Sunday, May 14, 2017

रोजगार व स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी
सहकारी संस्थांचे योगदान मोलाचे - महादेव जानकर  
नांदेड, दि. 14 :- रोजगार व स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी विविध विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकारी संस्थाचे योगदान मोलाचे आहे. पारदर्शक काम करणाऱ्या सहकारी संस्थांच्या पाठीमागे राज्य शासन सक्षमपणे उभे राहील, अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली.
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. नांदेडच्या धर्माबाद शाखेचे उद्घाटन श्री. जानकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी हैद्राबाद तेलुगू राष्ट्र समिती एम.एल.सी. अध्यक्ष आ. हणमंतराव मैनापल्ली, तेलंगणा शिवसेना प्रदेश अध्यक्ष दिनेशजी तिवारी, निजामाबाद शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर तिवारी, गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीचे संस्थापक आ. हेमंत पाटील, अध्यक्षा सौ. राजश्री हेमंत पाटील, येताळा जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. पद्मारेड्डी येताळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार, हैद्राबाद येथील नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.  
धर्माबाद येथील गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी शाखेच्या पहिल्या दिवशी जमा केलेले ठेवीदाराचे आभार मानून जानकर पुढे म्हणाले की, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, मत्सव्यवसायच्या विविध विकास योजनेचा महिला बचगटांना लाभ होण्यासाठी सहकारी पतसंस्थेचे सहकार्य महत्वाचे आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांनी पतसंस्थेच्या व्यवहारात सहभाग घ्यावा. घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर करावी. या भागातील शेतकऱ्यांचा मुलगाही मोठा उद्योजक झाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाच्या विविध विकास योजना आहेत, त्याचा अधिक लाभ घ्यावा. राज्य शासनाने अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले आहेत. जनावरांच्या उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
तत्पुर्वी जानकर यांनी धर्माबाद येथील लघु पुश चिकित्सालयास भेट देवून नवीन बांधकामाबाबत माहिती घेवून संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.  
सर्वसामान्य नागरिकांना सहज कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी प्रयत्नशील राहील. सोसायटीच्या विविध शाखेतून नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत, असे आ. हेमंत पाटील यांनी सांगितले.
गरजुंना संस्थेतून नियमानुसार कर्ज वाटप केले जात आहे. येत्या काळात पाच राज्यात संस्थेच्या शाखा सुरु होणार आहे. समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीचे ध्येय समोर ठेवून संस्था कार्यरत आहे. त्यामुळे व्यवसाय, व्यापार करणाऱ्यांना आर्थिक हातभार संस्थेच्या माध्यमातून मिळत आहे. धर्माबाद शाखेत ठेवीदारांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रक्कम याच भागातील नागरिकांना कर्ज रुपात वितरीत केली जाईल, असेही संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्री पाटील यांनी सांगितले.
समारंभाचे अध्यक्ष आ. हणमंतराव मैनापल्ली, दिनेश तिवारी, माजी नगराध्यक्ष विश्वनाथ पाटील बन्नाळीकर यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविकात व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी संस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षीत राहतील याची काळजी घेतली जाणार आहे, असे सांगून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यवतमाळ शाखेच्या उपसरव्यवस्थापक वंदना नखाते (ठवकर) यांनी आभार मानले.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शाखाधिकारी निलेश लाखकर, प्रशासकीय अधिकारी सुरेखा दवे, परिसरातील संस्थेचे ठेवीदार, व्यापारी, महिला बचत गटाच्या सदस्या, कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...