Saturday, February 11, 2023

वृत्त क्रमांक 64

भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षेसाठी

मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी द्यावी विद्यार्थ्यांना प्रेरणा
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

🔸विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासह परीक्षा केंद्राच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन दक्ष
🔸जिल्ह्यातील परीक्षा केंद्र संचालक व परीक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण

नांदेड (जिमाका) दि. 11 :- दहावी व बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 या महिन्यात घेतल्या जात आहेत. नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी कॉपीमुक्त अभियान राबवून विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास दिला. कोविड नंतरच्या कालावधीत विद्यार्थी हे एक वेगळी अनुभुती घेऊन परीक्षांना समोर जात आहेत. अशा स्थितीत त्यांचे मनोबल वाढावे, आत्मविश्वास वाढवा यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभ्यासक्रमाची अधिक सोपी उकल करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले पाहिजे. याचबरोबर सराव परीक्षांवर भर देऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास दिला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांने केले.
जिल्हा नियोजन भवन येथे या परीक्षांच्या नियोजनासाठी सर्व परीक्षा केंद्रसंचालक यांच्यासाठी विशेष परिसंवाद घेण्यात आला. त्यात ते बोलत होते. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर व विभाग प्रमुख उपस्थित होते.
सर्वच विद्यार्थी परीक्षेसाठी सुरूवातीपासून मेहनत करीत असतात. त्यांना जे काही अवघड जात असते ते शिक्षकांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. एका अर्थाने परीक्षा या आपण केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन असते हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अधिक सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
परीक्षा केंद्र ही विद्यार्थ्यांना आपली वाटावीत यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर येणाऱ्या विद्यार्थ्यांचे चॉकलेट देऊन स्वागत करण्यात येईल. या छोट्या कृतीतून प्रत्येक परीक्षार्थींच्या मनात सकारात्मक भाव निर्माण होण्यासमवेत परीक्षा केंद्राबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी निर्माण होईल, अशी भावना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत परीक्षेसंदर्भात कॉपी व इतर कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट करून त्यांनी संस्थाचालकांनाही सावध केले.
नांदेड जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेसाठी 92 परीक्षा केंद्र देण्यात आले असून एकुण 39 हजार 645 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होऊन 21 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा जिल्ह्यातील एकुण 45 हजार 468 विद्यार्थी देणार असून त्यासाठी 160 परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. ही परीक्षा 2 मार्च पासून 25 मार्च 2023 या कालावधी पर्यंत होईल.
00000




 वृत्त क्रमांक 63 

श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा सामान्य रुग्णालयात

भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 11  :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच 9 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या भव्य रक्तदान शिबीरास कै. शंकरराव चव्हाण शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीचे डॉ. मुनेश्वर व टीम उपस्थित राहून रक्त संकलन करण्याचे काम केले.  

 

नोडल अधिकारी एनसीडी डॉ. हनुमंत पाटील व आरएमओ ओपीडी डॉ. एच. के. साखरे यांच्या नियोजानामुळे या  शिबिरास जिल्हा रुग्णालय नांदेड येथील अधिकारी व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये  रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी अशा एकुण 64 व्यक्तीने रक्तदान केले आहे. या शिबिरास डॉ. विजय पवार, डॉ. अवसरे, डॉ. चिखलीकर, डॉ कुलदीपक,  डॉ. इंगळे, डॉ. अनुरकर, डॉ. सुमय्या खान, डॉ सुमित लोमटे, डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. उमेश मुंडे, डॉ. शैलेश अग्रवाल, माधव शिंदे, श्री. भोसले, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, मेट्रन श्रीमती सुरेखा जाधव, अधिपरिचारिका श्रीमती विद्या बापटे, श्रीमती विशाखा, श्रीमती नारवाडे, श्रीमती इंगळे, श्रीमती मुंडे, श्री. अटकोरे, श्री. दुरपडे, श्री. जावेद तसेच रुग्णालयीन अधिकारी  उपस्थित होते.

 

त्याचबरोबर या भव्य आरोग्य तपासणी  शिबिरास रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या आरोग्य तपासणी  शिबिराअंतर्गत रुग्ण व त्यांची नातेवाईक यांच्यासाठी  बीपी, शुगर व नेत्र तपासणी (डायबेटीक रेटीनोपथी ) आदी संबंधित आरोग्य तपासणी करण्यात  आली. या शिबिराअंतर्गत रुग्ण व त्यांची नातेवाईक अशा एकुण 188 व्यक्तींचे  तपासणी करण्यात आली. त्यापैकी  बीपी, शुगर साठी 156 तर नेत्र तपासणी (डायबेटीक रेटीनोपथी ) साठी एकुण 32 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 156 पैकी  71 रुग्ण हे मागील कांही दिवस व वर्षापासून बीपी, शुगर च्या औषधोपचाराखाली असल्याचे आढळून आले.

 

तर 32 पैकी 4 रुग्ण हे संशयित असल्याचे आढळून आले. त्यांना आवश्यक ते उपचार करण्यात आले. या शिबिरास डॉ. रोशनारा तडवी (रा.अ.नि.का व्यवस्थापक) डॉ. शैलेश विभूते, डॉ. विखारुनिस्सा खान, नेत्र चिकित्सा अधिकारी एल. जी. चंदनकर, श्रीमती लता पवार, कु. मयुरी मंगरूळकर, डॉ. तिरुपती कदम, नेत्र समुपदेशक ज्योती पिंपळे , अधिपरिचारिका श्रीमती शिल्पा सोनाळे यांनी उपस्थित राहून तपासणी व उपचार केले. समुपदेशक एस. एम. सुवर्णकार यांनी रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना आहार व जीवनशैलीतील  बदलासंदर्भात समुपदेशन केले. 

000000




लेख

चिखल, विटांच्या मोजणीतून शाळाबाह्य मुलांचे

गणित सावरणारी बिनभिंतीची शाळा 

वघ्या बारा वर्षांचा अनिकेत कांबळे हा आपल्या भवतालाच्या वास्तवाला व त्याच्या शैक्षणिक गरजांविषयी जो काही सांगत होता, त्यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. मी सकाळी चारला उठतो, बाबाला चिखल टाकू लागतो. चिखल टाकून झाल्यावर फड लावतो. फडाचे काम झाल्यावर गंडे लावतो. मग बाबा ट्रॅक्टरमधून चिखल आणायला जातो. मग भट्टीसाठी लागणारा काळा भुसा, साळ आणायला जातो. मग हात-पाय धुतो. जेवण करतो...!. ही रोजनिशी त्याच्या तोंडून ऐकतांना कोणीही आवाक होऊन जाईल. उमरखेडहून त्याचे कुटुंब वाजेगावला तात्पुरते स्थलांतरित झाले आहे. उमरखेडच्या शाळेत त्याचे नाव आहे. त्याची शाळा मात्र गावी आहे. गावी कोणी नसल्याने त्याला त्याच्या वडिलांसोबत राहण्याशिवाय पर्याय नाही. असे इथे सारेच अनिकेत आहेत, ज्यांनी चिखल आणि विटांच्या राशी जवळ केल्या आहेत.   

विटाचे गणित दंड्याच्या माध्यमातून तो ज्या सफाईपणे सांगत होता तसे एखाद्या स्थापत्यशास्त्र झालेल्या अभियंत्यालाही सांगणे अवघड ठरेल! विटांचा आकार, विटांसाठी लागणारी व तयार झालेली माती, भाजलेल्या विटांची पारख यापासून ते भट्टीला द्याव्या लागणाऱ्या उष्णतेच्या गणितापर्यंत असलेले त्याचे ज्ञान हे तसे पाहिले तर एखाद्या पदवीच्या पुढचे आहे. स्वानुभव आणि प्रत्यक्ष कृती यातून जे ज्ञान मिळते ते किती खोलाचे असते याची प्रचिती अनिकेतच्या प्रत्येक वाक्यात जाणवत होती. काम आवडते का शिक्षण असा प्रश्न जेंव्हा त्याला विचारला तेंव्हा विटांसाठी कालवलेल्या चिखलांकडे पाहत धैर्याने त्याने उत्तर दिले शिक्षण. मला शिकावे वाटते पण बाबांना कामासाठी मदत लागते हे त्याचे उत्तर ऐकुण नकळत समाज म्हणून कोणताही व्यक्ती आपली जबाबदारी पडताळून पाहिल. मुलाच्या शिक्षणाची, भविष्याची काळजी करण्यासमवेत बाप म्हणून आजच्या रोटीचा प्रश्न याला प्राधान्य देऊन अनिकेतच्या वडिलांनी मुलाची मदत घेण्याला प्राधान्य दिले असेल.   

नांदेडच्या दक्षिणेकडे वसलेला वाजेगाव परिसर अशा अनेक अनिकेतला घेऊन उभा आहे. वाजेगाव आता नांदेड शहराचाच एक भाग झाला आहे. गोदावरी नदीच्या एका काठाला वाजेगाव तर दुसऱ्या काठाला धनेगावचा परिसर सुरू होतो. ज्यांना शेती नाही, स्वयंरोजगाराची इतर साधने नाहीत असे जिल्ह्यातील काही कुटूंब या काठावर येऊन रोजगारासाठी स्थिरावले आहेत. यात अधिक विस्थापित हे विटभट्टी उद्योगामुळे स्थलांतरीत झालेले आहेत. चार दशकांपासून सुरू असलेल्या विटभट्टी उद्योगाने अनेक स्थलांतरीत कुटुंबांना आधार दिला आहे. परंतू यातून काही इतर प्रश्न निर्माण झाले. यात सर्वात महत्वाचा व नाजूक प्रश्न होता तो म्हणजे इथल्या विस्थापित कुटुंबातील मुलांच्या शालेय शिक्षणाचा. मुलांचे शाळेत प्रवेश तर होते परंतू शाळा मात्र कित्येक मैल दूर असलेल्या त्यांच्या गावात होती. 

राज्य शासनाने अशा शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळ असलेल्या शाळेत शिक्षणाची सुविधा दिली आहे. ते जिथे असतील तिथे त्यांना जवळ असलेल्या शाळेत त्यांची निकट असेपर्यंत समावून घेण्याचा हा शिक्षणक्षेत्रातला खूप महत्त्वाचा निर्णय ठरला आहे. जिल्ह्यात अशा मुलांची दरवर्षी प्रत्येक भागात फिरून नोंदणी करणे व त्यांना जवळच्या असलेल्या शाळेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे बालरक्षक म्हणून  727 शिक्षक पुढे सरसावले आहेत. त्यांनी या शैक्षणिक वर्षात 437 मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळ असलेल्या शाळेत शिक्षणाची सुविधा दिली आहे. 

बालरक्षक शिक्षकांनी आपली शालेय जबाबदारी सांभाळून कर्तव्यनिष्ठेने ही जबाबदारी पूर्ण केली हा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा एका अर्थाने गौरवच आहे. याउपरही जी काही थोडीबहुत मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहिली त्यांच्यासाठी इतर शिक्षक स्वयंप्रेरणेने शासनाच्या या उदात्त धोरणामुळे पुढे झाली. वाजेगाव येथील अनिकेत सारखी अनेक मुले शिक्षण घेणारी ही विटभट्टी परिसरातील बिनभिंतीची शाळा याचे एक आदर्श उदाहरण म्हणून नावारुपास आले आहे.   

या बिनभिंतीच्या शाळेला आकार घालण्यासाठी डायट सारखी शैक्षणिक संस्थेतील प्राध्यापक अभय परिहार, महिला शिक्षिका म्हणजे उषा नळगीरे या पुढे झाल्या. उषा नळगीरे या अर्धापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहेत. तिथली सर्व कर्तव्य सांभाळून शनिवार व रविवार असे दोन दिवस त्या या शाळेसाठी देतात. 

मुलांनी या बिनभिंतीच्या शाळेत रमावे यासाठी सारे काही येथे साकारले आहे. चिंचेच्या झाडाखाली भरणाऱ्या या शाळेत झोक्यापासून ते रोप क्लायंबिंग पर्यंत, आरोग्याच्या शिक्षणासाठी स्वच्छ हात धुण्यासाठी कॅनमधील पाणी गुरूत्वाकर्षणाच्या सहाय्याने काढून हँडवॉश पर्यंत असलेले प्रयोग विज्ञानाच्या प्रत्यक्ष साक्षात्काराचे द्योतक आहेत.  ध्यानाची अनुभूती घेता यावी यासाठी एका झाडाच्या आडोशाला मोठा दगडही येथे कल्पकतेने ठेवला आहे. विशेष म्हणजे ही मुलेही एक-एक करून जमेल तसे आपले चित्त एकवटून इथे बसण्याचा प्रयत्न करतात.  याशिवाय वनस्पती व प्राण्यांची ओळख करून देणारा एक कोपरा जंगल क्लब म्हणून साकारला आहे. माझ्यापासून ते जगापर्यंत समज देण्यासाठी एक कोपरा समाजशास्त्रासाठी आहे. आरोग्यासाठी स्वच्छतेचा कोपरा इथला सजलेला आहे. भट्टीची कामे आटोपून मुले या चिंचेच्या झाडा खालच्या शाळेला येतात. या मुलांना शिकण्यात गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने काही व्यक्तींनी दिलेले साहित्य ही मुले बाहेर काढतात. काही मुले चटई आंथरतात आणि मग सुरू होते यांची शाळा. विटांच्या राशी ज्या पद्धतीने मोजल्या जातात त्या पद्धतीने त्यांना गणित शिकविले जाते. ऐरवी जो चिखल विटांना आकार देतो तो चिखल आणि कोरडी माती इथे आता अक्षरांना आकार द्यायला लागली आहे.

 -         विनोद रापतवारजिल्हा माहिती अधिकारी, नांदेड 






 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...