Wednesday, September 26, 2018

राष्ट्रीय पोषण महिना विशेष लेख क्र. 3 :



दि. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत देशभर राष्ट्रीय पोषण महिनासाजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आपल्या आहारात फळांचे महत्व सांगणारा लेख ...
आहारात फळांचे महत्व
आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात 'तंतुमय' म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांनी आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन - प्रसरण चांगले झाल्याने मलप्रवृत्ती चांगली होऊन मलविसर्जन क्रिया सुलभ, सुकर होते. शौचास साफ होते. त्यायोगे अपचन होत नाही किंवा अपचनाने पोटात दुखणे, बद्धकोष्ठता, मलावरोध, आतड्यांना व्रण निर्माण होणे इत्यादी विकार जडत नाहीत.     
आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी आणि अन्य काही फळात '' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. सर्दी कमी करण्यास '' जीवनसत्व उपयुक्त ठरते. '' जीवनसत्वामुळे 'स्कर्व्हो' सारखा रोग होत नाही.
फळात जीवनसत्वे, आम्ले आणि संप्लवनशील तेले (व्होलाटाईल ऑईल्स) असतात. संप्लवनशील तेलामुळे भूक चांगली लागण्यास मदत होते. आंबा, कलिंगड, चेरी आणि अन्य काही फळात 'बीटा कॅरॉटीन' नावाचे द्रव्य असते. आरोग्य तज्ञांच्या मतानुसार या द्रव्यामुळे कर्करोगापासून बचाव होऊ शकतो. फळात 10 ते 15 टक्के मिनरल्स म्हणजेच खजिनद्रव्ये म्हणजेच धातू, अधातू, क्षार असतात. या खजिनद्रव्यात सोडीयम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, गंधक, फॉस्फरस, लोह, तांबे या धातू मूलद्रव्याचा समावेश होतो. कॅल्शियममुळे हाडांना बळकटी येते. दातांचे आरोग्य चांगले राहते. रक्तात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसल्यास माणसे चिडक्या स्वभावाची बनतात. मॅग्नेशियम मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्तीचा उत्साह मंदावतो. माणसास थकवा जाणवतो. रक्तातील सोडियम अन्नपचनाला मदत करते. पोटॅशियममुळे जखमांच्या वेळी रक्त थिजण्याच्या (क्लॉटिंग) क्रियेला मदत होते. थिजण्याच्या सक्षम क्रियेमुळे रक्तस्त्राव जास्त होत नाही. पोटॅशियम यकृताला उत्तेजीत करते. आयोडीनमुळे कंठस्थ ग्रंथीचे आरोग्य चांगले राहते. त्यायोगे थायरॉईड ग्रंथीच्या संबंधित विकार जडू शकत नाहीत. सर्वसमावेषक संतुलीत आहारामध्ये सर्व प्रकारच्या फळांचा, मोसमी किंवा बिगरमोसमी, त्याचबरोबर बदाम, पिस्ते, काजू, अक्रोड, चारोळी, इ. ड्रायफ्रुटसचा समावेश असणे आगत्याचे आहे.
विविध फळांमध्ये केळी, डाळिंब, अंजीर, करवंदे, जांभूळ, चिकू, सीताफळ, रामफळ, संत्री, मोसंबी, द्राक्षे, फणस, बोरे, अननस इत्यादी अनेक प्रकारची फळे समाविष्ट होतात. ज्या आहारात फळांचा समावेश अधिक त्या आहाराला संरक्षक आहार म्हणून संबोधले जाते.
महागडा आहार म्हणजे 'सत्वयुक्त' आहार किंवा सफरचंदसारख्या महागड्या फळांचे सेवन म्हणजेच अधिक सत्वयुक्त आहार हा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात खोलवर रुजलेला एक गैरसमज आहे. खरे पाहता सफरचंद, बदाम, आक्रोड हे फळांचे प्रकार सकृतदर्शनी महागडे वाटत असले तरी त्यांच्यातील पोषण मूल्यांचा विचार केला आणि त्यांच्यातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या शक्तीचा विचार केल्यास ती खऱ्या अर्थाने महागडी नाहीत. दुसरा मुद्दा हा की केळी, पेरू, पपई, चिकू, बोरे, संत्री, मोसंबी, सीताफळ, करवंदे, जांभळे ही उच्च दर्जाची पोषणमुल्ये असणारी, अत्यंत स्वस्त अशी फळे आहेत. नित्यनियमाने त्यांचे सेवन करण्यास काय हरकत आहे ?
            नारळ :- कफ, वात, पित्त प्रकृतीच्या व्यक्तीसाठी नारळ व नारळपाणी हे वरदानच आहे. नारळातील खोबरे आणि नारळ पाणी या दोहोत प्रथिने आहेत, कार्बोहाड्रेट्स आहेत. तेलाच्या स्वरूपात स्निग्धांश आहे, क्षार आहेत, जीवनसत्वे आहेत, अनेक प्रकारची खनिजद्रव्ये आहेत. आजारपणात डॉक्टर नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळ म्हणजे सर्व प्रकारच्या पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असा समतोल आहार आहे.
सफरचंद :- सफरचंद संधिवातावर उत्तम आहे. सफरचंद सेवनाने डोकेदुखी कमी होते. नैराश्य आले असल्यास तेही कमी होते. सफरचंद शरीराची ताकद व रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते. सफरचंदामुळे शौचाच्या तक्रारी कमी होतात व पचनशक्ती सुधारते.
द्राक्षे :- आयुर्वेदात द्राक्ष फळाला उच्च स्थान आहे. पिकलेली द्राक्षे चवीला मधुर असतात. ती तहान भागवू शकतात. द्राक्षांमुळे पित्तदोष कमी होतो. द्राक्षे खाल्यानी थकवा कमी होतो. एक महत्वाचा सल्ला हा की द्राक्षावर कीटकनाशकांचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे द्राक्षे ही दोन - तीन वेळा स्वच्छ धुवून खावीत हे अधिक महत्वाचे. 
केळी :- केळी सर्व ऋतूत उपलब्ध होतात. केळ्यामध्ये ७० टक्के पाणी, ०.८ टक्के खनिज द्रव्ये, ०.४ टक्के तंतुमय पदार्थ, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. केळात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस असतात. कॅल्शियममुळे हाडे व स्नायू मजबूत होण्यास मदत होते. केळातील साखर पचनास सुलभ असल्याने थकलेल्या शरीराला चटकन शक्ती प्राप्त होऊन उत्साह वाढतो. पचनसंस्थेचे आरोग्य टिकविण्यासाठी, मलविसर्जनची क्रिया सुलभ होण्यासाठी केळी फारच मोलाची ठरतात. केळी शक्तिवर्धक असल्यामुळे बालकांना शक्ती वाढविण्यासाठी ती टॉनिकच्या स्वरूपात उपयोगी पडतात. अधिक वाढलेले पित्त केळाने कमी होते. मलावरोध, आतड्याची जळजळ, मूळव्याध, डायरीया, संधिवात इ. अनेक रोगांवर केळ्याचा आहार फायद्याचा ठरतो. केळात लोह असते.
डाळींब :- डाळिंबात ग्लुकोजसारखी चटकन पचणारी साखर असते. डाळिंब दाण्यातील रस रक्तवर्धक असून त्याचा लॅक्टींग एजंट म्हणून म्हणजेच मातेला दूध वाढविण्यासाठी उपयोग होतो. डाळींबाच्या सेवनाने हगवण आमांश, मुळव्याध, जठर विकार बरे होतात. डाळिंब सालीचा रसही औषधी गुणधर्माचा असून त्याचा जंतूनाशक म्हणून आणि त्वचारोगावर चांगला उपयोग होतो. डाळिंब जठराग्नी प्रदिप्त करते. त्यामुळे भूक चांगली लागते. डाळिंब पित्तनाशक असल्यामुळे पित्ताच्या तक्रारीवर उत्तम ठरते. डाळिंबाने वातदोषाचे शमन होते. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. डाळिंबाने मलप्रवृत्ती सुधारून शौचास साफ होण्यास मदत होते.
पपई :- पपई हे शरीराची ताकद वाढविणारे फळ आहे. पपई मूळव्याधीवर गुणकारी सिद्ध झाली आहे. मूत्रपिंडाचे विकार कमी करण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. पपईच्या रसामुळे आम्लपित्त कमी होते. जठराला आलेली सूज कमी होते. पपईच्या सेवनाने अन्नपचन सुलभ होते. पपईने मांसाहाराच्या पचनास सुलभता प्राप्त होते. पपईच्या बियांचे चूर्ण व मध यांचे मिश्रण जंतुनाशक आणि कृमिनाशक म्हणून उपयोगी पडते.
अन्य फळे:- पेरू कफवर्धक परंतु मलप्रवृत्ती साफ करण्यास उपयुक्त. अंजीर पित्तशामक असून रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करते. आंबा वीर्यवर्धक असून शक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे. लिंबे, संत्री, मोसंबी या फळात '' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. '' जीवनसत्व अन्नपचन कार्यास प्रभावी ठरते. व्यायाम केल्यानंतर घाम येतो व शरीराचे निर्जलीकरण होते. या फळांनी म्हणजेच त्यांच्या रसांनी शरीरातील कमी झालेल्या जलाशयाची भरपाई होऊन शरीरातील 'जलसंतुलन' कायम राखले जाते. बदाम प्रथिनयुक्त असून बुद्धिवर्धक आहे. बदामामुळे अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते.
जांभूळ कफ व पित्तनाशक आहे. हे फळ विशेष करून मधुमेही व्यक्तिंना अधिक पथ्यकारक आहे. कलिंगड उन्हाळ्यातील मोसमी फळ आहे. कलिंगड, टरबूज, खरबूज, काकडी ही उन्हाळ्यात उत्पादीत होणारी फळे आहेत. निसर्ग कल्पक आहे. उन्हाळ्यात उन्हामुळे आणि अधिक उष्णतेमुळे प्राणीमात्राच्या शरीरातील घामाच्या स्वरूपात मोठा जलक्षय होतो. या फळात पाण्याचे प्रमाण मोठे असल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्याचे काम ही फळे करतात. या फळातील पाणी शुद्ध असून रक्त शुद्धीकरणाचे काम ती चांगल्या प्रकारे करतात. या फळातील साखर लवकर सहजरित्या पचणारी असल्यामुळे त्यांचा चांगला उपयोग होतो. कफ प्रकृतीच्या आणि ज्यांना वारंवार सर्दी, पडसे, खोकला होतो, त्यांनी शक्यतो ही फळी खाऊ नयेत.
फळे हि मानवी जीवनाला लाभलेले 'वरदान' आहे. 'फलाहार' हा उत्तम आहार आहे. निसर्ग फळांच्या माध्यमातून मानवी आरोग्याचे रक्षण करतो. फलाहाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्या आहारात योग्य ते बदल घडविण्याची जिद्द आपण सर्वानी का बरे बाळगू नये?
-प्रा. वसंतराव बंडोबा काळे
  सेवानिवृत्त उपप्राचार्य
  जयसिंगपूर, जि. कोल्हापूर
००००


जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची
शुक्रवारी बैठक, तक्रारी देण्याचे आवाहन
नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यातील  शासनाच्या  कोणत्याही  कार्यालयामध्ये  चालू  असलेल्या  किंवा आजपर्यंत  केल्या  गेलेल्या  भ्रष्टाचाराबाबत  कोणाची  काही  तक्रार  असल्यास  अथवा एखाद्या कार्यालयामध्ये होत असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी  स्वरुपात  तक्रार शुक्रवार 28 सप्टेंबर 2018 रोजी आयोजित  जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीच्या  बैठकीत  सादर  करावी, असे  आवाहन नांदेड जिल्हाधिकारी  तथा  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीचे  अध्यक्ष  यांच्यावतीने  करण्यात  आले.    
येथील  जिल्हाधिकारी कार्यालयातील  जिल्हाधिकारी  यांचे निजी कक्षात शुक्रवार 28 सप्टेंबर 2018 रोजी  दुपारी 4.30 वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत  निवेदन  लेखी  स्वरुपात  प्रत्यक्ष  उपस्थित  राहून  सादर  करावे  लागेल.  हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मूलन  समिती  नांदेड  या  नावाने  सबळ  पुराव्यासह  दोन  प्रतीत  सादर  करावे  लागेल.
या  बैठकीसाठी  सर्व  विभागांचे  प्रमुख  अधिकारी  उपस्थित  राहणार   असल्यामुळे  आपल्या  निवेदनाची तातडीने दखल  घेवून  शासनाच्या  नियमानुसार   भ्रष्टाचार  करणाऱ्या  अथवा भ्रष्टाचारास  वाव  देणाऱ्या  जबाबदार  अधिकारी  व कर्मचारी  यांच्याविरुध्द  कार्यवाही  करण्यात  येईल,  असे  आवाहनही  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीतर्फे  करण्यात  आले आहे.
00000


डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी
विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत
नांदेड दि. 26 :- अनूसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा सन 2016-17 व सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांनी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील लाभ घेण्यासाठी 15 ऑक्टोंबर 2018 तारखेपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब सामजिक न्याय भवन नांदेड येथे संपर्क साधावा.
सन 2017-18 मध्ये उत्तीर्ण झालेल्या परिक्षेचे गुणपत्रक, सन 2018-19 मध्ये शिकत असलेल्या महाविद्यालयाचे बोनाफाईड, सुधारीत आयएफएससी कोडसह बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, सन 2017-18 मध्ये शिकत असलेल्या महाविद्यालयाचे किमान 75 टक्के हजेरीसह उपस्थिती प्रमाणपत्र या कागदपत्रासह संपर्क साधावा. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षामध्ये स्वाधार योजनेसाठी अर्ज करुन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी वरील सुचनाप्रमाणे कार्यालयास संपर्क करावा. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांने किमान 50 टक्के गुण मिळविलेले असावेत. जे विद्यार्थी सन 2017-18 या शैक्षणिक वर्षांमध्ये कोणत्याही कोर्सच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते उदा. बीए / बीएससी / बीकॉम / पॉली तृतीय वर्ष, एमए / एमएससी / एमकॉम द्वितीय वर्ष, इंजिनिअंरिग, मेडिकल / लॉ शेवटचे वर्ष व इयत्ता 12 वी अशा विद्यार्थ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधू नये. सन 2016-17 व सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करुन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनीच या सुचना गृहित धराव्यात. 15 ऑक्टोंबर 2018 तारखेपर्यंत संपर्क न झाल्यास विद्यार्थ्यांचा लाभ देण्यासाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
0000000


उमरी येथे 30 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
नांदेड दि. 26 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम व नोडल अधिकारी डॉ. एच.आर. गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने उमरी येथे मंगळवार 25 सप्टेंबर रोजी अचानक धाडी टाकण्यात आल्या.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. कायद्यातील तरतुदीनुसार पथकामार्फत 30 तंबाखू विक्रेते यांच्याकडून 29 हजार 900 रुपये दंड आकारण्यात आला.
या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना तिवारी, कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे तथा सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, ग्रामीण रुग्णालय, उमरी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष कदम, दंतशल्यचिकित्सक डॉ. पूजा काळे व स्थानिक पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक कारेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. जी.एस. सरोदे आदी होते.
नांदेड जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी. कदम यांनी केले आहे.
000000


मतदारांच्‍यादृष्‍टीने  बीएलओ  हा महत्‍वाचा घटक
अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील ; लोहयात कार्यशाळा 
नांदेड दि. 26 :- मतदारांच्‍यादृष्‍टीने बीएलओ हा महत्‍वाचा घटक असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्‍यासाठी मतदार यादी अचूक असणे महत्‍वाचे आहे. यासाठी बीएलओ यांनी मतदार नोंदणी व यादीचे काम अचूक करावे. भारतीय नागरीकास मतदानाचा हक्‍क बजावता यावा यासाठी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
      मतदार यादीचे विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत लोहा येथील व्‍यंकटेश गार्डन मंगल कार्यालय येथे लोहा-कंधार विधानसभा अंतर्गत नियुक्‍त बीएलओ यांची 25 सप्‍टेबर 2018 रोजी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्‍यात आली. सदर कार्यशाळेस अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले, त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी लोहयाचे तहसिलदार विठल परळीकर, कंधारच्‍या तहसिलदार संतोषी देवकुळे, गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड, नायब तहसिलदार एस एम देवराये, सारंग चव्‍हाण यांचेसह बीएलओ मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
      पुढे बोलताना अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील म्‍हणाले की, मतदार नोंदणी अधिनियम अंतर्गत मतदार यादी तयार करण्‍याचे काम केले जाते. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्ष पूर्ण होणा-या पात्र नविन मतदाराचे नाव मतदार यादीत समावेश करावा. मतदार यादी अचूक होण्‍यासाठी मतदार यादी पुनरिक्षणाचे काम वारंवार करण्‍यात येते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होण्‍यासाठी अचूक मतदार यादी असणे आवश्‍यक आहे. याची बीएलओ यांच्‍यावर जबाबदारी असल्‍याने मतदारांच्‍या दृष्‍टीने बीएलओ हा महत्‍वाचा घटक आहे. त्‍यामुळे निकषानुसार विहीत नमुण्‍यातील फॉर्म तपासून अचूक काम करावे व एकही तक्रार येवू देवू नये. लोकप्रतिनिधींची नावे मतदार यादीत असल्‍याची खात्री करावी. मतदारांची नावे वगळताना घरोघरी भेटी देवून तपासणी करावी.  मतदारांना मतदानाचा हक्‍क हिरावला जावू नये, याबाबतची दक्षता घ्‍यावी. मतदार यादीत दोन ठिकाणी नावे असने ही फसवणूक असल्‍याने मतदारांनी याची काळजी घ्‍यावी. कार्यक्रमाचे प्रास्‍तविक तहसिलदार विठठल परळीकर यांनी केले. सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी तर आभार नायब तहसिलदार सारंग चव्‍हाण यांनी मानले.
      सदर कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी निवडणुक विभागाचे अव्‍वल कारकुन पी.पी. बडवणे , प्रशांत आपशेटे , तिरुपती मुंगरे, सुर्यकांत पांचाळ, विसपुते , सतीश धोंडगे , राजेश भदरगे, आर जी जहागीरदार, तलाठी कदम , माधव काकडे , सोपान परडे, राजु हनवते , सुधाकर महाबळे , चव्‍हाण , भुजंग वाघमारे, सुरेश पांचाळ आदींनी योगदान दिले.
00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...