Friday, February 24, 2023

वृत्त क्रमांक 89

 शेती, शेतकरी आणि भक्तीचा मार्ग

रस्ते विकासातून होण्यासाठी कटिबद्ध
- केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
· जिल्ह्यातील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात
गडकरी यांची जिल्ह्यास विविध महामार्गांची अपूर्व भेट
· अवघ्या साडेतीन तासात नांदेडहून गाठता येईल पुणे
नांदेड, (जिमाका) दि. 24 :-अती श्रीमंत देशच विविध महामार्गांची बांधणी करू शकतात हे सत्य नसून चांगल्या रस्त्याच्या बांधणीतून देशाला समृद्धीचा मार्ग गाठता येतो. या देशातील शेती, शेतकरी यांना खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात जर आणायचे असेल तर शेतीसाठी भक्कम रस्ते, भक्कम रस्त्यांच्या माध्यमातून कृषिपुरक उद्योगाला चालना आणि उद्योगासाठी आवश्यक ठरणाऱ्या वाहतुकीच्या ऊर्जेसाठी जैवइंधन-बायोडिजेल, इथेनॉल, ग्रीन हॉड्रोजन, बायो सीनएजी यावर भर हा भविष्यातील समृद्धीचा मार्ग आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरेतील समृद्ध भारताचा हाच मंत्र असून या कामांसाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
गुरूद्वारा बोर्ड मैदान येथे जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भिमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, प्रणितीताई देवरे, व्यंकटेश गोजेगावकर, प्रविण साले आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदेड शहराला ऐतिहासिक वारसा आहे. येथील भूमी गुरूगोविंदसिंघजी यांच्या वास्तव्याने पुणित झालेली आहे. भारतातील सर्व धर्माच्या अध्यात्मिक क्षेत्राला राष्ट्रीय महामार्गांच्या चांगल्या सुविधेने जोडण्यासाठी आम्ही विश्वास बसणार नाही असे प्रकल्प पूर्ण करून दाखविले. बुद्धा कॉरीडॉन, लडाख, अरुणाचल, हिमाचल, बिहार, उत्तराखंडपासून थेट दक्षिणेपर्यंत रस्त्याचे भक्कम जाळे आता निर्माण झाले आहेत. यातील काही सेक्शनचे काम येत्या 2024 पर्यंत आम्ही युद्धपातळीवर पूर्ण करू असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
तीन शक्तिपीठांना जोडणारा मार्ग पूर्णत्वास
महाराष्ट्रातील अध्यात्मिक मार्ग समृद्ध व्हावा यावरही आम्ही भर दिला. यातूनच पंढरपूर-देहू-आळंदी हा महामार्ग आता पूर्णत्वास आला आहे. महाराष्ट्रातील तीन शक्तीपिठांना जोडणारा महामार्गही पूर्ण होत आला आहे. रत्नागिरी ते नागपूर या सुमारे 30 हजार कोटी खर्चाच्या महामार्गात महाराष्ट्रातील कोल्हापूरची अंबाबाई-तुळजापूर येथील आईभवानी आणि माहूर येथील रेणुकामाता ही तीन शक्तीपिठे जोडली जात आहेत. यातील वारंगाफाटा ते पुढील काम, लातूर ते नांदेड मार्गातील अडचणी दूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
माहूरगडावर वृद्धांना विनासायास जाता यावे यासाठी स्कायवॉक
माहूर हे आमची कुलदैवत आहे. येथील गडावर वृद्ध ज्येष्ठांना विनासायास जाता यावे यासाठी माझ्या बहिणीची इच्छा होती. अनेक ज्येष्ठांना गडाच्या पायऱ्या चढताना थांबावे लागते. भक्तांना कष्ट होतात. भारतातील इतर देवस्थानांच्या विकासाप्रमाणे माहूरगडावरही लवकरच स्कायवॉक, चारमजली लिफ्टसह दोन स्टेशन, पायऱ्यांवर असलेल्या व्यापाऱ्यांसाठी चांगले मार्केट, नास्ता-प्रसादाची वेगळी सुविधा, गडाच्या पायथ्याशी पार्किंग असा एक चांगला प्लॅन तयार केला आहे. अर्थात राज्य शासनाशी चर्चा करून याला निश्चितच लवकर आकार देऊ अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
नांदेड जिल्ह्यात गत 8 वर्षात 508 कि.मी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सन 2014 पर्यंत जिल्ह्यात 258 कि.मी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते. सन 2014 नंतर आजपर्यंत जिल्ह्यात 766 कि.मी. रस्त्याची सुविधा निर्माण केली आहे. सुमारे 508 कि.मी.ची यात भर पडली आहे. येत्या 6 महिन्यात जिल्ह्यात ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत ती पुर्णत्वास येतील असे सांगून त्यांनी सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या 7 कामांची घोषणा करून नांदेड जिल्ह्याला नवी भेट दिली.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड शहरातील वाहतुकीची कोंडी सुटावी यासाठी उड्डाणपुलांची मागणी केली. याचबरोबर तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकच्या सिमेवर असलेल्या देगलूर, मुखेड, उदगीर आणि किनवट भागातील रस्त्यांच्या कामांची मागणी केली. खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार यांनी विविध मार्गांच्या केलेल्या मागणीचा आंर्तभाव येत्या विकास कामात घेतल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगीतले.
000000












वृत्त क्रमांक 88

 बालिकेच्या नातेवाईकांनी

पुराव्यासह संपर्क साधण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- सुहाना काशिम शेख ही 7 वर्षाची बालिका बुलढाणा येथे सापडली. या बालिकेने नांदेड जिल्ह्याचा पत्ता सांगितला आहे. सध्या ती बालिका शासकीय मुलींचे बालगृहमुरुड ता. मुरुड जि. लातूर येथे आहे. या बालिकेचे कोणी जवळचे नातेवाईक किंवा आई-वडील असल्यास ओळखीच्या पुराव्यासह 30 (तीस) दिवसांच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीजिल्हा महिला व बाल विकास कार्यालयशास्त्री नगरनांदेड, आर. आर. कांगणे मो.क्र.9421382042 व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे यांचा मो.क्र. 9834049738/9730336418संरक्षण अधिकारी संदीप फुले यांचा मो. क्र. 9011572458 याच्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

 

शासकीय मुलींचे बालगृहमुरुड ता. मुरुड जि. लातूर संस्थेत बालिकेचे पुढील संगोपन व पुनर्वसनासाठी दाखल करण्यात आले आहे. ही बालिका सडपातळ बांध्याचीगोऱ्या वर्णाचीमध्यम उंचीची आहे. 30 (तीस) दिवसांच्या आत संपर्क न साधल्यास या बालिकेचे कोणीही नातेवाईक किंवा आई-वडील ह्यात नाहीत अथवा ते या बालिकेची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाहीत असे गृहीत धरुन बालिकेच्या दत्तकाची व पुनर्वसनाची कायमस्वरुपी कार्यवाही पूर्ण केली जाईल. त्यानंतर कोणाचीही कसलीच तक्रार किंवा आक्षेप राहणार नाही यांची नोंद घ्यावीअसेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नांदेड यांनी कळविले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 87

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार

योजनेसाठी नविन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2022-23 साठी पात्र विद्यार्थ्यांना नविन अर्ज करण्यासाठी 15 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांनी आपला अर्ज http://www.syn.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर भरुन त्या अर्जाची प्रत (प्रिंट) 16 मार्च 2023 पर्यत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक नांदेड येथे कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावाअसे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर नांदेड यांनी केले आहे.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाहीअशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजननिवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार थेट वितरीत करण्यात येते.

 

लाभाचे स्वरूप या योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे राहतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणिक संस्था याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढीलप्रमाणे आहे. भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता 15 हजार रुपये, निर्वाह भत्ता 8 हजार रुपये, प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम 51 हजार रुपये, वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल. 

 

अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रे व संकेतस्थळ- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना या  http://www.syn.mahasamajkalyan.inसंकेतस्थळवर उपलब्ध आहे.  गरजू विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून सदर अर्जाची एक प्रत सहाय्यक आयुक्त कार्यालयातील स्वाधार शाखेकडे जमा करावी, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 86

 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना

सेवायोजन प्रमाणपत्र अद्यावत करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 24 :- शासनाच्या पूर्वीच्या रोजगार व स्वयंरोजगार व सध्याच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोकरी इच्छूक सुशिक्षित बेरोजगारांनी नाव नोंदणी केली आहे. त्या उमेदवारांनी नाव नोंदणीला आधार कार्ड लिंक करुन घ्यावेत.

 उमेदवारांनी आपले नाव नोंदणीला आधार कार्ड, शैक्षणिक पात्रता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी लिंक करुन माहीत अद्यावत करावी. त्यामुळे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत घेण्यात येणारे रोजगार मेळावे, दिले जाणारे प्रशिक्षण याचा लाभ उमेदवारांना घेता येईल, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 85

 परिवहन विभागाच्या फेसलेस

सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :-प्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहन, अनुज्ञप्ती व परवाना विषयीच्या 20 सेवा फेसलेस करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

 

या फेसलेस सुविधेत अनुज्ञप्ती मध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती, वाहन चालक अनुज्ञप्ती नुतनीकरण, वाहन चालक अनुज्ञप्ती वरील पत्ता बदलणे, अनुज्ञप्ती मध्ये मोबाईल नंबर अद्यावत करणे,अनुज्ञप्ती माहिती (DL Extract) मिळविणे, दुय्यम कंडक्टर अनुज्ञप्ती, कंडक्टर अनुज्ञप्तीचे नुतनीकरण, दुय्यम वाहन चालक अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्ती वरील पत्ता बदल, कंडक्टर अनुज्ञप्ती वरील पत्ता बदल या सुविधाचा समावेश आहे. वाहनांमध्ये दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना -हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलणे, वाहन कर्ज बोजा रद्द करणे, वाहन हस्तांतरण, तात्पुरती वाहन नोंदणी, दुय्यम योग्यता प्रमाणपत्र याचा समावेश आहे. परवाना सुविधेत वाहनांकरिता विशेष परवाना, वाहनांकरिता तात्पुरता परवाना, धोकादायक मालवाहने चालविण्यास मान्यता या सुविधांचा समावेश आहे असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्रमांक 84

 शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त 19 फेब्रुवारी पासून रक्तदान अभियान सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार 21 फेब्रुवारी रोजी कै.शं.च.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीच्या सहकार्याने शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील अध्यापक, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी यांनी रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात 92 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वाय.आर.पाटील यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. राजेंद्र अमिलकंठवार, शिबिर संयोजन वैद्य मंगेश नळकांडे यांच्यासह महाविद्यालय व रुग्णालयातील अध्यापक, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी तसेच कर्मचारी यांची उपस्थिती होती.

0000

वृत्त क्रमांक 83

 दहावी, बारावी परीक्षा केंद्र

परिसरात 144 कलम  

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :-  जिल्ह्यात उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (बारावी) 83 परीक्षा केंद्रावर 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाली आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (दहावी) 2 मार्च 2023 पासून 160 केंद्रावर सुरु होणार आहे. ही परीक्षा 25 मार्च 2023 पर्यत सुरू राहणार आहे.  या कालावधीत (सुटीचे दिवस वगळूनपरीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/ एस.टी.डी/ आय.एस.डी/भ्रमणध्वनी/फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्गमित केला आहे.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...