Thursday, July 7, 2022

 जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न


नांदेड (जिमाका) दि. 7 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबीरास अप्पर जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

यावेळी रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहतूक चिन्ह, हाताचे इशारे, हेल्मेट/सिटबेल्ट परिधान करणे याबाबत मार्गदर्शन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी नियमातील बदल, रात्रीच्या वेळी, पावसाळ्यात वाहन चालविणे याबाबत मार्गदर्शन केले.

सार्वजनिक वाहतुकीचा दैनंदिन व्यवहारात वापर करणे, कुटूंबियासाठी नियमांचे पालन करणे. तसेच सध्या वाहन संख्येमध्ये वाढ होत आहेत. नवीन रस्ते तयार होत आहेत. अपघात कमी करण्यासाठी सर्वानी कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसिलदार मकरंद दिवाकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी जाधव यांनी परिश्रम घेतले.
0000

अनोळखी मयत महिलेचा शोध 

·         ओळख पटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 7 :- बंदाघाट येथील गोदावरी नदी पात्रात साधारणता 1 मार्च रोजी दुपारी 1.45 वा. एका अनोळखी मयत महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेचे वय साधारण 25 ते 30 वर्षाच्या दरम्यान आहे. या महिलेचा रंग सावळा असून अंगात काळ्या रंगाची ब्रा आहे. ही अनोळखी महिला मान, दोन्ही हात, आणि पोटा पासून खालचा भाग कापलेल्या अवस्थेत आढळली आहे. याबाबत पोलीस स्टेशन वजिराबाद नांदेड येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू आहे. 

या मयत महिलेच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटत असल्यास त्यांनी वजिराबाद नांदेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांचा मो. 8788797077, 9923696860 तर दूरध्वनी क्र. 02462-236500 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी केले आहे.

000000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 11.50 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात गुरुवार 7 जुलै रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 11.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 243.40 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात गुरुवार 7 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 16.40 (255.80), बिलोली-15.90 (188.50), मुखेड- 1.60 (278.50), कंधार-8.70 (321.80), लोहा-13 (246.50), हदगाव-7.50 (187.40), भोकर- 12 (191.60), देगलूर-1.50 (276.30), किनवट-10.80 (260.80), मुदखेड- 10.50 (315.20), हिमायतनगर-6.40 (315.20), माहूर- 8.50 (184.40), धर्माबाद- 27.40 (202.90), उमरी- 14.80 (255.90), अर्धापूर- 22 (198.30), नायगाव- 20.30 (177.10) मिलीमीटर आहे.

0000

 धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी शहरातील

नामांकित निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू   

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे सन 2022-23  मध्ये शहरातील नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याबाबत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.  या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.

धनगर व त्यांच्या उपजाती समाजातील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली ते 5 वी मध्ये परीपूर्ण अर्ज भरून प्रवेश द्यावा. यासाठी नामांकित शाळेचे नाव पुढील प्रमाणे आहेत. ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कुल देगलूर येथे 100 विद्यार्थ्यांची संख्या. गोदावरी मनार पब्लिक स्कुल, शंकरनगर, बिलोली येथे 250 विद्यार्थी संख्या तर लिटील स्टेप इंग्लिश मेडीयम स्कुल नायगाव (खै.) जि.नांदेड येथे 150 विद्यार्थी संख्या आहे. या शाळेमध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी परिपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

 मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. यासाठी पात्र व्यक्ती / संस्थाकडुन अर्ज मागविण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारीमहाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळजिल्हा कार्यालयउद्योग भवनएमआयडीसी परिसर शिवाजीनगर, नांदेड या कार्यालयाशी भ्रमणध्वनी क्रमांक 9921563053 किंवा दुरध्वनी क्रमांकावर 02462-240674 वर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

योजनेची वैशिष्टे- मध उद्योगांचे मोफत प्रशिक्षणसाहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान. 50 टक्के स्वगुंतवणुक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी/ विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधामधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करणे आहे. तर या योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. वैयक्तीक माधपाळ पात्रतेसाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य. वय 18 वर्षापेक्षा जास्त व 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. केंद्र चालक प्रगतशील मधपाळ व्यक्ती पात्रतेसाठी किमान 10 वी उत्तीर्णवय वर्ष 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिच्या नावे एक एकर शेती जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था पात्रतेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. एक एकर शेत जमिन स्वमालकीची / भाडयाने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत. अटी व शर्तीमध्ये लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चीत केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

00000

लेख

नांदेड जिल्ह्यात या कारणांमुळे

निर्माण होते पूर परिस्थिती  

मराठवाड्यातील गोदावरी सारख्या प्रमुख नदीसह पेनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मनार या नद्या पावसाळ्यात जिल्ह्याचा बहुतांश भाग व्यापून टाकतात. हमखास पर्जन्याच्या क्षेत्रात नांदेड जिल्हा येत असल्याने अपवाद वगळता बऱ्याच वेळा अतिवृष्टीने जिल्ह्यातील अनेक गावात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते. जिल्ह्यातील जवळपास 337 गावे पूरप्रवण क्षेत्रात आहेत. याचबरोबर गोदावरीवर 7 ठिकाणी पूर नियंत्रणासाठीचे ठिकाणे मोडतात. 

गोदावरीतील पाणी वाढण्यासाठी हे आहेत प्रवाह

जायकवाडी धरणाचे पाणी गोदावरीच्या पात्रातून ढालेगाव बंधारा, माजलगाव धरणातील पाणी सोडल्यास सिंधफना नदीद्वारे ते गोदावरी नदी पात्रात, मुळी बंधारा, दिग्रस बंधारा, दुधा नदीचे पाणी पुर्णा नदीच्या पात्रात, सिद्धेश्वर धरणाचे पाणी पुर्णा नदीच्या पात्राद्वारे एकत्रित गोदावरीच्या पात्रात येऊन मिळते. हे सर्व पाणी वरच्या बाजुला असलेल्या बंधाऱ्यातून सोडण्यात आले तर ते सर्व पाणी एकत्र होत गोदावरी पात्रातून विष्णुपुरी धरणात पोहचते. विष्णुपुरीच्या खालच्या बाजुला गोदावरी पात्रात धर्माबाद जवळ बांभळी बंधारा व पुढे पोचमाड धरणात हे पाणी टप्याटप्याने पोहचत जाते.    

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती समजून घेण्यासाठी गोदावरी नदी पात्रातील विविध बंधाऱ्यातून येणाऱ्या पाण्याचे प्रवाह समजून घेणे खूप महत्वाचे आहे. ज्या-ज्या वेळेला मराठवाड्यात समाधानकारक पाऊस होतो तेंव्हा स्वाभाविकच गोदावरी नदीच्या पात्रात पाणी वाढीस लागते. नाशिक परिसरात जेंव्हा जास्त पाऊस होतो तेंव्हा हे पाणी गोदावरी मार्गे जायकवाडीला येऊन मिळते. जायकवाडीचे पाणी सोडल्यानंतर ते सरळ नांदेड मार्गे पुढे पोचमपाड धरणापर्यंत सरकत जाते. पोचमपाड धरण भरल्यावर त्याचा फुगवटा स्वाभाविकच गोदावरीच्या पात्रात निर्माण होतो. तीच स्थिती बाभळी बंधाऱ्याची आहे. बाभळी बंधारा ते विष्णुपुरी प्रकल्प यातील अंतर गोदावरीच्या फुगवट्यामुळे अधिक बाधित होते. एका बाजुला विष्णुपुरीतून सोडलेले पाणी तर दुसऱ्या बाजुला खालचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा झालेला ठहराव अधिक काळजीचा होऊन जातो. 

प्रशासनाची ही आहे दक्षता

जिल्ह्यातील या नैसर्गिक स्थितीमुळे प्रशासन नेहमी पूर आणि आपत्कालीन परिस्थितीबाबत वेळोवेळी योग्य ती खबरदारी घेऊन असते. संभाव्य परिस्थितीतून सावरण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे याही वर्षी संपूर्ण आढावा घेऊन सुरक्षिततेचा व्यापक आराखडा तयार केलेला आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे स्वत: लक्ष ठेवून असून जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्कालीन विभाग 24 तास सुरू करण्यात आला आहे. यासाठी तीन पाळ्यांमध्ये अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. आजच्या घडिला जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद बलाचे एक पथक तैनात आहे. जिल्हा प्रशासनाकडे एकुण 11 बोटी आहेत. 8 आसन क्षमता असलेल्या 8 बोटी रबर तर 3 बोटी या एचडीपीईच्या आहेत. प्रत्येक बोट लाईफ जॅकेटसह आवश्यक त्या सुरक्षा साहित्याने परिपूर्ण आहेत. 80 लाईफ जॅकेट, 80 लाईफ बॉय (गोल रिंग), स्वाकटर, टुलकिट, रेस्क्यू रोप आदी साहित्य आहे. 

पाच वर्षातील पर्जन्यमान

गत पाच वर्षाच्या पर्जन्यमानामध्ये 2020 वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. एकुण वार्षिक सरासरी 891.30 मिमी एवढी आहे. सन 2017 मध्ये या सरासरीच्या तुलनेत 72 टक्के, सन 2018 मध्ये 87 टक्के, सन 2019 मध्ये 106 टक्के, 2020 मध्ये 103 टक्के तर गतवर्षी म्हणजेच 2021 मध्ये 138 टक्के एवढा पाऊस झाला. स्वाभाविकच एवढा पाऊस झाल्याने काही भागातील शेतीतील माती वाहून गेली. शासनाने सर्वत्र नदीच्या काठावर असलेल्या गावात, संबंधित ग्रामपंचायतींना, ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. आजच्या घडीला पूराचे आव्हान जरी नसले तरी प्रशासन योग्य ती खबरादारी घेऊन आहे.

 -        विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

000000






  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...