Saturday, September 11, 2021

जिल्ह्यातील 3 हजार 779 अंगणवाड्यांना आता वृक्ष लागवडीतून सुपोषणाचा मंत्र

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची कल्पकता 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- ज्या अंगणवाड्यामध्ये बडबडगीतासह चिमुकले पोषणाचा स्वाद घेतात त्याच अंगणवाड्यामधून आता आरोग्यवर्धक वृक्ष लागवडीतून कृतीशील सुपोषणाचा मंत्र चिमुकल्याच्या माध्यमातून घराघरात पोहचणार आहे. ही अभिवन योजना नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने सुरु करण्यात आली आहे. घरोघरी मोठया श्रद्धेने निसर्गाच्या समीप घेवून जाणारा महिलांचा सण म्हणून हरतालिकाकडे पाहिले जाते. याचे अचूक औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील 3 हजार 779 अंगणवाडयामध्ये प्रत्येकी दोन वृक्ष याप्रमाणे एकूण 6 हजार 785 वृक्षांचे रोपण नुकतेच करण्यात आले. प्रत्येक अंगणवाडी दोन वृक्ष या गणितासमवेत अंगणवाडीची जबाबदारी असणाऱ्या एक झाड अंगणवाडी सेविकेच्या नावाने तर दुसरे झाड मदतनिसाच्या नावे करण्यात आले आहे हे विशेष. 

गावातील चिमुकल्यांच्या सुपोषणासाठी तसेच त्याच्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी, गरोदर महिलांच्या व स्तनदा मातांच्या पूरक आहारासाठी अंगणवाडी हा शासनाचा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. अंगणवाडीत देण्यात येत असलेल्या आहाराची पौष्टिकता वाढावी, तो आहार खऱ्या अर्थाने सकस व्हावा यासाठी त्यात शेवग्याच्या शेंगाचा तसेच पानांचा खूप मोठा उपयोग करता येणे शक्य आहे. हे लक्षात घेवून ग्रामीण भागात घरोघरी हा संदेश पोहचावा यादृष्टीने हा अभिवन उपक्रम अधिक महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. 

या अभिवन उपक्रमांचा शुभारंभ नांदेड जवळील लिंबगाव येथील अंगणवाडीतून प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घूगे, महिला व बाल विकास विभागाच्या सभापती श्रीमती सुशिलाताई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कूलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रेखा काळम-कदम, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे आदी मान्यवर उपस्थित होते.

00000




 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. रविवार 12 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत.

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यात 10 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 11 लाख 48 हजार 145 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 11 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 9 लाख 90 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 2 हजार 80 डोस याप्रमाणे एकुण 12 लाख 92 हजार 110 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित तर 2  कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 447 अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 281 एवढी झाली असून यातील 87 हजार 595 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 35 रुग्ण उपचार घेत असून 6 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, कंधार 1, हिंगोली 1, उमरखेड 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 5 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.   

आज 35 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 17, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, खाजगी रुग्णालय 4  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 19 हजार 845

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 16 हजार 683

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 281

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 595

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-35

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-6

00000

 दहावी व बारावी 2022 परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज करावीत 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

त्यानुसार 2022 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज फॉर्म नंबर 17 ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरुन घेण्यात येणार असून त्यासाठी पुढे नमूद केलेल्या सुचनांनुसार कार्यवाही करावयाची आहे.

इयत्ता दहावी व बारावी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी तारखा गुरुवार 16 सप्टेंबर ते मंगळवार 12 ऑक्टोंबर 2021 पर्यंत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरणे. शुक्रवार 17 सप्टेंबर ते गुरुवार 14 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज ऑलनाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करणे. सोमवार 18 ऑक्टोंबर 2021 रोजी संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीची एक छायाप्रत, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे याप्रमाणे तपशील आहे. 

शाळा सोडल्याचा दिनांक व दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राह्य धरण्यात यावा. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावी व बारावी-2021 चा निकाल जुलै-ऑगस्ट मध्ये लागलेला असल्याने, खाजगी विद्यार्थी ऑनलाईन नाव नोंदणीबाबत शाळा-कनिष्ठ महाविद्यालयाच्या दाखल्यावरील शाळा-कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याची तारीख 31 ऑगस्ट 2021 अशी ग्राह्य धरण्यात यावी. हा बदल कोविड-19 मुळे फक्त 2022 च्या परीक्षा पुरताच लागू राहील. परंतू विद्यार्थ्यांच्या वयासाठी 31 जुलै ही तारीख राहील.

खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in , इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in हे आहे.

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/ मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क, इयत्ता बारावीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क राहिल.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यामापन करावयाचे आहे. 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक / तोंडी श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे. 

इयत्ता दहावी व बारावी- 2022 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने जसे डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:जवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, कनिष्ठ महाविद्यालय, संपर्क केंद्र यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र, कनिष्ठ महाविद्यालयांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणो आवश्यक आहे, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...