Friday, July 1, 2022

नांदेड जिल्ह्यात 10 व्यक्ती कोरोना बाधित 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  226 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 9 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 10 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा 3, नांदेड ग्रामीण 1, मुदखेड 2, देगलूर 1, हिमायतनगर 1, लातूर 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे हदगाव तालुक्याअंतर्गत 1 बाधित आढळला आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 4 बाधितांना उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 903 एवढी झाली असून यातील 1 लाख 160 बाधितांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.   

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 42, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरणात 6 असे एकुण 51 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती. 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 8 हजार 250

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 88 हजार 20

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 903

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 160

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-51

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 0000

 

 शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 1 :- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या सर्व शासकीय वसतिगृहात या शौक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याबाबतची प्रक्रिया सुरु झालेली आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

 

इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या तसेच इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या व पदवी  प्रथम वर्षात व पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्रवेशोत्सूक विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरून द्यावेत. इयत्ता 8 वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार 15 जुलै तर इयत्ता 10 वी व 11 वी साठी शनिवार 30 जुलै पर्यंत प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रवेश अर्ज भरुन सादर करावे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही समाज कल्याण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

 आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण  

नांदेड (जिमाका) दि. 1 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात येत्या 1 ऑगस्ट 2022 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेण्यात येते. पात्र इच्छूक आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांनी बुधवार 27 जुलै 2022 पर्यंत शैक्षणीक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे. 

 

आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणाऱ्या 103 च्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी 27 जुलै 2022 तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचीत जमातीचे ) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी या पत्त्यावर आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पेटकुले नगर, गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड संपर्क दुरध्वनी क्रमांक 02469-221801/ 9881524643 / 7620304096 संपर्क करावा, असेही कळविले आहे. 

 

या प्रवेशाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उतीर्ण आसावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: रहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महीने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय 31 जुलै 2022 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधित प्रशिक्षणार्थीचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थींचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड (जिमाका) दि. 1 :- नांदेड जिल्ह्यात रविवार 3 जुलै  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 17 जुलै 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात रविवार 3 जुलै 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 17 जुलै  2022 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

000000

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 4 जुलै 2022 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.

 

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

 

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.

 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 शेतकऱ्यांबद्दल प्रत्ये‍क विद्यार्थ्यांच्या मनात

स्वाभिमान निर्माण करू 

-   मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 

कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत शेतीचा जागर

विष्णुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रातिनिधीक शुभारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- शेती-शेतकरी आणि खेड्यांशी असलेली बांधिलकी जिल्हा परिषदेच्या शाळांनी अधिक जबाबदारीने जपली. शाळेतील प्रयोगशील शिक्षकांनी आणि जागरूक पालक समित्यांनी याला एक वेगळा आयाम दिला आहे. एकेकाळी जिल्हा परिषदांच्या शाळांकडे केवळ गुणात्मक पातळीवर पाहिले जायचे. हा गुणात्मक दृष्टिकोण जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक सजग व डोळस करून दाखविल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काढली.

 

नांदेड जवळील विष्णुपूरी येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांची जयंती व कृषि दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रेरक डॉ. कल्पना मेहता, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास देशमुख, सचिव साहेबराव हंबर्डे, काळेश्वर ट्रस्टचे शंकरराव हंबर्डे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, मुख्याध्यापक एन. एन. दिग्रसकर व मान्यवर उपस्थित होते.

 

नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत जवळपास 8 हजार 599 शिक्षक आहेत. जिल्हा परिषदेच्या एकुण शाळा 2 हजार 195 शाळा आहेत. जवळपास 2 लाख 10 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खाजगी शाळांसह शिक्षकांची संख्या 3 हजार 739 तर या विद्यार्थ्यांसह एकुण 6 लाख 35 हजार एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या मनात शेतीविषयी आवड निर्माण केली तर त्यांच्या नजरेत शेतकरी घेत असलेले कष्ट सहज उजळून निघतील. शेतीच्या श्रमाला त्यांच्या मनातही प्रतिष्ठा निर्माण होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.

 

शालेय विद्यार्थ्यांच्या मनात शेतीविषयी एक उदासिनता निर्माण झालेली आहे, हे सत्य नाकारता येत नाही. फार कमी मुले शेतकरी व्हावायचे आहे, अशी मनिषा व्यक्त करताना दिसतात. याबद्दल मुलांनाही दोष देता येणार नाही. परंतू त्यांचे कसब व त्यांच्या मनात उच्च तंत्रज्ञानाप्रती असलेली ओड लक्षात घेऊन कृषि क्षेत्राला उच्च तंत्रज्ञानाची जोड दिली तर ही नवी पिढीही तेवढ्याच कौशल्याने शेतीशी जुळल्या जाईल. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासमवेत म्हणूनच कृषि शिक्षणाची जोड देणे आवश्यक आहे. एकप्रकारची ही पेरणीच असून मुलांकडे बियाणांच्या रूपात पाहून तसे संस्कार त्यांच्यावर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

आजच्या कृषि दिनानिमित्त जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये शेती व शेतकऱ्यांविषयी आवश्यक ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी माझी शेती माझा अभिमान ही मोहिम एक सुरूवात असून वर्षेभर आम्ही हा उपक्रम सुरू राहिल. प्रत्येक शाळांच्या पालक समित्या, शिक्षक हा वसा पुढे नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करून मुलांना शुभेच्छा दिल्या.        

 

वर्षा ठाकूर-घुगे यांनी विद्यार्थ्यांचा शेतीवर घेतला तास

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी विष्णुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दहावी क मधील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत कृषि विषयाबाबत एक तास घेतला. तुम्ही केवळ विद्यार्थी नाहीत तर देशाची प्रेरणा आहात. आपले आई-वडील ग्रामीण भागातले आहेत. त्यांना शेतीच्या कामामध्ये आपण मदत करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. यातूनच कामाप्रती आपल्या मनात प्रतिष्ठा निर्माण होते. सातत्य, परिश्रम, आणि अभ्यास याची योग्य जोड आपल्या लावता आली पाहिजे. आपला सभोवताल प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. यातूनच प्रत्येकाला आपले ध्येय गाठता येईल, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्राबाबत प्रातिनिधीक प्रश्न उपस्थित केले.

00000 




  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...