Wednesday, June 24, 2020

वृत्त क्र. 571   
मियावाकी वृक्षलागवडीच्या प्रसारासाठी
सर्व विभाग प्रमुखांनी पुढाकार घ्यावा
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड (जिमाका) दि. 24 :-  राष्ट्रीय वनधोरणानुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के वनाच्छादन असणे आवश्यक आहे. यादृष्टिने महाराष्ट्र शासनातर्फे पूर्वी पासून प्रयत्न केले जात आहेत. आजही शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रिकाम्या जागा उपलब्ध आहेत. या जागेवर प्राथमिकस्तरावर मियावाकी पद्धतीने घनवन लागवड करण्यासाठी शासनाच्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
नांदेड वनविभागमार्फत वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत अटल आनंदवन घनवन (मियावाकी) कार्यशाळा आज डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. अभिनव गोयल, औरंगाबाद विभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, उपवन संरक्षक अशिष ठाकरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने उपस्थित होते.
शासन व ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये स्मशानभुमी, शाळा, पेयजल योजनेच्या टाक्या आदी परिसरात मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड केल्यास या परिसराच्या सुशोभीकरणासह पर्यावरणालाही हातभार आपल्याला लावता येईल. याच्या प्रचार व प्रसारासाठी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी तालुका पातळीवर बैठका घेऊन त्या-त्या ठिकाणच्या सेवाभावी संस्थांचा यात सहभाग करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
झाड हे मानसांकडून काहीही मागत नाही. उलट प्रत्येकाला ते अनेक चांगल्या गोष्टी देत राहते. यात फुले, सुगंध, फळे, पाला, लाकूड सारेकाही झाड माणसाला देते, असे प्रकाश महाजन यांनी सांगून अटल आनंदवन घनवन वृक्षलागवडीचे तंत्रज्ञान समजून सांगितले. मियावाकी लागवडीबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या लातूर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राबविलेल्या मियावाकी वृक्षलागवडीचे सचित्र सादरीकरण करुन माहिती दिली.
00000

कोरोनातून 3 व्यक्ती झाले बरे
नवीन 5 व्यक्ती बाधित
नांदेड (जिमाका) दि. 24 :- कोरोना आजारातून आज औरंगाबाद येथे संदर्भित झालेले 3 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 248  व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. बुधवार 24 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 95 अहवालापैकी सर्वच्या सर्व 81 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात नवीन 5 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे‍ जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या 326 एवढी झाली आहे.
नवीन बाधितांमध्ये गुलजार बाग येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर नाका येथील 67 वर्षाचा 1 पुरुष, रहेमत नगर येथील 36  व 1  पुरुष, पिरबुऱ्हानगर येथील 2 वर्षाचा मुलगा आणि 9 वर्षाची मुलगी यांचा समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.  
आतापर्यंत 326 बाधितांपैकी 248 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 64 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 6 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. वय 50  52 वर्षाच्या दोन स्त्री बाधित व 38,65,67 व 75  वर्षाचे चार बाधित पुरुषांचा यात समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 64  बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 12, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 48 तर 3  बाधित व्यक्ती औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. बुधवार 24 जून रोजी 90  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 327,
घेतलेले स्वॅब- 5 हजार 913,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 139,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 05,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 326,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 09,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 14,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 248,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 64,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 90 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

वृत्त क्र. 569


सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई
शेतकऱ्यांना पर्यायी पीक नियोजनाचे आवाहन
- पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड दि. 24 :- पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाभरातून समोर येत आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून, शेतकऱ्यांच्या फसवणुकीची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतू अनेक ठिकाणी पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी यासंदर्भात बियाणे कंपन्यांविरोधात तक्रारीसुद्धा केल्या आहेत. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून विस्तृत माहिती मागवली आहे. ते स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत असून, शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी कारणीभूत ठरलेल्या बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असताना आता संपूर्ण देशाची दारोमदार खरीप हंगामावर आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सदोष बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना फटका बसणार असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे चव्हाण यांनी बजावले आहे. 
यासंदर्भात शासन कारवाई करेल. मात्र, दरम्यान शेतकऱ्यांनी वेळ न दवडता शेतातील ओलावा पाहून पर्यायी पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. दुबार पेरणीसाठी कृषितज्ज्ञांनी मूग, उडीद, तूर, सूर्यफूल या पिकांची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे.
000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...