Monday, April 24, 2017

हिवताप आजाराची नागरिकांनी काळजी घ्यावी
आरोग्य विभागाचे आवाहन; आज जागतिक हिवताप दिन  
नांदेड दि. 24 :-  जागतीक आरोग्य संघटनेने 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून घोषीत केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयातीन सर्व आरोग्यसंस्थेत मंगळवार 25 एप्रिल 2017 रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. भविष्यात या आजाराचा उद्रेक होवू नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्यादृष्टिने नागरिकांनी जागरुक रहावे व या आजाराची लक्षणे आढळुन आल्यास वेळीच नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.  
जिल्हयात डेंग्यु, हिवताप आजार वाढणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. हिवताप आजारात रुग्णास थंडी वाजून ताप येतो व हुडहुडी भरते. हा ताप एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड येतो. अंग दुखणे, डोके दुखणे तसेच रुग्णास पांघरुण घ्यावे वाटते व नंतर घाम येवून ताप कमी होतो आणि रुग्णास थकवा येतो. यासाठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरीत उपचार करुन घ्यावेत. उपचार न केल्यास वारंवार ताप येवून रुग्ण बेशुध्द होवू शकतो. डेंग्युच्या लक्षणात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायु दुखी होवून उलटया होणे, डोळयाच्या आतील दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातुन रक्त स्त्राव होणे, अशक्तपणा, भुख मंदावणे, तोंडाला कोरड पडणे ही लक्षणे दिसून येतात.
हिवताप आजारावर मात करण्यासाठी पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपाययोजना जनतेने राबविणे गरजेचे आहे. घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक दिवस निश्चित करुन रिकामे करावेत या साठयातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.             
आंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत. त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावे. पांघरुन घेवून झोपावे.  संध्याकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारुन घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवू किंवा रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादीची वेळीच विल्हेवाट लावावी. संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.
या सर्व रोगाची तपासणी व उपचार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवील त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

00000
जिल्हा रुग्णालयातील बुधवारचे
रोगनिदान शिबीर रद्द
नांदेड दि. 24 :- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे बुधवार 26 एप्रिल 2017 रोजी विशेष रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाढते तापमान लक्षात घेता रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून हे शिबीर स्थगीत करण्यात आले आहे. पुढील शिबिराचा दिवस नंतर कळविण्यात येईल याची संबंधीत रुग्ण व आरोग्य संस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.

00000
ग्रंथामुळे जीवना समृद्धी - डॉ हंबर्डे
नांदेड दि. 24 :-  शिक्षणाने मनुष्य शिक्षित होतो परंतु सुसंस्कृत होण्यासाठी अवांतर व चौफेर वाचन गरजेचे आहे. ग्रंथ वाचनाने व्यक्तिमत्व फुलण्यास मदत होते. ग्रंथामुळे जीवन समृद्ध होते, असे प्रतिपादन महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. गोविंद हंबर्डे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे जागतिक ग्रंथदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी डॉ. श्रीकांत लव्हेकर, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, ग्रंथ विक्रेते सुधीर देबडवार, ज्ञानविश्व साप्ताहिकाचे संपादक रमेश मस्के, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, मनपाचे ग्रंथपाल संजीव कार्ले, सेतू अभ्यासिकेचे ग्रंथपाल बाळू पावडे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी ग्रंथराजच्या प्रतिकृतीचे पूजन मान्यवरांचे हस्ते झाल्यानंतर ग्रंथभेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी प्रस्ताविकातून जागतिक ग्रंथ दिनाचे महत्व  व कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद केली. डॉ.लव्हेकर यांनी उपस्थितांना वाचनाची गोडी लावून घेणं आवश्यक असल्याचे सांगून ग्रंथाचे महत्व याविषयी माहिती दिली. याप्रसंगी निर्मलकुमा सूर्यवंशी व सुधीर देबडवार यांचीही समायोचीत भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय वट्टमवार यांनी केले तर आभार मुक्तीराम शेळके यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन कोंडीबा गादेवा, सोपान येनगुलवाड, रघुवीर श्रीरामवार यांनी केले.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...