Friday, March 30, 2018


कंधार ऊर्ससाठी 3 एप्रिल
ऐवजी 4 एप्रिलला स्थानिक सुट्टी
नांदेड, दि. 30 :- यापुर्वी कंधार ऊर्ससाठी मंगळवार 3 एप्रिल 2018 रोजीची स्थानिक सुट्टी रद्द करुन त्याऐवजी बुधवार 4 एप्रिल 2018 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. यापुर्वीच्या अधिसुचनेतील दिलेल्या सोमवार 23 जुलै 2018 रोजी आषाढी एकादशी ( पंढरपूर यात्रा ) आणि मंगळवार 6 नोव्हेंबर 2018 रोजी नरक चतुर्दशी या दोन सुट्ट्यांच्या तारखा त्याच राहतील, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शुद्धीपत्रकात नमूद केले आहे.
या स्थानिक सुट्ट्या नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील. हा सुधारीत आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू राहणार नाही, असेही शुद्धीपत्रकात म्हटले आहे.
00000


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा
नांदेड, दि. 30 :-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवार 31 मार्च 2018 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 31 मार्च 2018 रोजी लातूर येथून मोटारीने रात्री 9.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. रात्री 9.25 वा. विमानाने मुंबई प्रयाण करतील.
000000


नांदेड जिल्हा कृषी महोत्सवाचा समारोप
ग्राहकांमध्ये शेतकऱ्यांना सन्मानाने उभा करण्याची शक्ती
- अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील
नांदेड, दि. 30 :- शेतकऱ्यांचे कष्ट लक्षात घेऊन त्यांचा उत्पादीत माल खरेदी करुन शेतकऱ्यांना सन्मानाने उभा करण्याची शक्ती ग्राहकांमध्ये आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज येथे केले.  
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचेवतीने 26 ते 30 मार्च या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा मैदान नांदेड येथे आयोजित नांदेड जिल्हा कृषि महोत्सवाचा समारोप आज विविध शेतकऱ्यांचा सन्मान करुन करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील बोलत होते.      
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.  
अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील पुढे म्हणाले, कृषी महोत्सवात उत्पादक ते ग्राहक यामधील साखळी कमी करुन शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना योग्य किंमतीत माल विक्री केला आहे. यामुळे शहरी ग्राहकांपर्यंत शेतकऱ्यांच्या भावना, कष्ट पोहचले आहेत. महोत्सवात कृषि विषयक परिसंवाद, व्याख्यानांद्वारे विचारांच्या देवाण-घेवाणीतून शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यात आले. या मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी शेती उत्पादनात घेऊन त्याची माहिती इतर शेतकऱ्यांना दयावे, असेही आवाहन त्यांनी केले.
लोहा तालुक्यातील शेतकरी विश्वनाथ होळगे यांनी झिरो बजेट नैसर्गीक शेतीची माहिती देऊन शासनाने शेततळे दिल्यामुळे कोरडवाहू शेतीतून बागायत शेतीकडे वळता आल्याने शेतीत यशस्वी झाल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. मोटे यांनी कृषि महोत्सवात नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी व ग्राहकांनी सहभाग घेतल्याचे सांगून उत्पादीत शेतमाल विक्रीची सरासरी 67 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषि विषयक परिसंवाद, व्याख्यानांबरोबर मार्केटींग तंत्रज्ञान शिकायला मिळाल्याचे, सांगितले.
यावेळी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतीमध्ये उल्लेखनी अशी कामगिरी केलेले शेतकरी प्रतिक शिंदे, भागवत शिंदे, सुनिल मोरे, अर्जुन राऊत, भिमराव सोनटक्के, माधव सुर्यवंशी, विश्वनाथ होळगे, शशीकुमार पत्की, उमेश मामीडवार, कबीरदास कदम, संताजी वटाणे, नारायण पाटील, विजय ठाकरे, संदीप धडलवार, असलम पठाण यांना तर शेतकरी बचतगटात ओंकारेश्वर शेतकरी बचत गट भोगाव, पद्मश्री कदम शेतकरी गट धानोरा, जय आंबिका महिला शेतकरी गट तामसा, बलराम ग्रुप ॲण्ड फार्मस क्लब देगलूर, हरीतक्रांती शेतकरी गट बिलोली रुद्रापूर यांना प्रमाणपत्र देऊन उत्स्फूर्त गौरव करण्यात आला. तसेच 26 ते 30 मार्च या कालावधीत कृषि महोत्सवात स्टॉल लाऊन शेतीमाल उत्पादनाची विक्री व मार्गदर्शन केलेल्या सहभागींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.  
सुरुवातीला कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी यांचेवतीने हळद लागवड तंत्रज्ञान, केळी लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ट्रायकोडमी, माती परिक्षण घडीपत्रिकेचे तसेच एकरी शंभर टन ऊस उत्पादन, आधुनिक शेती पालन, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी एक दृष्टिक्षेप या पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  
            कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक विजयकुमार भरगंडे यांनी आभार मानले तर सुत्रसंचालन कृषि सहाय्यक वसंत जारीकोटे यांनी केले. नांदेड जिल्हा कृषि महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आयोजकाचे मान्यवरांनी अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, ग्राहक, नागरिक, कृषि व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
000000

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा दौरा
नांदेड, दि. 30 :-  केंद्रीय रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 31 मार्च 2018 रोजी लातूर येथून वाहनाने रात्री 9.15 वा. श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000

राष्ट्रीय लोकन्यायालयाचे
जिल्ह्यात 22 एप्रिलला आयोजन
नांदेड, दि. 30 :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड  यांच्याकडून रविवार 22 एप्रिल 2018 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये तडजोडपात्र फौजदारी, चेक बाऊंसची (138 एन.आय.अॅक्ट), बॅंक रिकव्हरी, दिवाणी, भुसंपादन, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, कामगार, मनपा,गरपालिका, विद्युत आणि पाणीपट्टी प्रकरणे तसेच विविध बॅंकांची, टेलीफोन कंपन्यांची प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
विधिज्ञ, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, म.न.पा. अधिकारी, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, बॅंक अधिकारी व संबंधित सर्व पक्षकार यांनी या राष्ट्रीय लोकन्यायालयात आपली जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढुन आपला पैसा, वेळ वाचवावा व या राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या रूपाने चालून आलेल्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश  सुधीर पी. कुलकर्णी यांनी केले आहे.
मागील राष्ट्रीय लोकन्यायालयातील यश पाहता यावेळी देखील बऱ्याच मोठया प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे यांनी व्यक्त केला आहे. पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात व दाखलपुर्व प्रकरणे जवळच्या तालुका विधी सेवा समितीकडे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड या कार्यालयाकडे एक अर्ज देवून आपले प्रकरण लोकन्यायालया ठेवावीत. यासाठी कुठलही शुल्क आकारण्यात येणार नाही. आपसातील वाद मिटवून या राष्ट्रीय लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असेही आवाहान श्री. वसावे यांनी केले आहे.
000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...