Monday, September 12, 2016

मतदार यादयांची विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण मोहीम
18 सप्टेंबर, 9 ऑक्टोंबर रोजी केंद्रावर बीएलओ उपस्थित राहणार  
नांदेड, दि. 12 :- भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर विधानसभा मतदार यादयाच्‍या विशेष पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचा कालावधी शुक्रवार 16 सप्‍टेंबर 2016 ते 14 ऑक्‍टोबर 2016 असा आहे. तर रविवार 18 सप्‍टेंबर व 9 ऑक्‍टोंबर 2016 रोजी विशेष मोहीम निश्‍चीत केली आहे. यादिवशी जिल्‍हयातील सर्व केंद्रावर बीएलओ उपस्थित राहून अर्ज स्‍वीकारतील. याचा सर्व मतदारांनी लाभ घ्‍यावा , असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी नांदेड यांनी केले आहे. दिनांक 1 जोनवारी 2017 रोजी ज्‍यांचे वयाची 18 वर्षे पूर्ण होणार आहेत अशा सर्व मतदारांनी सुध्‍दा नाव नोंदणीसाठी अर्ज करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.
            विशेष मोहिमेच्‍या तारखा व्यतिरिक्त  16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोंबर 2016 या कालावधीत जिल्‍हयातील सर्व तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्र व संबंधीत बीएलओ यांचेकडे अर्ज करता येतील. मतदारांनी अर्ज करताना आवश्‍यक ते पुरावे जोडूनच अर्ज करावेत. तसेच कुटूंबातील व्‍यक्‍तींनीच अर्ज जमा करावेत. त्रयस्थ व्‍यक्‍तीमार्फत गठ्ठयांनी अर्ज स्‍वीकरले जाणार नाहीत याची नोंद घ्‍यावी.
भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनाकांवर विधानसभा मतदारसंघाच्‍या मतदान यादयांच्‍या संक्षिप्‍त पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार यादीत नाव नोंदणी, नावात दुरुस्‍ती, आक्षेप नोंदविण्‍यासाठी 16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोबर 2016 हा कालावधी आयोगाने निश्‍चीत केला आहे. जिल्‍हयात सध्‍या मतदार संख्‍या 23 लाख 84 हजार 666 इतकी असून त्‍यापैकी पुरुष 12 लाख 43 हजार 586, स्त्री- 11 लाख 41 हजार 26 व  इतर- 54 मतदार आहेत.  
येत्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका
निवडणुकीस हीच यादी वापरण्‍याची शक्‍यता
            सन 2017 मध्‍ये जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुका प्रस्‍तावित आहेत. जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी विधानसभेची मतदार यादी वापरली जाते. त्‍यामुळे येत्‍या जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकासाठी दि. 1.1.2017 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी वापरली जाण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे सर्व मतदारांनी आपली नावे यादीत असल्‍याची खात्री करावी तसेच यादीत नावेही नोंदवावीत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी नांदेड यांनी केलेले आहे.
फोटो जमा करावेत
ज्‍या मतदारांचे यादीमध्‍ये फोटो नाहीत अशा मतदारांनी संबंधित बीएलओकडे फोटो जमा करावेत जेणे करुन त्‍यांना ओळखपत्र देण्‍यात येतील.
दुबार नावे वगळणे
मतदार यादीत एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नाव नोंदविणे बेकायदेशिर आहे. त्‍यामुळे ज्‍या मतदारांना यापुर्वी एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नोंदविली असतील त्‍यांनी एका ठिकाणावरुन नांव वगळण्‍यासाठी नमुना 7 मध्‍ये अर्ज सादर करावेत.

00000
दारु दुकाने आज बंद 
नांदेड दि. 12 :- नांदेड जिल्ह्यात मंगळवार 13 सप्टेंबर 2016 रोजी मुस्लीम बांधवाच्यावतीने मोठया प्रमाणात ईद उल अझहा (बकरी ईद) साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे या दरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुसूचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी यांनी ईद उल अझहा (बकरी ईद)  निमित्त नांदेड वाघाळा महानगरपालिका, जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालये, अन्य नगरपरिषद, नगरपालिका, नगर पंचायत हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-4 एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे.    

00000000
आयटीआय शिकाऊ उमेदवारांसाठी
भरती मेळाव्याचे गुरुवारी आयोजन  
नांदेड दि. 12 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे मारोती सुझुकी इंडिया लि. गुरगाव हरियाणा या कंपनीकडून गुरुवार 15 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10 वा. सभागृहात आयटीआय शिकाऊ उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षेसाठी भरती मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात जास्तीतजास्त उमेदवारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. आर. बुजाडे यांनी केले आहे.
आयटीआय पास व जुलै 2016 मध्ये परीक्षा दिलेले प्रशिक्षणार्थी व्यवसाय इलेक्ट्रीशीयन, जोडारी, मशिनिस्ट, मेकॅ. मोटार व्हेकल, टीडीएम, फॉउन्डीमॅन, मोल्डर, पेंटर ज., शिटमेटल वर्कर, टर्नर, वेल्डर, डिझल मेकॅ. डॉसमन मेकॅ. टॅक्टर मेकॅनिक या व्यवसायातील मुलांनी उपस्थित रहावे. स्टायफंड 8 हजार 776 रुपये महिना देण्यात येणार आहे. तसेच बोनस 2 हजार 600 रुपये मिळणार आहे, असे कंपनीच्या प्रतिनिधींने कळविले आहे. सोबत दहावी, आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व ओळखपत्र आणावे लागतील.

00000
जिल्हाधिकारी कार्यालयात
      बुधवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 12 :- जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार 14 सप्टेंबर 2016 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार 13 सप्टेंबर रोजी सुट्टी असल्याने लगतच्या दिवशी बुधवारी ही पेन्शन अदालत आयोजित केली आहे.
जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
जिल्हा परिषदेत बुधवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 12 - जिल्हा परिषदेअंतर्गत सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, शिक्षक तसेच आगामी 6 महिन्यात सेवानिवृत्त होणारे शिक्षक, कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन विषयक तक्रारी ऐकून घेणे, त्यावर कार्यवाही करण्यासाठी बुधवार 14 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत जिल्हा परिषद कॉन्फरन्स हॉल सामान्य प्रशासन विभाग येथे पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी या पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात येते. मात्र दुसऱ्या मंगळवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे बुधवार 14 सप्टेंबर रोजी संबंधितांनी पेन्शन अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

0000000
अल्‍पसंख्‍याक बहुल शासनमान्‍य शाळा, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, अपंग शाळेसाठी पायाभूत सोयी सुविधा
अनुदान योजना प्रस्ताव सादर करण्‍यास 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
नांदेड, दि. 12 "जिल्‍हयातील धार्मीक अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळांमध्‍ये पायाभूत सुविधा पुरविण्‍यासाठी अनुदान योजनेसाठी इच्‍छुक शाळांकडून अर्ज शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयात स्विकारले जातील. प्रस्‍ताव सादर करण्‍यासाठी शासन निर्णय व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्‍यात येणार नाही. याची संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष अल्‍पसंख्‍यांक विकास विभाग नांदेड यांनी केले आहे.
जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्‍त प्रस्‍तावांची छाननी, त्रुटींची पुर्तता करून अंतिमरित्‍या पात्र प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यापासून ते शनिवार 15 ऑक्टोंबर 2016 शासनास सादर करण्यात येणार आहे. सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी इच्‍छूक शाळांकडून अर्ज मागविण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्‍ताव सादर करण्‍याची यापुर्वी 8 ऑगस्ट व जिल्‍हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पात्र प्रस्‍ताव सादर करावयाची 31 ऑगस्ट पर्यंत मुदत विहित करण्‍यात आली होती.

000000
जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी
संवाद पर्व उपक्रम स्त्यूत्य - राहूल राऊत
नांदेड, दि. 12 :- सर्वसामान्य जनतेपर्यंत राज्य शासनाच्या विविध समाजोपयोगी व कल्याणकारी योजना पोहचविण्यासाठी संवाद पर्व हा उपक्रम निश्चित स्त्यूत्य आहे , असे प्रतिपादन नांदेडचे गटविकास अधिकारी राहूल राऊत यांनी गुंडेगाव येथे काल केले.
नांदेड तालुक्यातील गुंडेगाव येथे जिल्हा माहिती कार्यालय नांदेड व श्री साई गणेश मंडळ गुंडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद पर्व या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राऊत बोलत होते. यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष दासराव हंबर्डे, भुजंगराव हंबर्डे, दत्तराम पाटील कुरे, विस्तार अधिकारी दिलीप बच्चेवार, कृषि विभागाचे वसंत जारीकोटे व एन. जी. तुप्तेवार, मुख्याध्यापक आनंद ढेपे, ग्रामसेवक सी. एन. पुंड, गणेश मंडळाचे अध्यक्ष दिपक हंबर्डे, बळवंत घोगरे, संतोष कुरे आदी उपस्थित होते.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्याचा लाभ कसा घ्यावा याची माहिती तळागाळातील जनतेला नसते. संवाद पर्वच्या उपक्रमातून प्रशासकीय अधिकारी व जनतेशी संवादातून ही माहिती दिली जात आहे. म्हणून शासन आपल्या दारी ही संकल्पना संवाद पर्व उपक्रमाच्या माध्यमातून निश्चित साध्य होत आहे, असे सांगून श्री. राऊत यांनी सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती, मागासवर्गीय कामगार आदींसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देवून त्यासाठी पंचायत समितीच्यावतीने देण्यात येणारे अर्थसहाय्याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून गुंडेगावाचा सर्वांगिण विकास झाला आहे. हागणदारीमुक्त गाव, निर्मलग्राम, वृक्षलागवड, जलयुक्त, तंटामुक्ती सारखे विविध पुरस्कारही गावाने मिळवून आदर्श गाव म्हणून नावलौकीक मिळविलेला आहे. हे गावाच्या एकीच्या बळावर होवू शकले आहे, असे सांगून दासराव हंबर्डे यांनी संवाद पर्व या उपक्रमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला मिळाली आहे ही समाधानाची बाब आहे.
जलयुक्त शिवार योजने विषयी माहिती देताना कृषि विभागाचे वसंत जारीकोटे यांनी गुंडेगावने केलेल्या उत्कृष्ट कामांमुळे गावात जलक्रांती झाली आहे. शेतकऱ्यांनी पंतप्रधान कृषि सिंचन योजना, तुषार व ठिबक सिंचन योजना, फळबाग लागवड आदी कृषि विषयक योजनांची माहिती देवून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी संवाद पर्व या उपक्रमामागील हेतू विशद केला. छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर मुख्याध्यापक गुणाजी कपाळे यांनी सूत्रसंचलन केले. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                              

00000

लेख

फलोत्पादन अभियानातून खडकावर
जरबेराचे नंदनवन : कल्याणकर यांचे यश
महाराष्ट्र गेल्या तीन वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसत आहे. असे असतानाही मराठवाड्यातील नांदेड शहरालगत अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी गंगाराम किशनराव कल्याणकर यांनी अथक परिश्रम व नियोजनाने पाणी वापर करुन जरबेरा फुलांचे भरघोस उत्पन्न घेत दुष्काळावर मात केली आहे.
महादेव पिंपळगाव नांदेड शहरापासून जवळच आहे. गंगाराम किशनराव कल्याणकर यांची परिस्थिती अगदी जेमतेम. माळावर वडीलोपार्जीत खडकाळ जमीन केवळ चार एकर.. शिक्षणात फारसा रस नसल्याने वडीलांनी लहानपणीच चार म्हशी घेऊन दिल्या. तेंव्हापासून दुग्ध व्यवसाय सुरु केला. दुग्ध व्यवसायातून कसेबसे घर चालायचे. कालांतराने कुटुंब मोठे होत गेले. एकत्रीत कुटुंब असल्याने जबाबदाऱ्या वाढल्या. दुग्ध व्यवसायावर घर चालणे कठीण झाले. वडीलोपार्जीत जमीनीवर केवळ पारंपारीक पिकांमध्ये ज्वारी, कापूस, सोयाबीन घेतल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत गेली.  शेतीत काहीतरी विशेष करण्याची इच्छा होती. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कोणताच मार्ग सापडत नव्हता. कल्याणकर सांगतात "शासनाच्या योजनांची माहिती ऐकली आणि लगेच शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया नवा मोंढा येथील शाखाधिकाऱ्यांना भेटलो. परिस्थितीची सर्व माहिती सांगीतली. त्या अधिकाऱ्यानी योग्य मार्गदर्शन केले आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेतंर्गत 50 टक्के सबसीडीवर ग्रीन हाऊस उभारणीसाठी कर्ज देण्याचे मान्य केले. येथुनच नव्या प्रवासाला सुरुवात झाली.
या खडकाळ जमिनीवर 20 गुंठेवर ग्रीन हाऊस उभारुन त्यामध्ये खडक, लालमातीचा उपयोग करुन दिड बाय दोनचे वाफे तयार करण्यात आले. या वाफ्यांमध्ये जरबेरा फुलांची 19 हजार रोपे लावली. शेतातील बोअरला पाणी असल्याने पाण्याचे योग्य नियोजन केले. दहा हजार लिटरच्या सिंटेक्स टाकीचा वापर केला. रोपट्यांना खत, पाणी, औषध फवारण्यासाठी STP सेट बसविण्यात आला. ग्रीन हाऊस उभारणीसाठी व रोपटे व्यवस्थापनासाठी पुणे येथील के. एफ. बायोप्लँट कंपनीचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात आले. 19 हजार रोपटयांपासून दररोज 2 हजार फुलांची तोडणी होत आहे.
ही फुले नांदेड, हैद्राबाद, औरंगाबाद, मुंबई या बाजारपेठेत पाठविली जातात. या फुलांची काढणी, पॅकींग, आणि ग्रीन हाऊस देखभाल (व्यवस्थापन) यासाठी दहा मजूर आहेत. फुलांना बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने दर महिन्याला तीन लाखाचे उत्पन्न मिळते. दोन महिन्यात खर्च वजा जाता सहा लाखाचे उत्पन्न मिळाले आहे असे श्री. कल्याणकर यांनी सांगीतले.
सध्या फुलांचे उत्पादन चांगले असून बाजारभाव चांगला राहील्यास वर्षभरात 70 ते 75 लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. बँकेने मंजूर केलेल्या कर्जाचे काही हप्त्याची परतफेड झाली आहे. आणखी एक नवीन ग्रीन हाऊस प्रस्तावित असून त्यामध्ये मिरची लागवड करणार आहे. शेतात एका कोपऱ्यातून ग्रीन हाऊस करीता खडक व लाल मातीचे खोदकाम केल्यामुळे मोठा खड्डा तयार झाला असून त्याचा उपयोग शेततळयासारखा करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे यामध्ये पाणी साठले आहे. त्यामुळे जलस्तर पाणी पातळी वाढली आहे.
जेमतेम चौथी पर्यंत शिकलेले श्री. कल्याणकर यांना जरबेरा फुलशेतीची माहिती व प्रशिक्षण देण्याकरीता पुणे, मुंबई, नागपूर येथे बोलावले जाते. पारंपारिक शेतीला बाजूला सारुन नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन केवळ 20 गुंठे शेतात वर्षाकाठी 70 ते 75 लाखाचे उत्पन्न घेऊन , खडकावर नंदनवन फुलवणारे  गंगाराम कल्याणकर अशी ओळख निर्माण झाली आहे. नोकरी करण्यापेक्षा ज्यांना शेती आहे त्यांनी आधुनिक पध्दतीने शेती करावी, कृषी विद्यापीठातून नवनवीन पिकांची, शेती औजारांची माहिती घ्यावी. तरुणांनी शेतीकडे वळावे. कृषी विभागाच्या सहाय्याने शेती विकास केल्यास निश्चितच बेरोजगारीचा प्रश्न सुटेल , महाराष्ट्राचा शेतकरी सधन होईल. त्यामुळे महाराष्ट्राचा नक्कीच कायापालट होण्यास वेळ लागणार नाही अशी अपेक्षाही श्री. कल्याणकर व्यक्त करतात.  
-         आर. पी. सोनकांबळे   
9422174142
  (लेखक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आंतरवासिता करीत आहेत)

0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...