Sunday, April 30, 2017

महाराष्ट्र दिनानिमित्त आज
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन
वजिराबाद पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय समारंभ

नांदेड, दि. 30 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 1 मे 2017 रोजी वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्राद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.   
समारंभासाठी निमंत्रितानी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 वाजेपूर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाने राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे. 

00000000

Saturday, April 29, 2017

पालकमंत्री अर्जून खोतकर यांचा दौरा
नांदेड दि. 29 :-  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 30 एप्रिल 2017 रोजी वसमत येथून सायं. 7.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. रात्री 8 वा. नांदेड-वाघाळा महानगर पालिकेतील शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांची बैठक, स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड.  
सोमवार 1 मे 2017 रोजी सकाळी 7.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वजिराबाद पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण. सकाळी 8 वा. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय समारंभास उपस्थिती. स्थळ- पोलीस कवायत मैदान नांदेड. सकाळी 9.30 वा. सचखंड  हुजूर  साहिब  गुरुद्वारा  येथे  दर्शनासाठी  भेट. सकाळी 10.30 वा. शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रकाश कोडगे यांच्या निवासस्थानी स्नेह भेट. सकाळी 11 वा. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ओळखपत्राचे वितरण, स्थळ- क्षत्रिय समाज रेणुका माता मंदिरासमोर गाडीपुरा नांदेड. सकाळी 11.30 वा. नांदेड मनपाअंतर्गत प्रभाग क्र. 3 सांगवी येथील रस्त्याचे लोकार्पण, स्थळ- एम.जी.एम. कॉलेज समोर नांदेड. दुपारी 12.30 वा.  पिंपळगाव ता. हदगावकडे प्रयाण. दुपारी 1.45 वा. पिपळगाव येथे अखंड श्री दत्तनाम सप्ताह कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वा. पिंपळगाव येथून नांदेड मार्गे मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील.

000000
जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी योजनांची
प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी डोंगरे
मनरेगा, जलयुक्त, पाणीटंचाई उपायांबाबत सर्वंकष आढावा
नांदेड दि. 29 :- विकासाच्या योजना या थेट नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असतात. त्यामागे मोठा विचार-धोरण असते. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील मनरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना, जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा तसेच पाणी टंचाईवरील उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी डोंगरे बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवनातील कॅबिनेट सभागृहात बैठक संपन्न झाली. बैठकीत योजनांमधील विविध बाबी, टंचाई उपाययोजनांचा जिल्हाधिकारी डोंगरे यांनी तपशीलवार व सर्वंकष आढावा घेतला.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, सहायक जिल्हाधिकारी तथा किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॅा. राजेंद्र भारूड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मनरेगांतर्गत सहायक प्रकल्प अधिकारी आदींची उपस्थिती होती.  
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले की, एखाद्या गावात होणाऱ्या विकास कामाच्या मागे अनेक यंत्रणांच्या समन्वय महत्त्वाचा ठरतो. विकासाच्या योजना या जनतेच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या असतात. त्या राबविण्यामागे विचार तसेच धोरण असते. त्यातून नागरिकांचे जीवनमान उंचवावे, अशी अपेक्षा असते. त्यामुळे विविध यंत्रणांनी समन्वय राखला तरच अशा योजना लोकांपर्यंत पोहचतात, यशस्वी होतात. त्यामुळे महसूल असो वा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित यंत्रणा, या सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते. योजनांच्या अंमलबजावणीत अनेक घटकाचे योगदान महत्त्वाचे असते. त्यामुळे या घटकांना दीशा देण्यासाठी, योग्यवेळी योग्य नेतृत्त्व देण्याचे प्रयत्नही अधिकाऱ्यांनी करावेत, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील विविध स्वरुपांची कामे, त्यांचे प्रस्ताव ग्रामसभेतून निवडणे, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि वेळेत कामे पुर्ण करण्याबाबतही निर्देश देण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानातील गावांचा समावेश आणि करण्यात आलेल्या कामांचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. पाणीटंचाई उपाय योजना आणि त्यातील विविध मुद्यांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील, उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे तसेच उपस्थित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी सहभाग घेतला.

000000
महाराष्ट्र दिनी मुंबईतील ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रमध्ये
एसजीजीएसचे 100 विद्यार्थी सहभागी होणार
नांदेड, दि. 29 :- यंदाचा 58 वा महाराष्ट्र दिन ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रदिवस म्हणूनही साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकासात योगदान देणाऱ्या युवा पिढीशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमामध्ये नांदेड येथील श्रीगुरुगोबिंद सिंघजी अभियांत्रीकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी (एसजीजीएस) मधील शंभर विद्यार्थ्यांना आमंत्रित केले गेले आहे. ही बाब नांदेडसाठी आणि आमच्या संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रीया संस्थेचे संचालक डॅा. एल. एम. वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.
राज्याच्या विकासाबाबत आजच्या युवकांच्या कल्पना जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून साकारलेल्या कार्यक्रमाचा समारोप सोहळा वरळी येथील एनएससीआय येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील जवळपास आठ हजार युवक सहभागी होणार असून आपल्या ट्रान्सफॉर्म महाराष्ट्राबाबतच्या संकल्पना सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला रतन टाटा, मेजर जनरल अनुज माथुर, अक्षय कुमार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आपल्या देशाची खरी संपदा असलेल्या तरूणाईशी, विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांशी महाराष्ट्र दिनी राज्यापुढील महत्त्वाच्या समस्यांवर चिंतन करण्याचे त्यातून समस्यांची उकल करण्याचे आणि त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र हा उपक्रम हाती घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी निधी कामदार यांनी सांगितले.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रसाठी डिसेंबर महिन्यात राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील 11 सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील बदल घडविण्यासाठी युवकांनी आपल्या संकल्पना/उपाय सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार राज्यभरातील जवळपास 11,500 विद्यार्थ्यांकडून 2500 प्रवेश आले. तर तब्बल 6 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आता महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संकल्पना सादर करणाऱ्या युवकांना सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रमध्ये एनोव्हेशन एक्झिबिशन
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कॅप्टन अमोल यादव यांनी साकारलेले स्वदेशी विमान एनोव्हेशन एक्झिबिशनमध्ये असणार आहे. शिवाय वेगवेगळ्या युवकांनी केलेले इनोव्हेशनही या एक्झिबिशनमध्ये पहायला मिळतील. याबरोबरच पर्यटन, कौशल्य विकास, सांस्कृतिक कार्य, गृह, शिक्षण, माहिती व जनसंपर्क, समृद्धी महामार्ग, एमएमआरडीए-मेट्रो रेल, महाराष्ट्र ट्रान्स हार्बर लिंक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ-स्टार्ट अप योजना, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कृषी, पाणीपुरवठा आणि स्वच्छता असे विभाग सहभागी होण्याबरोबरच महाराष्ट्र विकासासंबंधित बुथ, स्टॉल्स, प्रदर्शने मांडणार आहेत. आजच्या युवकांनी राज्याच्या विकासाच्या केलेल्या प्रारुपाचाही या प्रदर्शनामध्ये समावेश असणार आहे.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रमध्ये सहभागी होणारीएसजीजीएस-नांदेडची टीम
टीम H20 - रोहित जंगले, उज्वदीप पाटील, मयूर पाटील, शिवरंजनी कदम, पराग नगराळे, ज्ञानेश्वर काळे या विद्यार्थ्यांच्या दुष्काळावर मात करण्यासाठीच्या संकल्पनेला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांना प्रा. मिलिंद वाईकर, प्रा. मिलिंद राजूरकर यांनी मार्गदर्शन केले.
टीम सूर्या- अजिंक्य धारिया, शिवानी सानितीकर, शांतनू बदमोरे, ऐश्वर्या कुलकर्णी, करिष्मा इस्मयील या विद्यार्थ्यांच्या दुष्काळावर मात करण्यासाठीच्या संकल्पनेला चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांना प्रा. माणिक रोडगे, प्रा. डी. एस. मेहता व प्रा. विनोद तुन्गीकर यांनी मार्गदर्शन केले.
टीम परिवर्तन- सागर उज्जैनकर वैभव पाटेवार, धनश्री घुगे, सुप्रतिक देशपांडे, सिद्धेश्वर रेवतकर, मयुरी लकशेटे या विद्यार्थ्यांच्या "भविष्याची गरज ओळखून ग्रामीण शिक्षणातील आवश्यक बदल" या संकल्पनेला चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांना प्रा. अरुण पाटील यांनी मार्गदर्शन केले.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रची काही वैशिष्ट्ये
  • राज्याच्या विकासासंबंधित संकल्पना जाणून घेण्यासाठी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र अभियान
  • गेल्या 26 डिसेंबर 2016 रोजी या अभियानाची सुरुवात
  • 1 मे रोजीच्या कार्यक्रमात आठ हजाराहून अधिक युवक सहभागी होणार
  • 6 लाखांहून अधिक ऑनलाईन व्होटर्सनी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रमधील नाविन्यपूर्ण प्रदर्शन NSCI वरळी येथे जनतेसाठी सकाळी 9 पासून खुले असणार असून अधिकाधिक नागरिकांनी तेथे भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी निधी कामदार यांनी केले आहे.

000000
दहावीच्या कला प्राविण्य गुणांसाठी
आणखी पाच संस्थांच्या प्रमाणपत्राना मान्यता
नांदेड दि. 29 :-  शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोक कला प्रकारात सहभागी होणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याकरीता निवडण्यात आलेल्या संस्थांच्या यादीमध्ये आणखी पाच संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागीय मंडळाचे सचिव यांनी दिली आहे.
मार्च 2017 पासून दहावीच्या परीक्षेमध्ये कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या‍ विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वाढीव गुणाची सवलत देण्यासाठी शास्त्रीय संगीत, नृत्य व वादन तसेच लोककला क्षेत्रातील संस्थांची प्रमाणपत्र देण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
इयत्ता 11 वीच्या प्रवेशपत्रासाठी या शासनमान्य असणाऱ्या पाच संस्थांमधील विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील राखीव जागांवर सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात येत होता. या पाच संस्थांचा आता विद्यार्थ्यांना सवलतीच्या वाढीव गुण देण्याकरीता निवड करण्यात आलेल्या संस्थांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येत आहे. या संस्था पुढीलप्रमाणे अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, सरफोजी राजे भोसले डान्स रिसर्च इन्स्टिटयूट, नालंदा नृत्त्य कला महाविद्यालय, श्री वल्लभ संगितालय आणि पुणे भारत गायन समाज. या वाढीव गुणांकरीता प्रमाण देण्याची कार्यपद्धती 1 मार्च 2017 च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याचे मंडळाने म्हटले आहे.

00000
धर्माबाद आयटीआयमध्ये शिल्पनिदेशकांच्या
नेमणुकीसाठी 2 मे रोजी मुलाखती
नांदेड दि. 29 :-  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे शिल्पकारागीर योजनेअंतर्गत शिल्पनिदेशकांचे पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात निव्वळ तासिका तत्वावर तत्वाभ्यास व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी नेमणूक करावयाची आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी मंगळवार 2 मे 2017 रोजी मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्राच्या प्रतीसह सकाळी 11.30 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद यांनी केले आहे. 
ज्या व्यवसायासाठी शिल्पनिदेशकाचे पद निव्वळ तासिका तत्वावर भरावयाची आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. यांत्रिक कृषित्र, अभियांत्रिकी चित्रकला निदेशक, संधाता व जोडारी या व्यवसायाकरीता शैक्षणिक अर्हता ही संबंधित व्यवसायामधील मेकॅनिकल अभियांत्रिकी किमान द्वितीय श्रेणीत पदवी, पदविका व एक / दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी, एटीएस परीक्षा उत्तीर्ण व तीन वर्षाचा असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेशक, गटनिदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णयानुसार अटी मान्य असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतरच तासिका तत्वारील नियुक्ती मिळेल.
या संस्थेस यापुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी मंगळवार 2 मे 2017 रोजी संस्थेत उपस्थित रहावे. तसेच त्यानंतर आलेल्या संबंधीत उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबादचे प्राचार्य यांनी सांगितले आहे.

000000

लेख

करा..पालन राष्ट्रध्वजसंहितेचे , राष्ट्रभिमान प्रतीकाचे 
            भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधत्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हा तिरंगा गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पूर्ण तेजाने फडकत राहण्यासाठी कित्येक लोक सशस्त्र बलांच्या जवानांसह त्याचे रक्षण करण्याकरिता उदारपणाने आपले प्राण पणाला लावत आहेत. भारतीय ध्वजसंहितेची थोडक्यात माहिती येथे देण्यात येत आहे.
        जनतेतील सदस्य, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादींनी ध्वजारोहण करणे, राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे कलम एक 2.1 बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 आणि राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 आणि या विषयावर अधिनियमित केलेला इतर कोणताही कायदा यात तरतूद केलेल्या मर्यादांव्यतिरिक्त उपरोक्त अधिनियमांच्या तरतुदी विचारात घेता सर्वसाधारण जनतेतील सदस्य, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादीनी (एक) बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, 1950 चा भंग करुन वाणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता कामा नये. (दोन) एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणू नये. याव्यतिरिक्त राष्ट्रध्वज लावण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. (तीन) ज्या प्रसंगी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यांवर उतरविण्यात येतो त्या प्रसंगाखेरीज ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही. (चार) खाजगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरुपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही. (पाच) ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोषाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही किंवा त्याचे उशा, हातरुमाल, हातपुसणे यावर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम करता येणार नाही किवां छपाई करता येणार नाही. (सहा) ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत. (सात) ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे बांधण्याचे किंवा वाहुन नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. परंतु विशेष प्रसंगी आणि प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय दिनी तो साजरे करण्याचा एक भाग म्हणून ध्वज फडकविण्यापूर्वी ध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळया ठेवण्यास कोणतीही हरकत असणार नाही. (आठ) एखाद्या पुतळयाचे अनावरण करण्यासारख्या प्रसंगी ध्वजाचा वापर करण्यात येईल तेव्हा तो सुस्पष्टपणे व वेगळा दिसेल अशाप्रकारे लावण्यात यावा आणि त्याचा पुतळा किंवा स्मारकाचे आवरण म्हणून वापर करता येणार नाही. (नऊ) ध्वजाचा वक्त्याचा टेबल (डेस्क) झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही. (दहा) ध्वजाचा जाणीवपूर्वक भूमीशी किंवा जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरुन फरफटत नेऊ नये. (अकरा) ध्वजाचा मोटार वाहन, रेल्वे गाडी, जहाज किंवा विमान यांच्या छतावर, बाजूंवर किंवा पाठीमागच्या बाजूस आच्छादता येणार नाही. (बारा) ध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही आणि (तेरा) ध्वजाचा 'केसरी' रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही.
        बोधचिन्ह व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे- कलम 2 या अधिनियमामध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर (अ) 'बोधचिन्ह' याचा अर्थ अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले असे कोणतेही बोधचिन्ह, मुद्रा, ध्वज, अधिचिन्ह, कुलचिन्ह किंवा चित्र प्रतिरुपण असा आहे. कलम 3 त्या त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र शासन विहित करील अशी प्रकरणे व अशी परिस्थिती खेरीजकरुन एरव्ही कोणत्याही व्यक्तीला अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले कोणतेही नाव किंवा बोधचिन्ह किंवा त्याची कोणतीही आभासी प्रतिकृती यांचा, केंद्र शासनाच्या किंवा शासनाने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही व्यापार, व्यवसाय, आजिविका किंवा पेशा यांच्या प्रयोजनार्थ अथवा कोणत्याही स्वामित्व हक्काच्या शिर्षकात अथवा कोणत्याही व्यापार चिन्हात किंवा चिन्हाकृतीत वापर करता येणार नाही किंवा वापर चालू ठेवता येणार नाही. टीप-भारताचा राष्ट्रीय ध्वज हा या अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये बोधचिन्हे म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आला आहे.
        राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 कलम 2 जो कोणी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या देखत भारतीय राष्ट्रध्वज किंवा त्याचा कोणताही भाग जाळील, छिन्नविच्छिन्न करील, विरुप करील, त्याचे पावित्र्य विटाळील, तो विद्रूप करील, नष्ट करील, पायाखाली तुडवील किंवा अन्यथा त्याची बेअदबी करील (मग ती तोंडी किंवा लेखी शब्दाद्वारे असो वा कृतीद्वारे असो) त्याला तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. स्पष्टीकरण 1-कायदेशीर मार्गाने भारतीय राष्ट्रध्वजात बदल घडवून आणण्याच्या हेतूने, भारतीय राष्ट्रध्वजाबाबत किंवा शासनाच्या कोणत्याही उपाययोजनांबाबत नापसंती दर्शविणारे अभिप्राय व्यक्त करण्याने किंवा त्यावर टीकाटिप्पणी करण्याने या कलमान्वये कोणताही अपराध घडणार नाही. स्पष्टीकरण 2- 'भारतीय राष्ट्रध्वज' या शब्दप्रयोगात कोणत्याही पदार्थापासून तयार केलेले किंवा कोणत्याही पदार्थावर चितारलेले भारतीय राष्ट्रध्वजाचे किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे अगर भागांचे चित्र, रंगीत चित्र, रेखाटन किंवा छायाचित्र अथवा अन्य दृश्य प्रतिरुपण अंतर्भूत आहे. स्पष्टीकरण 3- 'सार्वजनिक ठिकाण' या शब्दप्रयोगाचा अर्थ जनतेने वापरावी म्हणून योजलेली किंवा जेथे त्यांना प्रवेश असेल अशी कोणतीही जागा असा आहे व त्यात कोणत्याही सार्वजनिक वाहनाचा अंतर्भाव आहे.  2.2 राज्यातील सदस्य खाजगी संघटना किंवा शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा व सन्मान राखून सर्व प्रसंगांच्या व समारंभाच्या दिवशी किंवा अन्यथा राष्ट्रध्वज फडकविता, लावता येईल. (एक) ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येतो अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे. (दोन) फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावण्यात येऊ नये. (तीन) ध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा ध्वजांसोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये. (चार) या संहितेच्या भाग तीनच्या कलम नऊमध्ये अंतर्भूत केलेल्या तरतूदीव्यतिरिक्त कोणत्याही वाहनांवर ध्वज लावण्यात येऊ नये. (पाच) जेव्हा एखाद्या वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेंव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्याकडे असताना त्याच्या उजव्या बाजूकडे ध्वज लावण्यात यावा किंवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या पाठीमागे वरच्या बाजूला लावावा. (सहा) जेव्हा ध्वज भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तर ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा. जर ध्वज उभा लावण्यात आला असेल तर ध्वजाची केशरी रंगाची बाजू त्यांच्या (ध्वजाच्या ) उजव्या बाजूस असावी (म्हणजे ध्वजाकडे तोंड करुन उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस असावी) (सात) राष्ट्रध्वज या संहितेच्या भाग एकमध्ये विहित केलेल्या प्रमाण विनिर्देशांशी शक्य तेवढया प्रमाणात अनुरुप असावा. (आठ) राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूला किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणत्याही ध्वज किंवा पताका लावू नये तसेच ध्वज ज्या काठीवर फडकत ठेवला असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यांसह कोणतीही वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये. (नऊ) ध्वजाचा अन्य कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा शोभेसाठी उपयोग करुन नये. (दहा) कागदापासून तयार केलेला ध्वज जनतेला महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांच्या वेळी लावता येईल तथापि असे कागदी ध्वज अशा कार्यक्रमानंतर जमिनीवर टाकू नयेत किंवा फेकू नयेत. ध्वजाची प्रतिष्ठा राखून शक्यतोवर खाजगीरीत्या त्याची विल्हेवाट लावावी. (अकरा) जेव्हा ध्वज मोकळया जागेत लावावयाचा असेल तेव्हा हवामानाची स्थिती विचारात न घेता शक्यतोवर तो सूर्यादयापासून सूर्यास्तपर्यंत लावण्यात यावा. (बारा) ध्वज फाटेल अशा कोणत्याही पध्दतीने तो लावू नये किंवा बांधू नये. (तेरा) ध्वज फाटला असेल किंवा मळाल्यामुळे खराब झाला असेल तर तो विशेषत: जाळून किंवा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल अशा अन्य कोणत्याही पध्दतीने खाजगीरीत्या संबंधच्या संबंध नष्ट करावा.
        ध्वज लावण्याची योग्य पध्दत : 3.5 ज्या ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल अशारीतीने लावला पाहिजे. 3.6 जेथे कोणत्याही सरकारी इमारतींवर ध्वज लावण्याची प्रथा आहे तेथे त्या इमारतींवर रविवार व सुट्टीचे दिवस धरुन सर्व दिवशी ध्वज लावण्यात येईल आणि या संहितेमध्ये तरतूद केली असेल ती खेरीजकरुन हवामान कसेही असले तरी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात येईल. अशा इमारतींवर रात्रीसुध्दा ध्वज लावता येईल. मात्र काही अगदी विशेष प्रसंगीच तो रात्री लावावा. 3.7 ध्वजारोहणाचे वेळी ध्वज नेहमी झर्रकन वर चढवावा आणि उतरविताना मात्र तो सावकाशपणे व विधीपूर्वक उतरविण्यात यावा. ध्वजरोहण व ध्वजावतरण जेव्हा बिगुलाच्या प्रसंगोचित सुरांवर करावयाचे असेल अशा वेळी ध्वज चढविण्याची आणि उतरविण्याची क्रिया त्या सुरांच्या बरोबरच झाली पाहिजे. 3.8 जेव्हा खिडकीची कड, सज्जा अगर इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या बसविलेल्या काठीवरुन ध्वज फडकविण्यात येतो तेव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी. 3.9 जर ध्वज इतर प्रकारे म्हणजे भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तर ध्वंजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वात वर असावा जर ध्वज उभा लावण्यात आला असेल तर ध्वजाची केशरी रंगाची बाजू (ध्वजाच्या) उजव्या बाजूस असावी म्हणजे ध्वजाकडे तोंड करुन उभ्या असलेल्या व्यक्तींच्या डाव्या बाजूस असावी. 3.10 एखाद्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असताना त्याच्या उजवीकडे काठीवर ध्वज लावण्यात यावा अथवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या वरच्या बाजूस लावावा. 3.11 पुतळयाच्या अनावरणासारख्या प्रसंगी ध्वज लावताना तो स्पष्ट दिसेल अशा वेगळया जागी लावण्यात यावा. टीप-पुतळयाचे अगर स्मारकाचे आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करु नये. 3.12 ध्वज मोटारीवर लावावयाचा असेल तर तो मोटारीच्या बॉनेटवर मध्यभागी किंवा मोटारीच्या समोरील उजव्या बाजूस मजबूतपणे बसवलेल्या सळईवर लावण्यात यावा. 3.13 मिरवणुकीत अथवा संचलनाच्या वेळी ध्वज फडकत न्यावयाचा असेल तर तो चालणाऱ्यांच्या उजव्या म्हणजेच खुद्द ध्वजाच्या उजव्या बाजूस असावा अगर अशा प्रसंगी इतर आणखी ध्वजांची रांग असेल तर तो त्या रांगेच्या मध्यभागी पुढे ठेवावा.
        ध्वजाचा चुकीचा वापर : 3.14 फाटलेल्या अथवा चुरगळलेल्या ध्वज लावता कामा नये. 3.15 एखाद्या व्यक्तीस अगर वस्तूस मानवंदना करण्यासाठी ध्वज खाली आणू नये. 3.16 दुसरा कोणताही ध्वज अगर पताका राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूस अगर राष्ट्रध्वजावर आणि पुढे नमूद केलेले काही अपवाद सोडल्यास त्याच्या बरोबरीने लावू नये. तसेच ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालू नयेत अथवा बोधचिन्ह लावू  नये. 3.17 ध्वजाची तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा शोभेसाठी कोणत्याही प्रकारे उपयोग करु नये. 3.18 वक्त्याचे टेबल             झाकण्यासाठी अथवा व्यासपीठावर आच्छादन वा पडदा म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.  3.19 ध्वजाचा केशरी रंगाचा पट्टा खाली येईल अशा रीतीने ध्वज लावू नये. 3.20 ध्वजाचा जमिनीस स्पर्श होऊ नये अथवा तो पाण्यावरुन फरफटत नेण्यात येऊ नये. 3.21 ध्वज फाटेल अशा पध्दतीने लावू नये अथवा बांधू नये.
        गैरवापर : 3.22 ध्वजाचा कोणत्याही स्वरुपात आच्छादन म्हणून वापर करता कामा नये. सरकारमार्फत अथवा सेनादलांमार्फत तसेच केंद्रीय निमलष्करी दले यांच्यामार्फत काढण्यात येणाऱ्या अंत्ययात्रांचे प्रसंग यास अपवाद असतील, असे प्रसंग पुढे दिले आहेत. 3.23 ध्वजाचा वाहन अथवा रेल्वेगाडी अगर जहाज यांच्या झडपांवर, छतांवर, बाजूंवर अथवा पाठीमागच्या बाजूस आच्छादन म्हणून वापर करता कामा नये.3.24 ध्वज फाटेल किंवा तो मलिन होईल अशा प्रकारे वापरु नये किंवा ठेवू नये.  3.25 ध्वज फाटला असेल अथवा मळल्यामुळे खराब झाला असेल तर तो कोठेतरी फेकून देऊ नये अथवा त्याचा अवमान होईल अशा रीतीने त्याची विल्हेवाट लावू नये. अशा परिस्थितीत ध्वज खाजगीरित्या शक्य तर जाळून किंवा त्याचा मान राखला जाईल अशा इतर प्रकाराने सबधच्या सबध नष्ट करावा. 3.26 ध्वजाचा इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करु नये. 3.27 ध्वजाचा पोषाखाचा अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या गणवेशाचा भाग म्हणून वापर करु नये तसेच त्याचे उशा, हातरुमाल यावर भरतकाम करुन नये. अगर त्याची हात पुसण्याचे रुमाल किंवा पेटया यांवर छपाई करु नये. 3.28 ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. 3.29 ध्वजाचा जाहिरातीच्या कोणत्याही स्वरुपात वापर करु नये अथवा ध्वजस्तंभाचा जाहिरात लावण्यासाठी म्हणूनही वापर करुन नये. 3.30 ध्वजाचा काही घेण्यासाठी, देण्यासाठी बांधण्यासाठी अगर वाहून नेण्यासाठी साधन म्हणून ध्वजाचा वापर करु नये. विशेष प्रसंग आणि राष्ट्रीय दिन साजरा करण्याचा एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रवध्वज फडकविण्यापूर्वी राष्ट्रध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळया ठेवण्यात कोणतीही हरकत असणार नाही. 
-         संकलन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड
*******


Friday, April 28, 2017

महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 28 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 1 मे 2017 रोजी वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्राद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.   
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 वाजेपूर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. गृहविभागाने राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे. 

00000000
नांदेड शहरात यापुढे दर महिन्याच्या
पहिल्या गुरुवारी "नो-व्हेईकल डे"
वाहन न वापरण्याचे महापालिकेचे आवाहन 
नांदेड दि. 28 :-  शहरातील प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी यापुढे दर महिन्याचा पहिला गुरुवार हा "वाहन विरहीत दिन (नो-व्हेईकल डे)" पाळण्याचे आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
या आवाहनात म्हटले आहे की, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीत वाढते शहरीकरण, लोकसंख्या व सतत वाढणारी वाहन संख्या यामुळे प्रदुषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढणाऱ्या वाहन संख्येमुळे शहरामध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून शहरामध्ये प्रत्येक महिन्याचा पहिला गुरुवार हा "वाहन विरहीत दिन (नो-व्हेईकल डे )" म्हणून पाळण्याचे संकल्प नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. अशारीतीने "वाहन विरहीत दिन (नो-व्हेईकल डे)" चे पालन केल्याने शहरामध्ये ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण कमी करणे, वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी करणे, इंधनाची बचत करणे, तसेच नागरिकांमध्ये सायकल वापरण्याची सवय वृद्धींगत करणे या गोष्टी साध्य होतील. त्यामुळे महापालिकेतर्फे शहरातील सर्व नागरिकांना तसेच विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदींना या दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी दुचाकी, चारचाकी वाहन न वापरता सार्वजनिक वाहनांचा किंवा सायकलचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000
वाहनचालक परवान्यासाठी
सुविधा केंद्रावर शुल्क भरण्याची सुविधा
नांदेड दि. 28 :- वाहन चालक परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संगणक, इंटरनेट इत्यादी सुविधा तसेच ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा नाही अशा अर्जदारांसाठी शासनाने नागरी सुविधा केंद्राद्वारे (सीएससी) अर्ज भरण्याची व ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी सीएससी केंद्र चालकांना अर्जदाराकडून विहित शुल्का व्यतिरिक्त 20 रुपये इतके शुल्क आकारुन अशा अर्जदारांचे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरुन देण्याची शासनाने परवानगी दिलेली आहे. आरटीओ कार्यालयातील कामकाज पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी या केंद्रावरील सेवेचा लाभ घेऊन मध्यस्थविरहीत कार्यपद्धती निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्यामार्फत आवाहन करण्यात आले आहे.   
जिल्ह्यातील सर्व सीएससी केंद्राची माहिती www.apnacsconline.in/csc-locator/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्जदारास त्याच्या नजीकच्या सीएससी केंद्राची माहिती याद्वारे उपलब्ध होईल. तसेच कार्यालयात देखील सीएससी केंद्रांची यादी नागरिकांच्या माहितीसाठी फलकावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहन चालक लायसन्ससाठी कोणत्याही कामासाठी अर्ज करण्यासाठी मध्यस्थाकडे न जाता या सीएससी केंद्रावरुन अर्ज व शुल्क भरुनच कार्यालयात अर्ज सादर करु शकतील.  प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणी व लायसन्सबाबत सर्व कामकाज parivahan.gov.in या संकेतस्थळावर सारथी 4.0 व वाहन 4.0 या ऑनलाईन प्रणालीचा वापर सुरु झाला आहे. लासन्सबाबत सर्व कामांसाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरावयाचा असून त्याचे शुल्क देखील ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

000000
संजय गांधी निराधार योजनेतील  
लाभार्थ्यांना 1 मे रोजी ओळखपत्राचे वितरण
नांदेड दि. 28 :-  संजय गांधी निराधार योजना समितीच्या 2 जानेवारी 2017 व 12 एप्रिल 2017 रोजी बैठकीत मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री अर्जुन खोतकर  यांच्या हस्ते सोमवार 1 मे 2017 रोजी क्षत्रिय समाज श्री रेणुकामाता मंदिरासमोर एसजी रोड गाडीपुरा नांदेड येथे  ओळखपत्र वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी नांदेड शहरातील संबंधीत लाभार्थ्यांनी 1 मे रोजी सकाळी 11 वा. वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार संगांयो नांदेड (शहर) यांनी केले आहे.

000000
लेख.. . . .
क्रांतीकारी समाज सुधारक महात्मा बस्वेश्वर
यशवंत भंडारे, औरंगाबाद
महात्मा बसमेश्वारांनी केलेल्या सामाजिक सुधारणा आश्चर्य वाटतीज इतक्या नव्या होत्या. त्यांनी सांगितलेले आदर्श प्रत्यक्ष आचरनात आणले गेले. त्यांनी अंधश्रध्दा निर्मुलन आणि सामिजिक, आर्थिक विषमता यांच्यापर कडाडून हल्ला चढवला. समाजाला विषमतेच्या गर्देतून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. त्यांची 28 एप्रिल 2017 रोजी अक्षयतृतीयेला जयंती आहे. त्यानिमित्त हा लेख.. . . .
असं म्हटले जाते की, धर्माचे अंतरंग समजून घेण्यासाठी धर्म आणि समाज यांचे परस्पर संबंध विचारात घेणे तसेच धर्माचे हा समाजशास्त्रीय स्वरुप अभ्यासने अवश्यक असते धर्म हा सामाजिक यंत्रणेचा एक महत्वाचा भाग असतो. धर्माप्रमाणे लोक रुढी, लोकनीती, नीतिमत्ता, कायदा अदी सामाजिक नियमनांमुळे समाज व्यवस्थेतील व्यक्तींचे तसेच सामाजिक संस्था-संघटनांचे परस्पर संबंध नियमित होत असतात. एकंदरीत व्यक्ती, कुटूंब, समाज आणि धर्म यांचे प्रत्यक्ष अन् अन्योन्य संबंध असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोणताही समाज जाणून घेताना त्या समाजात धर्म अभ्यासणे आवश्यक असते. “धर्म हा मानवी समाजात इतका सार्वजनिक, शाश्वत आणि व्यापक असतो की धर्माचा व्यवस्थितपणे परिचय करुन घेतल्याशिवाय तो समाज समजावून घेणे आवश्यक असते ” असे किग्जले डेव्हिड यांनी नमूद केल्याचे सार्थ ठरते. त्यातच भारतीय समाज, संस्कृती, तत्वज्ञान आणि भारतीय जीवन पध्दती गांर्भीयाने समजून घेताना भारतातील विविध धर्मांचा अभ्यास करावा लागतो. त्यातून भारतातील विविध धर्मांचे आणि विविध संप्रदायांचे अनुबंध परस्परांशी सहजतेने गुंतलेले आढळतात.
धर्म हा भारतीयांच्या जीवन जगणाऱ्या पध्दतीचा अविभाज्य अंग राहिले आहे. धर्म आणि भारत यांच्यातील अतूट, अन्योन्य साधारण नातेसंबध स्पष्ट करतान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप उत्तमपणे नमूद केलय- “ भारतात धार्मिक संकल्पना या इतक्या अधिक प्रमाणात आढळतात की त्यांनी समाज जीवनाचे सर्व अंग व्यापून टाकलेले आहे. धर्माव्यतिरिक्त भारत काहीच नाही.” परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या अतिरेकी वापरामुळे ज्या मानवासाठी धर्म असतो तो धर्म खरा मानवकेंद्री धर्म न राहता त्याला कर्मकांडाचे स्वरुप प्राप्त होते. अंधश्रध्दांच्या जोखडात माणसाला जखडबंद करण्याचे केंद्र बनते. त्यामुळे धर्म माणसासाठी राहत नाही तर “धर्मासाठी माणूस असतो” असे धर्माचे स्वरुप बनते. अशा धर्माचे स्वरुप अखिल मानव समूहांसाठी धोकादायक असते, असेही नमूद केलय.
वरीशैव धर्माचा प्रसार या अशाच्या पार्श्वभूमीवर झाला. एवढेच नव्हेतर प्रस्थापित व्यवस्थेविरुध्दच्या बंडातून झाला. याबाबत डॉ. हुनशाळ यांनी यांचे खूप सुंदर विश्लेषण केलय, ते म्हणतात, “ जेव्हा बुध्द धर्म आणि जैन धर्माचा प्रसार कमी होत होता तेव्हा लिंगायत धर्माने शिवशक्तीच्या क्रांतीकारी झेंड्याखाली पुराणमतवादी परंपरिक, सनातनी धर्माला न जुमानता लढा दिला.” भारताचे दिवंगत उपराष्ट्रपती डॉ.बी.डी.जत्ती यांनी वीरशैव धर्माच्या उदयाच्या कारणांची मिमांसा नेमक्या शब्दात केली आहे. त्यांच्या मते “ भारतात जेव्हा जेव्हा धार्मिक अंधश्रध्दा, कर्मकांड,यांचा अतिरेक होऊन अनाचार माजला तेव्हा तेव्हा समाजाला या जाचांतून मुक्त करण्यासाठी धर्मसुधारणेसाठी आणि धर्मशुध्दीसाठी चळवळी झाल्या. अशा या चळवळीत वीरशैव धर्माला महत्वाचे स्थान आहे.” भारतीय समाज प्रामुख्याने कर्मठ असल्यामुळे त्यांच्या समाजशास्त्रीय चौकटीत अमुलाग्र स्वरुपाचे बदल होत नाहीत, असे म्हटले जाते. यात थोडासा सत्य अंश असल्याचे मान्य केले तरी या सामाजिक मूल्यांच्या बुर्जांना तडाखेबंद धक्के देणारे अनेक बंडखोर क्रांतीकारी धर्म सुधारक, धर्म संस्थापक आणि पंथ संस्थापकही निपजल्यांची अनेक उदाहरणे देता येतील. त्यात महावीर, तथागत भगवान बुध्दांपासून महात्मा बसवेश्वरांपर्यंत अनेकांची नावे घेता येतील. आपल्या विचारांचा अमिट ठसा समानमनावर बिंबवून नव्या समाजमनाला जन्म देण्याचे काम या बंडखोरांनी केले आहे. भारतीय धर्म संस्थेच्या इतिहासातील महात्मा बसवेश्वर हे असेच एक महनीय व्यक्तीमत्व होय. समाज सुधारक आणि क्रांतीकारक म्हणून त्यांचे अधिक महत्व वाटते तर त्यांच्या अनुयायांना आणि धर्म अभ्यासकांना समाज सुधारकांबरोबर एका धर्माचे, पंथाचे संस्थापक म्हणून त्यांचे कार्य कर्तृत्व कालातीत वाटते.
अनेक महापुरुषांकडे पाहण्याचे दोन दृष्टीकोण प्रामुख्याने दिसून येतात. एक तर दैवी विभूती म्हणून आणि दुसरा म्हणजे थोर महापुरुष म्हणून. परंतु महात्मा बसवेश्वरांनी केलेले कार्य अभ्यासताना त्यांच्याकडे एक थोर महापुरुष म्हणूनच पहिले पाहिजे, अशी माझी धारणा झाली आहे. कारण बसवेश्वरांनी आपल्या आयुष्यात केलेल्या कार्यातून त्यांचे महानतेचे गमक त्यांच्या माणूसपणात आणि चिरंतन मानवी मूल्यांसाठी त्यांनी केलेल्या कार्यातच दिसून येते.
महात्मा बसवेश्वरांचा जन्म आताच्या कर्नाटकातील आणि तेव्हांच्या म्हैसूर राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे झाला. आता हे गाव तालुक्याचे ठिकाण आहे. या गावाला बसवण्णाची बागेवाडी असेही म्हटले जाते. राजा किंवा इतर समृध्द व्यक्तीने ब्राम्हणांन दान दिलेल्या खेडयांना ‘अग्रहार’ असं म्हटले जात असे. बागेवाडी हे तेव्हा अत्यंत महत्वाचे ‘अग्रहार’ म्हणून प्रसिध्द होते. या गावात नेहमी विद्धवानांची वस्ती असे. उच्च शिक्षणासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येथे येत असत. येथे प्रामुख्याने वेद आणि त्यांची
सहा उपांगे, स्मृती, पुराणे, व्याकरण,छंदशास्त्र, तत्वज्ञानाची सहा व्यवस्था, काव्य, हत्ती आणि घोडे यांचे शास्त्र, वैद्यकशास्त्र आदींचे शिक्षण दिले जात असे. ज्या ब्राम्हणांची अग्रहारांवर सत्ता चाले त्यांना ‘महाजन’ म्हटले जात असे. ते सामूहिकरित्या अग्रहाराची कारभार चालवीत असत. काही वेळा महाजन आपला नेता निवडत आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कारभार करीत असल्याचे पुरावे सापडतात. बसवेश्वर अशाच एका महाजन नेत्यांचा मुलगा होता. बसवेश्वराच्या जन्माच्या काळात बागेवाडीत पाचशे ब्राम्हण कुटूंबे होती. अग्रहारात केवळ ब्राम्हण कुटूंबे असावीत असा काही संकेत नसल्याचे तेथे इतर जातींचीही काही कुटूंबे होती. विशेष म्हणजे तत्कालीन शिलालेखात बागेवाडीचा उल्लेख ‘महाअग्रहार’ असा करण्यात आला आहे. येथील ब्राम्हणांची विद्धतेबद्दल मोठी ख्याती होती. विशेष म्हणजे येथील बहुतेक ब्राम्हण शैवपंथाचे अनुयायी होते. आणि तेथील शिव मंदिर सर्व धार्मिक कार्यांचे केंद्रस्थान असे.
‘मंण्डगेय मादिराज ’ हे बागेवाडीचे प्रमुख होते. ‘मदांबी’ ही त्यांची बायको. सांख्यायन ग्रोत्राच्या कम्मे घराण्यातील ते शैव ब्राम्हण होते. कम्मे या नावावरुन हे कुटूंब आंध्रातील गुंटूर आणि नेलोर भागातून कर्नाटकात स्थानिक झाले असावे, असा कयास केला जातो. अग्रहाराचा प्रमुख म्हणून मादिराजांना मोठा मान होता. त्यांचे व्यक्तिनत्वही तसेच भारदस्त होते. अनेक वर्षांपासून मुलगा होत नसल्याने मदांबीने ज्योतिबाच्या सल्याने ‘वृषभव्रत’ केले. म्हणजेच मुलगा व्हावा म्हणून नंदीला नवस केला., अन् होणाऱ्या मुलाला त्याचे नाव देण्याचे कबूल केले. कालांतराने मदांबीना मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी ‘बसव’ असे ठेवले (संस्कृतमध्ये वृषभ शब्दाचा उपभ्रंश ‘बसव’ असा आहे.) बालपणी चंद्रकिरणांप्रमाणे सुंदर आणि सदैव हसतमुख असलेले हे बालक सर्वांना हवेहवेसे वाटे.
वयाच्या आढव्या वर्षी बसवेश्वरांच्या आई-बापांनी त्यांचे उपनयन करण्याचा घाट घातला, पण बसवेश्वरांनी या वयातही त्या गोष्टीला विरोध केला. ‘धर्म ग्रंथांनी दाखविलेला मार्ग ब्राम्हण आचरीत नाहीत आणि म्हणूनच आदर्श, वस्तुस्थिती यांत महदंतर पडले आहे. शिवाय ब्राम्हणांच्या धर्माला कर्मकांडाच्या निरर्थक उजळणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. बहुतेकांना ज्ञान किंवा भक्तीपेक्ष कर्माचेच महत्व अधिक होते, त्यांचे ईश्वर प्रेम म्हणजे निव्वळ देखावा आहे. असेही त्यांचे या बालवयात मत झाले होते. जातीयतेच्या भिंती अभ्यद्य स्वरुपात उभ्या होत्या. गरीब आणि श्रीमंतीमध्ये प्रचंड मोठी तफावत होती. एकीकडे श्रीमंतांची अत्यंतिक सुखासिनता आणि दुसरीकडे रोजच्या भाकरीसाठी अहोरात्र कष्ट असणारे गरीब. ही सगळी परिस्थिती बसवेश्वर पहात हाते. त्याचा त्यांच्या बालपनावर खोलवर परिणाम झाला. अस्पृशांची स्थिती तर अधिकच करुणाजनक होती. त्यांना “होलेय” म्हणजे विटाळणारे किंवा बहिष्कृत अनामिक आणि ‘सन्बोली’ म्हणजे
आपले गावातील आगमन ओरडून सांगणारे अशी नावे होती. त्यांच्या ओरडण्यामुळे उच्च जातीतील लोकांना त्यांचा विटाळ टाळणे सुलभ होई. असे लोक गावकुसाबाहेर राहत आणि क्कचितच गावात येत असतं. बहिस्कृत जातीतील लोक हाच श्रमिकांचा मोठा वर्ग होता. हे लोक सामंतांचे चक्क गुलामच होते. समाजात असंख्य अंधश्रध्दा होत्या. काही निरुपद्रवी तर काही अतिशय भयानक स्वरुपाच्या या अंधश्रघ्दातूनही समाजाचे शोषण होत असे. त्याचाही बसवेश्वरांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.
बाराव्या शेतकाच्या पूर्वार्धात कर्नाटकात जैन, वैष्णव, शैव आणि बुध्द धर्म प्रमुख होते. जैन धर्माचा कर्नाटकात पहिल्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत प्रभाव होता. जैन धर्माला जवळजवळ सर्वच राजघराण्यांनी आश्रय दिला. अशोकाच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याने कर्नाटकात बौध्द धर्म स्थिरावला. पण बौध्दांच्या प्रभावाची ठिकाणं मर्यादित होती. पण बाराव्या शतकात कर्नाटकात केवळ शैववादच सगळ्यात लोकप्रिय धर्म होता. त्यात आलेल्या काही अनिष्ट परंपरांचा बसवेश्वरांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. या प्रथा परंपरा त्यांना पटत नव्हात्या. त्यामुळे त्यांनी त्यास विरोध करण्याची भूमिका घेतली. बाह्यावडंबरापेक्षा आंतरिक शुध्दता ईश्वराला हवी असते, असे त्यांचे मत बनले होते. जन्म किंवा कुळ-जात यावरुन ईश्वर माणसांचे मोल ठरवत नाही. उलट कुळ ईश्वरकृपा होण्यातील आडसरच होते. कारण उच्च कुळातील जन्मामुळे माणसांचा अहंभाव वाढीस लागतो. ईश्वर प्राप्तीसाठी भक्ती आणि उदिष्टांची मन:पूर्वकता यालाच महत्व असाव्यास हवे. आपल्या अपंग मुलावर माता ज्या प्रमाणे मायेची पाखरण करते, त्याप्रमाणे कदाचित ईश्वर गरीब आणि पददलितांचा पक्ष घेत असावा. ईश्वर प्राप्तीसाठी धर्मग्रंथांचे ज्ञान आवश्यक असेलही, परंतु तेवढा एकच मार्ग आवश्यक नाही, असेही त्यांचे मत बनले होते.
असे सांगितले जाते की अनिच्छेनेच ‘बसव’ ने उपनयन संस्कार करुन घेतले. उपनयन संस्कार करण्यास त्यांनी प्रथम विरोध केला होता. त्याला हा सगळा प्रसंग क्लेशदायक वाटला. आईच्या वत्सलतेने त्याचे मन वळवण्यात आले होते. परंतु त्यांच्या वडिलांना त्यांचीशी भूमिका पचविणे अत्यंत कष्टदायक गेले. वडिलांच्या भावनांची बसवेश्वरांनी फारशी तमा बाळगली नाही. त्यांच्या या स्वभावामुळे आणि विचारांमुळे समाजाचा जाच बसवेश्वरांना सहन करावा लागत होता. काही समस्यांना धैर्याने तोंडही दिले होते. पंरतु परिस्थिती अगदीच असह्य झाल्यानंतर त्यांनी मोठ्या बहिणीसह बागेवाडीचा निरोप घेतला. बहिण अक्कनागमा बरोबर ते ‘कूडलसंगम’(कप्पडीसंगम) येथे आले. कूडलसंगम हे विजापूर जिल्ह्यातील तेव्हाचे छोटेसे गाव होते. मलप्रभा आणि कृष्णा नदीच्या संगमावर बसलेल्या या रमणीय गावातील संगमेश्वरांच्या देवालयाच्या सेवेत बसवेश्वर चांगलेच रमले. येथे त्यांचा चांगलाच लौकिक वाढला. त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक सेवातील नेतेपणाची पायाभरणी याच गावात झाली, असेही म्हणता येईल.
//5//
कूडलसंगम काही बागेवाडीपेक्षा वेगळे नव्हते. हे सगळे त्याच्या मनोवृत्तीला सहन न होणारे होते आणि आपल्यापरीने वयाच्या आठव्या आणि सोळाव्या वर्षी त्यांनी याबाबतचे असमाधान व्यक्त केलेले होते. येथे अज्ञान आणि पिळवणूक याविरुध्द झगडण्याची त्यांची मूळ प्रकृती बळावू लागली. एक नवीन व्यवस्था निर्माण करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. येथेच त्यांना भोवतालच्या विशाल समाजात जाऊन अखिल मानव जातीसाठी कार्य करायला लावणारी प्रेरणा मिळाली. येथेच नोकरी पत्कारुन आपल्या उदरनिर्वाह करावा असे त्यांच्या मनाने घेतले. यातून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा एक संच तयार करुन आपली स्वप्नातला आदर्श समाज आपल्याला निर्माण करता येईल, असे त्यांना वाटले. कूडलसंगम येथे जातवेद मुनींकडून त्यांनी लिंग दिक्षा घेतली आणि आपल्या अंगावर शिवलिंग धारण केले. जातवेद मुनींकडे राहून त्यांनी वेदवेदांगाचे,षड्दर्शनांचे, इतिहास-पुराणांचे, आणि धर्म शास्त्रांचे अध्ययन केले. याशिवाय बसवेश्वरांनी जैन आणि बौध्द दर्शनही समजावून घेतली. त्यांनी संस्कृत, तामिळ, पाली आदींभाषांतील प्रमुख ग्रंथही वाचले. बसवेश्वर येथेच विद्या संपन्न झाले.
आयुष्यभर सन्यासी होऊन राहील्यास आपला समाजाला उपयोग होणार नाही, असेही त्यांच्या मनाने घेतले आणि त्यांनी कल्याण नगरीत येण्याचा निर्णय घेतले. त्या कल्याण नगरीस आता बसव कल्याण असे म्हटले जाते. तिथे बिज्जळ नावाच्या राजाकडे त्यांना नोकरी मिळाली. बसवेश्वर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर काखतरांने राज्याचे कोषाध्यक्ष झाले.
काही ग्रंथात कूंडलसंगम गावावरुन दक्षिण भारतातील मंगलीवेड (महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे) येथे बिज्जळ राजाकडे आले असे म्हटले आहे. बसवेश्वरांच्या बंडखोर विचारांची पाळेमुळे जनसामान्यांच्या सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीविषयीच्या साठलेल्या असंतोषात खोलवर रुजलेली होती. म्हणून त्यांची शिकवण जाणणारे आणि त्याप्रमाणे आचरण करणारे लोक बहुतेक समाजाच्या दारिद्रयाने गाजलेल्या वर्गातून आलेले होते. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आपल्या धर्माचा स्वीकार कोणालाही करता येईल अशी घोषणा त्यांनी केली. त्यांच्या धार्मिक शिकवणीवर भगवान बुध्दांच्या विचारांचा प्रभाव दिसतो. बुध्दाने पंचशिल आणि अष्टअंगिक मार्गात सांगितलेली शिकवण बसवेश्वरांच्या शिकवणीशी साधर्म्य साधणारी आहे. चोरी करु नको, हत्या करु नको, खोटे बोलू नको, दारु पिऊ नका, व्याभिचार करु नका असे बुध्दांने पंचशिलमध्ये सांगितले, तसेच बसवेश्वरांने सांगितले. कोणावरही रागवू नकोस, कोणाचाही तिरस्कार करु नको, स्वत:विषयी अभिमान बाळगू नको, कोणालाही दुषणे देऊ नकोस, प्रेम आणि करुणेविना धर्म तो कसला? सगळ्या जीवांविषयी करुणा हवी, सगळ्या धार्मिक श्रध्देचे मूळ करुणा होय….पहा! मर्त्यांच्या आणि देवांच्या विश्वात कसलाच भेद नाही! सत्य वचन म्हणजे देवलोक आणि असत्यावचन म्हणजे मृत्युलोक,

सत्कृते म्हणजे स्वर्ग आणि दुष्कृते म्हणजेच नरक होय, अशी शिकवण बसवेश्वरांनी दिली. बसवेश्वरांनी केवळ सामान्य आणि ज्ञानी जनांसाठीच असलेल्या वर्गीकृत आणि कर्मठ विधींचा संच म्हणजे धर्म या जनसामान्यांच्या मनातील अपसमजुतीला सुरूंग लावला. बसवेश्वरांनी धर्म म्हणजे जगण्याची आणि आचरण करण्याची पध्दती, अशी संकल्पना प्रसृत केली.
बसवेश्वरांनी समतेचा पुरस्कार केला. नव्याने वीरशैव धर्मात प्रवेश केलेल्या प्रत्येकाला इतर वीरशैवी धर्मियांनी समानतेची वागणूक देण्याची शिकवण होती. जो वीरशैव धर्म स्वीकारी त्याला भूतपूर्व धर्माशी असलेले सर्व संबंध तोडणे आवश्यक होते. स्वच्छा आणि सत्शील राहणीला पोषक आचार संहिता बसवेश्वरांनी तयार केली. चन्नबसवाने अशा पन्नास आचारांची नियमावली तयार केली होती. ह्यात नियमित स्नान, दात घासणे, हिंसा टाळणे, सत्यवचन, नवऱ्याने अर्थात बायकोनेही एकनिष्ठा राहणे वगैरे गोष्टींचा समावेश केला होता. आंतरिक शुध्दतेवर भर देताना बाह्यांगीच्या शुध्दतेचे, स्वच्छतेचे महत्व वीरशैववादाने कधीच नाकारले नव्हते.
शिवाची असंख्य मंदिरे पाशुपत शैव धर्माची बलस्थाने होती. धनिक आणि प्रतिष्ठित लोक अमाप संपत्ती खर्चून मंदिरे उभारीत. एखादे मंदिर उभारले की, लोक देणग्या देत, दान करीत. वर्षभर दिवा लावण्याची सोय करीत, मंदिरात नृत्यांगना असावी म्हणून तशी व्यवस्था केली जाई, वेगवेगळे सण साजरे करण्यासाठी किंवा मठातील साधूंच्या चरितार्थासाठी किंवा शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी लोक दान करीत. अशा देणग्यांची माहिती अनेक शिलालेखांतून मिळते. परंतु अशा मंदिर आणि मठांमध्ये अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नसे. त्यामुळे बसवेश्वरांना मंदिर म्हणजे धनिकांचा आणि माथेफिरूंचा विपर्यस्त सामाजिक व्यवहार वाटे. त्यामुळे बसवेश्वरांनी आपल्या अनुयायांनी आणि वीरशैवीयांनी मंदिर बांधू नयेत. तसेच मंदिरात जाऊ नये, अशी सक्त ताकिद दिली होती. इष्टलिंगाच्या रुपाने ईश्वर आपण आपल्या शरीरावर धारण केल्यामुळे पूजेची जरुर नाही, असे त्यांनी सांगितले. परमेश्वर त्याच्या सतरुपाने ह्दयस्था आहे. बसवेश्वर अंधश्रध्दांचा तिरस्कार करीत. त्यांनी आपल्या शिष्यांना अंधश्रध्दांचा त्याग करण्यास सांगितले. स्पर्शाने विटाळ होतो या कल्पनेची त्यांनी टर उडविली. शुभ कार्यासाठी ज्योतीषांकडून मुहूर्त पाहण्याची वीरशैवीयांना काही गरज नाही असा बसवेश्वरांनी आग्रह धरला. ज्या दिवशी ईश्वराचे स्मरण कराल, तो प्रत्येक दिवस शुभ, असे मत त्यांनी नोंदविले.
बसवेश्वरांना अस्पृश्यांविषयी अपार प्रेम होते. त्यांना ‘होलेय’ असे संबोधण्यास त्यांचा विरोध होता. अस्पृश्यांना शिवेबाहेर राहावे लागे. या पध्दतीला त्यांचा विरोध होता. ज्यांच्या विषयी आदर वाटे असे अनेक संत अस्पृश्य होते. बसवेश्वरांनी जातिसंस्थेविषयी खूप विचार केला होता. व्यवसायांमुळे विविध जातींचे अस्तित्वा निर्माण होते, असा निष्कर्ष त्यांनी काढला. वेदाध्यना करणारा ब्राह्मन, कापड करणारा विणकर, जोडे
//7//
बनविणारा चांभार-वास्तविक सगळे समानच होते. बसवेश्वर म्हणत कोणीही आपल्या आईच्या मानातून जन्मलेला नाही. त्यामुळे भारतातच अशी अस्पृश्यता आहे, जगात का नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कल्याण शहराबाहेरच्या अस्पृश्य वस्तीतील अनेक जण वीरशैव झाले होते. त्या वस्तीमधे जाणाऱ्या रस्त्याचे नाव बसवेश्वरांनी ‘दिव्या माहेश्वरांचा’ रस्त असे ठेवले. माहेश्वरचा अर्थ “शिवाचा भक्त” असा होतो. या रस्त्याने बसवेश्वर नेहमी जात. एकदा त्या रस्त्याने जातांना त्यांनी शिवाचे स्तुतिगान ऐकले. चौकशी केल्यावर सम्बोली नागीदेव उर्फ शिवनागय्या हा अस्पृश्य शिवस्तुती गात होता, हे त्यांना कळले. शिवनागप्पाच्या शिवभक्तीमुळे आणि आचरणामुळे स्पृश्यांचा त्यांच्यावर राग होता. तरीही बसवेश्वरांनी शिवनागप्पांच्या घरी जाऊन त्याच्याबरोबर जेवण केले. त्यांच्या विरोधकांनी ही बातमी हेरांकरवी राजा बिज्जळाकडे पोहचवली. राजा पारंपरिक धर्माचा पुरस्कार करणारा, वर्णधर्म मानणारा होता. त्यामुळे राजा आणि बसवेश्वरांमधील दरी वाढत गेली.
बसवेश्वर गरीबांचे कैवारी होते. त्यांनी गरीब भक्ताला वाईट रितीने वागवू नका, त्याला बोलावून त्यांचे आदरातिथ्या करा, असे सांगितले. दारिद्रया काही पाप नाही आणि गरीबांना न्यूनगंडाची बाधा होण्याची काही एक गरज नाही, असेही ते म्हणत असत. लोकांच्या अस्मितेला त्यांनी आवाहन केले. दरिद्री लोकांच्या घरी जाण्याला करचले नाहीत. ते त्यांच्यात आत्मियतेने मिसळत आणि त्यांच्या सोबत भोजनही करत. आपल्या सर्व शिष्यांनी व्यवसाय करावेत, खूप परिश्रम करावेत आणि सुखी व्हावे, असे त्यांना मनोमन वाटे. त्यांची ही विचारसरणी म्हणजे आधुनिक समाजवादच होय. व्यवसाय करुन अर्थार्जन करावे म्हणून त्यांनी ‘कायाक’ नावाच्या तत्वाचीही शिकवण दिली. कायाकचा शब्दशा: अर्थ देहाशी निगडित ते ते सर्व असा होतो. कायाक म्हणजे शरीर किंवा देह. बसवेश्वरांच्या मते प्रत्येकाने कोणता तरी व्यवसाय केला पाहिजे. व्यक्तीने समाजावर बोजा टाकू नये, अशी त्यांची या मागे भूमिका होती.
स्त्रियांचा सामाजिकदृष्ट्या दर्जा कनिष्ठ होता. त्यांची सर्व कृतीशीलता घरापुरती मर्यादित होती. त्यामुळे बसवेश्वरांनी स्त्रियांना या जोखडातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. स्त्रियांना त्यांचे न्याय हक्क मिळवून दिले. त्यांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली. स्त्रियांना चांगले शिक्षण, मतस्वातंत्र्य, सभेतील मोकळीक, चर्चेत सहभाग आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आध्यात्मिक उपासनेची परवानगी देण्याचा आग्रह धरला. स्त्रियांना विविध व्यवसाय करण्यासाठी आणि कुटुंबासाठी कमाई करण्याकरिता बसवेश्वरांनी प्रोत्साहन दिले. गीत आणि काव्यरचनेतून स्वत:ला व्यक्त करण्याची मुभा दिली.
जातीव्यवस्था संपवण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले पाहिजे, जातीतच विवाह करण्याची प्रथा थांबवली पाहिजे आणि स्त्रियांना स्वत:चा जोडीदार निवडण्याची मुभा दिली पाहिजे, असे मत

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विसाव्या शतकात मांडले, पण बसवेश्वरांनी बाराव्या शतकात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. स्वत: तसेच वर्तन केले. बसवेश्वरांनी अस्पृश्यांच्या मुलींशी उच्च वर्णियांनी विवाह करावा, असे प्रतिपादन केले. त्यामुळे परंपरावादी आणखीणच भडकले. पारंपरिक धर्म शास्त्राप्रमाणे वर्णाश्रम धर्माचे संरक्षण करणे राजकर्तव्यच होते. त्यात असाही नियम होता की राजाने वर्ण संकर होणार नाही म्हणजे जाती-जातीत विवाह होणार नाहीत, याचीही खबरदारी घेतली पाहिजे. बसवेश्वारांच्या शत्रुंनी राजा बिज्जळ यांना याबाबत चांगलेच पटवून देऊन बसवेश्वरांचा बंदोबस्त करण्यास त्यांचे मन वळवले. कल्याणलाच अल्लय्या आणि मधवय्या नावाचे दोन शिवभक्ता राहत होते. अल्लय्या अस्पृश्या तर मधुवय्या जन्माने ब्राह्मन होता. दोघांची घनिष्ठ मैत्री होती; आणि ते बसवेश्वरांचे शिष्या होते. मधुवय्याच्या मनात आपली मुलगी अल्लय्याच्या मुलाला द्यावी असे होते. त्यास बसवेश्वरांची परवानगी होती. त्यामुळे सगळा बसवेश्वर समाज आनंदित झाला होता. प्रतिगाम्यांनी सवर्ण अस्पृश्यांकडे जेवतात असे ऐकले आणि पाहिले होते, परंतु आता विवाहापर्यंत या गोष्टी गेल्याचे पाहुण त्यांचा राग अनावर झाला. याबाबत राजा बिज्जळकडे तक्रार केली. राजाने विवाह थांबविण्याचे आदेश दिले. पण काहीही झाले तरी विवाह होणारच असे म्हणून त्या दोघांनी राजाची आज्ञा ठोकारली. बिज्जळ राजाने संतापाने त्यांचे डोके फोडले आणि दोघांचेही डोळे काढले. या घटनेने वीरशैव समाजात विद्रोहाचे वादळ उठले. यातून बिज्जळच्या राज्यात यादवीला सुरूवात झाली. बिज्जळचा वध करण्यात आला. बसवेश्वरांना कल्याण सोडून कुडल संगमावर जावे लागले आणि 1167-68 मध्ये कूडलसंगमावर बसवेश्वरांनी अखेरचा श्वास घेतला.
बसवेश्वरांनी केलेल्या सामजिक सुधारणा आश्चर्य वाटतील इतक्या नव्या होत्या. त्यांनी प्रतिपादलेले आदर्श प्रत्यक्ष वागणुकीत रुपांतरीत झाले होते. सर्वसामान्या लोकांना त्यांची शिकवण समाजली होती आणि ते त्यांचे अनुयायी झाले होते. याचा पुरावा उपलब्ध आहे. भारताच्या इतिहासात एवढ्या मोठ्या स्वरुपाची धार्मिक चळवळ बुध्दानंतर दिसत नाही. कर्नाटकच्या इतिहासतही हीच पहिली क्रांतीकारी चळवळ झाली, असेच म्हणावे लागेल.
यशवंत भंडारे
‘सुगत’ त्रिमुर्ती नगर, प्लॉट क्रं.29/30,
न्यू पहाडसिंगपूरा, हनुमान टेकडीजवळ, औरंगाबाद
मो.क्र. 9860612328
ई-मेल-yeshwantbhandare1964gmail.com
-*-*-*-*-*-*



  वृत्‍त क्र. 378   आज संध्याकाळी प्रचार तोफा थंडावणार   बुधवारी सायंकाळी 6 वाजेपासून शांतता कालावधीला सुरुवात होणार   जिल्ह्यामध...