Tuesday, March 19, 2024

वृत्त क्र. 255

 जातीचे मेळावे, सार्वजनिक ठिकाणी पक्ष कार्यालये

विनापरवानगी दुसऱ्याच्या घरावर झेंडे चालणार नाही

जिल्ह्यात कलम 144 लागू ; विविध बाबींवर निर्बंध

नांदेड, दि. 19 :- भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे आचारसंहिता लागल्यानंतर जातीचे  मेळावे आयोजित करता येणार नाही तसेच दुसऱ्याच्या घरावर झेंडे लावणे, सार्वजनिक ठिकाणी कार्यालय उघडणे, डमी मतपत्रिका छापणे, प्रचार साहित्य भर रस्त्यात लावणे यावर निर्बंध आखण्यात आले असून नियमाचा भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची दिनांक 16 मार्च 2024 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून नांदेडचे जिल्‍हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध आदेश 16 मार्च रोजी निर्गमीत केले आहेत. हे सर्व आदेश 6 जून 2024 पर्यत लागू राहतील.

पक्ष कार्यालय सार्वजनिक ठिकाणी नको
सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध करण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध
निवडणुकीचे प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीचा संबंधित जागा मालकाचे परवानगी शिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यत निर्बंध घालण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

रस्त्यावर जाहिराती नको
निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यत निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

जातीचे मेळावे नको
निवडणूक कालावधीत जात, धर्म, भाषावार शिबिरांचे आयोजन न करणे
जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिरांचे, मेळाव्यांचे आयोजनावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

नमुना मतपत्रिका छपाई वर निर्बंध
जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने, मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना इतर उमेदवाराचे नाव त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यत निर्बंध घालण्यात आले आहेत, असे असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
0000


 वृत्त क्र. 254

जप्ती प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

·  रोकड, दारु, शस्त्रास्त्रांवर करडी नजर
·  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत बैठक संपन्न  
 
नांदेड (जिमाका), दि. 19 :- निवडणूक काळात रोख रक्कम, शस्त्रास्त्र, दारुचा पुरवठा यावर नियंत्रण आणण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक निर्देश दिले आहेत. त्याअन्वये जिल्ह्यात जप्ती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी विकास माने, अरुणा संगेवार, प्रविण मेगेशेट्टे, स्वाती दाभाडे, सचिन गिरी, अविनाश काबंळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार,पोलीस विभाग, परिवहन, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत विकसित झालेल्या ‘इलेकशन सिझर मॅनेजमेंट सिस्टीम ॲपची निर्मिती केली आहे. निवडणूक काळात कुठलेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून यात सर्व सहभागी शासकीय यंत्रणा, पथके बारकाईने लक्ष ठेऊन कारवाई करतात. रोकड, अवैध मद्यसाठा, अंमली पदार्थ वा शस्त्र अशी कुठलीही जप्तीची कारवाई केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ती माहिती त्वरित या ॲपमध्ये समाविष्ट करावी लागणार आहे. त्यामुळे या कारवाईची माहिती लगेचच निवडणूक आयोगाला मिळणार आहे. अशा प्रकारच्या कारवाया प्रामुख्याने पोलीस, उत्पादन शुल्क विभाग व प्राप्तीकर विभागाकडून केल्या जातात. संबंधितांना कारवाईनंतर त्याची माहिती ॲपमध्ये समाविष्ट करावी लागणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाला सांगितले.

या कार्यवाहीत पोलीस विभाग, प्राप्तीकर, उत्पादन शुल्क, महसुल, अंमली पदार्थ नियंत्रण दल, सिमा सुरक्षा बल, अंमलबजावणी संचालनालय, परिवहन, डाक विभाग, नागरी उडयन विभाग या विभागांनी आपली जबाबदारी विहित वेळेत पार पाडण्याच्या सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सर्व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपल्या स्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करुन त्याद्वारे सर्व आवश्यक त्या परवानग्या देण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी , असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी यावेळी सांगितले.
0000





 वृत्त क्र. 253

अफवा पसरविणाऱ्या बातम्यांना थारा देऊ नका : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

एमसीएमसी संदर्भात पत्रकारांची कार्यशाळा

नांदेड, दि.१९ : लोकशाही प्रक्रियेमध्ये भारत निवडणूक आयोगाने माध्यमांच्या अनन्यसाधारण महत्वाला कायम अधोरेखित केले आहे. माध्यमांनी प्रतिबंध केल्यास अनेक चुकीच्या बातम्या,अफवा, गैरसमजला पायबंद बसतो. त्यामुळे ही निवडणूक अतिशय सकारात्मक पत्रकारितेचा आदर्श ठरावी. अफवांना थारा मिळू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.

माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची आज महत्त्वपूर्ण कार्यशाळा संपन्न झाली. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅबिनेट हॉल बैठकीमध्ये झालेल्या या कार्यशाळेला पत्रकारांची भरगच्च उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची अतिशय महत्त्वाची भूमिका असून या काळामध्ये माध्यमांनी कायदा सुव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम, मतदान प्रक्रिया, मतमोजणी संदर्भात सकारात्मक वृत्तलेखन करावे, तसेच या काळात उठणाऱ्या अफवांना गैरसमजांना चुकीच्या वृत्तांना थारा देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रेस कॉन्सिल ऑफ इंडिया तसेच भारत निवडणूक आयोगाने या काळात बातमीदारी, वृत्तप्रसारण,जाहिरात तयार करताना, माध्यमांवर पोस्ट टाकताना, सामाजिक सौहार्द बिघडणार नाही, समाजामध्ये तेढ वाढणार नाही, शत्रुत्व तिरस्काराची भावना निर्माण होणार नाही, चारित्र्य हणन होणार नाही, खासगी आयुष्यावरून सभ्यतेचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.  नांदेड येथील माध्यम प्रतिनिधींनी याबाबत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचे सादरीकरण केले माध्यम कक्षाची उपयुक्तता जाहिरातींचे प्रमाणीकरण पेड न्यूजवर नियंत्रण इलेक्ट्रॉनिक्स व सोशल मीडियावर येणाऱ्या आक्षेपार्यवृत्तांवर निर्बंध समितीचे कार्य प्रमाणिकरणाची पद्धत याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी माध्यम कक्षाच्या कार्यप्रणाली बद्दल संवाद साधला. तर समितीमध्ये सोशल मीडियाचे नोडल अधिकारी असणारे गंगाप्रसाद दळवी यांनी समाज माध्यमांसंदर्भात सुरू असलेल्या सनियंत्रणाची माहिती दिली. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन भवनात बैठक कक्षात माध्यम कक्ष सुरू करण्यात आले आहे.
000000








  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...