Friday, February 2, 2018

महाराष्ट्राला सकारात्मक व सौहार्दपूर्ण बनविणारा
सोशल मीडिया महामित्र
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या सोशल मीडियाने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे.  सोशल मीडियाच्या या अद्भूत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटूंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक सोशलझालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने  सोशल मीडिया-महामित्रनावाचा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.
सोशल मीडियाचा वापर संवादासाठी वाढला असला तरी सोशल मीडियाचा विधायक उपयोग देखील होत आहे. एकदा शेजारच्या  गावात वाटमारी  झाली, वाटमारीत सहभागी असणारे चोरटे चोरी करुन गावच्या दिशेने निघाले, तितक्यात गावच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर त्या शेजारच्या गावातील एका मित्राचा वाटमारीबाबत माहिती देणारा व चोरांच्या गाडीचे वर्णन सांगणारा मेसेज येऊन धडकला. त्यामुळे लागलीच गावातील तरुण मंडळ सावध झाले, त्यांनी त्या चोरांना पकडण्यासाठी गावातील चौकात जोरात फिल्डिंग लावली, आणि आश्चर्य काही वेळातच ते चोर अलगद येऊन तरुणांच्या हाती सापडले. मग काय तरुणांनी त्या चोरांना मनसोक्त चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.  कदाचित इथे ते चोरही गोंधळले असतील की  इतक्या कमी वेळात आपण पकडले गेलो तरी कसे ? खरं तर ही सर्व कमाल नव्या तंत्रज्ञानाची व सोशल मीडियावरील संवादाची म्हणावी लागेल.
वरील घटना म्हणजे  सोशल मीडियाच्या विधायक ताकदीचे एक उदाहरण आहे. आज ही ताकद  समाजाच्या विधायक फायद्यासाठी वापरणे गरजेचे आहे.  परंतु सध्या समाजातील काही अपप्रवृत्तीकडून या सोशल मीडियाचा गैरवापर सुरु आहे. त्यांच्याकडून सामाजिक शांतता भंग करुन समाजात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.  जाणीवपूर्वक अफवा पसरवून सामाजिक संघर्ष घडविण्यासाठी खोटी माहिती पसरवणे , जाती-धर्मात तेढ वाढेल अशा प्रकारचा गैरवापर या माध्यमाचा होत आहे, अशा प्रकारांवर आणि अपप्रवृत्तींवर कायदेशीर वचक ठेवण्याबरोबरच समाजातील एक सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण देखील हा प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे.
आज सोशल मीडियाचा चांगला व सकारात्मक उपयोग करणारे देखील मोठ्या प्रमाणात सुज्ञ नागरिक आहेत. जे कुठल्याही अयोग्य गोष्टींचा आधार न घेता कुठलेही टोकाचे राजकारण न करता केवळ आनंद पसरावा , समाजात चांगल्या गोष्टींची सुरुवात व्हावी, एखाद्या चांगल्या प्रयोगाला , उपक्रमाला लोकांपर्यंत आणावे अशा सद्हेतुने सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियाचा अशा पध्दतीने सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तींची दखल घ्यावी , त्यांच्या प्रयत्नांना मोठे व्यासपीठ मिळावे अशा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने  सोशल मीडिया-महामित्रनावाचा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.
काय आहे हा उपक्रम?
ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. ही बाब समोर ठेऊन सोशल मीडियाचा सदुपयोग समाजात अधिक विवेकवादी आणि सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा म्हणून करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सोशल मीडिया महामित्रउपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा फायदा काय?
सोशल मीडिया महामित्रउपक्रमात पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना मिळणार मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र.
*  सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवादाची,सेल्फी घेण्याची मिळणार संधी
या उपक्रमात मी कसा सहभागी होऊ?
महामित्रउप्रकमासाठी दिनांक 1 ते 18 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येईल.
गुगल प्ले स्टोअर’/ ‘ॲप स्टोअरवरुन महामित्र (Maha Mitra) हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्या.
*  राज्यातील 15 वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल.
*  अ‍ॅप्लिकेशनमध्ये नाव, वय, पत्ता हे तपशील देऊन नोंदणी करा
कशी होणार निवड?
*  प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) निवडले जाणार प्रत्येकी 10सोशल मिडिया महामित्र’.
*  या 10 जणांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाणार. या महामित्रांची जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाजमाध्यमाच्या सदुपयोगाबाबत होणार गटचर्चा.
*  या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी एका महामित्राची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी होणार निवड.
*  जिल्हास्तरावरील कार्यक्रम अंदाजे होणार 5 ते 17 मार्च या कालावधीत.
*  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्यस्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना केले जाणार आमंत्रित.
*  याच कार्यक्रमात सोशल मिडिया महामित्रपुरस्काराने होणार गौरव.
*  उपस्थितीत मान्यवरांशी साधता येईल संवाद
महामित्रनिवडीचे निकष काय?
*  विविध मॅसेजिंग ॲपच्या सर्वाधिक टॉप 5 ग्रुपमधील कॉन्टॅक्ट्सची संख्या. (5 गुण)
*  फोनबुकमधील एकूण कॉन्टॅक्ट्सची संख्या. (15 गुण)
*  किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म / मॅसेजिंग ॲप्लीकेशन उपयोगात आणण्यात येत आहेत. (10 गुण)
*  सहभागी व्यक्तीला त्याच्या स्नेहीजनांनी दिलेली मते (20 गुण)
*  सोशल मीडियातील प्रभाव आजमावण्यासाठी सहभागी व्यक्तीला पाठविलेल्या संदेशापैकी किती संदेश त्यांनी वितरित केले आहेत (15 गुण)
*  आलेल्या संदेशाचे पाठविलेल्या संदेशाशी गुणोत्तर. (10 गुण)

वरील गुणांकन ॲपमध्ये ऑनलाईन दिले जाईल. त्याप्रमाणे  एकूण सर्व सहभागींच्या तुलनेत आपले स्थान (रँक) काय आहे हे त्या सहभागी व्यक्तीला दिसेल.  निकषात असलेल्या 75 गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील (क्षेत्रातील) टॉप 20 सहभागी व्यक्तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्तीने या मोहिमेकरिता एक संदेश (मजकूर, ॲनिमेशन, ग्राफिक्स आदी) तयार करावा व तो ॲपमार्फत आयोजकांना पाठवावा. या संदेशाच्या आधारे 20 मधून 10 जणांची गट चर्चेसाठी  निवड करण्यात येईल.   गटचर्चेतील सहभागाआधारे 15 पैकी गुण देऊन  या 10 व्यक्तींपैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
सोशल मीडियाचा सकारात्मक व अभिनव उपयोग करणाऱ्यांसाठी सोशल मीडिया-महामित्रहे नाविन्यपूर्ण व्यासपीठ महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करुन दिले आहे. तेव्हा, चला महाराष्ट्राला सकारात्मक व सौहार्दपूर्ण बनविण्यात आपला हातभार लावण्यासाठी महामित्रउपक्रमात सहभागी  होऊ या...!

- शरदमणी मराठे / अभिजित झांबरे-पाटील

00000
ग्रामपंचायत निवडणुकीचे ऑनलाईन
नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 2 :-  राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मार्च ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासह सर्व सदस्य पदांसाठी, रिक्त पदांच्या पोट निवडणुकासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऑनलाईन संगणकीकृत नामनिर्देशपत्रे 5 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2018 या कालावधीत सादर करावयाची आहे.  
तसेच पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे पारंपारिक पद्धतीऐवजी संगणकीकृत ऑनलाईन स्विकारण्यात येणार आहेत. पोटनिवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. ऑनलाईन नामनिर्देशनपत्रे 5 ते 10 फेब्रुवारी 2018 या कालावधीत संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावीत, असे अवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

000000
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे  
जिल्ह्यात 10 फेब्रुवारीला आयोजन  
नांदेड दि. 2 :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यावतीने शनिवार 10 फेब्रुवारी 2018 राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आले आहे. सर्व संबंध पक्षकारांनी यासंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.  
या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा न्यायालय, नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय सहकार न्यायालय नांदेड येथे करण्यात आले आहे. लोकन्यायालयात प्रलंबित 2 हजार 500 प्रकरणापैकी 1 हजार दिवाणी 1 हजार 500 फौजदारी प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. दिवाणी प्रकरण, मो..दावा प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे तसेच इतर दिवाणी प्रकरणे, बॅंक कर्ज वसुली प्रकरण आदी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तडजोड पात्र आहेत अशी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय विद्युत कंपनी, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबत दाखल पुर्व प्रकरणे, विविध मोबाईल कंपन्यांची थक रकमेबाबत प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार असुन आतापर्यंत 6 हजार दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत.
            या राष्ट्रीय न्यायालयातीत नांदेड अभिवक्तासंघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे, उपाध्यक्ष अॅड.  जगजीवन भेदे, अमरीकसिंघ वासरीकर, जिल्हा सरकारी की तसेच जिल्ह्यातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. सर्व संबंध पक्षकारांनी यासंधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. टी. वसावे  यांनी केले आहे.

0000000
आनंदी राहणे हेच उत्तम आरोग्याचे औषध
- डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर
नांदेड दि. 2 :-   आनंदी राहून आपल्या शैक्षणिक कार्यात स्वत:ला झोकून द्यावे हेच उत्तम आरोग्याचे औषध आहे, असे प्रतिपादन डॉ. सुजाता जोशी पाटोदकर यांनी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये महिला तक्रार निवारण समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी मुलींना कायदेविषयक बाबींची माहिती देण्यासाठी नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य विणा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. डी. पोपळे हे होते.
मुलींनी वयात येताना होणाऱ्या बदलाची माहिती रंजक पद्धतीने सांगतानाच चुकीच्या अंधश्रद्धा न बाळगण्याचे सांगितले. बाह्य सौंदर्यापेक्षा कर्तत्वाचे सौंदर्य जपा असा मोलाचा सल्लाही डॉ. पाटोदेकर यांनी मुलींना दिला. प्राचार्या वीणा पाटील यांनी स्वसंरक्षणार्थ विविध कायद्याची माहिती दिली. अन्याय झाल्यास न भिता योग्य पद्धतीने त्याविरुद्ध आवाज उठविण्याचे व होणारा छळ टाळण्याचे आवाहन केले. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने मुली व महिलांसाठी मार्गदर्शक ठरणारा चर्चा व परिसंवाद कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल महिला तक्रार निवारण समितीचे प्राचार्य पी. डी. पोपळे यांनी अभिनंदन केले. यावेळी मंचावर महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ. एस. व्ही. बिट्टीगिरी, आयएसटीचे प्रभारी प्रा. दातीर, प्रा. डॉ. जी. एम. डक यांची उपस्थिती होती. कार्यकमाचे सुत्रसंचालन कु. आर. के. देवशी तर आभार डॉ. ए. ए. जोशी यांनी मानले.

000000
ध्येय निश्चिती यशासाठी फलदायी
- सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन
नांदेड दि. 2 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपले ध्येय निश्चित करुन त्यानुसार सात्यतपूर्वक अभ्यास, जिद्य चिकाटी ठेवल्यास याबाबी  यशासाठी फलदायी ठरतात. यासाठी वाचन, लेखन बोलण्याची क्षमता विकसित करणे हेही तितकेच महत्वाचे असल्याचे, प्रतिपादन धर्माबादचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड वाघाळा शहर मनपा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने उज्ज्वल नांदेड मोहिमेअतंर्गत आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या शिबिरास उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रा.सुजीत पवार (पुणे) जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची यावेळी उपस्थिती होती.
नुरुल हसन पुढे म्हणाले की, घरच्या वा सभोतालच्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करता यावर मात करुन हवे ते प्रतिष्ठेचे पद मिळविल्या जाऊ शकते. फक्त गरज आहे ती कठोर परिश्रमाची. असे परिश्रम करण्याची ज्याची तयारी आहे त्यांना कुठलीही प्रतिकूल परिस्थिती रोखू शकत नसल्याचे सांगून त्यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले, सतत प्रेरणादायी व्यक्तीच्या, वातावरणाच्या सहवासात राहुन  आत्मविश्वास दृढ करुन तयारी करा, जिल्हा प्रशासन आपल्या पाठिशी असून सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आम्ही कटीबद्ध असल्याचे सांगितले. याचसोबत तालुकास्तरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांसारखा स्पर्धा परिक्षेच्या सोई उपलब्ध करुन देण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी यावर मार्गदर्शन केले. प्रा. सुजीत पवार पुणे यांनी सर्वसाधारण बुध्दिमता गणीत या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तरपणे  मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, सूत्रसंचलन मुक्तीराम शेळके आभार आरती कोकुलवार यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रताप सुर्यवंशी, अजय ट्टमवार, कोंडीबा गाडेवाड, खंडेलोटे, लक्ष्मण शेनेवाड, सोपान यनगुलवाड आदीने सहकार्य केले.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...