Wednesday, May 15, 2019


शासकीय तंत्रनिकेतन येथे समुपदेशन कक्षाची स्थापना
 नांदेड दि. 15 :- दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका प्रवेश मार्गदर्शनासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ऑनलाईन प्रवेश नोंदणी, विविध शाखांची प्रवेश प्रक्रिया व उपलब्धता, भविष्यातील रोजगार संधी, विविध शिष्यवृत्तीच्या योजना, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शनाकडून माहिती विनामुल्य देण्यात येणार आहे.  
प्रवेश इच्छूक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी समुपदेशन कक्ष, शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर नांदेड येथे भेट दयावी, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी केले आहे.   
00000


संभाव्य आपत्ती काळात यंत्रणांनी
समन्वय, सतर्कता, तत्परतेने प्रयत्न करावेत
-          जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड दि. 15 :- आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रणासाठी संघटीत आणि वेळेत प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कता, समन्वय व तत्परतेने प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
मान्सून 2019 च्या अनुषंगाने पुर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांचेसह परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, पोलीस, आरोग्य, कृषि आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि सावधगिरीच्या उपाययोजनांचा आढावा संबंधीत विभागाकडून घेऊन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, पाझर तलाव, नद्या आणि पाण्याच्या साठवणुकीचे मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प पावसाळयात फुटु नये अथवा ओव्हरफ्लो होऊन गावांना धोका होऊ नये यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना वेळीच थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी आणि ब्लिचिंग पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा. महानगरपालिका, नगरपरिषदांनी नालेसफाई तसेच अतिक्रमण दूर करावेत. सर्व प्रमुख यंत्रणांनी 1 जून ते 30 सप्टेंबर या मान्सून कालावधीत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावीत. हवाई मार्गाने शोध व बचाव कार्य करावयाची आवश्यकता भासल्यास जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रफळाचे अक्षांश, रेखांश आणि स्थायी व अस्थायी आपत्तकालीन हेलीपॅडची माहिती स्थानिक पातळीवरुन तहसिलदारांना 25 मे पूर्वी पाठवावी. पाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नदी पाणी पातळीचा धोका, इशारा पातळीबाबत उपाययोजना करतांना सर्व खात्यात समन्वय ठेवून धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.  तहसीलस्तरावर मान्सुन पूर्व तयारीची आढावा बैठक वेळीच आयोजित करुन पूर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्सून पूर्वी पूर्ण करावीत आणि स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चालू मोबाईल संपर्क अद्यावत करावीत. जिल्ह्यात 80 मंडळातील पर्जन्यमापक यंत्र कार्यरत असून ते सुस्थितीत असेल याची खात्री करुन आवश्यक असल्यास पर्जन्यमापक यंत्र त्वरीत खरेदी करावे. शासन निर्णयाप्रमाणे आपतग्रस्तांना योग्य मदत झाली पाहिजे. दरवर्षी होणाऱ्या विजपातामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जनजागृती आणि बचाव कार्याचे रंगीत प्रशिक्षण पूर्ण करावे. सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून आपत्ती निवारणाची कामे सक्षमपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबाबत व केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.
नांदेड जिल्ह्याचे एकुण वार्षिक सरासरी पर्जन्यमान 955.55 मि.मी. एवढे असून मागील पाच वर्षात सन 2014 मध्ये 45 टक्के, सन 2015 - 48 टक्के, सन 2016 - 113 टक्के, सन 2017 - 67 टक्के, सन 2018 मध्ये 81 टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मनार या प्रमुख नद्या असून तालुकानिहाय पूरप्रवण गावांची संख्या नांदेड-46, अर्धापूर-9, मुदखेड- 10, लोहा-9, कंधार-17, किनवट-31, माहूर-7, हिमायतनगर-16, भोकर-14, हदगाव-23, उमरी-17, देगलूर-27, मुखेड-36, बिलोली-18, नायगाव-39, धर्माबाद-18 अशी एकुण 337 गावे आहेत, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.   
000000


संवाद सेतू: एकमेकांना देऊ साथ, दुष्काळाशी करु दोन हात!
मुख्यमंत्र्यांचा 6 दिवसांत 27,449 लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांशी संवाद
6 दिवस, 22 जिल्हे, 139 तालुक्यांतील 27,449 लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा सहभाग. मुख्यमंत्र्यांचे 884 सरपंचांशी प्रत्यक्ष संभाषण.
·        व्हॉटसअ‍ॅपवर तक्रारींसाठी 17 क्रमांक उपलब्ध, व्हॉटसअ‍ॅपवरून 13 मे 2019 पर्यंत 4,451 तक्रारी प्राप्त. प्रत्यक्ष दुष्काळाशी संबंधित तक्रारी 2,359.
            मुंबई, दि. 15:तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केल्यास गतिमान प्रशासनातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कसा हातभार लागू शकतो, याची यथार्थ प्रचिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवादसेतूया उपक्रमातून आली आहे. महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असताना, मुख्यमंत्र्यांनी मागील 6 दिवसांत तब्बल 27 हजार 449 लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. त्यावर प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश देतानाच प्रत्येक तक्रारीचे यथायोग्य निवारण करण्याची व्यवस्थाही उभारली.
            गेले 6 दिवस ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून 22 जिल्ह्यांतील 139 तालुक्यांपर्यंत मुख्यमंत्र्यांना पोहोचता आले. या 22 जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद, नांदेड, जालना, उस्मानाबाद, बीड, परभणी, अहमदनगर,नाशिक, धुळे, जळगाव, बुलडाणा, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, हिंगोली,वर्धा, नागपूर, वाशीम यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे हा संवादसेतू उपक्रम आयोजित करण्यात आला. ऑडिओ ब्रिज या आधुनिक तंत्रामुळे एकाचवेळी संपूर्ण जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेशी संवाद साधणे शक्य होत असल्याने कमी कालावधीत इतक्या व्यापक प्रमाणावर संपर्क साधून जलदगतीने दुष्काळ निवारणाच्या कामांचा आढावा घेणे शक्य झाले.
            या उपक्रमामध्ये मुख्यमंत्री जेव्हा प्रत्यक्ष सरपंचांशी संवाद साधत होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव, दुष्काळी उपाययोजनांशी संबंधित खात्यांचे प्रधान सचिव इत्यादी अधिकारी या बैठकीत हजर होते. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक हे सारे ऑडिओ ब्रिजवर उपलब्ध असत. अनेक पालक सचिवांनीही संबंधित जिल्ह्यांतून या आढाव्यात सहभाग नोंदवला. त्यामुळे संबंधित सरपंचांनी मांडलेली तक्रार एकाचवेळी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पालक सचिव आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी ऐकू शकत होते. या तक्रारींवर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दिलेले निर्देशही त्याचवेळी प्रत्यक्ष सरपंचांपर्यंतही पोहोचत होते.
            या उपक्रमातून 884 सरपंच थेट मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि त्यांनी आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या. ज्यांना संवादात सहभागी होता आले नाही, त्यांच्यासाठी विविध व्हॉटस्‌अ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले. या 22 जिल्ह्यांना एकूण 17 व्हॉटस्‌अ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले. या व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून 13 मे 2019 पर्यंत सुमारे 4 हजार 451 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील प्रत्यक्ष दुष्काळाशी संबंधित 2 हजार 359 तक्रारी होत्या.
            या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यासाठीही एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धती अवलंबविण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र एक्सल शीट तयार करण्यात आले आहे. त्यात प्राप्त झालेली तक्रार,मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश, स्थानिक प्रशासनाने केलेली कार्यवाही असा प्रत्येक जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांबाबतचा अहवाल हा थेट मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयात या प्रत्येक तक्रारीच्या निवारणासाठी पाठपुरावा करण्याची यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. याशिवाय जे प्रश्न धोरणात्मक बाबींशी निगडित आहेत, त्यावरही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने एकमेकांना देऊ साथ-दुष्काळाशी करु दोन हातहा उद्देश यातून साध्य करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे.
००००

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...