Friday, November 11, 2022

 ग्रंथोत्सवानिमित्त 20 नोव्हेंबर रोजी

विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 

प्रवेशिका 17 नोव्हेंबर पर्यंत सादर कराव्यात  

 

 नांदेड (जिमाका) दि.  11 :- उच्च व तंत्रशिक्षण विभाग जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 व 20 नोव्हेंबर 2022 या दोन दिवशीय ग्रंथोत्सवानिमित्त माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार 20 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2 ते 4 यावेळेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह शेजारी श्री गुरू गोंविदसिंघजी स्टेडियम परीसर नांदेड येथे होणार आहे. आजची समाज माध्यमे व वाचन संस्कृती हा स्पर्धेचा विषय देण्यात आला आहे.

 

नाव नोंदणीसाठी स्पर्धकांनी कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह शेजारी श्री गुरू गोंविदसिंघजी स्टेडियम परीसर नांदेड  या पत्यावर किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9421868639  किंवा dlonandeddol@maharashtra.gov.in येथे संपर्क साधावा. स्पर्धकाला भाषणासाठी सहा मिनीटे वेळ देण्यात येईल. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मराठीमध्ये भाषण करावे लागेल. माध्यमिक विद्यालयातील कोणत्याही दोन स्पर्धकांना प्रवेश दिला जाईल. नाव नोंदणीसाठी माध्यमिक विद्यालयांनी मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीच्या पत्रासह नाव शाळा वर्ग इत्यादीसह दोन विद्यार्थ्यांची स्पर्धक म्हणून प्रवेशिका व नाव नोंदणी शुक्रवार 17 नोंव्हेबर पर्यंत लेखी नोंदणी करावी. यानंतर आलेल्या प्रवेशिका स्विकारण्यात येणार नाही. स्पर्धकांने प्रवेशाच्या वेळी ओळखपत्र सोबत ठेवावे. तसेच स्पर्धकास कोणत्याही प्रवेश फी किंवा कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता देता येणार नाही याची  नोंद घ्यावी. मान्यवर परीक्षकांनी दिलेल्या भाषणातील सरासरी गुणांवरून पारितोषिक दिले जाईल. प्रथम क्रमांक पारितोषिक 1000 रूपये, व्दितीय क्रमांक पारितोषिक 500 रूपये, तृतीय क्रमांक पारितोषिक 300 रूपये ग्रंथ, प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ 200 रूपये प्रमाणपत्र पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभाग नोंदवा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी केले आहे.

0000

 मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त

लोककल्याणकारी योजनांच्या जागृतीसाठी महामेळावा

 

13 नोव्हेंबर रोजी पीपल्स कॉलेजच्या प्रांगणात होणार जागर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

 

 नांदेड (जिमाका) दि.  11 :- समाजाच्या तळागाळातील गरजू पर्यंत विविध लोककल्याणकारी योजना पोहोचाव्यात व त्यांनाही विकासाच्या प्रवाहात येता यावे या उद्देशाने शासन विविध योजना आखते. यातील अनेक योजना भारतीय राज्यघटनेने दिलेल्या निर्देशानुसार साकारलेल्या आहेत. विविध विभागांच्या योजनाद्वारे आदिवासी भागातील बांधवांपासून महानगरांमध्ये राहणाऱ्या गरजू लाभधारकांना त्यांच्या हक्काच्या योजना मिळाव्यात, याबाबत साक्षरता व्हावी या उद्देशाने 13 नोव्हेंबर रोजी पीपल्स कॉलेजच्या प्रांगणात शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या उपक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले. या बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. डी. एम. जज, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतियाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशावरुन 31 ऑक्टोंबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संपूर्ण नांदेड जिल्हामध्ये कायदेशीर जागरूकता आणि प्रसाराद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण मोहीम राबविण्याबाबत येत आहे. त्याअनुषंगाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश व्ही. न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम व्यापक करण्यात आला आहे. समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना योग्य तो न्याय मिळण्याच्या उद्देशाने त्यांना देण्यात येणाऱ्या मोफत विधी सेवा, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाची माहिती होईल व त्या योजनांचा लाभ त्यांना मिळण्यासाठी तसेच समाजातील अगदी तळागाळातील व्यक्ती सुध्दा या योजनेपासुन वंचित राहू नये यासाठी त्यांच्यात जागृती होण्यासाठी नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमीत्त जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 13 नोव्हेंबर 2022 रोजी पीपल्स कॉलेज मैदान, स्नेहनगर नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आयोजीत केले आहे.


या महाशिबीरामध्ये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या तर्फे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचावी व त्यांचा लाभ त्यांना मिळावा, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय योजनेचा महामेळावा आयोजीत केला आहे. या महामेळाव्यात तहसिल कार्यालय नांदेड अंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या सेवा व योजना, नवीन रेशन कार्ड योजना, रेशनकार्ड मधील नावात दुरुस्ती करणे, रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, नवीन आधार नोंदणी / दुरुस्ती, आधार कार्ड मध्ये नावात बदल, आधार कार्ड मध्ये जन्म तारखेत बदल, आधारकार्ड मधील पत्ता बदल, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर, वय,अधिवास व राष्ट्रीयत्व  प्रमाणपत्र, जातीचा दाखला, मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री श्रम-योगी मानधन योजना, आम आदमी विमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय  विधवा निवृत्ती वेतन योजना, आयुष्यमान भारत योजना, ई-श्रम , बांधकाम कामगारासाठी विविध योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, 33 टक्के महिला आरक्षण योजना आदी कल्याणकारी योजनाचे स्टॉल शासनाच्या विविध विभागामार्फत लावण्यात येणार आहेत. नांदेड जिल्हातील सर्व नागरीाकांनी या महामेळाव्यास उपस्थीत राहुन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदेड 
 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती डी. एम. जज यांनी केले आहे.

0000

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेरोजगार

उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 11 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी सोमवार 14  नोव्हेंबर व मंगळवार 15 नोव्हेंबर 2022 रोजी महास्वयंम या संकेतस्थळावरून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या  http://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छुक उमेदवारांना जॉब सिकर या लिंकवर नोंदणी करावी. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दिसेल. त्यातील Action या पर्यायाखाली दोन बटणापैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील. सदर संदेश काळजीपूर्वक वाचा व I Agree बटणावर क्लिक करावे व मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे (पदाचे नाव, शैक्षणिक अर्हता, आवश्यक कौशल्य, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण )दिसतील. आपल्या शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्ये यानुसार पदाची निवड करावी व  अप्लाय बटणावर क्लिक करावे. आपल्याला एक संदेश दिसेल, सदर संदेश काळजीपुर्वक वाचा व ओके बटणावर क्लिक करावे. आपला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप ईव्दारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा  दुरध्वनी क्रमांक 02462-251674 किंवा nandeddrojgar@gmail.com वर संपर्क साधावा, असेही आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

000000

आधारभूत किंमत खरेदी योजनेत नोंदणी करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

 

आधारभूत किंमत खरेदी योजनेत नोंदणी

करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :-आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान/भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली (कासराळी) येथील केंद्रावर सुरू आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी बुधवार 30 नोव्हेंबर 2022  पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

 

नोंदणीसाठी चालू हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, बँक खात्याची साक्षांकीत प्रत, आधार कार्ड व शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करावयाचा आहे.

00000

 

जिल्ह्यातील 3331 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा 4 लाख 24 हजार 127 पशुधनाचे लसीकरण

जिल्ह्यातील 3331 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 24 हजार 127 पशुधनाचे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 212 बाधित गावात 3 हजार 331 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. 

आतापर्यंत 167 पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या 2 हजार 183 आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन 987 आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 24 हजार 127 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 74 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

0000


 बचतगटांना पॅकेजिंग तंत्रासह

ऑनलाईन बाजारपेठेचा मिळणार मंत्र  

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष उपक्रम

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात एक वैविध्यपूर्ण कल्पकता व कलात्मकता दडलेली आहे. किनवट सारख्या आदिवासी भागात कोलाम व इतर जमातीच्या महिला बांबुपासून विविध वस्तुंची निर्मिती करतात. काही तालुक्यात सेंद्रीय व नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करून त्याची गुणवत्तापूर्ण उत्पादन करणारे असंख्य बचतगट जिल्ह्यात कार्यरत आहेत. या बचत गटांना बाजारपेठेशी व विशेषत: पॅकेजिंगसह ऑनलाईन विक्रीचे तंत्रज्ञान पोहचविण्याच्या दृष्टिने विशेष उपक्रमाला चालना देऊ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

निजामाच्या तावडीतून मराठवाड्याला मुक्त होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहे. अर्थात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या विशेष उपक्रमाला दिशा मिळण्यासाठी विद्यापिठात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील महिला बचतगट, शेतकरी उत्पादक, लघु उद्योजक यांच्या व्यावसायिक कल्पनांना आकार देऊन त्याचे स्टार्टअप पर्यंत रुपांतर व्हावे यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीस कुलगुरु डॉ. उध्दव भोसले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा नियोजन अधिकारी सु. धा. थोरात, मनपा उपायुक्त भारत राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. राजाराम माने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके आदी मान्यवर उपस्थित होते.  

 

जिल्ह्यात महिला बचत गट खूप मोठया प्रमाणात कार्यरत आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागात आता बचत गट आणि लघु उद्योगासह व्यवसायाबाबत मोठ्याप्रमाणात जागृती झाली आहे. लोकांना आता खरी गरज त्यांच्या कल्पनांना व्यवसायिक आकार देण्यासह स्टार्टअप पर्यंत आणण्याची आहे. एकाबाजुला शासनाच्या विविध योजनाअंतर्गत असलेला निधी व स्टार्टअपचे प्रशिक्षण देणारे विद्यापिठातील केंद्र यांचा समन्वय साधून नव्या लघु उद्योगांना आम्ही भक्कम आकार देऊ असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.

 

जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण काम करणारे विद्यार्थी/विद्यार्थीनी, बचतगटातील महिला व उद्योजक यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन व सहाय्य केले जाते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात यासाठी इनक्युब सेंटर साकारले असून यामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन मोठ्या प्रमाणात हाती घेऊ असे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी सांगितले.

 

जिल्ह्यातील मुली व महिलांसाठी एनयु एल एम, एमएस आर एलएम, माविम, बँक तसेच कौशल्य विकास यांचे सहकार्याने नाविण्यपूर्ण प्रशिक्षण याअंतर्गत दिले जाईल. यातून त्यांना रोजगार व स्वयंरोजगार मिळेल. यासाठी विशेष प्रशिक्षणावर भर देण्यासह इन्क्युबेशन सेंटर अधिक गतीने कार्यरत होणार आहे. या सेंटरमध्ये विद्यार्थी/विद्यार्थीनीना, बचतगटांतील महिला व उद्योजक यांना स्टार्ट-अप, मार्केटींग व विक्री सॉफ्ट स्किलबाबतचे प्रशिक्षण देण्याबाबत बैठकीत व्यापक चर्चा झाली.  महिलांना अधिक रोजगार व स्वयंरोजगार मिळावा असे प्रशिक्षण कौशल्य विकास कार्यकारी समितीमार्फत प्रस्तावित करावे असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. 


यावेळी कौशल्य विकास रोजगार व उद्योजगकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाची इतर माहिती सादर केली.

00000




 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि 11 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई  व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड तर्फे दिनांक  12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, नांदेड येथे होत आहे.

 

सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे सदर लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत.

 

याशिवाय, सदर लोक अदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, महानगरपालीकेचे थकीत मालमत्ता कराची प्रकरणे, घरकुल योजनेची प्रकारणे तसेच ग्रामपंचायतीचे थकीत मालमत्ता कराची व भारत संचार निगम लि. यांचे थकीत बाकी येणे  बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

 

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. सदर राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन एन.व्ही.न्हावकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड व न्यायाधीश श्रीमती डी.एम.जज, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांनी केले आहे. सर्व पक्षकारांनी येताना त्यांनी आपले अधिकृत ओळखपत्र घेवून येणे गरजेचे असुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच सर्व संबंधित पक्षकारांनी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 अग्निवीर वायू पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन  

नांदेड ( जिमाका )दि.11:- भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायु म्हणून भारतीय सेवेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या जाहिरातीद्वारे अग्निवीर वायू पदाच्या परीक्षेसाठी  https://agnipathvayu. cdac.in या संकेतस्थळावर 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त, रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...