Friday, July 3, 2020


वृत्त क्र. 606   
कोरोनातून 8 व्यक्ती झाले बरे
आज नवीन 16 व्यक्ती बाधित
एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू
नांदेड (जिमाका) दि. 3 :- कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 7 बाधित आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 बाधित असे एकूण 8 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 306 व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. 
नांदेड चौफाळा येथील 52 वर्षाच्या महिलेचा गुरुवार 2 जुलै रोजी सायंकाळी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या बाधित महिलेला उच्च रक्तदाब, श्वासनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरानामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 18 एवढी झाली आहे. शुक्रवार 3 जुलै रोजी प्राप्त झालेल्या एकुण 106 अहवालापैकी 71 अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले तर 16 नवीन बाधित व्यक्ती आढळले. जिल्ह्यात एकूण बाधित व्यक्तीची संख्या 414 एवढी झाली आहे.
नवीन बाधितांमध्ये गवळीपुरा येथील 20 वर्षाची 1 महिला, नवीन कौठा येथील 42 वर्षाचा 1 पुरुष, विष्णुपुरी येथील 31 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर नाका रहेमतनगर येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, चक्रधरनगर येथील 65 वर्षाची 1 महिला, विकासनगर येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, श्रीनगर येथील 38 वर्षाची 1 महिला व 10 व 17 वर्षाचे 2 पुरुष, आंबेडकर येथील 35 व 38 वर्षाचे 2 पुरुष, बळीरामपूर येथील 21 वर्षाचा 1 पुरुष, कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील 27 वर्षाचा 1 पुरुष, कंधार येथील 23 व 45 वर्षाच्या 2 महिला आणि 17 वर्षाचा एका पुरुषांचा यात समावेश आहे. सद्यस्थितीत या सर्व बाधित व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.  
आतापर्यंत 414 बाधितांपैकी 306 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 90 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 4 महिला व 6 पुरुष बाधिताचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 90  बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 29 बाधित, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 46 बाधित तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित उपचार घेत आहे. तर 9 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. शुक्रवार 3 जूलै रोजी 93  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 49,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 716,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 781,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 16,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 414,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 14,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 5,
मृत्यू संख्या- 18,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 306,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 90,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 93 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


वृत्त क्र. 605   
कृषि संजीवनी सप्ताहअंतर्गत
कंधार तालुक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नांदेड (जिमाका) दि. 3 :- कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत कंधार तालुक्यात पानभोसी, बहादरपुरा, शिरढोण, आलेगाव, हाळदा, चिंचोली, येलूर, अंबुलगा, उस्माननगर, लाठखू , फुलवळ,  पानशेवडी, बारुळ या गावासह एकूण 35 गावात हा कार्यक्रम बुधवार 1 जुलै रोजी संपन्न झाला. या गावात सरपंच, प्रगतशील शेतकरी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या बैठका  घेऊन विविध विषयावर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर फळबाग लागवडीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कंधार पंचायत समिती कृषी विभाग व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन वसंतराव नाईक सभागृहामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीबाई व्यंकटराव पाटील घोरबांड, पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, शिवा भाऊ नरंगले, गटविकास अधिकारी यु डी रहाटीकर, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुनवर, कृषी अधिकारी एस. एम. मुंडे, विस्तार अधिकारी एस. एस. बेलदार, डी. ए. भगत यांच्यासह शेतकरी दत्ता धर्मेकर गोविंदराव मोरे, माजी पंचायत समिती सदस्य माधवराव गीते, कृषी निविष्ठा विक्रेते पंडित देवकांबळे, भगवान डफडे शिवराज मंगनाळे चाटे, अरुण कांगणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची व कृषी संजीवनी सप्ताहअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. पंचायत समिती सदस्य शिवाभाऊ नरंगले, उत्तम चव्हाण यांनी वसंतराव नाईक साहेबांच्या योगदानाबद्दल व इतर विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आली.
कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील प्रा. व्यंकट शिंदे यांनी विविध गावांना भेटी देत शेतकऱ्यांना पीक  उत्पन्नावाढीच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. तालुक्यातील विविध गावात मंडळ कृषी अधिकारी पवन सिंह बैनाडे, विकास नारळीकर, आर. एम. भुरे, कृषी पर्यवेक्षक आत्माराम धुळगुंडे, बालाजी डफडे, संभाजी डावळे, दत्ता रामरूपे यांच्यासह कृषी सहाय्यक सोपान उबाळे, परमेश्वर मोरे, शिवाजी सूर्यवंशी, गोविंद तोटावाड, माधव गुट्टे, कल्पना जाधव, भूषण पेटकर, कुंभारे गजानन सूर्यवंशी, संतोष वाघमारे, जी. एम. कळणे यांच्यासह तालुक्यातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गाव बैठका घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन पुढील पिकाचे नियोजन करण्यात आले. रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड एकात्मिक कीड, रोग व्यवस्थापन एकात्मिक खत व्यवस्थापन लिंबोळी अर्क तयार करणे. सोयाबीन उगवण यासह पिक विमा राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना ठिबक सिंचन कृषी यांत्रिकीकरण फळबाग लागवड, शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजना याबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. गावागावात माहिती पत्रके शेतकरी मासिके देण्यात आली. नवीन वर्गणीदार करून घेण्यासाठी माहिती दिली. कंधार मंडळ कृषी अधिकारी अंतर्गत प्रचार वाहन व त्यावर  ध्वनिक्षेपक लावून त्याद्वारे सात दिवस गावोगावी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आठवडाभर चालणार असून संपूर्ण तालुक्यातील संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, पोखर्णी तसेच  कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
00000


वृत्त क्र. 604   
प्रधानमंत्री पिक विमा हप्ता भरण्याची मुदत 31 जुलै
नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात खरीप हंगाम सन 2020-21 साठी खरीप ज्वारी, मुग, उडीद, तुर, सोयाबीन व कापूस या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना बँकेत पिक विमा भरण्याची अंतिम मुदत शुक्रवार 31 जुलै 2020 दिली आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात खरीप हंगाम 2020-21 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील पिकांसाठी बंधनकारक होती. यावेळेस शेतकऱ्यांना ऐच्छिक केली आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के व कापसासाठी 5 टक्के ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गीक आपत्ती आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात नुकसान इत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढीलप्रमाणे राहील. ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस पिकासाठी जोखीम स्तर 70 टक्के आहे. ज्वारी पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 25 हजार रुपये, विमा हप्ता दर 24 टक्के, विमा हप्ता रक्कम 6 हजार रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 500 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 750, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 750 रुपये.
सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 45 हजार रुपये, विमा हप्ता दर 30 टक्के, विमा हप्ता रक्कम 13 हजार 500 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 900 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 14 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 6 हजार 300, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 14 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 6 हजार 300 रुपये.
मूग पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, विमा हप्ता दर 24 टक्के, विमा हप्ता रक्कम 4 हजार 800 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 400 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 200, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 11 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 200 रुपये.
उडीद पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये, विमा हप्ता दर 26 टक्के, विमा हप्ता रक्कम 5 हजार 200 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 400 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 12 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 400, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 12 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 2 हजार 400 रुपये.
तूर पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये, विमा हप्ता दर 27 टक्के, विमा हप्ता रक्कम 9 हजार 450 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 2 टक्के, विमा हप्ता रक्कम 700 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 12.5 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 4 हजार 375, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 12.5 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 4 हजार 375 रुपये.
कापूस पिकासाठी विमा संरक्षण प्रति हे. (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत) : विमा संरक्षित रक्कम 45 हजार रुपये, विमा हप्ता दर 19 टक्के, विमा हप्ता रक्कम 8 हजार 550 रुपये. शेतकरी हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता दर 5 टक्के, विमा हप्ता रक्कम 2 हजार 250 रुपये. केंद्राचा हिस्सा प्रति हे. : विमा हप्ता 7 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 3 हजार 150, राज्य हिस्सा प्रति हेक्टर : विमा हप्ता दर 7 टक्के, विमा हप्ता अनुदान रक्कम 3 हजार 150 एवढी रक्कम आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


वृत्त क्र. 603   
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात रविवार 19 जुलै 2020 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात रविवार 5 जुलै 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जुलै 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


वृत्त क्र. 602   
आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत
अन्न धान्य वितरणास मुदतवाढ
नांदेड (जिमाका) दि. 3 :- आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या पात्र लाभार्थी आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतील लाभार्थ्यांस अन्न धान्य वितरणास शुक्रवार 10 जुलै 2020 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांनी अद्याप रास्त भाव दुकानातून अन्न धान्य उचल केली नाही, त्यांनी 10 जुलै पर्यंत रास्त भाव दुकानातून अन्न धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विशिष्ट आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता, विना शिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्यांना मे व जून 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज योजनेंतर्गत प्रति व्यक्ती प्रति महा 5 किलो तांदूळ व प्रति कुटुंब प्रति महा 1 किलो अख्खा हरभरा यानुसार माहे मे व जूनचे एकत्रित प्रतिव्यक्ती 10 किलो तांदुळ व प्रति कुटूंब 2 किलो अख्खा चना लाभार्थ्यांना वाटप सुरु आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (प्राधान्य कुटुंब व अंत्योदय) योजनेतील लाभार्थ्यांना माहे जूनसाठी प्रती सदस्य प्रतिमाह 5 किलो तांदूळ मोफत व मे व जूनची प्रति कुटुंब तुरदाळ किंवा चनादाळ प्रती महा 1 किलो याप्रमाणे दोन महिन्याची 2 किलो दाळ मोफत जूनमध्ये वितरीत करण्यात येत होती. या दोन्ही योजनेतील काही लाभार्थ्यांना अद्याप पर्यंत अन्नधान्य उचल न केल्याने शासनाने विशेष बाब म्हणून 10 जुलै 2020 पर्यंत अन्न धान्य प्राप्त करुन घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी नमूद केले आहे.
000000

वृत्त क्र. 601


नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 5.68 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात 3 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 5.68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 90.86 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 189.16 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 21.22 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 3 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 1.00 (197.54), मुदखेड- 7.33 (126.00), अर्धापूर- 1.33 (138.00) भोकर- 3.00 (220.25), उमरी- निरंक (164.67), कंधार- 2.00 (132.84), लोहा- 3.50 (189.33), किनवट- 13.86 (150.37), माहूर- 19.75 (178.00), हदगाव- 18.14 (195.57), हिमायतनगर-9.00 (317.33), देगलूर- 0.33 (173.94), बिलोली- निरंक (190.60), धर्माबाद- 4.33 (236.65), नायगाव- निरंक (187.20), मुखेड- 7.29 (228.27). आज अखेर पावसाची सरासरी 189.16 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3026.56) मिलीमीटर आहे.
                                                                       00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...