Monday, September 19, 2016

ग्रंथालयांच्या बळकटीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न
-        ग्रंथालय संचालक धांडोरे  
ग्रंथालयांसाठी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 19 :- महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ प्रभावी असून ग्रंथालयांच्या बळकटीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न म्हणून राज्यात ई-ग्रंथालय उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी आज येथे सांगितले.
ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित एक दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. धांडोरे बोलत होते. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव पा. म. ताकटे होते. राजाराम मोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता व ग्रंथालय संचालनालय यांच्याअंतर्गत अर्थसहाय्याच्या विविध योजनांच्या माहिती संबंधी आयोजित या कार्यशाळेत तीन सत्रात मार्गदर्शन करण्यात आले. विजयनगर परिसरातील हनुमान मंदिर मंगल कार्यालयात कार्यशाळा संपन्न झाली.  
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथसंचालक ए. मा. गाडेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गंगाधर पटने, ॲड बी. आर. भोसले, निर्मलकुमार सुर्यवंशी, प्रभाकर देशमुख, राजेंद्र हंबीरे आदींची उपस्थिती होती.
श्री. धांडोरे म्हणाले की , देशात सर्वाधिक सार्वजनिक वाचनालय महाराष्ट्रात आहेत. अशा ग्रंथालयांच्या माध्यमातून ज्ञानवर्धनाचे काम होत आहे. राज्यातील ग्रंथालयांसाठी विविध योजनाही सुरु करण्यात येत आहेत. ग्रंथालयांना अनुदान वेळेत व अनुषंगिक सुविधा देण्याबाबत नेहमीच प्रयत्न केला जातो. ग्रंथालयांचे बळकटीकरण हा महत्वपूर्ण विषय आहे. ग्रंथालयांच्या आधुनिकरणासाठी ई-ग्रंथालय ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 
जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, ग्रंथालयांनी भविष्याचा वेध घेऊन वाटचाल केल्यास त्यांना समाजाच्या सर्वच स्तरातून पाठबळ मिळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रंथ आणि वाचन संस्कृतीबाबत महत्व पटवून दिले आहे. त्यामुळे समाजाच्या विकासात ग्रंथालयांचे महत्व नेहमीच राहिले आहे.
यावेळी ग्रंथालय संघाचे अध्यक्ष पटने यांनीही ग्रंथालय चळवळीबाबत मांडणी केली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रीय अधिकारी अनंत वाघ यांनी विविध योजनांची माहिती दिली. तिसऱ्या सत्रात सार्वजनिक ग्रंथालयाचे आधुनिकीकरण या विषयावर डॉ. गोविंद हंबर्डे, कैलास वडजे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. जगदीश कुलकर्णी होते. या तिन्ही सत्रांचे सूत्रसंचालन देवदत्त साने यांनी केले.

00000
अठरा ते वीस वर्षाखालील मुलांना
वाहन चालविण्यावर निर्बंध 
नांदेड दि. 19 :- मोटार वाहन कायद्यानुसार 18 वर्षाखालील व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवण्याबाबत तसेच 20 वर्षाखालील व्यक्तीस विहित क्षमतेहून अधिक ताकदीचे वाहन चालवण्यास परवानगी नाही. याबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
 मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 मध्ये नमूद केल्याप्रमाणे 18 वर्षाखालील वाहन चालविणाऱ्या मुलासंदर्भात वाहन मालकास शिक्षा करण्याचे तरतूद आहे.
मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम चार पोटकलम (1) अन्वये सार्वजनिक ठिकाणी 50 सीसीपेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणाऱ्या व्यक्तीस व कलम अठरामध्ये सार्वजनिक ठिकाणी 20 वर्षाखालील व्यक्तीस व्यावसायीक वाहन चालविण्यास मान्यता नाही. मोटार वाहन कायद्याच्या कलम 180 मध्ये 18 वर्षाखालील व्यक्तीने वाहन चालविल्यास वाहन चालकास तुरुंगवास किंवा एक हजार रुपयापर्यंत दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


00000

लेख -

राहूल कस्तूरे यांना मिळाला
बीज भांडवल योजनेचा आधार
            बालपण नांदेड शहरातच गेलं. माझ्या घरची परिस्थिती तशी बेताची. मला एक भाऊ व तीन बहीणी असा परिवार त्यात आई गृहीणी व वडील महाराष्ट्र परिवहन महामंडळात कामाला... तुटपुंज्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह. एक वर्षाचा असताना अंगात खूप ताप आला... औषधोपचारासाठी डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी ताप असतानाच इंजक्शन दिले. त्यात माझे दोन्ही पाय निकामी झाले. या आजारानंतर घरच्यांनी माझ्यासाठी खूप ठिकाणी उपचार केला. परंतू त्यांना यश आले नाही. त्यामुळे मला कायमचे अपंगत्व... मला चालता येत नसल्याने शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षण पुर्ण झाले. शिक्षण पुर्ण करत असतानाच स्व:ताचा व्यवसाय चालु केला. या व्यवसायासाठी मला देना बँक व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने मदत केली. बीज भांडवल योजनेचा लाभ मिळाला. पानटपरीचा व्यवसाय सुरु केला. आजही अपंगत्वावर मात करुन खंबीरपणे हा व्यवसाय चालवित आहे.हे बोल आहेत राहूल माधवराव कस्तूरे यांचे.
नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरातील राजेशनगर येथे राहणाऱ्या राहूलने 12 वी पर्यंतचे शिक्षण वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय वसरणी सिडको येथे पुर्ण केले. शिक्षणाबरोबर व्यवसाय चालु ठेवला. व्यवसाय करतानाच यशवंतराव चव्हाण मु्क्त विद्यापीठाच्या यशवंत महाविद्यालयातील अभ्यास केंद्रातून बी.ए. ची पदवी पुर्ण केली. त्यानंतर मराठी/इंग्रजी टंकलेखनाचा कोर्स पुर्ण केला. ही शैक्षणिक वाटचाल करताना त्याला खुप अडचणी आल्या त्यावर मात करत त्याने शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण पुर्ण झाल्यावर जवळपास 20 पेक्षा अधिक स्पर्धा परिक्षा दिल्या परंतू त्यात राहूलला यश आले नाही. घरची परिस्थिती बिकट असल्याने शिक्षण करावयाचे म्हणल्यावर थोडा विचार केला. 12वीत शिकत असताना त्याने सायकल टॅक्सीचा व्यवसाय सुरु केला. परंतू त्या व्यवसायात पाहिजे तेवढा नफा मिळत नव्हता. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या समाज कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तीच्या विविध योजनांची माहिती घेतली. त्यातील बीज भांडवल योजनेचा लाभ घेतला. यासाठी देना बँक, आनंदनगर, नांदेड यांचे सहकार्य त्याला लाभले.50 हजार रुपये कर्ज आणि 10 हजार रुपये सबसिडी मिळाली. त्यानंतर सायकल टॅक्सीचा व्यवसाय बंद करुन पानठेल्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. कारण हा व्यवसाय त्याच्यासाठी सोपा होता, यात फिरण्याची आवश्यकता नव्हती.
समाज कल्याणची बीज भांडवल योजना त्याच्यासाठी जिवनदायी ठरली. या योजनेतून व्यवसाय करण्याची संधी मिळाली. या व्यवसायावरच त्याला लग्नासाठी स्थळ आलं. आणि 2013 मध्ये लग्न झाले. सध्या एक मुलगी आहे. या व्यवयसायावर त्याचे घर चालते.त्यामुळे त्याच्यासाठी ही योजना जिवनदायी ठरली. याबाबत शासनाच्या बीज भांडवल योजनेचा ऋणी असल्याचे तो आवर्जुन सांगतो.
राहूलला वाचनाची खूप आवड आहे. त्याचा तो छंदही आहे. त्याला सामाजिक उपक्रम करायला आवडतं. स्व:ताच्या पैशातून दररोज 5 दैनिक वाचकांसाठी मोफत त्याच्या पानटपरीवर उपलब्ध करुन देतो. दिव्यांग व्यक्तीला सर्वात मोठा आधार कुटुंबाचा असतो. आई,वडील,भाऊ,बहीणी आणि पत्नी यांचा त्याला मोठा आधार आहे. हे सर्वच त्याचा आत्मविश्वास वाढवतात. मेहनत घेण्याच्या जिद्दीला साथ मिळाली बीज भांडवल योजनेची आणि यातून तो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

-         लोणेकर प्रितम तुकाराम
मो. 9860720646
  (लेखक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आंतरवासिता करीत आहेत)


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...