Thursday, October 25, 2018

लेख


विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी
महाडीबीटी पोर्टल
         - अनिल आलूरकर
       जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
 
       अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व प्रकारची शिष्यवृत्ती ऑनलाईन मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे महाडीबीटी हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची महाडीबीटीच्या संकेतस्थळावर नोंदणी केली जात आहे. यामुळे मागास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेत व पारदर्शकपणे त्यांच्यापर्यंत थेट बँकेमार्फत पोहोचणार आहे. या योजनेविषयीची ही माहिती.

सन 2018-19 पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. महाडीबीटी हे या संकेतस्थळाचे नाव असून https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ संचालक, माहिती व तंत्रज्ञान (DIT) यांचेमार्फत नव्याने कार्यान्वित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती / शिक्षण फी परिक्षा फी / विद्यावेतने / निर्वाह भत्ता वितरीत करावयाच्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी प्रतीपुर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (इयत्ता 11 वी, 12 वी) तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमामधून शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन या योजनांचा समावेश या संकेतस्थळामध्ये करण्यात आला आहे.
या महाडीबीटी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्यांना देय होणारे शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, शिक्षण फी, परीक्षा फी, इतर अनुज्ञेय फी त्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर थेट वितरीत केला जाणार आहे. त्याकरीता विद्यार्थ्यांना आपले आधार कार्ड क्रमांक आपल्या बँक खात्याशी संलग्नीत करुन घ्यावे लागणार आहेत.
महाडीबीटीची वैशिष्ट्ये
लाभार्थी कोणत्याही वेळी कुठुनही महाडीबीटीच्या वेबसाईटवर नोंदणी करु शकतात. लाभार्थी त्यांच्या स्वत:च्या अर्जाची स्थिती युझर आयडीने पाहू शकतात. सुलभ पडताळणी आणि पारदर्शकता यासाठी मार्कशीटस, जात प्रमाणपत्र इ. अपलोड करु शकतात. महाडीबीटी प्रक्रियाच्या विविध स्तरांवर विद्यार्थी आणि संस्थांना एसएमएस आणि ई-मेल अलर्टची तरतूद. विद्यार्थ्यांच्या बॅंकेच्या खात्यात शिष्यवृत्तीचे प्रत्यक्ष वितरण. सुलभ शिष्यवृत्ती मंजुरीची प्रक्रिया, भुमिका आधारित युनिक लॉग इन आयडी आणि पासवर्ड सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. विभाग आणि राज्य प्राधिकरण यांच्याद्वारे शिष्यवृत्तीच्या देखरेखीची पारदर्शकता ठेवली जात आहे. कोणत्याही स्वरुपाच्या तांत्रिक बाबींची अडचण उदभवल्यास संकेतस्थळावरील 022-49150800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्यास कळविले आहे. पात्रतेचे निकष विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.
अर्जासाठी मार्गदर्शक तत्वे
वरील योजनांचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या युजर मॅन्युअल / एफ.ए.क्यु.चा वापर करुन ऑनलाईन पद्धतीने व पोर्टलवर दिलेल्या सुचनांचे पालन करुन अर्ज भरण्याच्या विहित अंतिम तारखेपर्यंत न थांबता संपूर्ण अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरुन घ्यावा. अर्जदार शिष्यवृत्तीसाठी निर्धारीत केलेल्या सर्व अटी लागू आणि पूर्ण करण्यासाठी पात्र आहे, याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदाराची असते. जर अर्जदाराची पात्रता कोणत्याही टप्प्यावर अवैध आढळली तर त्याची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येते. अर्जदाराने अंतिमत: अर्ज जमा करण्यापुर्वी तपासावे की त्याच्या / तिच्याद्वारे प्रदान केलेले सर्व तपशील योग्य आहेत कारण त्यानंतर माहिती संपादित करण्यासाठी कोणतीही तरतूद प्रणालीमध्ये नसेल. शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची पद्धत केवळ ऑनलाईनच असेल. "*" चिन्हासह जे रकाने चिन्हांकित आहेत ते भरणे अनिवार्य असेल. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक हा मोबाईल क्रमांकाशी संलग्नीत नाही त्यांनी त्वरीत जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी संलग्न करुन घ्यावेत.
सर्व संस्थांच्या व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या योजनांची माहिती संस्थेच्या दर्शनी भागातील सुचना फलकावर कायमस्वरुपी लावावी व पात्र विद्यार्थ्यांना वरील योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी सहकार्य करावे व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन भरलेले अर्जांची पुढील कार्यवाहीसाठी ऑनलाईन पद्धतीने छाननी करावी. अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबतची सुचना डीबीटी पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयाला दिली जाईल. त्यामुळे संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय वा तंत्रनिकेतन यांनी कोणत्याही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेवू नये. तसेच कोणत्याही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची असेल. सर्व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती मिळण्यासाठी  15 नोव्हेंबर 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत असे जाहीर आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरु घ्यावयाची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. गतीमानता व पारदर्शकतेच्या दिशेने शासनाचे एक महत्वकांक्षी पाउल म्हणून याकडे पाहिले जात आहे.
0000


दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
नांदेड दि. 26 :- दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन 29 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर 2018 या कालावधीत करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने 20 ऑक्टोंबर 2018  रोजी काढले आहे. दिलेल्या सुचनानुसार कार्यक्रमाचे आयोजन करुन भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहे.
राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगिकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांमार्फत सप्ताहाचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत कार्यालयाच्या दर्शनी भागात व मोक्याच्या ठिकाणी भित्तीपत्रक, कापडी फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंधस्पर्धा, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.
           या सप्ताहाच्या अनुषंगाने विशेष पुस्तिका प्रकाशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, सामान्य नागरिक यांना दक्षता जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या www.cvc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध साहित्याचा जनतेमध्ये वितरणासाठी उपयोग करण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना या सप्ताहाच्या निमित्ताने देण्यात आल्या आहेत.
विभाग प्रमुखांनी परिपत्रकात दिलेल्या सुचनानुसार अधिनस्त सर्व कार्यालय प्रमुखाना सुचना देण्यात याव्यात तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
00000


ई-निविदाबाबत कृषि अधिकाऱ्याचे आवाहन
नांदेड दि. 25 :- उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड या कार्यालयांतर्गत कंधार तालुक्यातील वर्ग 1-9 व नोंदणीकृत मशिनधारक- मानसपुरी-1 (2245522/-), मानसपुरी-2 (1918795/-), नवरंगपुरा-1 (1620812/-), लालवाडी-2 (89562/-). सुशिक्षित बेरोजगार - गुलबवाडी-1 (1106691/-), इमामवाडी-1 (630518/-). मजूर सहकारी संस्था- बाळांतवाडी-1 (499915/-), मानसपुरी-3 (1322884/-).  याप्रमाणे ई-निविदा www.mahatender.gov.in या संकेतस्थळावर 26 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर 2018 या कालावधीत प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000


उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी
सुक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 25 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2018 या वर्षासाठी शुक्रवार 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे.
उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सुक्ष्म व लघु  उद्योगांना पुरस्कार दिले जातात.  सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे  15 हजार व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.
जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या  वेळी,  उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी पासून उद्योग आधार व एमएसएमई डेटा बँक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कमीतकमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापुर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे.
नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी शुक्रवार 30 नोव्हेंबर 2018 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावा,  असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000


बारड येथे 15 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
11 हजार 700 रुपयाचा दंड आकारला 
नांदेड दि. 25 :- जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने बारड येथे आज अचानक धाडी टाकून कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार या पथकामार्फत 15 तंबाखू विक्रेत्यांकडून 11 हजार 700 रुपये दंड आकारण्यात आला आहे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम व नोडल अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. हजारी, कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे तथा सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, ग्रामीण रुग्णालय, बारड येथील समुपदेशक नागोराव अटकोरे व स्थानिक पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पवार तथा जाधव आदी होते.  
जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.
000000


कापूस, तूर पिकाचा कृषि संदेश 
            नांदेड दि. 25 :- जिल्हयात  काप, तुर या पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतक-यांनी पुढील प्रमाणे किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
कापुस पिकावर कामगंध सापळयातील लुर बदलावे आणि सायपरमेथ्रीन 3 टक्के + इंडोक्झाकार्ब 10 टक्के एस. सी 5 मिली प्रति 10 पाण्यात फवारावे.
 तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत. गुंडाळलेली पाने अळीसहीत नष्ट करावीत पक्षी थांबे लावावेत, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
00000


ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या
नोंदणीकृत संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 25 :- महाराष्‍ट्र ग्राहक संरक्षण व मार्गदर्शन निधी नियम, 1992 मधील परिच्‍छेद 7 नुसार राज्‍य शासनाकडुन सहाय्यक अनुदान वितरीत करण्‍यासाठी महाराष्‍ट्रात ग्राहक चळवळ व ग्राहक जनजागृती क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रात काम करणा-या, परंतु ग्राहक चळवळ, ग्राहक व ग्राहक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करुन ग्राहकांच्‍या हक्‍कांचे संरक्षण व  संवर्धनाचे कार्य करणा-या नोंदणीकृत संस्‍थांकडून अर्ज मागविण्‍यात येत आहे.
यासंदर्भात या विभागाच्‍या दिनांक 26 जुलै, 2017 च्‍या शासन निर्णयानुसार, ग्राहक जनजागृती क्षेत्रात काम करणा-या ग्राहक संस्‍थां व्‍यतिरिकत इतर क्षेत्रात काम करणा-या परंतु ग्राहक चळवळीचे ही कार्य करणा-या नोंदणीकृत सस्‍थांना शासनाकडुन अनुदान वितरीत करण्‍याबाबतच्‍या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आल्‍या आहे.  विहित अर्जाचा नमुना शासन निर्णय महाराष्‍ट्र शासनाच्‍या www.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.
अर्ज करणा-या इच्‍छुकांनी विहीत नमुन्‍यातील त्‍यांचा प्रस्‍ताव 30 दिवसाच्‍या आत नांदेड जिल्‍हाधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेपुर्वी किंवा त्‍यापुर्वी प्राप्‍त होतील असा सादर करावा. विहीत मुदतीनंतर प्राप्‍त झालेल्‍या अर्जाचा व विचार केला जाणार नाही, याची नोंद संबंधितांनी घ्‍यावी. तसेच यामध्‍ये बदल करण्‍याचे सर्व अधिकार अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राखून ठेवले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000


रास्तभाव धान्य दुकानात
ऑक्टोंबर महिन्याची साखर उपलब्ध
नांदेड दि. 25 :- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधपत्रिकाधारकासाठी शासनाने ऑक्टोंबर 2018 साठी नियमित नियतन साखर प्राधान्य कुटुंब योजनेसाठी प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजुर केले आहे. या महिन्‍यात जिल्‍हयासाठी 3 हजार 865 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.  
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे. नांदेड - 536.50, हदगाव- 452.0, किनवट- 237.50, भोकर- 159.00, बिलोली- 191.50, देगलूर- 220.00, मुखेड- 433.00, कंधार- 320.00, लोहा- 324.00, अर्धापूर- 114.50, हिमायतनगर- 138.00, वाई माहूर- 113.50, उमरी- 126.00, धर्माबाद- 90.00, नायगाव- 271.50, मुदखेड- 138. याची सर्व प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्य दुकानातून या परिमानानुसार मंजुर साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी  केले आहे.
0000000


विधानसभा विरोधी पक्ष नेता
राधाकृष्ण विखे पाटील यांचा सुधारीत दौरा
नांदेड दि. 25 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
 शुक्रवार 26 ऑक्टोंबर 2018 रोजी तुळजापूर जि. उस्मानाबाद येथून हेलिकॉप्टरने सकाळी 10 वा. नायगाव हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नायगावकडे प्रयाण. सकाळी 10.10 वा. शासकीय विश्रामगृह नायगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10.20 वा. शासकीय विश्रामगृह नायगाव येथून मोटारीने हनुमान मंदिर परिसर नायगावकडे प्रयाण. सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हनुमान मंदिर परिसर नायगाव येथे आगमन व जनसंघर्ष यात्रेच्या जाहिर सभेस उपस्थिती. स्थळ- हनुमान मंदिर परिसर नायगाव. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत राखीव. स्थळ- आमदार वसंतराव चव्हाण यांचे निवासस्थान नायगाव. दुपारी 1 वा. नायगाव येथून जनसंघर्ष यात्रेसमवेत मोटारीने भोकरकडे प्रयाण. दुपारी 2.30 ते 5 वाजेपर्यंत भोकर येथे आगमन व जनसंघर्ष यात्रेच्या जाहिर सभेस उपस्थिती. स्थळ- मार्केट कमिटी मैदान भोकर. दुपारी 5 वा. भोकर येथून मोटारीने जनसंघर्ष यात्रेसमवेत नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.30 ते 8 वाजेपर्यंत नांदेड शहरामध्ये आगमन व जनसंघर्ष यात्रेच्या रॅलीस उपस्थिती. सायं. 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत जनसंघर्ष यात्रेच्या जाहिर सभेस उपस्थिती. स्थळ- नवा मोंढा मैदान नांदेड. नंतर खासदार अशोकराव चव्हाण यांचे निवासस्थान नांदेड येथे राखीव. सोईनुसार मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
000000


भूजल अधिनियमानुसार जिल्ह्यातील
401 गावे संभाव्य पाणी टंचाईग्रस्त जाहीर
नांदेड दि. 25 :-  महाराष्ट्र भूजल अधिनियम (विकास व व्‍यवस्‍थापन) अन्‍वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील 401 गावे / वाडया / तांडया येथेभाव्‍य पाणी टंचाईग्रस्‍त म्‍हणून जाहीर केले आहे. याबाबतचा आदेश निर्गमीत केला आहे.
वरिष्‍ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा नांदेड यांनी सप्‍टेंबर 2018 अखेर पर्यंत झालेल्‍या पर्जन्‍यमान व त्‍यामुळे निरिक्षण विहीरीच्‍या स्थिर पाण्‍याच्‍या पातळीतील फरक यांचा तुलनात्‍मक आभ्‍यास करुन त्‍यांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे. यानुसार जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नांदेड जिल्ह्यातील 401 गावे, वाडया, तांडयामध्‍ये सद्यस्थितीत पाणीटंचाई भासण्‍याची शक्‍यता आहे.
या अहवालानूसार महाराष्ट्र भूजल अधिनियम (विकास व व्‍यवस्‍थापन) 2009 चे कलम 20, 25 व 26 अन्‍वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील 401 गावे / वाडया / तांडया येथेभाव्‍य पाणी टंचाईग्रस्‍त म्‍हणून जाहीर केले आहे.
अहवालानुसार तसेच पिण्‍याच्‍या पाण्‍याची सद्यस्थिती पाहता जिल्‍हयात दिनांक 1 ऑक्टोंबर 2018 ते 30 जून 2019 या कालावधीमध्‍ये पाणी टंचा भासणारी गावे पुढील प्रमाणे आहेत. यात ऑक्‍टोबर 2018 ते डिसेंबर 2018 - (115 गावे), जानेवारी 2019 ते मार्च 2019- (110 गावे), एप्रिल 2019 ते जून 2019- (176 गावे ) असे एकूण 401 गावे सोबत दिलेल्या यादी नमुद करण्‍यात आली आहेत.
000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...