Wednesday, June 28, 2023

 प्रशासन व लाभार्थ्यांच्या सकारात्मक सहभागामुळे शासन आपल्या दारी उपक्रमाला अभूतपूर्व यश - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

▪️पोलीसांच्या यशस्वी नियोजनाने कार्यक्रमानंतर अवघ्या 15 मिनिटात जनसमुदाय परतला
▪️ग्राम पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंतच्या नियोजनाने
शासकीय उपक्रमाचा शक्य झाला भव्य सोहळा
▪️जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कर्मचारी-अधिकाऱ्यांचा गौरव
नांदेड (जिमाका) दि. 28 :- शासकीय योजनांप्रती जनसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, शासकीय योजनांप्रती साक्षरताचे नवे पर्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे या उद्देशाने नांदेड जिल्हा प्रशासनाने शासन आपल्या दारी उपक्रमाचे नियोजन केले. यात लाभार्थी व प्रशासनातील सर्व घटकांच्या सकारात्मक सहभागामुळे नवे मापदंड निर्माण करू शकले, या शब्दात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गौरव केला. रविवार 25 जून रोजी नांदेड येथे शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी व सर्वांचे कौतुक करून आत्मविश्वासाला द्विगुणित करावे या उद्देशाने आयोजित विशेष समारंभात ते बोलत होते. नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
एखाद्या शासकीय उपक्रमाचे एवढे भव्य नियोजन करणे हे प्रशासनासाठी आव्हानात्मक होते. लाभार्थ्यांच्या निवडीपासून या कार्यक्रमाच्या आयोजनातील प्रत्येक टप्प्यावर आपण खबरदारी घेतली. सर्व माध्यमांनी सकारात्मक भूमिका घेऊन नेमक्या कुठे अडचणी येऊ शकतील याची स्पष्ट माहिती देऊन त्याबाबत प्रत्यक्ष भेटून सूचित केले. सर्वांच्या सकारात्मक सहभागामुळे नांदेड जिल्हा शासकीय योजनेच्या या सकारात्मक उपक्रमाला यशाच्या शिखरावर नेऊ शकला, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक लाभार्थी घरी सुखरूप पोहोचेपर्यंत जिल्हा पातळीपासून गावपातळीवरील टिम दक्ष होती. वाहतुकीचा आराखडा हा आव्हानात्मक होता. यात नांदेडकरांनी दाखवलेला संयम याचे कौतूक करावे लागेल. याचबरोबर पोलीस विभागाने सर्वपातळीवर केलेल्या नियोजनामुळे, वाहनांच्या थांब्यापासून ते वाहतुकीच्या मार्गापर्यंत जी खबरदारी घेतली त्यामुळे लाभधारकांचा आलेला जनसागर अवघ्या 15 मिनिटात विनाव्यत्यय कार्यक्रम संपल्यावर बाहेर पडू शकला. प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, वैद्यकिय टिमने, बचतगटाच्या कार्यकर्त्यांनी, माविमपासून ते थेट ग्रामपंचायतीपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलेले नियोजनही महत्त्वाचे होते, असे त्यांनी सांगितले.
विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता राजपूत व टिम, महिला व बालकल्याण विभाग, माविम, जिल्हा उपनिबंधक आदी सर्व विभागांनी परस्पर सहकार्यातून केलेले नियोजन हे भविष्यातील प्रशासकीय कामकाजाच्यादृष्टिने महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. येणारे दिवस हे पावसाचे आहेत. याच काळात अनेक कामांचे नियोजन करावे लागते. पुढील नियोजन व जबाबदाऱ्या याच उत्साहाने पेलून आपण जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडून असा विश्वास जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी उत्कृष्ट सांभाळणाऱ्या डॉ. सान्वी जेठवाणी, आनंदी विश्वास, मंडप व इतर व्यवस्था यशस्वीपणे सांभाळणारे धडूशेठ, बसेसची व्यवस्था पाहणारे निखील लातूरकर, वाहतुक तळासाठी जागा विनामूल्य उपलब्ध करून देणारे बापु देशमुख, गुरूद्वारा प्रबंधक ठानसिंग, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक कुलकर्णी यांचाही यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांनी केले.
-------





  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...