Thursday, August 31, 2017

लोकशाही दिनाचे 4 सप्टेंबर रोजी आयोजन
नांदेड, दि. 31 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकू घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्‍यात येतो. त्यानुसार सोमवार 4 सप्टेंबर 2017 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्‍याचे व न स्विकारण्‍याबाबतच्‍या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्‍यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्‍यात येणार नाहीत. त्‍यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
यादिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास  सुरुवात करण्यात येईल.  
न्यायप्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील  महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल , असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000

Wednesday, August 30, 2017

बालक, गरोदर मातांसाठी लसीकरणाची
जिल्हात विशेष मोहिम राबविण्यात येणार  
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 30 :- लसीपासून वंचित 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना आजारापासून संरक्षीत करण्यासाठी "इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य" ही विशेष मोहिम ऑक्टोंबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
           
जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात "इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य" सन 2017 समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली काल संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) एस. व्ही. शिंगणे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. नितीन बोडके, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम इंगळे, डॉ. अमोल गायकवाड, श्री. प्रमीत वाघमारे, समितीचे सदस्य, आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, ही मोहिम यशस्वी करण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यात ग्रामपातळीपासून ते महानगरपालिकेपर्यंत आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी, लिंक वर्कर यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन असंरक्षीत बालके व गरोदर माता यांच्या याद्या तयार करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या भागात असरंक्षीत लाभार्थी जास्त आहेत त्या भागात ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2017 या महिन्यात 7 ते 14 तारखेला व जानेवारी 2018 या महिन्यात 8 ते 15 तारखेपर्यंत  जिल्ह्यात  "इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य" मिशन राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरुन जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक व तालुकास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक जिल्ह्यातील लसीकरणाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी व पर्यवेक्षण करणार आहेत. लसीकरणासाठी लसीचा पुरेशा साठा जिल्हास्तरावर वरिष्ठ कार्यालयामार्फत प्राप्त होणार असून सर्व संस्थांना लस पुरवठा जिल्हास्तरावरुन करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांचे आई-वडील, पालक, शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, खासगी वैद्यकीय व्यवसायीक व सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांचे या मोहिमेत योगदान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात असंरक्षीत मात व बालकांना त्यांच्या वयोगटानुसार लसीकरण करुन या मोहिमेत लसीकरणाद्वारे जिल्ह्यामध्ये 90 टक्केच्यावर लाभार्थ्यांना संरक्षीत करण्यात येणार आहे. म्हणुन या मोहिमेस सर्वांनी सक्रीय सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. डोंगरे यांनी केले आहे.
            जिल्ह्यात लसीकरणाचे काम कमी असणारे भाग, जोखीमग्रस्त भाग (घटसर्प, गोवर, धनुर्वात, उद्रेक झालेला भाग) अतिदुग्रम भाग, डोंगराळ भाग, सलग तीन सत्रे रद्द झालेले गावे , विभाग, ए.एन.एम.ची पदे रिक्त असलेल्या उपकेंद्रांची गावे, शहरी भागातील झोपडपट्टी, पल्स पोलीओ कार्यक्रमात असलेले जोखीमग्रस्त भाग, विटभट्टी, बांधकामे, स्थलांतरीत वस्त्या, ऊस तोडणी वस्त्या, इतर (पेरिअर्बन एरिया) या भागामध्ये ही मोहिम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. शुन्य ते 2 वर्ष वयोगटातील बालकांना बी.सी.जी., पोलीओ, आय.पी.व्ही., इंजे. पेंटाव्हॅलेंट, डी.पी.टी. व गोवर या लसी, अ जीवनसत्वाच्या मात्रा तसेच गरोदर मातांना धनुर्वाताची मात्रा व लोहाच्या गोळ्या देण्यात येणार आहेत. तसेच बालकांना क्षयरोग, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, मेंदुज्वर, कावीळ या आजारासाठी रोग प्रतिबंधक लसी देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
            यावेळी नांदेड जिल्ह्यात "इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य" ही मोहिम राबविण्यासंबंधी सादरीकरणातून माहिती  देण्यात आली.

000000

Tuesday, August 29, 2017

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दौरा रद्द   
नांदेड दि. 29 :- मुंबईमध्ये सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहतुक व्यवस्थेअभावी राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दि. 29 व 30 ऑगस्ट 2017 रोजीचा पुर्वनियोजित नांदेड जिल्हा दौरा रद्द झालेला आहे.    

00000
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सुधारीत दौरा
नांदेड दि. 29 :- राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 30 ऑगस्ट 2017 रोजी मुंबई येथुन देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन मोटारीने सगरोळी ता. बिलोलीकडे प्रयाण. सकाळी 11 वा. शेतकरी कंपनीच्या बीज प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन स्थळ कृषि विज्ञान केंद्र शारदानगर सगरोळी. सकाळी 11.30 वा. "संकल्प ते सिद्धी" कार्यक्रम व शेतकरी कर्जमाफी अर्ज भरणे मेळावा. स्थळ कृषि विज्ञान केंद्र शारदानगर सगरोळी. दुपारी 2 वा. श्रमदानातून शौचालय बांधणी कार्यक्रम. स्थळ- कासराळी ता. बिलोली. दुपारी 2.30 वा. सगरोळी येथुन मोटारीने नायगावकडे प्रयाण. दुपारी 3 वा. शेतकरी कर्जमाफी अर्ज भरणे मेळावा व पीक परिस्थिती आढावा बैठक (कृषि, पणन व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) स्थळ- तहसिल कार्यालय नायगाव बा. दुपारी 4.30 वा. नायगाव बा. येथुन मोटारीने नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं. 6 वा. देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000
 जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 13.11 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 52.45 टक्के पाऊस
           नांदेड, दि. 29 :- जिल्ह्यात मंगळवार 29 ऑगस्ट 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 13.11 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्‍ह्यात  दिवसभरात एकुण 209.83  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 501.19 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी नुसार आतापर्यंत 52.45 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मंगळवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय पुढील प्रमाणे असून  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 12.25 (755.02), मुदखेड- 20.33 (705.84), अर्धापूर- 26.67 (613.00), भोकर- 12.75 (516.25), उमरी- 13.67 (503.67), कंधार- 10.67 (488.85), लोहा- 5.00 (511.16), किनवट- 20.00 (473.43), माहूर- 18.50 (396.40), हदगाव- 9.86 (525.61), हिमायतनगर- 6.00 (373.49), देगलूर- 9.67 (312.32), बिलोली- 13.40 (453.00), धर्माबाद- 9.00 (461.33), नायगाव- 15.20 (466.06), मुखेड- 6.86 (463.57) आज अखेर पावसाची सरासरी 501.19 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 8019.00) मिलीमीटर आहे.

00000 
नोंदणीकृत मदरसांना पायाभुत सुविधा,
विषय शिक्षकांच्‍या वेतनासाठी अनुदान  
अर्ज करण्याची 18 सप्टेंबर पर्यंत मुदत   
नांदेड, दि. 29 :-  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा आणि विषय शिक्षकांच्‍या वेतनासाठी सहाय्यक अनुदान 2017-18 साठी ज्‍या मदरशांमध्‍ये फक्‍त पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्‍यात येत आहे आणि ज्‍यांना आधुनिक शिक्षणासाठी  शास‍कीय अनुदान घेण्‍याची इच्‍छा आहे अशा मदरशांकडून राज्य अल्‍पसंख्‍याक विकास विभागाने अर्ज मागविले आहेत. इच्‍छुक मदरशांनी विहित नमुन्‍यातील परिपुर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रासह सोमवार 18 सप्टेंबर 2017 पर्यंत जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष उच्‍चस्‍तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे.  
मदरसाची धर्मदाय आयुक्‍त अथवा महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाकडे नोंदणी आवश्यक आहे. अर्जाचा नमुना, आवश्‍यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहेत. शासन निर्णयाच्‍या तरतुदीनुसार पुढील बाबींसाठी विहित नमुन्‍यात अर्ज करता येतील. विज्ञान, गणित, समाजशास्‍त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्‍यासाठी शिक्षकांना मानधन देणे. पायाभूत सुविधासाठी व ग्रंथालयासाठी अनुदान आणि मदरशांमध्‍ये शिकणा-या विद्यार्थ्‍यांसाठी शिष्‍यवृत्ती. शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 च्‍या तरतुदीनुसार जास्‍तीतजास्‍त तीन डी. एड / बी. एड शिक्षकांना मानधन देण्‍यात येईल. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू यापैकी एका माध्‍यमाची निवड करून त्‍यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे. ग्रंथालयासाठी तसेच शैक्षणिक साहित्‍यासाठी एकदाच 50 हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत सुविधासाठी 2 लाख रुपये अनुदान देय आहे. यामध्‍ये मदरशांच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, पेय जलाची व्यवस्था करणे, प्रसाधन गृह उभारणे व त्‍याची डागडुजी करणे, विद्यार्थ्‍यांसाठी आवश्‍यक फर्निचर, मदरसाच्‍या निवासस्‍थानात इन्‍वहर्टरची सुविधा उपलब्‍ध करणे, मदारसांच्‍या निवासी इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, संगणक, हार्डवेअर, सॉफटवेअर, प्रिंटर्स इत्यादी व प्रयोगशाळेचे साहित्‍य. यासाठी किमान 3 वर्षापूर्वी नोंदणी केलेल्‍या व अल्‍पसंख्‍याक बहुल मदरशांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. ज्‍या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्‍कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राहय धरले जाणार नाहीत, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

00000
अल्‍पसंख्‍याक बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय,
औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, अपंग शाळेसाठी पायाभुत सोयी सुविधा अनुदान योजना
नांदेड दि. 29 :- जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळा  यांच्यासाठी पायाभूत सोयी सुविधा योजनेकरीता परिपुर्ण अर्ज जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सोमवार 18 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर  करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष उच्‍चस्‍तरीय निवड समिती नांदेड यांनी केले आहे. 
शासन निर्णय 7 ऑक्टोंबर 2015 व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांच्‍याकडून शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व नगरपालिका, नगरपरिषद शाळामध्‍ये अल्‍पसंख्‍याक समाजाचे (मुस्लिम, बौध्‍द, ख्रिश्चन, जैन, शिख, व पारसी मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. पायाभूत सोयी सुविधा अनुदान योजनेंतर्गत कमाल 2 लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्‍यासाठी विहीत नमुन्‍यात अर्ज मागविण्‍यात येत आहे.
शासन मान्‍यताप्राप्‍त अपंगाच्‍या शाळांमध्‍ये किमान 50 टक्के अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. या योजनेंतर्गत पुढील पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे. शाळेच्‍या इमारतींचे नुतनीकरण व डागडूजी. ग्रंथालय अद्ययावत करणे. संगणक कक्ष उभारणे/अद्यावत करणे. शैक्षणिक कार्यासाठी आवश्‍यक फिर्निचर. इन्‍व्‍हर्टरची सुविधा निर्माण करणे. अध्‍ययनाची साधने (Learning Material)/ एल.सी.डी.प्रोजेक्‍टर अध्‍ययनासाठी लागणारे विविध  सॉफटवेअर, इत्‍यादी. इंग्रजी लॅग्‍वेज लॅब. शुध्‍द पेयजलाची व्‍यवस्‍था करणे. प्रयोगशाळा उभारणे / अद्यावत करणे. प्रसाधनगृह / स्‍वच्‍छतागृह उभारणे / डागडूजी करणे. झेरॉक्‍स मशीन. संगणक हार्डवेअर / सॉफटवेअर. या योजनेंतर्गत यापूर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्‍या शाळा, संस्‍था यावर्षी अनुदानासाठी पात्र  असणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राह धरले जाणार नाहीत.

0000000
दहावी परीक्षेचा निकाल जाहीर  
नांदेड, दि. 29 :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय मंडळामार्फत 18 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 या कालावधीत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी कळविले आहे.

निकालाची कार्यपद्धती व कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे दिला आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर विषयनिहाय गुण उपलब्ध करुन दिला असून त्याची प्रिंट घेता येईल. परीक्षार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप संबंधीत माध्यमिक शाळेमार्फत करण्यात येणार आहे. त्याची तारीख स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी विहित नमुन्यात व शुल्कासह 8 सप्टेंबर 2017 पर्यंत विभागीय मंडळाकडे अर्ज करावीत. अर्जासोबत ऑनलाईन निकालाचे गुणपत्रक जोडणे अनिवार्य राहील. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसात पुनर्मुल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात, विहित शुल्क भरुन संबंधीत विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधीक महितीसाठी संबंधीत माध्यमिक शाळा, विभागीय मंडळाकडे संपर्क करावा. मार्च 2018 मधील दहावी परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ व्हावयाचे आहे अशा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ होणारे, अन्य विद्यार्थ्यांची अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारली जातील. त्याचा तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येतील. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत परीक्षेस पुन:श्च प्रविष्ठ होण्याची संधी सन 2008 पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार जुलै-ऑगस्ट 2017 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीच्या अधीन देय संधी उपलब्ध राहील, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 
शहरात भव्य महाअवयवदान जनजागृती रॅली संपन्न
 सर्वांना अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 29 :- वैद्यकीय संचालनालय, आयुष संचालनालय व शासकीय आरोग्य विभागाच्यावतीने नांदेड शहरात भव्य महाअवयवदान जनजागृती रॅली आज काढण्यात आली. या रॅलीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी हिरवा झेंडा दाखून शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयापासून शुभारंभ केला.
यावेळी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्यामकुंवर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, डॉ. हंसराज वैद्य, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुरेश कदम, एमएमसीचे सदस्य डॉ. संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.  


या रॅलीचा शिवाजीनगर, महात्मा फुले पुतळा मार्गे डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे समारोप झाला. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी "अवयव दान अमुल्य दान", "मृत्युला रोखण्याची ताकद तुमच्या श्रेष्ठ दानात आहे" "असहाय्य रुग्णांना द्या जीवनाची अमुल्य भेट",  "अवयवदान करु या, समाधान सन्मान मिळू या", "अवयवदान करा आणि इतरांचे जीवन वाचवा", "कोणत्याही धर्माचा माणुस कोणासाठीही अवयवदान करु शकतो", "मरावे परी अवयवरुपी उरावे" असे फलक हातात घेऊन उत्साहात घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधत होते. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी रॅलीत अवयवदान सर्वश्रेष्ठ दान असल्याचे पथनाट्याद्वारे बोलीभाषेतून नागरिकांना माहितीचे सादरीकरण केले.  
डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. म्हस्के म्हणाले की , अवयवदान चळवळ पुढे नेण्यासाठी तरुणाचा मोठा सहभाग असला पाहिजे. राज्यात मराठवाडा विभाग अवदानात अग्रस्थानी आहे. अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया नांदेडनी दोनवेळेस यशस्वी करुन दाखविली आहे. राज्यात हा उपक्रम चांगला राबवण्यात येत असून सर्वांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र अवयवदानात एका वर्षात देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. यावर्षी पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी तसेच अवयवदानाची मोठी गरज ओळखून सर्वांनी अवयवदानाची संकल्प करुन अवयदानाचे जास्तीतजास्त संमतीपत्र भरुन दयावीत, असे आवाहन त्यांनी केले.  
यावेळी अधिष्ठाता डॉ. श्यामकुंवर यांनी शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाकडून जिल्ह्यातील 33 महाविद्यालयात अवयवदानाविषयी प्रबोधनात्क कार्यक्रमातून जनजागृती करण्यात आले असे सांगितले. तर डॉ. सुरेश कदम यांनी रुग्णांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, अवयवदानाला महत्व आहे. ग्रामीण जनतेतही अवयवदानाविषयी जनजागृती प्राधान्याने करणे आवश्यक आहे असे सांगितले. डॉ. संजय कदम यांनी अवयदानाची व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे. अवयवदानाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत, माणसापर्यंत पोहचला पाहिजे यासाठी स्वयंसेवी संस्था, विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभागी होणे आवश्यक आहे, असे सांगितले.   
प्रास्ताविकात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गुंटूरकर म्हणाले, अवयवदानाच्या प्रतिक्षा यादीवरील रुग्णांना अवयवाची मोठी गरज आहे. अवयवदानाचे महत्व सर्वांनी ओळखून नातेवाईक, मित्रांना संमतीपत्र भरुन देण्याचे सांगावे, असेही आवाहन केले.  
कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनचे प्रमुख डॉ. राजेंद्र अमीलकंठवार, वैद्यकीय अधीक्षक वाय. एच. चव्हाण, प्रशासन अधिकारी र. ह. चंचलवार, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधीक्षक सुरजितसिंघ तबेलेवाले, वैद्यकीय अधिकारी, रोटरी क्लब, लायन्स क्लबचे पदाधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, यांची उपस्थिती होती. सुरुवातील मान्यवरांनी सरस्वती पुजन व धन्वंतरी स्तवन केले. यावेळी डॉ. संतोष शिरशीकर यांनी उपस्थितांना अवयवदानाची प्रतिज्ञा दिली तसेच अवयवदानाचे संमतीपत्र वाटप करुन भरुन घेण्यात आलीत. सुत्रसंचलन संतोष शिरशीकर यांनी तर आभार डॉ. हजारी यांनी मानले.  

00000

Monday, August 28, 2017

कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज
भरण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत  
नांदेड, दि. 28 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत 30 जुन 2016 रोजी थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना निकषाच्या अधीन राहून सरसकट कर्जमाफी व प्रोत्साहनपर इतर लाभ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज शुक्रवार 15 सप्टेंबर 2017 पर्यंत सुविधा केंद्रावर भरण्याचे आवाहन, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.  
जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार, महाऑनलाईन किंवा सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावीत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांने सुविधा केंद्रावर जातांना सोबत आधारकार्ड, आधार नोंदणी क्रमांक (EID) केल्याबाबतची पोच, कर्जखाते पुस्तिका / उतारा व बचत खाते पुस्तिका, पॅनकार्ड (असल्यास), आधारकार्ड, पॅनकार्ड, पेन्शन पीपीओ बुक, बँकेचे पासबुक याची छायांकीत प्रत, फोटो कॉपी घेऊन जाणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा नि:शुल्क आहे. ऑनलाईन अर्जाचे फार्म आपले सरकार, महाऑनलाईन किंवा सीएससी केंद्रावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये, तालुक्याचे उप / सहायक निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयात उपलब्ध करून दिले आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्याही कारणाशिवाय केंद्र चालकांकडून रक्कम मागितली जाणार नाही. शेतकऱ्यांकडून या योजनेत अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या केंद्रावर सर्व पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर, 2017 पर्यंत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमाफी व कर्ज प्रोत्साहन अनुदान योजना 28 जु 2017 चे शासन निर्णयान्वये जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी 1 एप्रिल 2009  रोजी व त्यानंतर  पीक कर्ज  घेतलेल्या व अशा कर्जापैकी  30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना पुढील निकषाच्या अधीन राहून  सरसकट कर्जमाफी व प्रोत्साहनपर इतर लाभ देण्यात येणार आहेत.
दिनांक 30 जून 2016 रोजी थकीत असलेले मुद्दल व व्याजासह 1 लाख 50 हजार रुपये र्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. मुद्दल व व्याजासह 1 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (One Time Settlement) म्हणून दि. 30 जून 2016 रोजी थकबाकीपैकी शासनातर्फे 1 लाख 50 हजार रक्कमेचा लाभ देण्यात यावा. या योजनेअंतर्गत  पात्र शेतकऱ्यांनी त्याच्या हिश्याची संपुर्ण रक्कम बँकेत जमा केल्यावर शासनातर्फे 1 लाख 50 हजार रुपये लाभाची रक्कम शेतकऱ्यांना आदा करण्यात येणार आहे. सन 2015-16 या वर्षात पीक कर्जाची 30 जुन 2016 रोजी परतफेड केल्यास शेतकऱ्यांनी सन 2016-17 वर्षात घेतलेल्या कर्जाची रक्कम दि. 31 जुलै 2017 पर्यंत पुर्णतपरतफेड केलेल्या पीक कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये पर्यंत जी कमी असेल ती रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मात्र ही रक्कम किमान 15 हजार रुपये असेल. तथापी, शेतकऱ्यांनी परतफेड केलेली रक्कम 15 हजार रुपये पेक्षा कमी असल्यास अशी संपुर्ण रक्कम शेतकऱ्यांना शासनामार्फत आदा करण्यात येईल. सन 2009-10 ते 2015-16 या कालावधीत कर्जाचे पुर्नगठन केलेल्या शेतकऱ्यापैकी जे शेतकरी दि. 30 जुन 2016 रोजी थकबाकीदार असतील त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. तथापि  जे थकित नाहीत त्यांना 25 हजार रुपये रक्कम शासनामार्फत अदा करण्यात येईल.

000000
वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यातील शासकीय सेवकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यासाठी 6 ते 8 सप्टेंबर या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे वेतन पडताळणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची दि. 1 जानेवारी 2016 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे. 
वेतन पडताळणी  पथकाचा माहे सप्टेंबर 2017 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे. हे पथक मंगळवार 5 सप्टेंबर 2017 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व बुधवार 6 सप्टेंबर ते शुक्रवार 8 सप्टेंबर 2017 काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे पथक या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील.

0000000
परिवहन संवर्गातील वाहन योग्यता
प्रमाणपत्रासाठी आरटीओचे आवाहन
            नांदेड, दि. 28 :- परिवहन संवर्गातील सर्व वाहनाचे 1 सप्टेंबर पासून योग्यता प्रमाणपत्र संगणकीकृत वाहन 4.0 वर करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी वाहनाचे सर्व वैध कागदपत्रे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे किमान सात दिवस अगोदर सादर करावीत. वाहन तपासणीसाठीची नियोजीत वेळ घेतल्यास वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतीनकरण करण्यात येईल, असे आहवान प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

Saturday, August 26, 2017

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 26  :- जिल्ह्यात रविवार 10 सप्टेंबर 2017 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनाची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात रविवार 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
000000


अवयवदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी
संमतीपत्र भरुन देण्याचे आवाहन
मंगळवारी शोभायात्रेचे आयोजन
नांदेड दि. 26 :- राष्ट्रीय पातळीवर अवयवदान अभियानाचे 25 ते 30 ऑगस्ट या कालावधीत जनजागरण आयोजन करण्यात आले आहे. अवयवदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वांनी अवयावदानाचे संमतीपत्र भरुन दयावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासोबत मंगळवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ते डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहापर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी केले आहे.
अवयवदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी वयाच्या 5 व्या वर्षापासून शंभराव्या वर्षापर्यंत स्त्री-पुरुष अवयावदानाचे संमतीपत्र भरुन अवयवदान करु शकतात. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे जवळपास 8 ते 9 लोकांचे जीवन सुकर व आनंदी होते. त्यामध्ये हृदय, फुफुस, यकृत, स्वादुपिंड, डोळे, मुत्रपिंड, हाडे, त्वचा इत्यादी अवयवाचे दान करता येते. आपण जे निधनानंतर अमुल्य अवयव नष्ट करुन टाकतो.
अवयवदान  जीवनाच्या तीन वेगवेगळ्या टप्प्यात किंवा पायरीत करता येतात. व्यक्तीच्या मृतनंतर 6 तासाच्या आत डोळ्याचे, हाडाचे आणि त्वचेचे अवयवदान करता येते. जीवंतपणी स्वतः रक्ताच्या नातेवाईकास एक मुत्रपिंड, फुफुस, यकृताचा तुकडा इत्यादी दान करु शकतात. मेंदू मृत झाल्यावर हे रुग्ण अत्यावश्यक अतिदक्षता विभागात असतात त्यांचा मेंदू मृत आसतो आणि इतर सर्व अवयव हे चांगल्या स्वरुपात कार्यरत असतात. त्यामुळे ते अवयव इतर रुग्णांना दानाच्या स्वरुपात देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची संमती लागते. जे रुग्ण प्रतिक्षा यादीवर आहेत ज्यांना अवयावदानाची अती निकड आहे तसेच त्यांच्या आजाराचे स्वरूप इत्यादी बाबींची तपासणी करुनच त्यांना ते अवयव मोफत देण्याची शिफारस अवयव प्रत्यारोपण समिती करते.
अवयवदान झाल्यावर संबंधीत अवयवाचे नियोजीत ठिकाणी हवाई मार्गाने अथवा रेल्वेने घेऊन जाऊन त्या अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते. यासाठी ग्रीन कॉरीडोअर निर्माण करावा लागतो. त्यासाठी जिल्हा पोलीस, जिल्हाधिकारी व वाहतूक विभागाचे सहकार्य लागते. कमीतकमी वेळात हे अवयव ज्या रुग्णांना प्रत्यारोपित करावयाचे आहे त्यांच्या पर्यंत पोहोचणे गरजेचे आसते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गुंटूरकर यांनी दिली आहे.

00000
जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 17.47 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 48.61 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यात शनिवार 26 ऑगस्ट 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 17.47 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्‍ह्यात  दिवसभरात एकुण 279.56  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 464.49 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात शनिवार 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय पुढील प्रमाणे असून  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 9.00 (713.14), मुदखेड- 25.67 (638.84), अर्धापूर- 11.33 (524.33), भोकर- 2.00 (477.50), उमरी- 42.33 (462.00), कंधार- 24.67 (461.18), लोहा- 27.00 (493.66), किनवट- 13.86 (436.72), माहूर- 9.50 (371.15), हदगाव- 6.00 (481.18), हिमायतनगर- 2.00 (357.82), देगलूर- 23.33 (285.99), बिलोली- 16.00 (419.40), धर्माबाद- 22.67 (446.33), नायगाव- 19.20 (427.86), मुखेड- 25.00 (434.71) आज अखेर पावसाची सरासरी 464.49 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 7431.81) मिलीमीटर आहे.

जिल्ह्यात वार्षिक सरासरी नुसार आतापर्यंत 48.61 टक्के एवढा पाऊस झाला आहे. तालुकानिहाय झालेला टक्केवारीत पाऊस पुढीलप्रमाणे. नांदेड 78.20 टक्के, मुदखेड- 74.84, अर्धापुर- 60.30, लोहा- 59.24, कंधार- 57.18, हदगाव- 49.24, मुखेड- 49.02, धर्माबाद- 48.75, भोकर- 47.92, नायगाव- 46.73, उमरी- 46.37, बिलोली- 43.32, हिमायतनगर- 36.61, किनवट- 35.22, देगलूर- 31.77,माहूर- 29.93 टक्के आहे.      
स्वच्छता पुरस्कारासाठी प्रस्ताव
सादर करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 26 :- नेहरु युवा केंद्राशी संलग्न असणाऱ्या ग्रामीण भागातील युवा मंडळ संस्था, महिला मंडळानी तालुकास्तरीय स्वच्छता पुरस्कारासाठी 18 सप्टेंबर पर्यंत विहित नमुन्यात प्रस्ताव नेहरु युवा केंद्र मालेगाव रोड नांदेड येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र नांदेड यांनी केले आहे.
सन 2016-17 चा प्रस्ताव सादर करताना पाणी पुरवठा, विहीर, परीसर स्वच्छता, गाळ काढणे, नदीकाठ स्वच्छता, गवत, जलपर्णी काढणे, वृक्षारोपण, वृक्षसंगोपन तत्सम कामे, स्वच्छता रंगरंगोटी, ग्रामस्वच्छता, मैदान स्वच्छ करणे, पाणी अडविण्यासाठी बंधारे, शोषखड्डे, शौचालय बांधकामास प्रोत्साहन देणे अशी कामे करणाऱ्या पात्र युवा मंडळ संस्था व महिला मंडळांना हा पुरस्कार देण्यात येतो.
पुरस्काराचे स्वरुप प्रथम पुरस्कार 8 हजार रुपये, द्वितीय 4 हजार रुपये रोख व गौरवपत्र देण्यात येते. तसेच ग्रामस्तरीय युवा सांसद कार्यक्रमांतर्गत 18 ते 30 वयोगटातील नवीन युवा मंडळांना 2 हजार 400 रुपये तसेच संलग्नीत युवा मंडळ, संस्था, महिला मंडळांना 700 रुपये ( सन 2015-16 पर्यंतचे)  देण्यात येणार आहे, अशी माहिती नेहरु युवा केंद्र नांदेड यांनी दिली आहे.  

000000








फोटो ओळी :-

नांदेड नगरीत गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर आता आगमन होणार आहे, ते गौरीचे (महालक्ष्मी) हनुमानपेठ (वजिराबाद) भागात उत्कृष्ट, सुंदर, सुबक, विलोभनीय गौरींच्या मुर्ती बाजारात आल्या आहेत. ( छाया : विजय होकर्णे नांदेड )

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...