Thursday, April 18, 2019



निवडणूक विशेष वृत्त
राज्यात दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघात
पाचपर्यंत ५७.२२ टक्के मतदान
- अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती
मुंबई, दि. १८ : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या मतदानात राज्यातील १० मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.२२ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली. काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडले,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्रालयात आज रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.
            दुसऱ्या टप्प्यातील दहा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान झाले. बुलडाणा 57.09 टक्के, अकोला 54.45 टक्के, अमरावती 55.43 टक्के, हिंगोली 60.69 टक्के, नांदेड 60.88 टक्के, परभणी 58.50 टक्के, बीड 58.44 टक्के, उस्मानाबाद 57.04 टक्के, लातूर 57.94 टक्के आणि सोलापूर  51.98 टक्के.
           
दुसऱ्या टप्प्यात राज्यात २० हजार ७१६ मतदान केंद्रे होती. मतदान प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम बंद पडल्याच्या अत्यल्प घटना घडल्या असून त्या ठिकाणी तात्काळ मतदान यंत्रे बदलून मतदान प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली. सुमारे ०.४ टक्के मतदान यंत्रे (बॅलेट युनिट तसेच कंट्रोल युनिट) तर ०.९ टक्के व्हीव्हीपॅट बंद पडल्या होत्या त्या तात्काळ बदलण्यात आल्या. त्यामुळे यंत्रातील बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत कोठेही खंड पडला नाही, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
            या टप्प्यासाठी १ लाख ८ हजार ५९० कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामकाजासाठी नेमण्‍यात आले होते. त्याशिवाय सुमारे २५ हजार पोलीस व अन्य सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते. सर्व मतदारसंघांमध्ये मतदारांसाठी आवश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रँप आदी सुविधा पुरविण्यात आल्या. याशिवाय २ हजार १२९ इतक्या मतदान केंद्रावरील कामकाजाचे लाईव्ह वेबकास्टींग तर १ हजार ६४१ मतदान केंद्रावरील संपूर्ण कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. सर्व कर्मचारी महिला असलेली ८७ सखी मतदान केंद्रे होती, अशी माहितीही श्री. शिंदे यांनी दिली.
राज्यात विविध कारवायांमध्ये आतापर्यंत ११९ कोटी ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यामध्ये सुमारे ४४.९९ कोटी रुपये रोकड, सुमारे २२ कोटी ५० लाख रुपये इतक्या किंमतीची दारु, सुमारे ६ कोटी ३८ लाख रुपयांचे अंमली पदार्थ तर ४५ कोटी ४७ लाख रुपये किंमतीचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. सी-व्हिजिल ॲपवर नागरिकांकडून ३ हजार ३३८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी तथ्य असल्याचे  आढळून  आलेल्या १ हजार ९११ तक्रारींमध्ये योग्य  ती कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
००००

सखी मतदान केंद्रावर मतदारांचे स्‍वागत
नांदेड, दि. १८ः- भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून मतदान जागृती अभियान राबवण्यात आले. तसेच इतरांपेक्षा वेगळे आणि सुविधायुक्त मतदान केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करावेत असेही निर्देश होते. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात सहा सखी मतदान केंद्र स्‍थापना करण्‍यात आली होती. 
केवळ महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती असलेले सखी मतदान केंद्र आणि सर्व प्रकारच्या सुविधा तसेच मतदारांना हवेहवेसे वाटणारे आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते.
मतदारसंघात ८५-भोकरमध्‍ये मौलाना आझाद विद्यालय (मुदखेड), ८६-नांदेड-उत्तरमध्ये महिला कामगार कल्याण मंडळ (लेबर कॉलनी, नांदेड), ८७- नांदेड दक्षिण गुजराती हायस्‍कूल वजीराबाद, नांदेड, ८९-नायगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव, ९०-देगलूरमध्ये सावित्रीबाई फुले विद्यालय देगलूर, ९१-मुखेडमध्ये गुरुदेव प्राथमिक शाळा, मुखेड अशा सहा ठिकाणी राबविण्‍यात आलेल्‍या मतदान केंद्रात येणा-या महिलांना हळदी-कुंकू औक्षण करुन स्‍वागत करण्‍यात आले. अनेक मतदान केंद्रात सजावट करण्‍यात आली होती. मतदारांसाठी बैठक व्‍यवस्‍था तर मतदारांचे गुलाब पुष्‍प देवून सत्‍कार करण्‍यात आला. अचानक एखाद्या मतदारांस आरोग्‍य विषयक त्रास झाला तर त्‍वरीत उपचार मिळावा यासाठी आरोग्‍य कक्षाचीही स्‍थापना करण्‍यात आली होती. 

०००००

पहिल्यांदाच दिव्यांग कर्मचाऱ्यांनी चालविले मतदान केंद्र
नांदेड, दि. १८ः- नांदेड लोकसभा मतदारसंघात पहिल्‍यांदाच दिव्‍यांग कर्मचा-यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कला मंदिर जवळील नेहरू इंग्लिश स्कूलमध्ये दिव्‍यांगानी मतदान केंद्र चालवले. या मतदान केद्रांत दिव्‍यांग कर्मचारी एस. एस. मठपतीगणेश रायेवारकिशन केनेतुकाराम सुर्यवंशी , बाबुराव मोरे, व्‍यंकटी मुंडे, गणपत शिरसाठ, अशोक सोळंके, तुषार कुलकर्णी, पदृमिनी कासेवाड, आश्विनी केंद्रे, आदी कर्मचा-यांनी उत्कृष्टरीत्या मतदान केंद्र चालविले. याबद्दल या मतदान केंद्रातील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.

००००
लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा :
दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 46.63  टक्के मतदान

मुंबई, दि 18 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 46.63 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
दहा लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वा. पर्यंत झालेले मतदान : बुलडाणा 45.94 टक्के, अकोला 45.39 टक्के, अमरावती 45.63 टक्के, हिंगोली 49.13 टक्के, नांदेड 50.04 टक्के, परभणी 48.45 टक्केबीड 46.29 टक्केउस्मानाबाद 46.13 टक्केलातूर 48.10 टक्के आणि सोलापूर  ‎41.47 टक्के.

0 0 0

वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...