके आलटून पालटून वापर केल्यास गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करणे शक्य होईल.
            सध्याच्या हवामानात किड रोगांच्या प्रादुर्भावात वाढ झालेली असल्यामुळे किडनाशकांचे फवारणीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. त्यामुळे फवारणी करताना शेतकरी / शेतमजूर यांनी संरक्षक किटचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे किटकनाशकापासून होणा-या विषबाधा टाळणे शक्य होईल, याकरिता शेतकरी / शेतमजूर यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
            गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी कापूस पिक पाते फुले लागली आहेत. जेथे प्रादुर्भाव दिसून येत नाही अशा ठिकाणी निंबोळी अर्काची फवारणी करावी. फवारणीनंतर दर दोन दिवसांनी अशा क्षेत्रातील पात्याची फुलांची पाहणी करुन निरीक्षणे घ्यावीत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास, शिफारस केलेली किटकनाशके क्विनॉलफॉस, थायडीकार्ब, प्रोफीनोफॉस वापरावीत. ज्या क्षेत्रातील कापूस दिनांक 15 जुन 2018 नंतर लावण्यात आलेला आहे, तेथे अद्यापही पाते फुले लागलेली नाहीत, अशा क्षेत्रात एकरी दोन फेरोमन सापळे लावावेत शेतांमध्ये दर दोन दिवसांनी निरीक्षणे घ्यावीत दक्षता म्हणून निंबोळी अर्काची एक फवारणी करावी. परंतु ज्या क्षेत्रामध्ये सध्या पाते फुलांमध्ये गुलाबी बोंड अळी दिसून आलेली आहे, अशा ठिकाणी तात्काळ रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. तसेच असेही निदर्शनास आले आहे की, अधिक उत्पादनाच्या नावाखाली कृषि विद्यापिठाने शिफारस केलेली नसतानाही अनावश्यक पिक वाढ संजीवके याचा वापर शेतकरी करीत आहे. यामुळे कापूस, सोयाबीन या पिकांचा हिरवेपणा व लुसलुशीतपणात वाढ होत असून परिणामी अशा पिकावर मोठया प्रमाणात रसशोषण करणा-या किडींचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे.
            तरी शेतकरी बंधुना आवाहन करण्यात येत आहे की, अशा प्रकारच्या कुठल्याही शिफारस नसलेल्या पिक वाढ संजीवकांचा किंवा संप्रेरकांचा (टॉनिक) वापर करु नये.
            कृषि विद्यापिठांनी शिफारस केलेली किडनाशके कृषि विद्यापिठाने विविध किड रोगांसाठी दिलेले सल्ले कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in वेबसाईटवरील क्रॉपसॅप मेन्यूमध्ये उपलब्ध आहेत, त्याचा वापर करण्यात यावा, असे आवाहन मा.आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.
****


  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...