Wednesday, August 31, 2016

महा-अवयवदान अभियानात
विविध महाविद्यालयात मार्गदर्शन संपन्न
नांदेड, दि. 31 :- महा-अवयवदान अभियान-2016 मध्ये आज श्री गुरुगोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्यावतीने प्रतिभा निकेतन महाविद्यालय तसेच पिपल्स महाविद्यालय येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, डॉ. दीपक हजारी यांनी अवयवदानाचे महत्व तसेच त्याबाबतच्या गैरसमजुती, इतर बाबींवर विद्यार्थी व कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे उपप्राचार्य  डॉ. डी. के. स्वामी, डॉ. प्रा. डी. एन. वाघमारे, एम. बी. लुटे, पिपल्स महाविद्यालयाचे  प्राचार्य आर. एम. जाधव तसेच एनएसएस प्रमुख प्रा. मुनेश्वर यांची उपस्थीती होती. अवयव दानाचे महत्व या कार्यक्रमास विद्यार्थी व कर्मचारी वर्गाचा उत्तम  प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शेंकेचे निरसन करण्यात आले. डॉ. प्रदीप बोरसे, प्रवीण गुजर, सुवर्णकार सदाशिव यांनी संयोजन केले.

000000
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा सुधारीत दौरा
नांदेड, दि. 31 :- राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 2 सप्टेंबर 2016 रोजी  यवतमाळ येथून सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.
शनिवार 3 सप्टेंबर 2016 रोजी लातूर येथून सोईनुसार शासकीय वाहनाने नांदेड मार्गे यवतमाळकडे प्रयाण करतील.  

000000

विशेष छायाचित्रे….

बळीराजाचा सवंगडी...जीवलग आणि त्याच्या कुटुंबाचाच एक भाग असणाऱ्या...बैलांचा सण म्हणजे पोळा...गुरूवारी बैलपोळा साजरा होतो आहे. त्यासाठी या बैलांना सजविण्या...धजविण्यासाठी धन्यांचीही धांदल सुरु आहे. बैलाला पवनी पाडणे... म्हणजे त्याच्यासोबत जलक्रिडा करण्याची...पोहण्याची आणि...त्यात धन्याकडून कोडकौतुक करून घेण्यातही मग आगळी मौज असते, हे दर्शविणाऱे बोलके क्षण टिपले आहेत, विजय होकर्णे यांनी कंधार..लोहा परिसरात..पोळ्याच्या पुर्वसंध्येला....








माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
महाराष्ट्र माझा संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा

नांदेड, दि. 31 :- महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे दि. 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 15 हजार रूपये, 10 हजार रूपये, 5 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ  बक्षीसे देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी छायाचित्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
            महाराष्ट्र माझा या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,  मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, भाग्यश्री योजना, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी  संबंधित जिल्हा माहिती कार्यालय आणि मुंबईतील छायाचित्रकारांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथे हाय रिझॉल्युशन (एचडी) छायाचित्रे dgiprnews01@gmail.com या ई मेल पत्यावर  दिनांक 10 सप्टेंबर 2016 पर्यंत पाठवावीत.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी 5  तज्ज्ञांची समिती गठित केली असून समितीत ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, ज्येष्ठ पत्रकार आशुतोष पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठी समन्वयक वरिष्ठ  सहायक  संचालक  अजय  जाधव  (9702973946), (dloajayjadhav2012@gmail.com),  सहायक   संचालक  सागरकुमार कांबळे (8605312555), (ksagar1983@gmail.com) यांच्याशी संपर्क साधावा.

0000000
सण-उत्सवातून सामाजिक सलोखा
वाढविण्याचा प्रयत्न व्हावा - काकाणी
जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न 
नांदेड, दि. 31 :-  आगामी काळातील सण-उत्सव उत्साहात पण शांततेत व सामाजिक सलोखा वाढीस लागेल अशारितीने साजरे करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय शांतता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी येथे केले. जिल्हास्तरीय शांतता समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे मंगळवारी 30 गस्ट रोजी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. सण-उत्सवासाठी  प्रशानाच्यावतीने चोख बंदोबस्त तसेच काटेकोर नियोजन करण्यात आल्याचे तसेच विशेषतः समाज माध्यमांवरून (सोशल मिडीया) प्रसारीत होणाऱ्या गोष्टींबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी गणेश उत्सव व बकरी-ईद यांच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, महेंद्र पंडीत, अशोक बनकर , तहसिलदार पी. के. ठाकूर, मनपा उपायुक्त रत्नागर वाघमारे यांच्यासह नांदेड शहर आणि जिल्ह्यातील मान्यवर सदस्य उपस्थित होते.
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, यंदा चांगल्या पावसामुळे बाजारपेठेत सण-उत्सवांचा उत्साह चांगला राहील. पण याच काळात अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. सण-उत्सव साजरे करताना या उत्साहाचा विनियोग चांगले समाजोपयोगी संदेश प्रसारीत करण्यासाठी करण्यात यावा. जलजागृती विषयी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे पाणी वाचवा, बेटी बचाओ, उज्ज्वल नांदेड, व्यसनमुक्ती अशा सामाजिक जाणीवा जागृत करणाऱ्या विषयांवर प्रबोधन करण्याचा प्रयत्न करावा. उत्सवातील स्पर्धा ही सकारात्मक राहावी. उत्सव मंडळांनी अतीउत्साही कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवावे. सर्वच प्रकारच्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत. सार्वजनिक शांततेचे भान बाळगून उत्सव साजरे करावेत. पारंपारिक वाद्यांचा वापर करावा, डॅाल्बीमुक्त मिरवणूक तसेच पाणी-ध्वनी-पर्यावरणाचे प्रदूषण टाळून सण-उत्सव साजरा करावा, असेही त्यांनी सांगितले. नाकाबंदी, समाजकंटकावर कारवाई तसेच संशयितांची माहिती तातडीने पोलिसांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था यासाठीही संयुक्त पथके स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
सीसीटिव्ही कॅमेरे तसेच पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांच्या मदतीने उत्सव काळातील गर्दी, मिरवणुका यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवायोजनेचे सदस्य तसेच उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही स्वयंसेवक म्हणून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहभागी करुन घेतले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे यांनी सांगितले.
आयुक्त श्री. उन्हाळे यांनी गणेश उत्सव तसेच बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबत माहिती दिली. पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा यासाठी तसेच बकरी ईदच्या अनुषंगाने शहरात स्वच्छतेविषयक तत्पर सुविधा व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांनीही विविध उपयुक्त सूचना मांडल्या. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. पंडीत यांनी आभार मानले.                              

0000000
नांदेड तालुक्यात दिवसभरात 96.50 मिमी पाऊस  
जिल्ह्यात हंगामात 69.73 टक्के  
          नांदेड, दि. 31 :- जिल्ह्यात  बुधवार 31 ऑगस्ट 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 484.73 मिलीमीटर  पाऊस झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 30.30  मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे.  सर्वाधिक पाऊस नांदेड तालुक्यात 96.50 मिमी इतका झाला आहे. तर जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 666.33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्याक्रमाने) भोकर- 86.76, लोहा- 84.18, हदगाव- 82.49, अर्धापुर- 77.81, नांदेड- 76.88, हिमायतनगर- 76.16, माहूर- 74.42, बिलोली- 70.82, कंधार- 68.08, नायगाव- 65.66, धर्माबाद- 64.66, मुदखेड- 63.34, मुखेड-61.84, किनवट- 61.45,देगलूर- 51.39, उमरी- 50.44. यंदाच्या  हंगामातील  पावसाची  टक्केवारी  69.73 इतकी झाली आहे.   
जिल्ह्यात बुधवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 96.50 (701.11), मुदखेड- 14.00 (540.68), अर्धापूर- 19.67 (676.66) , भोकर- 11.25 (864.50) , उमरी- 15.00 (502.59), कंधार- 33.17 (549.14), लोहा- 40.67 (701.51), किनवट- 7.00 (762.03), माहूर- 17.25 (922.75), हदगाव- 29.29 (806.14), हिमायतनगर- 18.00 (744.32), देगलूर- 29.00 (462.68), बिलोली- 51.40 (685.60), धर्माबाद- 26.67 (592.03), नायगाव- 58.00  (601.20), मुखेड- 17.86 (548.41) आज  अखेर  पावसाची सरासरी 666.33  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 10661.35) मिलीमीटर आहे.  

000000
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा
नांदेड, दि. 31 :-  राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड  हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 2 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 6 वा. यवतमाळ येथून लातूरकडे प्रयाण करतील. शनिवार 3 सप्टेंबर 2016 रोजी लातूर येथून सोईनुसार शासकीय वाहनाने नांदेड मार्गे यवतमाळकडे प्रयाण करतील.  

000000
जिल्हा कारागृहात फिरते कायदेविषयक शिबीर संपन्न
नांदेड, दि. 31 :-  जिल्हा कारागृह नांदेड येथे  कायदेविषयक  शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  न्या. ए. आर. कुरेशी,  फिरत्या कायदेविषयक शिबीराचे न्या. भीमराव नरवाडे पाटील, अॅड. प्रविण अयाचित उपस्थित होते.  
यावेळी श्री. कुरेशी यांनी विविध कायदयांची माहिती दिली. जिल्हा न्यायालयातील नवनियुक्त अति. सह दिवाणी न्यायाधीश जे.आर. पठाण , न्या. श्रीमती बी. ए. तळेकर, श्रीमती एन. एम. बिरादार यांनी प्ली बारगीनिंगबाबत बंद्यांना मार्गदर्शन केले. अॅड. नईमखान पठाण, अॅड. श्रीमती पी. ए. झगडे, अॅड. ए. बी. घोरपडे, अॅड. एम. डी. वाकोडकर यांनी उपस्थित बंद्यांना प्ली बारगीनिंग, जामिनाच्या तरतूदी, न्यायाधीन बंदी व सिध्ददोष बंदी यांचे अधिकार या विविध विषयावरील  कायद्यांची माहिती  दिली. निवृत्त न्यायाधीश नरवाडे पाटील यांनी एकमेकाबद्दल भेदभाव न करण्याचे आवाहन केले.  
जिल्हा  कारागृहाचे  अधिक्षक जी. के. राठोड यांनी  आभार मानले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते.

00000000

Tuesday, August 30, 2016

डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील
नेत्रदान चित्रप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 30 :-  नेत्रदानाची जनजागृती व्हावी यासाठी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेबर 2016 या  कालावधीत नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे नेत्रदान पंधरवाड्यानिमित्त नेत्रदान चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांसाठी चित्रप्रदर्शन सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत खुले राहील , या प्रदर्शनाचे नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.      
चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता  डॉ. काननबाला येळीकर यांच्या हस्ते संपन्न झाले.  यावेळी प्राध्यापक डॉ. संतोष सिरसिकर, नेत्र विभाग प्रमुख डॉ. विवेक  सहस्रबुद्धे, सहयोगी प्राध्यापक डॉ. राऊत, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. बोडके यांची उपस्थिती होती.  
इच्छुकांना मरणोत्तर नेत्रदानाचे  संकल्प  अर्ज भरण्याची  व्यवस्था  करण्यात आली आहे. मागील पाच वर्षामध्ये जिल्ह्यात जवळजवळ 100 नेत्रांचे संकलन जनतेच्या सहकाऱ्याने शक्य झाले आहे. गरजू रुग्णांना याचा लाभ झाल्याचे समाधान मिळू शकले अशी भावना विभाग प्रमुखानी व्यक्त केली.  
            या उपक्रमासाठी मार्गदर्शन प्राध्यापक डॉ. सहस्रबुद्धे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. गुंटूरकर, डॉ. इंगळे, डॉ. भोसीकर यांचे लाभले. कार्यक्रमाचे संयोजन वैद्यकीय महाविद्यालयातील अधिव्याखाता, रेसिडेंट डॉक्टर्स, इन्चार्ज सिस्टर्स, श्री. कंधारकर, जिल्ह्यातील नेत्रचिकित्सा अधिकारी श्री. दीक्षित, श्री. तातोडे, श्री. घोडके, श्री. कागबटटे, श्री. मांजरमकर तसेच नेत्रदान समुपदेशक श्रीमती ज्योती पिंपळे, श्री. गजानन टेकाळे, श्री. मोजेस  यांनी केले.

000000
गुंडेगाव येथे फिरते लोकन्यायालय, कायदेविषयक शिबीर संपन्न 
नांदेड, दि. 30 :- गुंडेगाव येथे नुकतेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने फिरते लोकन्यायालय व कायदेविषक शिबीर असे उपक्रम संपन्न झाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  नांदेडच्या अध्यक्षा  न्या.  सविता बारणे यांच्या निर्देशानुसार या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
            ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या फिरते लोकन्यायालय उपक्रमाच्या प्रारंभी बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  न्या. ए. आर. कुरेशी यांनी भारतीय नागरीकांचे मुलभूत कर्तव्य (आर्टिकल 51 ए भारतीय घटना) नदी, नाले, जंगल, वन्य प्राणी, पाण्याचे स्त्रोत यांचे संरक्षण व सुधारणा तसेच पर्यावरण संरक्षण याबाबत माहिती दिली.
फिरत्या लोकन्यायालयाचे पॅनल प्रमुख निवृत्त जिल्हा न्यायाधीश भीमराव नरवाडे पाटील यांनी  ‘‘बेटी बचाव, बेटी पढाओ’’ याबाबत माहिती देतानाच परस्परातील वाद न वाढविता ते सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन केले.   
अॅड.  प्रविण अयाचित यांनी हिंदू विवाह कायदा याविषयी माहिती दिली. तत्पुर्वी अॅड. श्रीमती झगडे यांनी महिलांना कौटुंबिक हिंसाचार अधिनियम याविषयी माहिती दिली. अॅड. एच. आर. जाधव यांनी फारकतीचे कायदे व अॅड. वाकोडे  यांनी  विधी सेवा प्राधिकरणाच्या तरतूदी व लाभ याबाबत मार्गदर्शन केले.
तत्पुर्वी गुंडेगाव येथील  सरपंच दासराव  हंबर्डे यांनी गुंडेगावास विविध पातळीवर तसेच राष्ट्रपतींकडून  विविध  पुरस्कार  मिळाल्याचे सांगून हे पुरस्कार  गावक-यांच्या सहकार्याने झाल्याचे सांगीतले.

00000000
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
महाराष्ट्र माझासंकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा
Ø  निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन
Ø   पंधरा, दहा व पाच हजार रुपयांची पारितोषिके
Ø   एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे
 मुंबई, दि. 22: महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे दि. 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 15 हजार रूपये, 10 हजार रूपये, 5 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ  बक्षीसे देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी छायाचित्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
            महाराष्ट्र माझा या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,  मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, भाग्यश्री योजना, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी  संबंधित जिल्हा माहिती कार्यालय आणि मुंबईतील छायाचित्रकारांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथे हाय रिझॉल्युशन (एचडी) छायाचित्रे dgiprnews01@gmail.com या ई मेल पत्यावर  दिनांक 10 सप्टेंबर 2016 पर्यंत पाठवावीत. राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी 5 तज्ज्ञांची समिती गठित केली असून समितीत ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, ज्येष्ठ पत्रकार आशुतोष पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा.त्यासाठी समन्वयक वरिष्ठ सहायक संचालक अजय जाधव (9702973946),dloajayjadhav2012@gmail.com), सहायक  संचालक सागरकुमार कांबळे (8605312555),  (ksagar1983@gmail.com) यांच्याशी संपर्क साधावा.


अवयवदानाचे परिवर्तन समाजात रुजविण्यासाठी
तरुणांनी संदेश दूत व्हावे - कुलगुरु डॅा. विद्यासागर
नांदेड शहरात महा-अवयदानात अभियानात भव्य जनजागरण फेरी

नांदेड, दि. 30 - मृत व्यक्तीलाही अवयदानामुळे पुढे अनेक व्यक्तींमध्ये देहरुपी उरता येते. त्यासाठी अवयवदानाचे परिवर्तन समाजात रुजविण्यासाठी तरुणांना संदेशदूत व्हावे लागेल, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. पंडीत विद्यासागर यांनी आज येथे केले. महा-अवयवदान अभियानांतर्गत आयोजित भव्य जनजागरण फेरीच्या समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे समारोप समारंभ झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर महा-अवयवदान अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीचे सहअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अभियानाच्या समन्वय अधिकारी तथा डॅा. शंकरराव चव्हाण  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॅा. काननबाला येळीकर, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा  शल्यचिकीत्सक डॅा. विजय कंदेवाड, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. भास्कर श्यामकुंवर, आयएमए-नांदेडचे अध्यक्ष डॅा. संजय कदम, निमा-नांदेडचे अध्यक्ष डॅा. डी. लक्ष्मण, डॅा. हंसराव वैद्य, लायन्स क्लबचे अध्यक्ष जयेश ठक्कर, रोटरीचे अध्यक्ष डॅा. दिपक मोरताळे, डॅा. करुणा पाटील, डॅा. वाय. एस. चव्हाण, गुणवंत पाटील-हंगरगेकर आदींची उपस्थिती होती.
 मरावे परी..देहरुपी उरावे.. या उक्तीच्या घोषणेसह... भव्य जनजागरण फेरी काढण्यात आली. तरूण, विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्तसहभागासह विविध स्वयंसेवी संस्थांनी घेतलेल्या पुढाकारामुळे या फेरीला भव्य असे रुप प्राप्त झाले होते.
           
अध्यक्षीय समारोपात मार्गदर्शन करताना कुलगुरु डॅा. विद्यासागर पुढे म्हणाले की, वैचारिक स्थित्यंतराच्या  काळात, आता मृत्युची संकल्पनाही बदलते आहे. विज्ञान-तंत्रज्ज्ञानामुळे मृतमेंदु संकल्पना पुढे आली. या नव्या संकल्पना आता स्विकाराव्या लागतील. मृत व्यक्तीलाही अवयवदानाच्या स्वरुपात अनेक व्यक्तींमध्ये  देहरुपी  उरता येते. यापुर्वी आपण ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे असे म्हणत असू, पण आता मरावे परी देहरुपी उरावे ही उक्तीही सत्यात आली आहे. हे वाक्य घेऊन, तरुणांनी समाजात जावे लागेल. इतरांमध्ये परिवर्तन घडवून आणताना , स्वतःपासून त्याची सुरवात करावी लागेल. अवयवदानाचे परिवर्तन समाजात रुजविण्यासाठी तरुणांना संदेशदूत व्हावे लागेल.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, अवयवदानाची  ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून आणि आपल्या कुटुंबापासून सुरवात करावी लागेल. पुर्वी रक्तदानाकरिता आणि कालांतराने  नेत्रदानाकरिता  अशी  चळवळ उभी करावी लागली होती. त्याचप्रमाणे अवयदानाकरिता समाजात जागृती निर्माण करण्यासाठी कुटुंबापासून सुरवात करावी लागेल. आगामी सण-उत्सवाच्या काळातही अवयदानाबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
समारंभाची सुरवात धन्वंतरी पुजनाने झाली. सक्षम संस्थेच्या सदस्यांनी स्वागतगीत सादर केले. जिल्हा  शल्यचिकित्सक  डॅा.  कंदेवाड यांनी प्रास्ताविक केले. रेडक्रॅास, लायन्स क्लब, शुभकरोंती फाऊंडेशन, रोटरी क्लब यांनी या अभियानासाठी उत्स्फुर्त सहकार्य केल्याचे डॅा. कंदेवाड यांनी नमूद केले. डॅा. गौरी जाधव यांनी अवयदानाच्या संकल्पनेबाबत सादरीकरण केले. सक्षमचे बी. डी. शिंदे, अधिष्ठाता डॅा. श्यामकुंवर, डॅा. येळीकर यांचीही समयोचित भाषणे झाली. डॅा. दिपक हजारी यांनी आभार मानले. डॅा. उज्ज्वला पवार यांनी पसायदान सादर केले. आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अवयदानाबाबतचे पथनाट्यही सादर केले.
तत्पुर्वी, आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणातून भव्य जनजागरण फेरीस सुरवात झाली. कुलगुरु डॅा. विद्यासागर, जिल्हाधिकारी श्री. काकाणी आदी मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून फेरीस मार्गस्थ करण्यात आले. आयुर्वेद महाविद्यालय, शिवाजीनगर, महात्मा ज्योतीबा फुले पुतळा परिसर-आयटीआय चौक ते कुसुम सभागृह पुढे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह श्री  गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम परिसर अशा मार्गावरून फेरी काढण्यात आली. फेरीत विविध राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सीग महाविद्यालय तसेच विविध स्वंयसेवी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आदींनी सहभाग घेतला. अवयदानाचे महत्त्व स्पष्ट करणारी घोषवाक्यांचे फलक, त्याबाबत घोषणा यामुळे फेरी लक्षवेधी ठरली. अतिरिक्त जिल्हाशल्य  चिकित्सक डॅा. एच. आर. गुंटूरकर, डॅा. व्हि. एन. भोसले, डॅा. दिपक शिरसीकर आदींनी फेरीचे व समारंभाचे संयोजन केले.

00000000

Monday, August 29, 2016

मन-बुद्धी-शरीराच्या तंदुरूस्तीसाठी
क्रिडास्पर्धांचे योगदान महत्त्वपुर्ण - कुलगुरू डॉ. विद्यासागर
जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन

नांदेड, दि. 29 :- बदलत्या परिस्थितीत पोलिस दलाच्याही मन-बुद्धी आणि शारिरीक तंदुरूस्तीसाठी क्रिडास्पर्धांचे योगदान महत्त्वपुर्ण राहील, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. पंडीत विद्यासागर यांनी आज येथे केले. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा-2016 चे उद्घाटन कुलगुरू डॅा. विदयासागर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर या तीन दिवसीय स्पर्धांना पथसंचलन आणि जिम्नॅस्कीक्सच्या कवायतींनी उत्साहात प्रारंभ झाला.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, संदीप डोईफोडे आदींसह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. नांदेड मुख्यालय, नांदेड शहर आणि कंधार आणि भोकर अशा चार विभागांच्या संघांचा या स्पर्धांमध्ये सहभाग राहील. या संघांमध्ये सुमारे दोनशे खेळाडुंचा समावेश आहे.
उद्घाटनपर भाषणात डॉ. विद्यासागर म्हणाले की, पोलिस दलाविषयी आदर आणि विश्र्वासार्हता या महत्त्वाच्या बाबी आहेत. आता गुन्ह्यांचे प्रकार आणि गुन्हेगारांचेही प्रकारही बदलत आहेत. तंत्रज्ज्ञानामुळेही नवी गुन्हेगारीचे स्वरुप बदलले आहे. खरेतर सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही, तर त्यामध्ये समाजाचाही सहभाग असणे आवश्यक आहे. तशी मानसिकता निर्माण करणेही आवश्यक आहे. पोलिस दलातील मनुष्यबळासाठी मन-बुद्धी आणि शरीराची तंदुरूस्ती ही खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी खेळांचा, विविध प्रकारच्या क्रिडा प्रकारांचाही विचार करावा लागेल. आज क्रिडाजगत हे विज्ञानाशीही जोडले गेले आहे. त्यामुळे पोलिसांच्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठी अशा क्रिडा स्पर्धांचे योगदान मोठे राहील. यावेळी डॅा. विद्यासागर यांनी विद्यापीठाकडूनही पोलिसांच्या क्षमता विकासासाठी विविध अभ्यासक्रमांसाठी सहकार्य केले जाईल, असेही नमूद केले.

सुरवातीला कुलगुरू डॅा. विद्यासागर यांना पथसंचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संघाच्या या पथसंचलनाचे नेतृत्व रामराव राठोड यांनी केले. पोलीस क्रिडापटू रेणुका देवणे यांनी वाहून आणलेल्या क्रिडा ज्योतीद्वारे मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेची क्रिडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. श्री. राठोड यांनी सहभागी खेळाडुंना स्पर्धेची शपथ दिली. किरण स्पोर्टस असोसिएशनच्या खेळाडुंनी जिम्नॅस्टीक्सचे प्रकार सादर केले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे यांनी प्रास्ताविक केले. गृह पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर यांनी आभार मानले. प्रा. संतोष देवराय यांनी सुत्रसंचालन केले. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा समारोप बुधवार 31 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी
10 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्यास मुदत
नांदेड, दि. 26 :- सामाजिक न्याय विभागामार्फत शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार सन 2016-17 साठी इच्छूक सामाजिक संस्था, समाजसेवकांनी परीपूर्ण अर्ज दोन प्रतीमध्ये शनिवार 10 सप्टेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अधिक माहितीसाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भगवान वीर यांनी केले आहे.    
            मागासवर्गीय कल्याण क्षेत्रात लक्षणीय वैशिष्टयपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती संस्थेला दरवर्षी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. पुरस्कारांसाठी सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात मागासवर्गीय, पददलित, दिव्यांग, वृध्द, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन इत्यादी क्षेत्रात वैशिष्टयपूर्ण काम करणाऱ्या संस्थाकडून दरवर्षी  प्रस्ताव  मागविण्यात येतात.  प्राप्त प्रस्तावांची राज्यस्तरीय समितीमार्फत निवड छाननी करुन पुरस्कार निश्चित करण्यात येतो, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

000000            
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 26 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा शनिवार 27 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 6 वाजेपासून सोमवार 26 सप्टेंबर 2016 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...