Monday, October 24, 2016


प्र.संचालक, राधाकृष्ण मुळी यांना निरोप तर
 नवीन प्र. संचालक यशवंत भंडारे यांचे स्वागत
       औरंगाबाद, दि. 1: माहिती जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत औरंगाबाद येथील मराठवाडा विभागीय माहिती कार्यालयातील प्र. संचालक (माहिती) श्री. राधाकृष्ण मुळी यांची बदली  अमरावती तसेच संचालक नागपूर येथे झाल्यामुळे  यांना निरोप देण्यात आला, तर नवीन प्र.संचालक यशवंत भंडारे यांचे स्वागत आज  संचालक (माहिती), कार्यालयात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले.
 या वेळी संचालक (माहिती), राधाकृष्ण मुळी यांना  शाल, पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. यावेळी संचालक (माहिती) श्री मुळी आपल्या मनोगतात म्हणाले माझ्या चार वर्षाच्या कार्यकाळात सर्व आधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने ही वाटचाल यशस्वी   करता आली. तसेच नवीन संचालक माहिती श्री. यशंवत भंडारे यांना येत्या वाटचालीसाठी शुभेच्छा ही  दिल्या.
            यावेळी नवीन प्र.संचालक यशवंत भंडारे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, कुठलेही शासकीय काम कोण्या एका व्यक्तीचे नसून सांघिक प्रयत्नातून यशस्वी होत असते. कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी श्री. रा.वि.देठे , सहायक संचालक डॉ.रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी, वंदना थोरात, तसेच कर्मचाऱ्यामध्ये विलास सरोदे, यशंवत सोनकांबळे, ..पठाण यांनी मनोगत व्यक्त केले त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक माहिती कार्यालय जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद येथील सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती सहायक श्रीमती संजीवनी जाधव(पाटील) यांनी केले तर माहिती सहायक शाम टरके यांनी सर्वांचे आभार मानले.
        
    श्री. यशंवत भंडारे यांनी यापूर्वी पुणे येथे उपसंचालक(माहिती) या पदासह जिल्हा माहिती अधिकारी म्हणून औरंगाबाद , लातूर ,जालना येथे तर सहायक संचालक म्हणनू मंत्रालय , मुंबई , औरंगाबाद येथील मराठवाडा विभागीय माहिती कार्याल्यात काम केले आहे. तसेच माहिती जनसंपर्क महासंचालनाल्यात येण्या पूर्वी श्री. भंडारे यांनी उपसंपादक म्हणून दै. लोकमत, (औरंगाबाद), दै. सकाळ, (पुणे/नशिक) वृत्तसंपादक म्हणून दै. विश्वमित्र (औरंगाबाद), दै. एकमत मध्ये काम केले आहे. धुळे वृत्तपत्र विद्या आणि संज्ञापन विभागात विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी  पाच वर्षे काम  केले  आहे. त्यांना राज्य शासनाने यशंवतराव चव्हाण विकास वार्ता पुरस्कार देऊन पुरस्कृत केले आहे. त्यांचे काही ग्रंथही प्रकाशित झाली आहेत. आज त्यांनी लातूर येथील उपसंचालक पदाचाही कार्यभार स्वीकारला आहे.
-*-*-*-*-*-*


नांदेडमध्ये ई-पीडीएसद्वारे ऑनलाईन
शिधापत्रिका वाटपास सुरुवात
राज्यातील पहिलाच प्रयोग, जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते उद्घाटन
 
नांदेड, दि. 24 :- जिल्ह्यातील ई-पीडीएस प्रणालीद्वारे शिधापत्रिका वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. ई-पीडीएएस सिस्टीचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते आज तहसिल कार्यालय नांदेड येथे करण्यात आले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहलिसदार पी. के. ठाकुर यांची उपस्थिती होती.  
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी ईपीडीएस सिस्टीम ही नागरिकांच्या उपयोगी आहे. नागरिकांना घरी बसून ऑनलाईन शिधापत्रिकेचे अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर त्यांना स्मार्ट कार्ड सारखे राशन कार्ड मिळणार आहे. अशा प्रकारच्या प्रणालीची राज्यात सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आली आहे. ही माहिती food chain management system साठी सुद्धा वापरण्यात येणार आहे. या प्रक्रियेचा वापर सुरु झाल्यानंतर सर्व प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार आहे. शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना फळे, भाजीपाला, आटा, खाद्यतेल, 11 प्रकारचे तांदूळ, कडधान्य, गुळ, शेंगदाने, रवा, मैदा, चणापीठ अशा विविध गोष्टींची विक्रीची परवानगी देण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी या अद्ययावत प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी केले आहे.
प्रस्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. वेणीकर म्हणाले की, या प्रणालीमुळे ऑनलाईन चलन, ऑनलाईन परमिट, ऑनलाईन वितरण होण्याची सुविधा प्राप्त होवून या प्रक्रियेमध्ये विलंब कमी होवून वेळेवर धान्य उचलण्याची सुविधा रास्त भाव दुकानदार यांना उपलब्ध होणार आहे. नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी आभार मानले.

000000
रब्बी हंगामासाठी बी-बियाणे उपलब्धतेबाबत
काटेकोर नियोजन व्हावे- जिल्हाधिकारी काकाणी
हंगामातील पीक क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करण्याचेही निर्देश
नांदेड, दि. 24 :- आगामी रब्बी हंगामासाठी प्रामुख्याने हरभरा, भुईमूग आणि ज्वारी या पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न व्हावेत. रब्बा हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी आवश्यक अशा बियाण्याच्या उपलब्धतेबाबत कृषि विभागाने काटेकोर नियोजन करण्यात यावे. बी-बियाण्यांच्याबाबत शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, त्यांच्या पुरेश्या उपलब्धतेबाबत वेळीच नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली रब्बी हंगामाच्या नियोजनांसाठी कृषि विभाग आणि बी-बियाणे पुरवठादारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात बैठक झाली.
बैठकीत बी-बियाण्याच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, अनुदानित बियाण्याची उपलब्धता आणि खुल्या बाजारातील बियाणे याबाबतही मार्गदर्शन करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिले.
बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, मोहिम अधिकारी ए. जी. हांडे, तंत्र अधिकारी एस. बी. शितोळे, बी-बियाणे खत विक्रेता संघटनेचे अध्यक्ष मधुकर मामडे, महाबीजचे व्यवस्थापक के. एल. सावंत तसेच राष्ट्रीय बिज निगम, कृभको यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
रब्बी हंगामात हरभरा, भुईमूग आणि ज्वारी यांच्या क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. हरभरा  बियाण्याच्या उपलब्धतेबाबत अनुदानित आणि खुल्या बाजारातील विक्री याबाबत पारदर्शकता ठेवण्यात यावी, असे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निर्देशित केले. रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्धतेबाबत महाबीज, कृषि विभाग, घाऊक विक्रेते आणि तालुकास्तरावरील यंत्रणांनी संपर्क-समन्वय ठेवावा. जेणेकरून शेतकऱ्यांची अडचण होणार नाही. त्यासाठी वेळोवेळी माहितीची देवाण-घेवाण करावी, असेही त्यांनी सांगितले. खतांचा पुरवठा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतही यावेळी चर्चा झाली.
हरभऱ्याचे अनुदानित बियाण्याचे वाटपात अडचणी येऊ नयेत यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर आणि सात-बारा, आधार कार्डच्या नोंदी घेऊन प्रति शेतकरी तीस किलोचे वाटप करण्यात येत आहे. हरभऱ्याच्या अनुदानित बियाण्याचा दर ऐंशी रुपये प्रतिकिलो असा आहे. तर खुल्या बाजारातील विक्रीबाबत शेतकऱ्यांनी संबंधित छापील किंमतीची खात्री करून बियाणे घ्यावे. बियाणे खरेदीची पावती घ्यावी व ती जपून ठेवावी. बी-बियाणे व खतांच्या दुकानात कृषि तसेच विविध यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक लावण्यात आले आहेत. त्यामुळे बी-बियाण्याच्या उपलब्धतेबाबत अडचणी आल्यास संबंधितांकडे किंवा तालूका कृषि अधिकारी, पंचायत समितीच्या कृषि अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषि विभागाच्यावतीने बैठकी दरम्यान करण्यात आले.
जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्रात अडीच लाख हेक्टरपर्यंत वाढ व्हावी, त्यातही पिक-पद्धतीत अमुलाग्र बदलासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात यावे, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री. काकाणी व्यक्त केली.

0000000
मतदारांना प्रभावित करणाऱ्या गैरप्रकारांवर
संशयास्पद व्यवहारांवर नजर राहणार
जिल्हाधिकारी काकाणी यांचे जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती बैठकीत निर्देश

नांदेड, दि. 24 :- विधानपरिषद आणि नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी मतदारांना प्रभावित करणाऱ्या गैरप्रकारांवर, आर्थिक बळाचा वापर, संशयास्पद आर्थिक व्यवहार, दारुचा अवैध वापर यांच्यावर नजर राहणार आहे. त्यासाठी आज जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न  झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात बैठक झाली.
बैठकीस नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी  जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी, नगरपरिषद प्रशासन अधिकारी विद्या गायकवाड, उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक गणेश पाटील, आयकर विभागाच्या सहायक आयुक्त वृंदा मतकरी, अग्रणी बँकेचे प्रतिनिधी श्री. वरणकर आदींची उपस्थिती होती.
भारत निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या नांदेड प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा तसेच नऊ नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधानपरिषदेसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी  तथा जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, तर नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठीही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीद्वारे सनियंत्रण केले जाणार आहे.
 या दोन्ही निवडणुकांच्या अनुषंगाने आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. यामध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोर पालन करण्यासाठी विविध यंत्रणांवर जबाबदाऱ्या सोपविण्याचे नियोजन करण्यात आले. विशेषतः संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर बँक आणि आयकर विभागाच्या समन्वयाने नजर ठेवणे, जिल्ह्यात पाहणीसाठी फिरते तसेच स्थानिक पथकांची  नियुक्ती करणे, तसेच निवडणूक काळातील शांतता-सुव्यवस्थेसाठी अवैध अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करणे, त्यासाठी माहितीची देवाण-घेवाण समन्वयनासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. अवैधरित्या मद्यविक्री किंवा विहीत कालमर्यादेनंतरही मद्यविक्री, अवैध साठे शोधणे, प्रचार-प्रसिद्धी दरम्यान विरूपणास प्रतिबंध करणे यासाठीच्या नियोजनाबाबतही निर्देशित करण्यात आले.
निवडणूक काळातील आर्थिक व्यवहारांबाबत व्यावसायीक, व्यापारी तसेच अन्य प्राधिकरणांनी, व्यक्तींनी बँकीग नियमन तरतुदीनुसार सोबत दस्तऐवज, अनुषांगीक माहिती ठेवावी. बँकींग नियमावलीनुसार मोठ्या स्वरुपाच्या आर्थिक व्यवहारासाठीची विहित पद्धतीचा काटेकोर अवलंब करावा, जेणेकरून अशा नियमित व्यवहारांबाबत कोणतीही अडचण उद्भवणार नाही,असेही आवाहन सनियंत्रण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष
जिल्ह्यात  निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने, आचारसंहिता भंगाच्या तक्रारीची नोंद घेण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाचा 1077 हा दुरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर येणाऱ्या तक्रारीबाबत संबंधित यंत्रणांना दर दोन तासांनी अद्ययावत माहिती देण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निर्देशित केले. या तक्रारीबाबत  केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवालही वेळोवेळी सादर करण्यात यावा, अशा सुचनाही बैठकीत देण्यात आल्या.

0000000

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...