Monday, March 12, 2018


चाणक्य पुरस्काराने देवेंद्र भुजबळ सन्मानित 


पुणे दि. 12 : देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या पब्लीक रिलेशन्स कॉन्सिल ऑफ इंडीयाच्यावतीने जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) देवेंद्र भुजबळ यांना प्रतिष्ठेच्या ‘चाणक्य’ पुरस्काराने  मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
येथे नुकतेच पब्लीक रिलेशन्स कॉन्सिल ऑफ इंडीयाची दोन दिवसीय 12 वी ग्लोबल कम्युनिकेशन परिषद झाली. यामध्ये प्रतिष्ठेच्या चाणक्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पब्लीक रिलेशनमधील तज्ज्ञ मॅथ्यू, पीआरसीआचे पदाधिकारी एम. बी. जयराम, विजयलक्ष्मी, आर. डी. कुमार, बी. एन. कुमार, आर. टी. कुमार, वेणूगोपाल यांच्यासह  देशभरातून पब्लीक रिलेशनमध्ये काम करणाऱ्या मान्यवर संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
या परिषदेत जनसंपर्क क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे तज्ज्ञ सहभागी होतात. यावर्षीची 12 वी परिषद ‘ट्रान्सफॉर्म’ या संकल्पनेवर आधारीत होती.  या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्थांना या परिषदेत सन्मानित करण्यात आले.
या वर्षी शासनाच्या जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कम्युनिकेटर ऑफ द इयर ‘चाणक्य’ पुरस्काराने देवेंद्र भुजबळ यांना सन्मानित करण्यात आले. देवेंद्र भुजबळ हे 1991 पासून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात कार्यरत आहेत. सध्या ते संचालक (माहिती) या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी केसरी या मराठी वृत्तपत्रापासून आपल्या कामाला सूरूवात केली, नंतर त्यांनी मुंबई दूरदर्शन येथे प्रोग्रॅम प्रोड्यूसर म्हणून सहा वर्षे काम केले आहे. माहिती व जनसंपर्क विभागात त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. 
या परिषदेला देशभरातून जनसंपर्क क्षेत्रातील विविध मान्यवर संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.     
*****


प्रसार माध्यमांमध्ये काम करताना कल्पकता महत्वाची
-माहिती संचालक देवेंद्र भुजबळ

औरंगाबाद, दि.12 :- शासकीय खाजगी प्रसार माध्यमांमध्ये काम करताना कल्पकता महत्वाची असून माध्यमांच्या बदलत्या युगात स्वत:ला सिध्द करण्याची क्षमता विकसीत केली गेली पाहिले, असे मत माहिती जनसंपर्क मराठवाडा विभागाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी  आज येथे व्यक्त केले.
देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या पब्लिक रिलेशन्स कॉन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रतिष्ठेच्या चाणक्यपुरस्काराने नुकतेच पुणे येथे श्री.भुजबळ यांना सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त्माहिती जनसंपर्क महासंचालनालय मराठवाडा विभाग औरंगाबाद कार्यालयात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
श्री.भुजबळ पुढे म्हणाले, माध्यमांमध्ये काम करताना कल्पकतेसोबतच भाषेलासुध्दा फार महत्व आहे. आधुनिक युगात माध्यमांचे स्वरुप बदललेले आहे. त्याचबरोबर माध्यमांचे तंत्रसुध्दा बदललेले आहे. त्यामुळे विशेष शैलीत लिखाण केल्यास त्याची दखल विविध माध्यमांत घेतली जाते. त्यामुळे सतत लिखाण करणे आवश्यक आहे. शासकीय सेवेत राहुन विविधांगी लिखाणामुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे. आपण करत असलेल्या सेवेचा फायदा वंचित घटकांपर्यत करुन देणे महत्वाचे असते. माध्यमात काम करताना बदलत्या माध्यमाचा वापर करुन आपण कल्पकतापूर्ण लिखाण केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.  हा कॉर्पोरेट पुरस्कार असून जनसंपर्क क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेमार्फत हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला मनस्वी खुप आनंद झाला आहे असे ते म्हणाले. 
कार्यक्रमात लातूर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे आपल्या मनोगतात म्हणाले की, देवेंद्र भुजबळ यांच्या 32 वर्षाच्या शासकीय सेवेतील उत्कृष्ट कामाची नोंद म्हणून त्यांना चाणक्य पुरस्काराने गौरविले आले आहे ही महासंचालनालयासाठी फार मोठी गौरवाची बाब असून देशपातळीवरील जनसंपर्क क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेतर्फे शासकीय गटातून श्री.भुजबळ यांना हा पुरस्कार देण्यात आला, असे सांगुन त्यांनी श्री.भुजबळ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक संचालक डॉ.रवींद्र ठाकुर, माहिती अधिकारी वंदना थोरात, माहिती सहायक संजीवनी पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती सहायक श्याम टरके यांनी केले तर संहिता लेखक रमेश भोसले यांनी आभार व्यक्त केले. 
या कार्यक्रमाच संचालक माहिती कार्यालयातील आणि जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
******



जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत
लाभार्थ्यांची नावे अंतिम करण्यासाठी प्रसिद्ध
पात्र अर्जदारांनी कर्ज मंजुरीचे पत्र ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन   

नांदेड दि. 12 :- जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांची नावे अंत करण्यासाठी महाऑनलाईनवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र अर्जदारांनी वित्तीय संस्थेकडून विनाअट कर्ज मंजुरीबाबतचे पत्र शुक्रवार 23 मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
राज्यातील जलयुक्त शिवार अभियान तसेच जल मृद संधारणाच्या कामांना गती मिळावी स्किल  इंडियाच्या धर्तीवर ग्रामीण भागातुन कुशल उद्योजक तयार करणे या दुहेरी उद्देशाने राज्य शासनाच्या मृद जलसंधारण विभागाने, "जलसमृद्धी यंत्र सामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना" राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करून अर्थमुव्हर्स खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज शासन भरणार आहे. या योजनेंतर्गत प्रथम टप्प्यात दि. 31 जानेवारी, 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्जाची जिल्हास्तरीय समितीकडून छाननी करून योजनेंतर्गत लाभार्थ्यांची नावे अंतिम करण्यासाठी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.  ही यादी  जिल्हाधिकारी कार्यालय राष्ट्रीयकृत बँकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीतील पात्र अर्जदारांनी राष्ट्रीयकृत बँकेकडून सदर योजनेतंर्गत शासन निर्णयाप्रमाणे विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या Log in ID द्वारे शुक्रवार 23 मार्च, 2018 पर्यंत ऑनलाईन सादर करावयाचे आहे.
कर्ज मंजुरी पत्रामध्ये शासनाचे दायित्व, अनुज्ञेय असलेल्या व्याजाच्या परताव्याच्या रकमेकरिता कर्जाच्या रकमेची कमाल मर्यादा रु.17.60 लक्ष राहील त्यानुसार पाच वर्षामध्ये शासनामार्फत कमाल व्याज परतावा रक्कम रु.5.90 लक्ष पर्यंत राहील. अशी अट वित्तीय संस्थेस (बँक) मान्य असल्याचे स्पष्टपणे नमूद असावे. कर्ज मंजुरी बाबतचे संपूर्ण अधिकार हे संबंधित बँक / वित्तीय संस्थेचेच राहणार असून या संदर्भातील बँकेच्या असणाऱ्या संपूर्ण अटी शर्ती यांची पूर्तता करण्याची जबाबदारी लाभार्थी यांची राहील.
वित्तीय संस्था / बँकेकडून कर्ज मंजुरीचे पत्र सादर करण्यात आलेल्या अर्जदारांची संख्या जास्त असल्यास जिल्हा स्तरीय समितीने जाहीर सोडत काढून दिलेल्या लक्षांकाप्रमाणे लाभार्थी निवडण्यात येतील. यामुळे पात्र लाभार्थी यांनी बँकेचे विनाअट कर्ज मंजुरीबाबतचे पत्र 23 मार्च, 2018 पर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन करण्यात आहे. दि. 23 मार्च 2018 नंतर दाखला सादर करणाऱ्या अर्जदारांचा विचार लाभार्थी निवडताना करण्यात येणार नाही. याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
000000


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...